Sunday, September 13, 2026

वातापी गणपती


वातापी गणपती 


कर्नाटकातील बदामी प्राचीन काळातील वातापी. लालसर-तपकिरी वाळूच्या खडकांनी वेढलेली ही नगरी दख्खनच्या इतिहासात केवळ एक प्राचीन राजधानी म्हणून नव्हे, तर स्थापत्य, शिल्पकला, धर्म आणि सांस्कृतिक परंपरांचा एक अद्भुत संगम म्हणून उभी आहे. 



 

बदामी लेणी क्रमांक 1 शिल्पसमूहाकडे पाहताना जवळच दिसणाऱ्या गणेशाच्या उपस्थितीमुळे दृश्याला एक वेगळीच गोडी प्राप्त होते. पित्याचे नृत्य पाहणारा पुत्रही कल्पना मनात घेतली की या शिल्पाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो. ‘बाबा नाचत आहेत,मग आपणही नाचू शकतो का?’ अशी बालसुलभ उत्सुकता जणू या दृश्यातून जाणवते. अर्थात, ही शिल्पावर आधारित रसात्मक व्याख्या आहे. प्राचीन शिलालेख किंवा ग्रंथातून सिद्ध झालेली कथा म्हणून ती मांडलेली नाही . पण शिल्पाचा भावार्थ समजून घेण्यासाठी ती नक्कीच मोहक आहे.छोटा बालगणेश शिव नटराजप्रमाणे हाताची मुद्रा करत आहे.बालकांच्या ठायी उत्सुकतापूर्ण अनुकरण हा शिल्पात दाखवले आहे 

तर रावलफडी मधला बाळगणेश लाडू /मोदक पात्र हाती घेऊन खाण्याच्या मुद्रेत आहे.



बदामी या शिल्पवैभवाची आठवण झाली की पुढे येते ती एका दुसऱ्याच गणपतीची कथा वातापी गणपतीची.

‘वातापी गणपतिं भजेहम्’ हे नाव भारतीय शास्त्रीय संगीताच्या रसिकांना अपरिचित नाही. कर्नाटक संगीताच्या त्रिमूर्तींपैकी एक असलेल्या मुथुस्वामी दीक्षितरांनी रचलेली ही संस्कृत कृती तामिळनाडूतील तिरुवारूर जिल्ह्यातील तिरुचेंकाट्टनकुडी येथील वातापी गणपतीला समर्पित आहे. हंसध्वनी रागातील ही रचना आज कर्नाटकी संगीताच्या मैफलींमध्ये विशेष लोकप्रिय आहे.

अशी आख्यायिका आहे की, गजमुखसुराला मारल्याच्या पापाबद्दल गणपतीने येथे शिवाची पूजा केली . गजमुखसुराला शिवाकडून अमरत्वाचे वरदान मिळाले होते आणि त्याने मातंगपुरम येथील आपल्या स्वनिर्मित राजधानीतून मानवांना अतोनात दुःख दिले होते.

हत्तीने गणपती देवाचा सामना केला आणि आपल्या तुटलेल्या उजव्या सुळ्याने त्या राक्षसाचा पराभव केला. असे मानले जाते की, त्या राक्षसाने सांडलेल्या रक्तामुळे येथील जमीन लाल झाली आणि म्हणूनच तमिळमध्ये या जागेला 'तिरुचेनकाट्टनकुडी' असे नाव पडले . जरी येथील मुख्य देवता शिव असले तरी, गणपतीलाच प्रथम सन्मानाचे स्थान दिले जाते.

वातापी गणपतीची मूर्ती बदामीहून तिरुचेंकाट्टनकुडी येथे कशी पोहोचली, याभोवती एक प्रसिद्ध मौखिक परंपरा आहे. 

बदामी किल्ला परिसरातील ‘लोअर शिवालय’ हे सातव्या शतकातील एक सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे.आज जरी शिवालय ओळखले जाते तरी इथे पल्लव आक्रमणाआधीएक गणेश मूर्ती होती, होय तीच प्रसिद्ध 'वातापी गणपती '!!



इ.स. ६४२ च्या सुमारास पल्लव राजा नरसिंहवर्मन प्रथम याने चालुक्यांची राजधानी वातापीवर विजय मिळवला. त्याचा सेनापती परंज्योती याने युद्धानंतर वातापी येथून गणपतीची मूर्ती आणली आणि आपल्या जन्मभूमीत तिची प्रतिष्ठापना केली, असे सांगितले जाते. पुढे हाच परंज्योती ‘सिरुत्तोंडर’ या नावाने शैव नायनार संतपरंपरेत प्रसिद्ध झाला, अशी आख्यायिका आहे.

मात्र इतिहास आणि आख्यायिका यांची सरमिसळ होऊ नये. परंज्योतीने वातापीतून हीच गणपतीची मूर्ती आणली, याला ठोस समकालीन लिखित पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे ही कथा ‘मौखिक परंपरेनुसार’ किंवा ‘स्थानिक आख्यायिकेनुसार’ अशीच मांडणे अधिक शास्त्रीय ठरेल.



तिरुचेंकाट्टनकुडीतील उत्तरापतिश्वरस्वामी मंदिराशी वातापी गणपतीची परंपरा जोडलेली आहे. या मंदिरसमूहात गणपतीचे एक वैशिष्ट्यपूर्ण मानवी-मस्तक असलेले रूपही आढळते. त्यामुळे गणपतीच्या प्रतिमाविश्वातील विविधता आणि स्थानिक धार्मिक परंपरांचे परस्पर संबंधही येथे अभ्यासता येते.

दगडात कोरलेला नटराज, त्याच्या सान्निध्यातला गणेश आणि दूर तामिळनाडूत आजही घुमणारा ‘वातापी गणपतिम्’चा स्वर या सगळ्यांना जोडणारा धागा म्हणजे वातापी.

वातापी म्हणजे आजचे बदामी.ते दख्खनच्या स्मृतीत कोरलेले एक जिवंत सांस्कृतिक पर्व!!

‘वातापि गणपतिं भजेहम्’ ही मुथुस्वामी दीक्षितरांची संस्कृत कृती असून ती हंसध्वनी रागात रचलेली आहे. 

वातापि गणपतिं भजेहम्

वातापि गणपतिं भजेहम् ।

वरणास्यं वरप्रदं श्रीम् ॥

मी वातापीच्या गणपतीचे भक्तिभावाने स्मरण व भजन करतो.सुंदर, विशाल मुख असलेल्या, भक्तांना वरदान देणाऱ्या त्या मंगलमूर्तीची मी उपासना करतो.


भूतादि संसेवित चरणम् ।

भूत-भौतिक-प्रपञ्च-भरणम् ।

वीतरागिणं विनुतयोगिनम् ।

विश्वकारणम् ॥

ज्यांच्या चरणांची पंचमहाभूतांसह सर्व सृष्टीतील शक्ती उपासना करतात,जे या संपूर्ण भौतिक विश्वाचे पालन-पोषण करतात,जे आसक्तीपासून मुक्त आहेत आणि योगिजन ज्यांची स्तुती करतात,त्या गणेशाला मी वंदन करतो.जो या संपूर्ण विश्वाच्या अस्तित्वामागील कारणस्वरूप आहे.


पुरा कुम्भ-सम्भव मुनिवर

प्रपूजितं त्रिकोण-मध्यगतम् ।

मुरारि-प्रमुखाद्युपासितम् ।

मूलाधार-क्षेत्रस्थितम् ॥

ज्यांची पूर्वी अगस्त्य ऋषींनी भक्तिभावाने पूजा केली,जे त्रिकोणाच्या मध्यभागी विराजमान आहेत,ज्यांची विष्णूसह श्रेष्ठ देवताही उपासना करतात,आणि जे योगशास्त्रातील मूलाधारचक्रात अधिष्ठित आहेत,त्या गणपतीला मी नमन करतो.


परादि चत्वारि वागात्मकं ।

प्रणवस्वरूपं वक्रतुण्डम् ।

निरन्तरं निटिल-चन्द्रखण्डम् ।

निज-वामकर-विधृत-इक्षुदण्डम् ॥


जे परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी या वाणीच्या चार अवस्थांचे स्वरूप आहेत,जे पवित्र ॐकाराचे मूर्त स्वरूप आहेत,ज्यांची सोंड वक्र आहे,ज्यांच्या कपाळावर चंद्रकोरी शोभते,आणि ज्यांच्या डाव्या हातात ऊसाचा दंड आहे.अशा वक्रतुण्ड गणपतीला मी वंदन करतो.


करंबुज पाश बिजापुरं 

कलुषविदुरं भूतकरं हरादी 

गुरुगुहा तोषिता बिंबं 

हमसाध्वनी भूषित हेरंबम ।।५।।

आपल्या कमळधारी हातांमध्ये तो फास आणि लिंबू फळ धारण करतो. तो सर्व अशुद्धतेपासून दूर, सर्व जीवांचे साक्षात स्वरूप आहे. त्याची तेजस्वी प्रतिमा हर (शिव), इतर आणि गुरुगुह (स्कंद) यांना आनंदित करते. तो हेरंबा (दुर्बळांचा रक्षक) असून, हंसध्वनीच्या सुरावटीने अलंकृत आहे.

या स्तोत्रात गणपती केवळ विघ्नहर्ता किंवा वरदायक देवता म्हणून येत नाही. दीक्षितर गणपतीला विश्वाच्या मूलतत्त्वाशी जोडतात. मूलाधारचक्र, ॐकार, वाणीच्या चार अवस्था, पंचमहाभूते आणि विश्वाचे कारण या संकल्पनांमधून गणपतीचे एक अत्यंत व्यापक, तात्त्विक आणि योगपरंपरेशी संबंधित रूप उभे राहते.

म्हणून ‘वातापी गणपतिं भजेहम्’चा भाव केवळ “हे गणपती, माझे विघ्न दूर कर” इतकाच नाही. तो अधिक खोल आहे

“हे वातापी गणपती, तू विश्वाच्या अस्तित्वाचा आधार आहेस, वाणीचे आणि प्रणवाचे स्वरूप आहेस; योगी आणि देवताही तुझी उपासना करतात. त्या विश्वव्यापी, मंगलमय गणेशाला मी भक्तिभावाने वंदन करतो.”


राग: हंसध्वनी 

ताल: आदि ताल 

रचनाकार: मुथुस्वामी दीक्षितर

कालखंड: इ.स. १७७५–१८३५; त्यांचा जन्म २४ मार्च १७७५ रोजी झाला आणि निधन २१ ऑक्टोबर १८३५ रोजी झाले. 

भाषा: संस्कृत

देवता: तिरुचेंकाट्टनकुडी येथील वातापी गणपती

परंपरा: कर्नाटक संगीताच्या मैफलीची सुरुवात गणपतीच्या मंगलस्मरणाने करण्यासाठी ही कृती विशेष लोकप्रिय आहे. 

विशेष म्हणजे हंसध्वनी रागाची निर्मिती मुथुस्वामी दीक्षितरांनी केलेली नाही. हा राग त्यांच्या वडिलांना, रामस्वामी दीक्षितरांना, श्रेय दिला जातो. त्यामुळे वडिलांनी निर्माण केलेल्या रागात मुलाने गणपतीची ही अजरामर कृती रचली, हा संगीतपरंपरेतील सुंदर योग आहे.

आणखी एक विशेष बाब म्हणजे ‘वातापि गणपतिम्’च्या शेवटच्या भागात हंसध्वनीचा उल्लेख येतो, त्यामुळे ही कृती कोणत्या रागात गायची याचाही संकेत रचनेतच मिळतो. 

“वातापीच्या कातळांमध्ये कोरलेली गणपतीची स्मृती पुढे मुथुस्वामी दीक्षितरांच्या ‘वातापि गणपतिम्’मधून स्वररूपाने अमर झाली.आणि त्या स्वरांना लाभला हंसध्वनीचा मंगल नाद.”

-भक्ती 

Friday, September 11, 2026

अष्टमहाभय अवलोकितेश्वर

 #badami बदामीतील अनवट वाटेवरील अष्टमहाभय अवलोकितेश्वर




बदामी म्हटले की डोळ्यांसमोर येतात ती चालुक्यकालीन शैव आणि वैष्णव लेणी, त्यांच्या भव्य देवप्रतिमा आणि खडकात कोरलेले स्थापत्य. मात्र याच बदामीच्या कलाविश्वात एक वेगळी आणि तुलनेने अनवट वाट दाखविणारी बौद्ध प्रतिमा आढळते. बदामी लेणी क्रमांक ३ मधील या शिल्पाची ओळख काही कला-इतिहास अभ्यासकांनी अष्टमहाभय अवलोकितेश्वराशी जोडली आहे. या ओळखीचा उल्लेख De Mallmann यांच्या अभ्यासाच्या संदर्भात आढळतो. त्यामुळे या प्रतिमेकडे बदामीच्या प्रामुख्याने प्रतिमाविश्वाच्या चौकटीबाहेर डोकावणाऱ्या महत्त्वपूर्ण शिल्परूप म्हणून पाहता येते.


अवलोकितेश्वर हा महायान बौद्ध परंपरेतील करुणेचा बोधिसत्त्व मानला जातो. संकटात सापडलेल्या भक्ताचे रक्षण करणारा, त्याच्या हाकेला प्रतिसाद देणारा आणि भयातून मुक्त करणारा असा त्याचा स्वरूपविचार विकसित झाला. ‘अष्टमहाभय’ म्हणजे भक्ताला किंवा प्रवाशाला भेडसावणारी आठ महान संकटे. या संकटांपासून रक्षण करणारा अवलोकितेश्वर हा या प्रतिमाविषयाचा केंद्रबिंदू आहे.


पश्चिम दख्खनातील बौद्ध लेण्यांमध्ये अवलोकितेश्वराच्या ‘संकटमोचक’ किंवा ‘रक्षक’ स्वरूपाची अनेक उदाहरणे आढळतात. अजिंठा, कान्हेरी, संभाजीनगर आणि वेरूळ येथील विविध प्रतिमांमधून या संकल्पनेचा विकास दिसून येतो. उपलब्ध अभ्यासानुसार अजिंठ्यात अवलोकितेश्वराच्या संरक्षणरूपाची अनेक उदाहरणे, कान्हेरीत तीन, औरंगाबाद लेणी ७ मध्ये एक आणि वेरूळमध्ये दोन उदाहरणे नोंदली गेली आहेत.


यांपैकी संभाजीनगर  (औरंगाबाद )लेणी क्रमांक ७ हे तुलनेसाठी विशेष महत्त्वाचे उदाहरण आहे. तेथे मध्यभागी उभा अवलोकितेश्वर असून त्याच्या दोन्ही बाजूंना आठ संकटांची स्वतंत्र लघुदृश्ये कोरलेली आहेत. एका बाजूला अग्नी, दरोडेखोर, बंधन किंवा गुलामी आणि जलसंकट, तर दुसऱ्या बाजूला सिंह, सर्प, हत्ती आणि यक्षिणी/राक्षसीपासून होणारे संकट अशी मांडणी केली आहे. प्रत्येक प्रसंगात संकटात सापडलेल्या भक्ताच्या रक्षणासाठी अवलोकितेश्वराचे लघुरूप येताना दाखविले आहे.


बदामीतील प्रतिमा मात्र मोठ्या प्रमाणात झिजलेली आणि अस्पष्ट असल्यामुळे औरंगाबादच्या उदाहरणाप्रमाणे तिच्या भोवतीची प्रत्येक लघुदृश्ये निश्चितपणे कोणत्या महाभयाचे प्रतिनिधित्व करतात, असे ठामपणे सांगणे योग्य ठरणार नाही. छायाचित्रात मध्यवर्ती उभी आकृती आणि तिच्या दोन्ही बाजूंना लहान मानवी व कथात्मक आकृत्यांची रचना जाणवते. त्यामुळे ‘अष्टमहाभय अवलोकितेश्वर’ ही विद्वत्तापूर्ण ओळख लक्षात घेऊन, प्रत्यक्ष दृश्य पुराव्याच्या आधारे सावधपणे अभ्यास करणे अधिक योग्य ठरेल.


यामुळे बदामीतील हे शिल्प विशेष ठरते. एकीकडे बदामी चालुक्यांच्या शैव-वैष्णव कलापरंपरेचे महत्त्वाचे केंद्र आहे, तर दुसरीकडे त्याच परिसरात महायान बौद्ध प्रतिमेची शक्यतादर्शक उपस्थिती दिसते. ही प्रतिमा तत्कालीन दख्खनमधील धार्मिक परंपरांमधील संपर्क, कलात्मक देवाणघेवाण आणि सांस्कृतिक सहअस्तित्व समजून घेण्यासाठी एक वेगळी खिडकी उघडते.

Wednesday, August 26, 2026

ओनम आणि महाबलीचा प्रसंग - त्रिविक्रमाच्या पावलांतील समतेची कथा

 #



ओनम आणि महाबलीचा प्रसंग - त्रिविक्रमाच्या पावलांतील समतेची कथा


आज ओनमचा सण. केरळच्या सांस्कृतिक स्मृतीत अत्यंत जिव्हाळ्याने जपला गेलेला हा दिवस म्हणजे केवळ उत्सव, फुलांची सजावट आणि सणभोजन यापुरता मर्यादित नाही. या दिवसामागे आहे राजा महाबलीची कथा हि दान, समता, प्रजाप्रेम आणि शब्दाला जागणाऱ्या राजाची कथा.


या चित्रात दिसणारे शिल्प विष्णूच्या त्रिविक्रम अवताराशी संबंधित आहे. कथेनुसार महाबली हा पराक्रमी आणि उदार असुरराजा होता. त्याच्या राज्यात प्रजा सुखी होती आणि दानधर्माला विशेष महत्त्व होते. महाबलीच्या वाढत्या सामर्थ्यामुळे देव चिंतित झाले. तेव्हा विष्णूंनी वामनाचे एका लहान ब्राह्मण बालकाचे रूप धारण करून महाबलीकडे दान मागितले.


वामनाने राजाकडे फक्त तीन पावलांची जमीन मागितली. इतकी छोटी मागणी ऐकून महाबलीने ती सहज मान्य केली. पण दानाचा संकल्प होताच वामनाने विराट रूप धारण केलेतोच त्रिविक्रम एका पावलाने त्याने पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पावलाने आकाश. आता तिसरे पाऊल ठेवण्यासाठी जागा उरली नाही.


महाबलीने मग स्वतःचे मस्तक पुढे केले.


हा प्रसंग पराभवाचा नसून समर्पणाचा आहे. महाबलीकडे सत्ता होती, संपत्ती होती, सामर्थ्य होते; पण त्याहून मोठी गोष्ट त्याच्याकडे होती.दिलेला शब्द पाळण्याची तयारी. स्वतःचे सर्वस्व गमावण्याची वेळ आली तरी त्याने दानातून मागे हटणे स्वीकारले नाही.


ओनमच्या कथेत पुढे असे सांगितले जाते की महाबलीला त्याच्या प्रजेशी असलेल्या प्रेमामुळे वर्षातून एकदा आपल्या राज्यात येण्याची संधी मिळाली. म्हणूनच ओनम हा राजा महाबलीच्या स्वागताचा उत्सव मानला जातो. लोक आपल्या घरांची सजावट करतात, फुलांच्या रांगोळ्या पूक्कळम काढतात आणि आनंदाने त्याच्या आगमनाची प्रतीक्षा करतात.


या शिल्पाकडे आज, ओनमच्या दिवशी पाहताना, त्यातील प्रसंगाला एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो. येथे केवळ विष्णूचा विराट त्रिविक्रम दिसत नाही,तर त्याच्यासमोर उभा राहून स्वतःचे मस्तक अर्पण करणारा महाबलीही दिसतो. एका बाजूला दैवी विराटता आहे, तर दुसऱ्या बाजूला मानवी मूल्यांची विराटता.


ओनम आपल्याला महाबलीची आठवण करून देतो अशा राजाची, ज्याचे वैभव त्याच्या सिंहासनात नव्हते, तर त्याच्या दानशूरतेत आणि प्रजेवरील प्रेमात होते.


आजच्या या ओनम पर्वावर, या शिल्पातील बळी-त्रिविक्रम प्रसंगाकडे पाहताना एकच विचार मनात येत


सत्ता क्षणभंगुर असते पण दिलेला शब्द, उदारता आणि लोकांच्या मनात मिळवलेले स्थान अमर असते.


सर्वांना ओनमच्या हार्दिक शुभेच्छा!

ഓണം ആശംസകൾ!


शिल्पशास्त्र -६ वे शतक इ.स.त्रिविक्रम, अष्टभुज (आठ हात असलेला), आपल्या उजव्या पायावर उभा आहे आणि त्याने आपला डावा पाय खांद्यापर्यंत वर उचलला आहे. नमुची अत्यंत आदराने त्याचा उजवा पाय धरून आहे, तो सांगत आहे की दान वामन रुपाला आहे या त्रिविक्रम रूपाला नाही.देवाचे अथांग रूप पाहून थक्क झालेला एक असुर हातात खड्ग घेऊन त्याच्या उजवीकडे उभा आहे. देवाच्या डाव्या बाजूला, त्याच्या वर उचललेल्या पायाच्या खाली वामन हातात छत्री घेऊन उभा आहे, आणि राजा बलीकडून मिळणारे दान स्वीकारत आहे. बलीसोबत त्याची पत्नी आणि गुरू शुक्राचार्य आहेत, जे बलीच्या वतीने कमंडलूतून पाणी ओतण्याच्या क्रियेत दाखवले आहेत. या दृश्याच्या वर, देवाने ज्या वेगाने आपला पाय वर उचलला आहे, त्या वेगाने एक राक्षस हवेत फेकला गेला आहे. डाव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात एक हसरा चेहरा दाखवला आहे. देवाच्या वर उचललेल्या पायाच्या वर दोन आकृत्या हवेत उडताना दिसत आहेत. एकाचा चेहरा अस्वलासारखा आहे, जो स्पष्टपणे जांबुवंताचे प्रतिनिधित्व करतो आणि दुसरी आकृती गरुडाची आहे. हे दोघेही देवाने केलेल्या या अद्भूत पराक्रमाची स्तुती करत आहेत.

त्रिविक्रमाच्या हातात खड्ग (तलवार), गदा, बाण, चक्र, शंख (हा उचललेल्या पायाला समांतर धरलेला आहे), खेटक (ढाल) आणि धनुष्य.

------------------------------

Monday, August 24, 2026

गंगाधरशिव –ऐहोळे

 #गंगाधरशिव – #रावणफाडी गुहा मंदिर, #ऐहोळे, कर्नाटक





रावणफाडीच्या एका शांत गुहेत, गंगाधर शिवाचे ते अद्भुत शिल्प एकाच शिळेत कोरले गेले आहे. हे शिल्प विकसित भारतीय वास्तुकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. इ.स. ५५० च्या सुमारास चालुक्य राजवटीत बांधलेल्या या गुहा मंदिरात प्रवेश करताच, दरवाजालगतच्या डाव्या भिंतीवर हे भव्य शिल्प आपले स्वागत करते.


या शिल्पात भगवान शिव समभंग मुद्रेत उभे आहेत. गंगा स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळातून प्रवास करत असल्यामुळे तिला त्रिपथागामी असेही म्हटले जाते. ही घटना येथे नमस्कार मुद्रेत असलेल्या तीन एकसारख्या स्त्रियांच्या (गंगा, यमुना आणि सरस्वती) एकत्रीकरणातून भव्यपणे चित्रित केली आहे. महादेवाने आपल्या मस्तकावर उंचावून ही गंगा धरली आहे. त्यांनी जटा आणि अर्धचंद्राने बनलेला मुकुट परिधान केला आहे. त्यांच्या मस्तकाभोवती तेज कोरले आहे, जे चंद्रमौळीश्वरांच्या देवत्वाला अधोरेखित करते.


चतुर्भुज शिव विश्राममुद्रेत उभे आहेत. त्यांचा खालचा उजवा हात कट्यावलंबित मुद्रेत आहे, तर वरचा डावा हात चिन्मुद्रेत आहे. वरच्या दोन हातांनी ते आपल्या काही जटा हवेत उचलून वेगळ्या करून गंगेचा लहानसा अंश पृथ्वीवर सोडत आहेत. त्यांनी आपला पुढचा डावा हात मांडीवर ठेवला असून, त्यात त्यांनी उत्तरीय धारण केली आहे.


त्यांच्या धनुष्यासारख्या भुवयांच्या मधला तिसरा डोळा मिटलेला आहे आणि बाकीचे डोळे अर्धवट मिटलेले आहेत. विश्वाच्या कल्याणासाठी त्यांना गंगेचे असह्य ओझे आपल्या मस्तकावर वाहावे लागते. पण त्या प्रचंड दबावाखाली वाकण्याऐवजी, त्यांच्या चेहऱ्यावर आश्वासक हास्य आहे, कारण त्यांचे हे आणखी एक बलिदान पृथ्वीवरील प्रत्येक जीवनात चांगला बदल घडवून आणणार आहे.


डाव्या बाजूला महाराज भगीरथ एका पायावर उभे राहून कठोर तपश्चर्या करत आहेत. ते अत्यंत कृश (सडपातळ) दाखविले आहेत, जणू हाडांचा सापळा. भगीरथ इक्ष्वाकु वंशाचे (भगवान रामाचे पूर्वज) एक महान राजा होते. त्यांचे पूर्वज, राजा सागर यांचे साठ हजार पुत्र, कपिल मुनींच्या शापाने भस्म झाले होते. त्यांच्या आत्म्यांना मुक्ती मिळावी यासाठी गंगेचे पावित्र्य आवश्यक होते. म्हणून भगीरथाने हजारो वर्षे कठोर तप केले.प्रथम ब्रह्मदेवाची प्रसन्नता मिळवली, नंतर गंगेला पृथ्वीवर येण्यास राजी केले. पण गंगेच्या प्रचंड वेगाने पृथ्वी नष्ट होण्याची भीती असल्याने त्यांनी पुन्हा शिवाची आराधना केली. शिवांनी गंगेला आपल्या जटांत सामावून घेतले आणि हळूहळू पृथ्वीवर सोडले. म्हणून गंगेला भागीरथी असेही म्हटले जाते. या शिल्पात भगीरथाचे एकपाद तप आणि त्यांची अत्यंत कृश काया त्यांच्या कठोर तपश्चर्येचे आणि दृढनिश्चयाचे सशक्त प्रतीक आहे.


उजव्या बाजूला पार्वती उभी आहे. पार्वतीने डोक्यावर उंच मुकुट घातला आहे आणि तिचे कानातले तिच्या दिव्य सौंदर्यात भर घालत आहेत. तिने गळ्यात, हातांवर, कमरेवर आणि बाहूंवर सुंदर दागिने घातले आहेत. ती डोळे विस्फारून आपल्यासमोर घडणाऱ्या दृश्याकडे पाहत आहे. तिचा उजवा हात हनुवटीवर ठेवून ती आपल्या पतीकडे पाहत आहे. तिच्या चेहऱ्यावर गंमत, आश्चर्य, अभिमान, समाधान आणि तृप्ती यांसारख्या भावनांचे मिश्रण दिसून येते.


भगवान शिवाच्या मस्तकावर गंगा, यमुना आणि सरस्वती अंजली मुद्रेत दिसतात. हे संपूर्ण मंदिर एकाच प्रचंड खडकातून कोरले गेले आहे. ऐहोळे येथील रावणफाडी गुहा मंदिरातील हे गंगाधर शिव शिल्प, भगीरथाच्या तपाने गंगेला पृथ्वीवर आणण्याची आणि महादेवाने तिला आपल्या जटांत सामावून घेतल्याची महान पौराणिक कथा अत्यंत प्रभावी आणि भावपूर्ण रीतीने साकारते.

Saturday, August 22, 2026

‘केवल नरसिंह’ बदामी लेणी ३





 ‘केवल नरसिंह’ ही संज्ञा विष्णूच्या सिंह-मानव अवताराच्या स्वतंत्र, एकाकी आणि शांत स्वरूपाला सूचित करते, ज्यात लक्ष्मी किंवा सक्रिय युद्धाचे घटक दर्शवले जात नाहीत. अनेक अभिजात ग्रंथ केवल -एकांत स्वरूपाला बसलेल्या, ध्यानस्थ मुद्रेशी गिरीष/गिरीजा किंवा योग नरसिंह जोडतात, परंतु बदामी लेणी ३ मधील उभ्या केवल नरसिंहाचे एक दुर्मिळ, प्रारंभिक स्वरूप सादर झाले आहे.

नेहमीच्या स्थूल /स्थौण नरसिंहाच्या जो हिरण्यकशिपूला सक्रियपणे फाडून टाकतो विपरीत, हा नरसिंह शांतपणे त्रिभंग स्थितीत उभा असून एक हात सहजपणे गदेवर ठेवतो. त्याच्या अत्यंत शांत, जवळजवळ हसऱ्या चेहऱ्यामुळे हे राक्षसाच्या वधानंतरचे क्षण दर्शवते, जिथे दैवी शक्ती शांत झाली आहे आणि तो सर्वोच्च स्वामी म्हणून एकटा उभा आहे "केवलाचे सार"!!
चार हातांचा नरसिंह पाय पसरून उभा आहे. त्याचे मस्तक कमळाने सुशोभित आहे, जे सर्व प्रारंभिक नरसिंह मूर्तींमध्ये आढळते.
त्याने यज्ञोपवीत, मकर किंवा मालाकार, कौपीनासारखे अधोवस्त्र आणि हार इत्यादी अलंकार धारण केले आहेत.
उजवा खालचा हात उजव्या स्तनाजवळ धरला असून त्यात अस्पष्ट वस्तू आहे. वर दोन जोड्या गंधर्व-युग्म उडताना दाखवले आहेत.
देवाच्या उजवीकडे खाली असुर प्रह्लादाची बटु आकृती आहे.डावीकडे मानवी रूपात (पंखांसह) गरुड उभा आहे.
हातांतील आयुधे: एका हातात अस्पष्ट वस्तू, चक्र (व्यक्तीरूप), शंख (व्यक्तीरूप) आणि गदा.
अशा प्रतिमेबाबत कोणत्याही प्रतिमाशास्त्रीय ग्रंथात विधान आढळत नाही, तरीही ही मूर्ती देवाची ती अवस्था दर्शवते जिथे त्याने आपले कार्य हिरण्यकशिपूचा वध पूर्ण केल्यानंतर शांत झाला आहे, आणि प्रह्लाद ज्यामुळे अवतार आवश्यक झाला उपस्थित आहे. हातांत व्यक्तीरूप आयुधे धारण करणे विशेष उल्लेखनीय आहे, कारण ते प्रारंभिक चालुक्य शिल्पकलेत अत्यंत दुर्मिळ आहे.
सुरुवातीच्या बदामी चालुक्यांनी या प्रतिमाशास्त्राचा धोरणात्मक वापर करून शांतताप्रिय पण विलक्षण शक्तिशाली एकाकी नरसिंहाच्या चित्रणातून दख्खन प्रदेशावरील आपले स्वतंत्र, अनियंत्रित सार्वभौमत्व (केवल सत्ता) दृष्यरूपात प्रतिबिंबित केले.कर्नाटकात या प्रकारच्या नरसिंहाची फक्त दोन उदाहरणे आढळतात.दुसरे ऐहोळ येथील दुर्गा मंदिरात आहे.
संदर्भ- प्रख्यात कला इतिहासकार डॉ.श्रीनिवास व्ही.पेडिगार-
The Cult of Vishnu in Karnataka from Earliest Times to 1336 a D Based on a Study of Inscriptions and Sculpture