Saturday, November 27, 2010

कंचनीचा महाल - (rasagrahaN सदोष असू शकते.

कंचनीचा महाल - कवी ना. घ. देशपांडे

तोच तो इच्छित दीपक दिसला काठाशी हासत आले
क्षितीजा पासून क्षितीजा पर्यंत आकाश कंपीत झाले
अहंते वर या ओवाळले रे मी पाचही हे प्राण माझे
भरून छातीत नेत्रांत धावले उन्मत्त उधाण माझे
ताठर नाचत होता रे माझ्या या भुवयां वरती माज
माथीचा चंद्रही बघत होता हा बुडून गेलेली सांज
तोच ती आली रे हाक त्या पोराची उभार ते हात होते
दाबून घट्ट हे अधर तरी मी समोर पहात होते
आतले कठीण्य तनूत आले रे तोच अन झाले मी काळी
कठीण पणा हा गोठून पडले दगड बनून खाली


माझ्या या महाला मधल्या प्रत्येक कमानी कमानी पुढे
वार्‍याच्या झुळूकी वरुन आत्ताच वाजत गेले रे चुडे
प्रत्येक रंगीत हातात होती रे उज्ज्वल दीपाची थाळी
प्रत्येक कपाळी शोभत होती रे मोत्यांची सुंदर जाळी
तुपाचे दीपक जाळून होता मी चांदवा धूसर केला
जेथून निघाले त्याच या भूमीचा संपूर्ण विसर केला
बाभळी वरल्या फुलांत आता मी सोसते पाऊस ऊन
आज मी आहे रे पाषाण होते मी कोमल कुसुमाहून
फुलले परंतु वाहिले नव्हते चंपक पुष्प मी ताजे
कळस लावून रितेच ठेविले मानस मंदिर माझे

खालच्या मैदानावर मी रात्रीत दुरात ऐकते टापा
ऐकते तमात एकाकी गुराच्या या भिंती जवळ धापा
कमानी कमानी मधून सारखा हुंकार देतात वारे
पाहत जातात भकास निळ्या या आकाशा मधले तारे
आतून लागते आच पण हा दगड पेटत नाही
सगळे पारखे दयेचे मायेचे कुणीच भेटत नाही
अंधार्‍या रात्रीत ती सारी नगरी तमात बुडते बाई!
मिटल्या दातांच्या ओसाड भिंती या बोलत नाहीत काही
पुनव येताच वासनामय मी दगडा मधून येते
महाला भोवती चांदण्या खालती तेच ते फेर मी घेते

कशी रे रंगवू आज मी राजसा ते चित्र पुसट लेले
पुनव रात्रीत माझे हे हिंडते मानस विस्कटलेले
दक्षिण दाराच्या बाहेर पडले अनेक शतके अशी
पाषाण मय हे अचल जिवीत सोशीत आहे मी पिशी
पडल्या शीळेला भेटला नाही रे कुणीच रंक वा राजा
मीच रे ऐकला मानव वांछेचा सुदीर्घ निःश्वास माझा
दोनच उरले मजले खालचे कुणीच नाही रे गडी
एकही कवाड नाही रे आणखी एकही नाही रे कडी
घुमतो पारवा झोंबतो गारवा वार्यात वाजते शिटी
सहस्त्र भुजंग बळाने राजसा एकच घाल रे मिठी !
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~`

कंचनीचा महाल - (rasagrahaN सदोष असू शकते.)

हे काव्य भाव अथवा रूपक काव्य भासत नाही तर एक कथा यात जाणवली.ही कथा विश्लेषण,संदेश देत नाही तर वाचकाला एक अनुभूती देते त्या नायिकेची.
जी नायिका मला भेटली ती शतकांशतकांपासून कशाच्या तरी शोधात आहे.....
स्वप्नांचा महाल साकारतांना.....तो हरवून गेल्याने ती गोठून गेली आहे अगदी शिळेप्रमाणे आणि ह्याच महालाची कथा ती सांगते आहे,कवीने आजुबाजूची स्थित्यंतरे रेखाटलेली असल्याने आपणाला हिची व्यथा महाल साकारण्याची किती काळापसून अतृप्त असेल असा भास होतो.
नायिकेने परंतू हा बंदिस्त दगडी स्वप्नांचा महाल आपलासा केला आहे ही पुढील ओळींतून दिसते.

जेथून निघाले त्याच या भूमीचा संपूर्ण विसर केला
बाभळी वरल्या फुलांत आता मी सोसते पाऊस ऊन
आज मी आहे रे पाषाण होते मी कोमल कुसुमाहून
फुलले परंतु वाहिले नव्हते चंपक पुष्प मी ताजे
कळस लावून रितेच ठेविले मानस मंदिर माझे

ती अजूनही वाट पाहतेय .....ती व्यक्ती आहे?....ती इच्छा आहे?.....तो सूड आहे?.....तो मृत्य़ू नाही अथवा तिला या कथेचा शेवट करायचा नाही...तर तिला हवाय आनंद,मोकळा श्वास जो तिची यात साथ देईल मुक्ती नाही तर साथ देईल.......
माझ्या दृष्टीने तो आनंद म्हणजे हरवत चाललेली 'माणुसकी'असा घेते...कारण हीच मिठी कोण त्याही काळात जन माणसाला..संस्कृतीला तारू शकते.

पडल्या शीळेला भेटला नाही रे कुणीच रंक वा राजा
मीच रे ऐकला मानव वांछेचा सुदीर्घ निःश्वास माझा
दोनच उरले मजले खालचे कुणीच नाही रे गडी
एकही कवाड नाही रे आणखी एकही नाही रे कडी
घुमतो पारवा झोंबतो गारवा वार्यात वाजते शिटी
सहस्त्र भुजंग बळाने राजसा एकच घाल रे मिठी !

म्हणून शेवटची ओळ पंच लाईन आहे...जो वाचक ह्याचा जो अनुभव वा अर्थ घेईल त्या नुसार याचे आकलन होईल
भक्त्ती.

No comments: