Saturday, June 20, 2026

हंपीचा ध्यास-४ (कृष्ण मंदिर,लक्ष्मी नरसिंह,बदवी लिंग ,प्रसन्न विरुपाक्ष मंदिर )


कृष्ण मंदिर
दोन्ही गणेशाचे दर्शन घेऊन मग आम्ही पुढे चालू लागलो.ऊन बरेच होते तेव्हा नारळ पाणीने जीवाला थंडावा देत.कृष्ण मंदिरापाशी पोहचलो.त्याचे ते भव्य ,ऊंचच ऊंच  प्रवेशद्वार विजयनगर साम्राज्याची भव्यता पुन्हा अधोरेखित करत होती .उदयगिरी किंवा उत्कल (सध्याच्या ओरिसा राज्यात) या पूर्वेकडील राज्याच्या विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी राजा कृष्णदेवराय यांनी १५१३ मध्ये त्यांचे मंदिर बांधले.
मंदिरात स्थापित केलेली मुख्य मूर्ती बाळकृष्णाची होती. ही मूर्ती आता चेन्नई येथील राज्य संग्रहालयात आहे.इ..स. १५१३ च्या एका शिलालेखात नमूद केल्यानुसार, या मोठ्या आणि सुशोभित, पूर्वेकडे तोंड असलेल्या मंदिराची प्रतिष्ठापना कृष्णदेवराय यांनी उदयगिरी (ओरिसा) येथून आणलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीने केली होती. पंचायतन शैलीत दोन आवारांसह बांधलेल्या या मंदिर संकुलात गर्भगृहासह मुख्य मंदिर, एक प्रवेशकक्ष, स्तंभयुक्त मंडप आणि सभागृहे, एक देवी मंदिर आणि अनेक उप-मंदिरे आहेत. याव्यतिरिक्त, मुख्य मंदिराच्या आग्नेय दिशेला एक स्वयंपाकघर आणि नैऋत्येकडील पहिल्या आवारात एक स्वतंत्र भांडार आहे. भव्य मनोरा असलेले पूर्वेकडील प्रवेशद्वार हे विजयनगर वास्तुकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. मंदिराच्या भिंतींवर भगवान कृष्णाची पौराणिक कथा असलेल्या भागवताचे आणि त्या काळातील जीवनाचे चित्रण कोरलेले आहे. महामंडपाच्या स्तंभांवर भगवान विष्णूच्या दहा अवतारांची शिल्पे आहेत. मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडे ५०० मीटरच्या रस्त्यावरील बाजाराकडे आणि त्यानंतर एका पवित्र पाण्याच्या तलावाकडे घेऊन जाते. मंदिराच्या आवारात स्थापित केलेल्या एका मोठ्या शिलालेखावर या मंदिराची कथा आणि विजयाची कहाणी कोरलेली आहे.

आत शिरलो तर दोन्ही भिंतींवर कोरलेली शिल्पे दिसली अगदी वरपर्यंत साधारण १२- १५ फूटापर्यंत हे कोरीव शिल्पे होती.मी यापूर्वी कृष्णमंदिरातील शिल्पाविषयी एक व्हिडियो पाहिला होता.त्यानुसार यावरील विष्णूचे दशावतार शोधू लागले .अगदी पायथ्याशी लतासुंदरीचे आखीव शिल्प आणि त्या तिने हातात धरलेल्या लता -वेली वरपर्यंत गेल्या आहेत आणि त्यावर गोलात हे दशावतार कोरलेले आहेत.

अगदी वर पाहिल्यावर या द्वाराच्या छतावर एक अनोखे कोरीवकाम आहे-चंद्रग्रहणाचे दृश्य.!त्यात चंद्रातील ससा आणि त्याच्याकडे सरकत येणारे राहू-केतू स्वरूपातील दोन सर्प दाखवले आहेत. हे चंद्रग्रहणाच्या पौराणिक कल्पनेचे कलात्मक चित्रण मानले जाते.या शिल्पात राहू हा सर्पाकार अथवा राक्षसी आकृतीच्या स्वरूपात दाखवला असून तो चंद्राला गिळण्याचा प्रयत्न करताना दिसतो. 
भारतीय पुराणांनुसार समुद्रमंथनाच्या वेळी अमृतपान केलेल्या राहूचे डोके भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने छाटले. मात्र अमृत पिल्यामुळे तो अमर झाला. तेव्हापासून सूर्य आणि चंद्र यांनी त्याची तक्रार केल्याचा राग मनात धरून राहू वेळोवेळी त्यांना गिळण्याचा प्रयत्न करतो. सूर्य किंवा चंद्र काही काळ झाकले गेले की ग्रहण होते, अशी लोकमान्यता होती.ही कथा केवळ धार्मिक श्रद्धेपुरती मर्यादित नाही तर  ती सामान्य जनतेला आकाशातील घटनांचे स्पष्टीकरण देणारी लोकप्रिय आख्यायिका होती. त्यामुळे मंदिरातील शिल्पकारांनी ग्रहणासारख्या खगोलीय घटनेलाही कलात्मक रूप दिले.

समोर असणारे भव्य प्रांगण आणि मुख्य मंदिर आणि उपमंदिरांचे आकर्षक छोटी छोटी कलात्मक शिखरे पाहून मी थक्क झाले.अशी तीन उपमंदिरे या मंदिराच्या प्रांगणात आहेत.

आता बाहेर पडतांना लक्ष समोरच्या गोपुराच्या शिल्पाकडे जाते .गुलाबी-लालसर रंगाचे हे काम अतिशय मोहक आहे,परंतु हवामान, वर्षाव आणि जीर्णता यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे, तरीही उरलेले भाग अद्भुत आहेत.त्यामुळेच ASI कडून तिथे डागडुजीचे  काम सुरु असून अनेक रॉड लावले होते .कृष्ण मंदिराच्या गोपुरावर मूळत विष्णूचे विविध अवतार,कृष्णलीला,देव-देवता,गंधर्व,अप्सरा.याली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे 'युद्धप्रसंग' दाखवले आहे .
ही शिल्पे स्टुको (stuscco)शिल्पे आहेत.स्टुको ही चुनखडी, वाळू, गूळ, वनस्पतीजन्य घटक, शंखचूर्ण आणि कधी कधी अंड्याचा बलक किंवा इतर बांधणीकारक पदार्थ यांचे मिश्रण करून तयार केलेली सजावटीची कलाशैली आहे. या मिश्रणापासून मूर्ती, नक्षीकाम, देव-देवतांच्या आकृती आणि वास्तूवरील अलंकार घडवले जातात.दगड कोरून शिल्प तयार करण्याऐवजी स्टुकोमध्ये ओल्या मिश्रणाला आकार देऊन आकृती तयार केली जाते. नंतर ते वाळल्यावर त्यावर रंगकामही केले जात असे.

हे शिल्प दृश्य कृष्णदेवरायांच्या १५१२-१५१३ च्या कालिंग/उदयगिरी/ओडिशा मोहिमेतील विजय दर्शवते. त्यांनी गजपती राजा प्रतापरुद्रावर विजय मिळवला.हे शिल्पे त्या विजयाचे स्मारक आहेत.काही संशोधकांना हे फक्त "विजय" नव्हे तर युद्धातील हानी आणि मानवी भावनाही दाखवतात असे वाटते . उदाहरणार्थ, सैनिकांच्या चेहऱ्यांवरील विविध भाव.
हा लेख नक्की वाचा,हा युद्ध प्रसंगाचे खूप सुंदर वर्णन आहे .
https://www.spottedowlets.com/2019/11/krishna-temple-in-hampi-decoding…

या युद्धप्रसंगात योद्धे ढाली घेऊन.घोडे काही जोमदार, काही राजाच्या समोर,हत्ती युद्धरथ किंवा सैन्याच्या रांगेत(हे मला ओळखता आले नाही)
सैन्याची रचना, राजा कृष्णदेवराय  एका घोड्यावर स्वार दिसत आहेत,काही वर्णनांनुसार गंभीर चेहऱ्याने दिसत आहे. सैनिकांच्या चेहऱ्यावरील भाव काही हसरे, काही गंभीर किंवा दुखी दिसत आहेत.युद्धातील हालचाल, पडलेले सैनिक इत्यादी दाखविले आहे .व दुसऱ्या बाजूला गोपुरावर भगवान कृष्णाच्या लीला  संबंधित शिल्प आहेत.

 

आता आम्ही बाहेर पडलो.मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडे ५०० मीटरच्या रस्त्यावरील बाजाराकडे आणि त्यानंतर एका पवित्र पाण्याच्या तलावाकडे घेऊन जाते.हा खरं तर मुख्य रस्ता -सपाट असा -रथांचा रस्ता होता, जो एकेकाळी 'कृष्ण बाजार' म्हणून ओळखल्या जाणाऱ्याबाजाराकडे जात असे. अनेक मंडपात बाजारातील दुकाने होती.












कृष्ण मंदिराच्या दक्षिणेला,२०० ते ३०० मीटर अंतरावर विशाल एकाश्म नरसिंह मूर्ती आहे. दक्षिण भारतात  नरसिंह पूजा खूप प्रचलित आहे.हंपीतील ही मूर्ती त्या परंपरेचे एक प्रमुख उदाहरण आहे.ही मूर्ती कृष्णदेवराय १५२८ ई. यांच्या काळात, कृष्णभट्ट या शिल्पकाराने एकाच दगडातून घडवली. विजयनगर साम्राज्याच्या शिखर काळातील ही एक अत्यंत महत्त्वाची कलाकृती आहे. कृष्णदेवराय वैष्णव भक्त होते आणि नरसिंह हे धर्मरक्षणाचे प्रतीक मानले जाते.मूर्ती सुमारे २२ फूट उंच असून ती एका अखंड ग्रॅनाइट शिळेतून घडवण्यात आली आहे.

विशेषतः होयसळ आणि विजयनगर स्थापत्यामध्ये उग्र नरसिंह, योग नरसिंह आणि लक्ष्मी नरसिंह ही रूपे प्रामुख्याने दिसून येतात.

१. उग्र नरसिंह 
उग्र नरसिंह हे विष्णूच्या क्रोध आणि धर्मसंरक्षणाचे प्रतीक मानले जाते. या रूपात नरसिंह हिरण्यकश्यपूचा वध करताना दाखवला जातो. सिंहमुख, मोठे गोल डोळे, बाहेर आलेले दात, फुगलेल्या आयाळीचे केस आणि अनेक हातांत शस्त्रे अशी त्याची वैशिष्ट्ये असतात.
बहुतेक मंदिरांच्या बाह्य भिंतींवर, द्वारशाखांवर किंवा मंडपातील शिल्पपट्टिकांमध्ये हे रूप कोरलेले आढळते. यामागील संकल्पना अशी की मंदिरात प्रवेश करणाऱ्या भक्तांचे आणि देवालयाचे संरक्षण करणारा उग्र देव बाह्य भागात असावा.

२. योग नरसिंह
योग नरसिंह हे पूर्णतः वेगळे आणि शांत स्वरूप आहे. हिरण्यकश्यपूचा वध झाल्यानंतर क्रोध शांत होऊन नरसिंह योगध्यानात स्थिरावला आहे, अशी या रूपामागील कल्पना आहे.या मूर्तीमध्ये पद्मासन किंवा योगासन,गुडघ्यांभोवती योगपट्टा,ध्यानस्थ मुद्रा,प्रसन्न किंवा गंभीर मुखमुद्रा अशी वैशिष्ट्ये दिसतात.
होयसळ स्थापत्यातील अनेक नरसिंह मंदिरांच्या गर्भगृहात योग नरसिंहाची प्रतिष्ठा करण्यात आली आहे. भक्तांना भय नव्हे तर आध्यात्मिक शांततेचा अनुभव देणे हा यामागील उद्देश असावा.

३. लक्ष्मी नरसिंह
हे नरसिंहाचे सर्वाधिक लोकप्रिय आणि भक्तिपर स्वरूप आहे. या रूपात लक्ष्मी देवी नरसिंहाच्या मांडीवर किंवा शेजारी बसलेली असते.लक्ष्मीच्या उपस्थितीमुळे उग्रतेचे रूपांतर करुणा आणि संरक्षणात होते. त्यामुळे ही प्रतिमा शक्ती आणि सौम्यता यांचा सुंदर समन्वय दर्शवते.

हंपीतील नरसिंह कोणत्या प्रकारचा?

लक्ष्मी नरसिंह ह्या हंपीतल्या मूर्तीबाबत एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागते. आज ती 'उग्र नरसिंह' म्हणून प्रसिद्ध असली तरी ती हिरण्यकश्यपूचा वध करणारी पारंपरिक उग्र नरसिंह प्रतिमा नाही. त्या मूर्तीमध्ये राक्षस नाही, युद्धदृश्य नाही आणि वधप्रसंगही दाखवलेला नाही.

मूळतः ती लक्ष्मी नरसिंह प्रतिमा होती. नरसिंहाच्या मांडीवर लक्ष्मी बसलेली होती. कालांतराने ताळिकोटच्या युद्धानंतर झालेल्या विध्वंसात लक्ष्मीचा बहुतांश भाग तुटून गेला.यामुळे मूर्तीचे मूळ सौम्य रूप हरवले आणि आज ती अधिक उग्र वाटते.  लक्ष्मीची मूर्ती नष्ट झाल्यामुळे आज केवळ विशाल सिंहमुखी नरसिंह दिसतो आणि त्याच्या तीव्र मुखमुद्रेमुळे त्याला "उग्र नरसिंह" म्हणण्याची प्रथा पडली.म्हणून शिल्पशास्त्रीय दृष्टीने हंपीची मूर्ती लक्ष्मी नरसिंह आहे, तर लोकप्रिय पर्यटनपर भाषेत ती उग्र नरसिंह म्हणून ओळखली जाते. हा फरक समजून घेणे अभ्यासकांसाठी महत्त्वाचे आहे.
यात अजून एक भर पडली ती ही मूर्ती योग नरसिंहही  आता भासते.हंपीतील लक्ष्मी नरसिंह मूर्तीचा योग पट्टा हा मूर्तीच्या सर्वात चर्चित आणि लक्षात येणारा भाग आहे.योग पट्टा हा योगासनातील स्थिरतेसाठी वापरला जाणारा पट्टा आहे. तो गुडघ्याभोवती किंवा पायांना बांधला जातो, जेणेकरून दीर्घकाळ ध्यान/योग मुद्रेत बसता येते.ही मूर्ती क्रॉस-लेग्ड (पद्मासनासारखी) योग मुद्रा मध्ये आहे. पाय ओलांडलेले, हात गुडघ्यांवर आणि गुडघे एकत्र धरलेले दिसतात.१९८० च्या दशकात ASI ने जीर्णोद्धार केला.नवीन गुडघे आणि दगडी योग पट्टा जोडला गेला. हा पट्टा गुडघ्यांना एकत्र बांधतो.
यामुळे मूर्ती आता योग नरसिंह किंवा लक्ष्मी नरसिंह म्हणून ओळखली जाते. काहीजण या जीर्णोद्धाराला वादग्रस्त मानतात, कारण मूळ उग्र रूप बदलले गेले.


परंतु या एकाच मूर्तीने तिन्ही उग्र,योग,लक्ष्मी नरसिंह म्हणून ओळखले जाणे खरंच खूप अद्भुत योगायोगच म्हणावे लागेल :)
नरसिंह हा विष्णूचा चौथा अवतार जो मानवी शरीर + सिंहमुख दर्शवतो.जिथे मानव = बुद्धी ,सिंह = शक्ती म्हणजेच शक्ती आणि विवेक यांचा समतोल सृष्टीत दाखवतात .मूर्ती पाहताक्षणी सर्वांत प्रथम लक्षात येतात बाहेर आलेले  डोळे आणि उग्र चेहरा. सिंहाचे केस, तीक्ष्ण दात आणि भयावह अभिव्यक्तीमुळे तिला उग्र नरसिंह म्हणून ओळखले जाते. पण त्याच वेळी ती योगासनात बसलेली आहे. गुडघ्याभोवती योग पट्टा (बांधलेला, जो दीर्घकाळ ध्यानस्थ राहण्यासाठी वापरला जातो.
मूर्ती अदिशेषनागाच्या तीन वळणांवर बसलेली आहे. शेषनागाचे सात फणे  डोक्यावर उभे राहून एक दिव्य छत्र तयार करतात.भारतीय तत्त्वज्ञानात शेष म्हणजे अनंत काळ,विश्वाचे आधारतत्त्व,ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणून ही मूर्ती केवळ देवप्रतिमा नसून "विश्वरक्षक" संकल्पना दर्शवते .मूळतः नरसिंहाच्या मांडीवर लक्ष्मीदेवी बसलेल्या होत्या आता केवळ तिचा एक हात कंबरेभोवती दिसतो. हात, अलंकार आणि लक्ष्मीची पूर्ण आकृती १५६५ च्या तालीकोटा युद्धानंतरच्या आक्रमणात नष्ट झाली, तरीही ही मूर्ती आजही उभी आहे जणू इतिहासाला आव्हान देत!
जर तुम्हाला आवारात आत जाण्याची संधी मिळाली (मला मिळाली नाही,मूर्ती सामान्यांसाठी कारणपूर्णपणे बंदिस्त करण्यात आली आहे ), तर तुम्हाला देवीचा हात विष्णूच्या पाठीवर आलिंगन अवस्थेत विसावलेला दिसतो,असे सांगितले जाते .




बदवी लिंग 


नरसिंहापासून काही पावलांवरच शेजारीच बदवीलिंग आहे.हे हंपीतील सर्वात मोठ्या शिवलिंगांपैकी एक आहे-सुमारे ३ मीटर (९-१० फूट) उंच!!
एकाच दगडातून कोरलेले ह्या लिंगावर तीन डोळ्यांची नक्षी स्पष्ट दिसते.मंदिराचे गर्भगृह नेहमी पाण्याने भरलेले असते.ह्या शिवलिंगाचा पाया २ ते ३ फूट 
सतत पाण्यात  राहते. तुंगभद्रा नदीतून एक छोटी कॅनॉल ने पाणी मंदिरात आणले जाते, ज्यामुळे वर्षभर पाणी आटत नाही. गर्भगृह नेहमी पाण्याने भरलेले असते.पूजा करणारे भक्त किंवा पुजारी पाण्यात चालत लिंगाजवळ जातात.

"बदवी" किंवा "बडाव" म्हणजे कन्नड भाषेत गरिब किंवा दरिद्री असा होतो.
कथेनुसार, हे लिंग एक गरिब शेतकरी स्त्री  ने आपल्या भक्तिभावाने बनवले किंवा बनवण्यास प्रेरणा/अर्थ साहाय्य दिले. तिच्या साध्या-सोप्या श्रद्धेमुळे हे नाव पडले. ही कथा हंपीच्या लोकपरंपरेत प्रसिद्ध आहे.

नरसिंह आणि बदवीलिंग शेजारीच का?हा प्रश्न अनेक संशोधकांना पडतो.वैष्णव आणि शैव परंपरा अनेकदा वेगळ्या मानल्या जातात.परंतु विजयनगरमध्ये दोन्ही परंपरांना समान महत्त्व होते.त्यामुळे नरसिंह  'विष्णू' आणि बदवीलिंग 'शिव' या दोन प्रतिमा एकत्र उभ्या राहून धार्मिक समन्वय दर्शवतात.

पुढच्या ठिकाणाकडे आता चालू लागलो -प्रसन्न विरुपाक्ष मंदिराकडे ...रस्त्याच्या दोन्ही बाजूला केळीच्या बागा होत्या ,त्यामुळे चालायला मजा येत होती .पण नंतर लक्षात आले कि मंदिराकडचे अंतर खूप आहे ,तेव्हा रिक्षा करून तिकडे गेलो.


प्रसन्न विरुपाक्ष मंदिर 



प्रसन्न विरुपाक्ष मंदिर हे हंपीतील सर्वात रहस्यमय आणि अनोख्या मंदिरांपैकी एक आहे. याला सामान्यतः भूमिगत शिवमंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर विजयनगर काळात बांधले गेले असून, जमिनीच्या पातळीपेक्षा काही मीटर खाली स्थित आहे. मंदिराकडे जाताना अनेक पायऱ्या उतरत खाली जावे लागते .मग चारी बाजुंना चिरेबंदी दगडांसारखे दगड वापरून भिंती बांधल्या आहेत .यामुळे हे ठिकाण अजूनच गूढ वाटते.

आजच्या जमिनीच्या पातळीवरून पाहिले तर मंदिराचे छप्पर जवळजवळ जमिनीच्या समांतर दिसते, परंतु मुख्य सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह खालच्या स्तरावर आहेत. यामुळे संपूर्ण मंदिर जमिनीत दडलेले असल्याचा भास होतो, म्हणूनच त्याला भूमिगत मंदिर म्हणतात.
या मंदिराचे आणखी एक गूढ वैशिष्ट्य म्हणजे त्यातील पाणी. गर्भगृह आणि आतील भाग वर्षभर पाण्याने वेढलेले असतात. पावसाळ्यात पाण्याची पातळी आणखी वाढते. काही संशोधकांच्या मते हे पाणी तुंगभद्रा नदीशी जोडलेल्या जलमार्गांमुळे येत असावे, मात्र याचे नेमके कारण आजही निश्चितपणे ज्ञात नाही. पाण्यात बुडालेले असलेले शिवलिंगाचे दर्शन येथे खास अनुभवास येते.
हे मंदिर विजयनगर स्थापत्यशैलीचे असले तरी हंपीतील इतर भव्य मंदिरांपेक्षा वेगळे आहे. येथे साधे दगडी स्तंभ, अलंकरणाचा कमीतकमी वापर, प्रशस्त महामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी साधी आणि प्रभावी रचना दिसते. हजारराम मंदिर किंवा कृष्ण मंदिरातील सूक्ष्म नक्षीकाम येथे आढळत नाही. त्यामुळे काही अभ्यासकांच्या मते हे मंदिर राजघराण्याच्या खासगी पूजेसाठी वापरले जात असावे.
या मंदिराबाबत एक रोचक बाब म्हणजे ते जवळजवळ चारशे वर्षे माती आणि गाळाखाली पूर्णपणे झाकले गेले होते. १९८० च्या दशकात उत्खनन आणि संवर्धनाच्या कामांदरम्यान ते पुन्हा प्रकाशात आले.
प्रसन्न विरुपाक्ष नावाचे विशेष महत्त्व आहे. हंपीतील मुख्य विरुपाक्ष मंदिर हे भव्य सार्वजनिक तीर्थक्षेत्र आहे, तर हे भूमिगत मंदिर शिवाच्या प्रसन्न, शांत आणि कृपाळू स्वरूपाला समर्पित मानले जाते.
आता आम्ही पुन्हा मुख्य विरुपाक्ष मंदिराकडे निघालो ....

-भक्ती

 

संदर्भ

 https://www.spottedowlets.com/2019/11/krishna-temple-in-hampi-decoding.html

https://hampi.in/krishna-temple

https://kevinstandagephotography.wordpress.com/2015/04/18/krishna-temple-hampi/

https://nanchi.blog/2020/03/27/lakshmi-narasimha-statue-hampi-monolith-statueplaces-to-visit-in-hampi/

Tuesday, June 16, 2026

तुर्की येथील ऐतिहासिक स्थळांशी निगडित वेब सीरीज-द गिफ्ट आणि राईज ऑफ एम्पायर्स: ऑटोमन

 #तुर्की येथील ऐतिहासिक स्थळांशी निगडित वेब सीरीज



माझ्यासारख्या इतिहासाची आवड असणाऱ्या सामान्य मुलीच्या बकेट लिस्टमध्ये इराणच्या ऐतिहासिक आणि आकर्षक स्थळांनंतर तुर्कीतील इस्तांबूल या शहराचे नाव आवर्जून येते. प्रत्यक्षात तिथे जाण्याची संधी कधी मिळेल याची शाश्वती नसली, तरी आजच्या डिजिटल युगात मनाने जगभर भटकण्याची सुविधा आपल्याला मिळाली आहे. अशाच मनस्वी प्रवासात मला तुर्कीच्या इतिहास, पुरातत्त्व आणि संस्कृतीशी संबंधित दोन उत्कृष्ट नेटफ्लिक्स वेब सीरीज पाहायला मिळाल्या. एक म्हणजे रहस्य, अध्यात्म आणि कल्पनारम्यतेचा संगम असलेली द गिफ्ट (Atiye) आणि दुसरी म्हणजे इतिहासाला जिवंत करणारी राईज ऑफ एम्पायर्स: #ऑटोमन


द गिफ्ट (#Atiye) ही तुर्कीतील जगप्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ गोबेकली टेपेच्या पार्श्वभूमीवर आधारित फँटसी-मिस्ट्री मालिका आहे. इस्तांबूलमध्ये राहणारी आतीये नावाची चित्रकार मुलगी तिच्या आयुष्यात अचानक समोर आलेल्या एका गूढ चिन्हामुळे प्राचीन इतिहास, स्वतःचा भूतकाळ आणि विश्वाच्या रहस्यमय शक्तींशी जोडली जाते. Şengül Boybaş यांच्या Dünyanın Uyanışı या कादंबरीवर आधारित असलेल्या या मालिकेत रहस्य, आध्यात्मिकता, विज्ञान आणि मानवी भावविश्व यांचे अनोखे मिश्रण पाहायला मिळते. तीन सीझन्स आणि चोवीस भागांमध्ये उलगडणारी ही कथा केवळ मनोरंजन करत नाही, तर गोबेकली टेपेसारख्या प्राचीन स्थळाविषयी कुतूहलही निर्माण करते. प्राचीन संस्कृतींचे संकेत, प्रतीके आणि मानवाच्या अस्तित्वाविषयीचे प्रश्न यांना आधुनिक कथानकाशी जोडण्याचा या मालिकेचा प्रयत्न प्रभावी वाटतो.


दुसरीकडे राईज ऑफ एम्पायर्स: #ऑटोमन ही मालिका इतिहासप्रेमींसाठी पर्वणीच आहे. डॉक्युमेंट्री आणि नाट्यमय पुनर्निर्मिती  यांचा सुरेख संगम असलेल्या या मालिकेत ऑटोमन साम्राज्याच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या घटनांपैकी एक असलेल्या १४५३ मधील कॉन्स्टँटिनोपलच्या विजयाची कथा मांडली आहे. सुलतान मेहमेद दुसरा याने बायझंटाईन साम्राज्याची राजधानी जिंकण्यासाठी केलेली तयारी, विशाल तोफांचा वापर, नौकादलाला जमिनीवरून नेण्यासारख्या अभिनव लष्करी युक्त्या आणि निर्णायक युद्धांचे चित्रण अत्यंत प्रभावीपणे करण्यात आले आहे. दुसऱ्या सीझनमध्ये मेहमेद आणि व्लाद द इम्पेलर यांच्यातील संघर्ष दाखवण्यात आला आहे. इतिहासतज्ज्ञांच्या माहितीपूर्ण मुलाखती आणि नाट्यमय दृश्यांमुळे ही मालिका केवळ माहितीपर न राहता अत्यंत रंजकही बनते.


ऑटोमन साम्राज्याची स्थापना उस्मान प्रथम याने इ.स. १२९९ मध्ये केली. पुढे मेहमेद दुसऱ्याने १४५३ मध्ये कॉन्स्टँटिनोपल जिंकून इतिहासात नवे पर्व सुरू केले. सुलतान सुलेमान द मॅग्निफिसंटच्या काळात हे साम्राज्य सर्वाधिक विस्तारले आणि अनेक शतकांपर्यंत युरोप, आशिया व आफ्रिकेच्या विस्तीर्ण प्रदेशांवर त्याचे वर्चस्व राहिले. अखेरीस १९२२ मध्ये ऑटोमन साम्राज्याचा अस्त झाला आणि आधुनिक तुर्कस्तानाचा उदय झाला.


या दोन्ही मालिका तुर्कीच्या समृद्ध वारशाचे दोन वेगळे पैलू दाखवतात. 'द गिफ्ट' प्राचीन पुरातत्त्व, गूढता आणि आध्यात्मिकतेच्या माध्यमातून कल्पनाशक्तीला चालना देते, तर 'राईज ऑफ एम्पायर्स: ऑटोमन' इतिहासातील महत्त्वपूर्ण घटनांना जिवंत स्वरूपात आपल्या समोर उभे करते. इस्तांबूल आणि तुर्कीची भटकंती प्रत्यक्षात शक्य नसली तरी या मालिका पाहताना मन मात्र त्या भूमीत सहज पोहोचते. त्यामुळे माझ्या बकेट लिस्टमध्ये इस्तांबूलसोबत या दोन्ही वेब सीरीजनाही विशेष स्थान आहे.

https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi3oa-D003zuw2NDHl__rG_mafi1BTwl5-gMDib1eA4T6_2xaXnzG31qva9kCiUa4UoVSgUS8Py8Oi07dYZ-LbFDxwJJsfPw04rs3PhMcMlywgn2rjJrTAJous86E9DlKVDTMIOMxM77f6d21vJD00FO4OswvxnAc5CnYjX9cgE0lGY4h-Jb3lcR3y2ioVX/s1536/ChatGPT%20Image%20Jun%2017,%202026,%2011_45_34%20AM%20(1).png

Friday, June 12, 2026

खान्देश स्पेशल दुधातलीशेवभाजी

 खान्देशी_स्पेशल_दुधातली_शेवभाजी



अमुक तमुकचा खान्देशी special भाग पहिला. त्यात दुधातली शेवभाजी याचा खुप कौतुक झालं. मी शेवभाजी खुप भारी तयार करते. असा माझा समज होता 

पण धुळे, जळगाव इथल्या ढाबा स्पेशल शेवभाजी तीही दुधातली यां बाबत नविनच समजलं.

दुधातले अधिक तर गोड पदार्थ खाल्ले जातात.


आज काहीतरी खास, वेगळं आणि खान्देशी स्टाईलचं बनवायचं!


 मनात थोडी धाकधूक होती, कारण दुधातली शेवभाजी मी पहिल्यांदाच स्वतःहून तयार करत होते.


 नगरच्या चाफे फरसाणची खुसखुशीत, ताजी शेव, दूध, कांदा-टोमॅटो, आलं-लसूण आणि खान्देशी मसाले आणले. याशिवाय मी यात काजू पेस्ट, कसुरी मेथी आणि फ्रेश क्रीमही घातली. डिश आणखी रिच आणि मलईदार व्हावी म्हणून!



सर्वप्रथम लसूण, आलं पेस्ट, टमाटर कांदा खोबरे घेतलेली प्युरी यांची फोडणी केली. मसाला भाजत असताना खान्देशी खास सुगंध सगळ्या घरभर दरवळू लागला.शेवभाजीत इलायचीने खुप छान चव येते म्हणाल तर हिच यातली प्रमुख सामग्री आहे.

 मग त्यात काजू पेस्ट घातली त्यामुळे रंग आणि चव दोन्ही अप्रतिम येतात. फ्रेश क्रीम घालून सर्व मिश्रण तेल सुटू पर्यन्त परतले. 


त्यानंतर हाताने चुरलेली कसुरी मेथी टाकली. 


मग आला मुख्य टप्पा भरपूर दूध(4 कप )ओतलं! दूध उकळू लागल्यावर नगरच्या चाफे फरसाची ती खुसखुशीत शेव हळूहळू टाकली. शेव मुरत असताना शेवटी परत कसुरी मेथी भुरभुरली. वाह! रंग गुलाबी-केसरी झाला, घट्टपणा अगदी मलईदार दिसू लागला आणि सुगंध तर असा दरवळला!!


शेव पूर्ण मऊ झाली होती. दूध, क्रीम, काजू आणि मसाल्याचा रस तिच्यात चांगलाच भिनला होता.कसुरी मेथी भुरभुरवली. पहिला चमचा घेतला आणि मी स्वतःच, अरे वा! म्हणून टाकलं.


खुसखुशीत शेव, खान्देशी तिखट-गोड-खारट चव, काजू-क्रीममुळे आलेला मलईदारपणा आणि कसुरी मेथीचा हलका सुगंध सगळं एकत्र इतकं अप्रतिम!!

माझ्या काही टिप्स

• मीठ शेवटीच टाका नाहीतर दूध फाटेल.

• काजू पेस्ट आणि फ्रेश क्रीममुळे डिश खूप रिच आणि लक्झरी वाटते,मात्र त्याचं प्रमाण जास्त ठेवू नका.

• कसुरी मेथी शेव शिजल्यावर शेवटी टाका, म्हणजे तिचा सुगंध टिकून राहतो.

• नगरच्या चाफे फरसाची शेव नक्की वापरून पाहा 😊ती खुसखुशीत, चवदार आणि शिजल्यानंतरही उत्तम लागते.

• जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल, तर खान्देशी मसाल्यात लाल तिखटाचं प्रमाण वाढवा.

-भक्ती

https://youtube.com/shorts/TPDer0BWZ04?si=uYx4h4r_oy27jKMN

Wednesday, June 3, 2026

श्री त्रिशुंड मयूरेश्वर गणपती,पुणे

 श्री त्रिशुंड मयूरेश्वर गणपती,पुणे 


त्रिशुंड्या गणपती हे पुण्यातील सोमवार पेठेत असलेले एक मंदिर आहे. पुण्यातील सर्व गणपती मंदिरांमधले शिल्पकलेने नटलेले हे सर्वोत्तम देऊळ आहे. हे मंदिर गिरी गोसावी पंटाचे आहे. ह्या तीन सोंड्या गणपतीच्या देवळातल्या मूर्तीच्या खाली तळघरात मंदिराचे संस्थापक महंत श्री दत्तगुरू गोस्वामी महाराज यांची समाधी आहे. मूर्तीवर अभिषेक केला की, तळघरात असलेल्या समाधीवर ते जल ओघळते.मंदिरात एक भूमिगत तळघर आहे, जे वर्षातून फक्त एकदाच  (गुरुपौर्णिमेला) भक्तांसाठी उघडले जाते.हे तळघर पाण्यात बुडलेले असते आणि त्यात विशेष पूजा-अर्चा होते.

 

हे मंदिर गिरिगोसावी पंथीयांच्या तंत्रमार्गीयांचे असल्याने सर्वसामान्य भाविकजन इथे फिरकत नव्हते. मंदिरात सध्याची मुख्य मूर्ती त्रिशुंड गजाननाची असली तरी शिवमंदिर उभारण्याची मूळ कल्पना असावी.

 


इतिहास

शाहाजीराजांनी इ.स. १६०० मध्ये शाहापुरा पेठ वसवली.पुढे थोरले बाजीराव पेशव्यांनी १७३५ मध्ये या भागाचा विकास करून त्याला सोमवार पेठ असे नाव दिले.

हे मंदिर भीमगीरजी गोसावी महंतानी २६ ऑगस्ट १७५४ रोजी बांधून पूर्ण केले. त्यांचे वंशज इंदूरला घामपूर गावात राहत. सरकारी नोंदीत इ.स. १९१७ पर्यंत मंदिराला मालकच नव्हता. मंदिरासमोर असलेल्या झाडाची एक फांदी जवळच्या नेर्लेकर यांच्या घरावर गेली म्हणून त्यांनी पालिकेत तक्रार केली; तेव्हा पालिकेने चौकशी केली. मंदिराचे मालक इंदूरला गोसावी नावाचे गृहस्थ असल्याचे समजले. त्यांना इंदूरहून बोलावून आणले. त्यांनी झाड समूळ तोडून टाकले. नंतर मंदिराच्या पुढच्या भागात लाकडाची वखार चालू केली; तर मंदिराच्या सभामंडपाला कोळशाचे गोदाम केले. पुढे ही वखार कुलकर्णी नावाच्या मित्राला देऊन ते इंदूरला निघून गेले. १९४५ साली वहिवाटदार म्हणून कैलासगीर गोसावींचे नाव लागले. पण, कागदोपत्री पुरावा देता न आल्याने त्यांचा मंदिरावरचा हक्क गेला. सन १९८५ साली मंदिराच्या देखभालीसाठी एक ट्रस्ट स्थापन झाला.


मंदिराची मांडणी करताना वर मंदिर व खाली तळघर, समाधी व हठयोग्यांची पाठशाळा चालावी, अशी योजना होती. सर्व दिनचर्येची सोय तळघरात होती. प्रातर्विधीसाठी नागझरीजवळ जाण्याची भुयारी पाऊलवाट होती. विहिरीच्या भिंतीत पाण्याच्या पातळीवर एक मोठी खोली होती. तेथे तंत्रसाधकांच्या प्रमुख गुरुवर्यांसाठी स्नानाचा संगमरवरी चौरंग होता.


तळघरातील खोल्यांना दरवाजे व खोल्यांच्या भिंतींना कोनाडे आहेत. खोलीच्या छताला दगडात दोन खाचा असून त्या खोबणीतून दोराच्या साह्याने छताला उलटे टांगून घेऊन पेटत्या निखाऱ्यावर काही ठराविक वनस्पतींचा धूर करून तो तोंडावर घ्यावयाचा, हा धूर साधनेचा विधी असे.


 मंदिराच्या गर्भगृहातील तीन शिलालेखांपैकी उल्लेखानुसार , येथील बांधकाम २६ ऑगस्ट १७५४ रोजी धामपूर (इंदूरजवळ) येथील भीमजीगिरी गोसावी यांनी सुरू केले. हे मंदिर १६ वर्षांनंतर, १७७० मध्ये पूर्ण झाले.मंदिराची वास्तुकला राजस्थानी, माळवा आणि दक्षिण भारतीय शैलींचे मिश्रण आहे. एकेकाळी गर्भगृहावर एक उंच शिखर होते, जे काही काळापूर्वी नष्ट झाले, किंवा कदाचित ते कधीच पूर्ण झाले नाही.


मंदिराच्या बाहेरील भिंतींवर अत्यंत सुंदर कोरलेली शिल्पे आहेत.ज्यातलं सर्वात आश्चर्यकारक शिल्प आहे एका गेंड्याचे !!पुण्यात तर गेंडे नव्हते तर हे चित्रण का केले गेले ?



एक गैंडा लोखंडी साखळदंडांनी बांधलेला आहे. ब्रिटिश सैनिक किंवा इंग्रज सैनिक त्याला नियंत्रित करत आहेत. काही शिल्पांमध्ये एकापेक्षा जास्त ब्रिटिश सैनिक दाखवले आहेत.

प्रतीकात्मक अर्थ असा आहे  किती गेंडा हा  आसाम ,बंगालचे प्रदेशाचे प्रतीकमानले गेले गैंड्याला साखळदंडांनी बांधणे याचा अर्थ  ब्रिटिशांनी बंगाल आणि आसामवर विजय मिळवल्याचे आणि नियंत्रण प्रस्थापित केल्याचे प्रतीक.हे शिल्प १७५७ च्या प्लासी युद्धानंतरच्या ब्रिटिश विजयाचे ऐतिहासिक चित्रण मानले जाते.ज्या खाली दोन हत्तीची झुंज दाखविली आहे .जे भारतीय सत्ता अंतर्गत एकमेकांशी लढत आहेत हे दाखवायचे आहे का ??या शिल्पावरच सुरेख कोरलेले देवकोष्टक कोरलेले आहे ,ज्यावर अप्रतिम मोर रचना दाखवल्या आहेत.

स्तंभांवर साखळदंड, घंटा आणि भारवाहक यक्ष यांची सुंदर नक्षी आहे.प्रवेशद्वाराजवळ ऊंच  द्वारपालांची शिल्पे आहेत.

मंदिराच्या बाहेरील व आतील दोन द्वारशाखावरील ललाटबिंब हे सर्वार्थाने सुबक आणि कोरीव लेणे आहे जी पाहत राहावे असे आहे .

१.बाहेरील द्वार 

येथे सर्वात वरती शेषशायी विष्णू आहे .तर गजांत लक्ष्मीचे चित्र आहे.मकरमुखातून निघालेले तोरण आहे .तीन मोर आहेत,ज्यापैकी मधल्याने पिसारा फुलवला आहे  वानर शिल्पमाला आहे .तसेच एक अद्भुत गजव्याल आहे जो दुर्मिळ आहे.तसेच विठ्ठल रुक्मिणी ,विष्णू ,राम यांचे शिल्प आहे .









२.सभामंडप 

येथील द्वारशाखेवरील पट्टीवरील गजांत लक्ष्मीचे शिल्प स्पष्ट पाहता येते .तसेच येथून आत प्रवेश करताना भाविकांच्या डोक्याचा स्पर्श गणेशयंत्राशी होईल अशा प्रकारे ते कोरले आहे .





३.गर्भगृह 

येथे ललाटबिंबावरील मनुष्यरूपी शिल्पात शिव आहे ,ज्याचा मांडीवर एका बाजूला शक्ती (बाजूला सिंह वाहन दिसते )तर दुसर्या बाजूला गंगा असावी (वाहन नंदी दिसतो ).




त्रिशुंड गणपती मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर एकूण तीन शिलालेख आहेत. हे शिलालेख मंदिराच्या इतिहास, बांधकाम आणि धार्मिक संदर्भाबद्दल महत्त्वाची माहिती देतात.




१. पहिला शिलालेख (संस्कृत भाषा, देवनागरी लिपी)-“पुण्यनगरीपुरी” -पुण्याचे प्राचीन नाव पुण्यनगरी किंवा पुणेश्वर दर्शवतो.

यात मंदिराच्या बांधकामाची तारीख स्पष्टपणे नमूद आहे-२६ ऑगस्ट १७५४ (मंदिर बांधकाम सुरू किंवा स्थापना).मंदिर रामेश्वर (शिव) मंदिर म्हणून सुरू झाल्याचे उल्लेख.|| श्री गणेशाय नमः || श्री || सारखे मंगलाचरण.


२. दुसरा शिलालेख (संस्कृत भाषा, देवनागरी लिपी)यात भगवद्गीतेतील श्लोक कोरलेला आहे (सामान्यतः प्रारंभिक श्लोक).मंदिरातील आध्यात्मिक आणि वेदिक संदर्भ दर्शवतो.


३. तिसरा शिलालेख (फारसी भाषा) मंदिर गुरुदेव दत्तात्रेय यांचे असल्याचे उल्लेख.गोसावी संप्रदायाशी (दत्त परंपरा) संबंध दर्शवतो.


गर्भगृहातील गणपती मूर्ती 





या गणपतीचं मूळ नाव हे श्री त्रिशुंड मयूरेश्वर गणपती असे आहे . ही भारतातील एकमेव गणेश मूर्ती आहे ज्यात तीन सोंड (त्रिशुंड) आणि सहा हात आहेत.सामान्य गणपती उंदरावर (मूषक) बसतात, पण हे मोरावर (मयूर) बसलेले आहेत. यामुळे त्यांना मयूरेश्वर असेही म्हणतात.काळ्या बेसाल्ट दगड पासून कोरलेली मूर्ती.

मुख: एक मुख (एक चेहरा) आणि तीन सोंड आहेत.


उजवी सोंड ही  मोदकाच्या पात्राला स्पर्श करत आहे.मधली सोंड पोटावर किंवा शरीरावर रुळत आहे वा मोराला स्पर्श करत आहे .डावी सोंड ही  डाव्या मांडीवर बसलेल्या शक्ती देवी च्या हनुवटीला स्पर्श करत आहे(त्यामुळे हा तांत्रिक उच्छिष्ट गणेश असावा का ?). सहा हात असून ज्यात आयुधे आहेत.उजवा बाजू: अंकुश, त्रिशूल मोदकपात्र.डावा बाजू: परशू, पाश , आणि खालचा हात शक्ती देवीला आधार देत आहे. मोरावर आरूढ, शांत आणि शक्तिशाली मुद्रेत गणपती दिसत आहे .


या मूर्तीचा प्रतीकात्मक अर्थ असा लावता येतो की ,तीन सोंडा या तीन जग (भूलोक, स्वर्गलोक, पाताललोक) किंवा सृष्टी, पालन आणि संहार यांचे प्रतीक,वा भूत,वर्तमान,भविष्यकाळ , काहींनुसार त्रिगुण (सत्त्व, रज, तम) यांचे प्रतीक आहे .गणपती आरूढ असलेले मोर वाहन ब्रह्मांडाच्या विस्ताराचे किंवा सौंदर्य/ऊर्जेचे प्रतीक आहे .शक्ती आणि गणेश यांचा मिलाफ, तांत्रिक/हठयोगी परंपरेशी संबंध.

मूर्तीच्या मागे भिंतीवर शेषशायी विष्णू आणि गणेश यंत्र कोरलेले आहे.ही मूर्ती पेशवाई काळातीलआहे. मंदिर मूळतः शिव मंदिर म्हणून बांधले गेले होते, नंतर गणेश मूर्ती स्थापित झाली.

बाह्य प्रदक्षिणा मार्गात तीन भिंतीवर तीन विविध सहसा दुर्मिळ असे शिल्प आहेत.

दक्षिण भिंत शिल्प- नटराज 


शिवाचे नृत्यरूप (Cosmic Dance).हातात डमरू, अग्नी आणि विशिष्ट मुद्रा. विश्वातील सूक्ष्म ऊर्जा, काळ, कंपन आणि सृष्टी-संहार चक्र याचे हे प्रतीक आहे .


२. पश्चिम भिंत - लिंगोद्भव शिव 




शिव लिंगाच्या रूपात प्रकट होताना, ब्रह्मा (हंस रूपात) आणि विष्णू (वराह रूपात) त्यांचा शोध घेताना दाखवलेले.

ही कथा पुराणातील प्रसिद्ध आहे .शिव ही अनंत ऊर्जा आहे, ज्याची सुरुवात किंवा अंत सापडत नाही.

या मंदिरातील लिंगोद्भव शिल्प वैशिष्ट्यपूर्ण आणि गहन अर्थाने कोरलेले आहे.

कथा अशी आहे कि ,जेव्हा विष्णू आणि ब्रह्मा यांच्यात श्रेष्ठत्वासाठी संघर्ष झाला होता. येथे लिंगाच्या रूपात दर्शविलेल्या शिवाने (जरी कथेत तो कधीकधी ज्योत किंवा प्रकाशाच्या स्तंभाच्या रूपात दिसतो), त्यांना आपला उगम शोधण्याचे आव्हान दिले. विष्णूने वराहाचे रूप धारण केले आणि तळाशी शिवाच्या पायांचा शोध घेऊ लागला, तर ब्रह्माने हंसाचे (हंसाचे) रूप धारण केले आणि शिवाच्या मस्तकाचा शोध घेण्यासाठी उंच आकाशात उड्डाण केले.


ब्रह्मा आणि विष्णू दोघेही आपल्या शोधात अयशस्वी झाले आणि भगवान शिवाकडे परत आले. विष्णूने जाहीर केले की त्याला भगवान शिवाचे चरण सापडले नाहीत आणि त्याने आपल्या अहंकाराबद्दल पश्चात्ताप व्यक्त केला. तथापि, ब्रह्माने दावा केला की त्याने भगवान शिवाचे मस्तक पाहिले होते आणि पुरावा म्हणून त्याने केतकीचे फूल, तुळस आणि एक गाय साक्षीदार म्हणून आणली.भगवान शिवाने घोषित केले की अनंततेच्या मर्यादा मोजणे अशक्य आहे. त्यांनी शाप दिला की पृथ्वीवर ब्रह्मदेवाचे मंदिर असणार नाही आणि त्यांच्या पूजेसाठी केतकीचे फूल व तुळस कधीही वापरली जाऊ नये. भगवान शिवाने गाईलाही शाप दिला की, तिने तोंडाने खोटे बोलल्यामुळे तिचे तोंड यापुढे अपवित्र राहील. आज शिवरात्रीचा अपवाद वगळता, शिवपूजेमध्ये केतकीच्या फुलांचा वापर मोठ्या प्रमाणावर निषिद्ध मानला जातो.



३. उत्तर भिंत - हरिहर 



एकाच मूर्तीत विष्णू (हरि) आणि शिव (हर) यांचा अर्ध-अर्ध मिलाफ दिसतो .दोन्हीही हातात शिवाचे डमरू आणि विष्णूचे आयुध आहेत .शिव आणि विष्णू एकच आहेत (अद्वैत).हे शिल्प शिव-विष्णू ऐक्य दर्शवते. “शिवाय विष्णुरूपाय, विष्णवे शिवरूपिणे...”

मागेले बाजूला छताकडे पाहातांनाही अश्व,व्याल /सिंह ,हत्ती कोरलेले दिसतात जे आता जीर्ण होत आहेत .


मंदिराचा आत सम्राट सरोदे यांनी मंदिर रचनेचा लावलेला एक माहिती फलक दिसला .जो बराच रोचक आहे .जो वैज्ञानिक, ज्योतिषीय आणि आध्यात्मिक अर्थाने लिहिले आहे. यात वेद, शिल्पशास्त्र, नक्षत्र आणि वास्तुशास्त्र यांचा मेळ सांगितला आहे.यातला क्रमांक १३ मुद्दा फारच वेगळा आहे .




क्रमांक १३ - सूक्ष्म ऊर्जा आणि स्थूल ऊर्जा (Subtle Energy and Gross Energy)

Energy = Natraj Shilp, M = Inner sculptures of Garbhgraha, C² = Lingodbhav Shilp

सविस्तर मराठी स्पष्टीकरण:


या शिल्पकलेत वैज्ञानिक सूत्र E=MC² (आइनस्टाइनचे ऊर्जा-सूत्र) याचाच आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रीय अर्थ सांगितला आहे.


E (Energy) = नटराज शिल्प

नटराज मूर्ती ही सूक्ष्म ऊर्जा (Subtle Energy) चे प्रतीक मानली आहे.

नटराज हे काल, कंपन, ऊर्जा आणि सृष्टीच्या गतिमान स्वरूपाचे प्रतीक आहे. त्यांचे नृत्य हे विश्वातील सतत चालणारे ऊर्जेचे रूपांतर दर्शवते.

M (Mass) = गर्भगृहातील अंतर्भागातील शिल्पे

गर्भगृहाच्या आत असलेल्या विविध शिल्पांना स्थूल पदार्थ (Gross Matter) किंवा स्थूल ऊर्जा चे प्रतीक मानले आहे.

म्हणजे मंदिरातील दृश्य स्वरूपातील देवता, आकृत्या यांच्यात स्थूल ऊर्जा आहे.

C² = लिंगोद्भव शिल्प

पश्चिम भिंतीवरील शिव लिंगोद्भव शिल्प हे C² (प्रकाशाच्या वेगाच्या वर्गाचे) प्रतीक आहे.

लिंगोद्भव शिल्प अनंत सूक्ष्म ऊर्जेचे (Infinite Subtle Energy) प्रतीक मानले जाते.


संपूर्ण समीकरण:

E = MC²सूक्ष्म ऊर्जा = स्थूल पदार्थ × (प्रकाशाचा वेग)²मंदिरातील शिल्परचनेत हे सूत्र दृश्य रूपात मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. म्हणजे


नटराज = ऊर्जा

गर्भगृहातील शिल्पे = पदार्थ (Mass)

लिंगोद्भव = C² (अनंत गती/ऊर्जेचे रूप)


बाकीचा फलक मराठीत -


क्र.विषय (Topic)माहिती (Information)
1मुख्य देवतात्रिशुंड गणपती (तीन सोंड असलेले अनोखे गणपती)
2“गणपती” चा सामान्य अर्थत्रिशुंड गणपती (तीन सोंड असलेले अनोखे गणपती)
3“गणपती” चा वैदिक अर्थसर्व प्राणिमात्रांचा स्वामी (सर्व गटांचा प्रमुख)
4गणपतीचा वैज्ञानिक अर्थविश्व हे असंख्य सूक्ष्म, घनाकृती ऊर्जा-भरलेल्या अणूंपासून बनलेले आहे. सर्व गटांचा स्वामी गणपती आहे.
5त्रिशुंडचा अर्थवास्तुकलेच्या दृष्टीकोनातून विश्वाच्या तीन आयामांचे प्रतीक – लांबी, रुंदी, उंची (३ आयाम)
6विश्वाचा चौथा आयाम (४थे dimension)नटराज मूर्ती (काळ / ऊर्जा / कंपन / निरपेक्ष काळ)
7दक्षिण भिंतीवर नटराज आणि हातातील प्रतीकशिव नृत्य = निरपेक्ष काळ, डमरू → ॐ ध्वनी, अग्नी → ॐ प्रकाश
8गर्भगृहातील विष्णू मूर्तीस्थूल जगाचे (Gross world) प्रतीक
9गर्भगृहातील विष्णू मूर्तीच्या वरची यंत्रवरच्या त्रिकोण = पुरुष/अग्नी/उर्ध्व ऊर्जा, खालचे त्रिकोण = स्त्री/प्रकृती/अधो ऊर्जा. दोन्ही केंद्रस्थानी एकत्र होणे म्हणजे सृष्टीची उत्पत्ती.
10ब्रह्मदेवाचे पाच चेहरेपाच वेदांचे प्रतीक – प्रणव, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद (स्रोत: श्रीमद् भागवत महापुराण, स्कंद)
11शिव लिंगोद्भव शिल्पअनंत सूक्ष्म ऊर्जेचे प्रतीक (सूक्ष्म ऊर्जा)
12पश्चिम भिंतीवरील लिंगोद्भव शिल्पाची गुप्त कथाप्रणव वेदाचे चार भाग – ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद (स्रोत: श्रीमद् भागवत महापुराण, अध्याय ९, अध्याय १४, श्लोक ४८)
13सूक्ष्म ऊर्जा आणि स्थूल ऊर्जाऊर्जा = नटराज शिल्प, M = गर्भगृहातील अंतर्भागातील शिल्पे, C² = लिंगोद्भव शिल्प
14उत्तर भिंतीवरील हरिहर शिल्पE = MC²
15मोरावर गणपतीमोर = ब्रह्मांडाच्या विस्तारित रूपाचे प्रतीक. गणपती मोरावर बसणे म्हणजे विश्वातील सर्व ऊर्जा-घनाकृती (कॉस्मिक क्यूब्स) सर्व दिशांनी विस्तार पावत आहेत.
16मंदिराचे निर्मातेभीमजीगिरी गोसावी महाराज यांचा नक्षत्र = मूळा
17गर्भगृहातील देवतेचा नक्षत्रत्रिशुंड गणपती - शततारका (संदर्भ: डॉ. गणपती शास्त्री - “Who Created God”)
18कार्तिकेय देवतेचा नक्षत्रविशाखा नक्षत्र
19पुण्याच्या नावाचा नक्षत्रउत्तर फाल्गुनी नक्षत्र
20गर्भगृहाची लांबी व रुंदी८'२"–११/१६ × ८'२"–११/१६
21अंगुलानुसार गर्भगृहाचा परिमिती२८७ किष्कु अंगुल
22गर्भगृहाचा नक्षत्रअश्विनी (भगवान कार्तिकेय आणि दत्तात्रेय यांना अनुकूल)
23गर्भगृहाचा वारशनिवार (भयंकर)
24गर्भगृहाची रासवृश्चिक रास
25गर्भगृहाच्या ऊर्जेचे आयुष्य (Life Span)बांधकामाच्या वर्षापासून ४९० वर्षे
26हस्तानुसार गर्भगृहाचा परिमिती१२ किष्कु हस्त (परिमिती)
27ऊर्जेची दिशा४ (कुत्रा) → संघर्ष
28वारमंगळवार → आर्थिक नुकसान
29निष्कर्ष (यादीप्रमाणे)या मंदिराचे मापदंड भगवान मुरुगन (कार्तिकेय) आणि दत्तात्रेय यांच्या नक्षत्राशी अधिक जुळते.
30सुधारणेचा सल्ला२८३ किष्कु अंगुल परिमिती गणपतीसाठी अधिक शुभ आहे.



संदर्भ -https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0


https://kevinstandagephotography.wordpress.com/2020/06/04/trishund-ganpati-temple-pune-trishunda/


https://youtu.be/Cw1BRT7jqU4?si=-02MrQZWgC7evug0


https://youtu.be/MorEQTQnlbA?si=MTlsqDGsWJT9cz6M


Friday, May 29, 2026

बिजापूर डायरी- लेखिका - डॉ. ऐश्वर्या रेवडकर

 बिजापूर डायरी

लेखिका - डॉ. ऐश्वर्या रेवडकर


विकसित भारताची चमकदार प्रतिमा आपण नेहमी पाहतो. मोठमोठी शहरे, आधुनिक सुविधा, वेगाने धावणारे जीवन आणि विकासाच्या गप्पा. पण या सगळ्याच्या पलीकडे अजूनही एक भारत असा आहे, जो जंगलात हरवलेला आहे. जिथे आजही रस्ते, आरोग्यसेवा, शिक्षण आणि सुरक्षित आयुष्य या मूलभूत गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो. छत्तीसगडमधील बस्तर विभागातील बिजापूर हा असाच एक दुर्गम, नक्षलवादाच्या सावटाखाली जगणारा भाग. या भागात एक तरुण स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर म्हणून पोहोचते.बस्तर विभागातील बिजापूर, दंतेवाडा, नारायणपूर आणि सुकमा या जिल्ह्यांतील सकारात्मक बदलांविषयीची लेखमालिका डॉ. ऐश्वर्या यांनी साधना साप्ताहिकासाठी लिहिली होती. त्याच लेखांतुन पुढे तिच्या अनुभवांतून जन्माला येते ती “बिजापूर डायरी”.
याआधीही डॉ. ऐश्वर्या यांनी सर्च, स्पर्श आणि आरोही या संस्थांमार्फत वंचित समाजासाठी स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून सेवाकार्य केले होते.
डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांनी लिहिलेली ही डायरी केवळ एका डॉक्टरच्या अनुभवांची नोंद नाही, तर ती बस्तरच्या माणुसकीची, संघर्षाची आणि आशेची कहाणी आहे. इथल्या आदिवासी जीवनाचे वास्तव, त्यांच्या वेदना, निसर्गाशी असलेले त्यांचे नाते, त्यांच्या डोळ्यांतील भीती आणि तरीही न हरवणारी जगण्याची जिद्द या पुस्तकातून अत्यंत संवेदनशीलपणे समोर येते.
पुस्तकातील अनेक प्रसंग मन हेलावून टाकतात. गर्भवती स्त्रिया अनेक किलोमीटर चालत, कधी जंगलातून जीव धोक्यात घालून रुग्णालयात पोहोचतात. काही वेळा त्यांची अवस्था इतकी गंभीर असते की जगण्याची आशाच उरत नाही. पण अशा परिस्थितीतही डॉक्टर म्हणून डॉ. ऐश्वर्या शांतपणे, संयमाने आणि कौशल्याने उपचार करत राहतात. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात निर्माण होणारा विश्वास पुस्तकात अत्यंत हळुवारपणे उमटतो.
या भागातील वास्तव फक्त दारिद्र्याचे नाही, तर सततच्या संघर्षाचे आहे. एका बाजूला नक्षलवादी, दुसऱ्या बाजूला पोलीस आणि प्रशासन यांच्या संघर्षात सामान्य आदिवासी माणूस भरडला जातो. संशय, भीती, असुरक्षितता आणि हिंसा या वातावरणातही इथली माणसे जगण्याचा प्रयत्न करत राहतात. तरीही या पुस्तकात निराशेपेक्षा आशेचा सूर अधिक जाणवतो.
डॉ. ऐश्वर्या यांनी फक्त समस्याच मांडलेल्या नाहीत, तर या भागात काम करणाऱ्या सकारात्मक व्यक्तींची ओळखही करून दिली आहे. बारसूरमधील गोडबोले दांपत्य, शिक्षणासाठी झटणारे कार्यकर्ते, मुलांच्या भविष्यासाठी सुरू असलेले “बचपन बनाओ” अभियान, खेळातून मुलांना नवी दिशा देणारी बिजापूर स्पोर्ट्स अकादमी, सेंद्रिय शैलीच्या शेती प्रसारासाठीचा भूमगादी प्रकल्प, पर्यटनासाठी झटणारे निसर्गप्रेमी जीतसिंह आर्य,आदिवासी संस्कृती जपणारे विविध उपक्रम या सगळ्यांमुळे बस्तरचा एक वेगळाच चेहरा समोर येतो.
IAS अधिकारी डॉ. अय्याज तांबोळी, IPS अधिकारी डॉ. दिव्यांग पटेल यांसारखे अधिकारी केवळ प्रशासन चालवत नाहीत, तर लोकांच्या आयुष्यात बदल घडवण्याचा प्रयत्न करतात, हे पुस्तकातून जाणवते. पंचशील आश्रमसारख्या संस्थांमुळे आदिवासी मुलांना शिक्षणाची आणि सुरक्षित आयुष्याची नवी संधी मिळताना दिसते.
“बिजापूर डायरी”चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील माणुसकी. पुस्तक कुठेही कृत्रिम वाटत नाही. प्रत्येक अनुभव हा जगलेल्या वास्तवातून आलेला असल्याने तो थेट मनाला भिडतो. आदिवासी समाजाविषयी सहानुभूती निर्माण करतानाच त्यांच्या संघर्षशील वृत्तीबद्दल आदरही निर्माण होतो.
बस्तरमधील आदिवासी समाजाचे जीवन जंगलाशी घट्ट जोडलेले आहे. आदिवासी संस्कृती जंगलातील विविध झाडे, फुले आणि फळांपासून ते पारंपरिक पेये तयार करतात. महुआच्या फुलांपासून बनवलेले पेय हे त्यांच्या सण, समारंभ आणि धार्मिक विधींचा महत्त्वाचा भाग आहे. तसेच सल्फीच्या झाडातून मिळणारा गोड रस पौष्टिक आणि ऊर्जा देणारे पेय मानले जाते.
तेंदू, इमली आणि इतर वनफळांपासूनही स्थानिक पेये तयार केली जातात. ही पेये केवळ खाद्यसंस्कृतीचा भाग नसून आदिवासींच्या निसर्गाशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचे प्रतीक आहेत.
बिजापूर डायरीमध्ये इंद्रावती नदीचा उल्लेख केवळ एका नदीप्रमाणे नाही, तर बस्तरच्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून आलेला दिसतो. दाट जंगलातून शांतपणे वाहणारी इंद्रावती बस्तरच्या निसर्गसौंदर्याला अधिक गूढ आणि मोहक बनवते.
सलवा जुडूम चळवळीमुळे बस्तरचे सामाजिक जीवन हादरून गेले. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. तरीही इथला आदिवासी समाज पूर्णपणे कोसळला नाही. संघर्ष हा त्यांच्या जीवनाचा भागच बनून गेला आहे. निसर्गाशी एकरूप होऊन जगणाऱ्या या लोकांमध्ये जगण्याची विलक्षण ताकद आहे, हे पुस्तक वारंवार जाणवून देते.
' बिजापूर डायरी ' वाचताना आपण फक्त एका प्रदेशाची माहिती घेत नाही, तर एका वेगळ्या भारताला भेटतो. संवेदनशील मनाने समाजाकडे पाहण्याची दृष्टी हे पुस्तक देते. वंचितांसाठी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या संघर्षामागे किती माणुसकी आणि समर्पण दडलेले असते, याची जाणीव करून देणारे हे पुस्तक मनाला अंतर्मुख करते.
हे पुस्तक वाचून संपल्यावर बस्तर, तिथली माणसे आणि त्यांचे जगणे दीर्घकाळ मनात रेंगाळत राहते. 'बिजापूर डायरी' ही फक्त डायरी नसून, अंधारातही आशेचा दिवा जपणाऱ्या माणसांची जिवंत कहाणी आहे.