Monday, March 9, 2026

सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार



 इतिहासात कुठेही अहमदनगर म्हटलं की,उत्सुकता आणखिनच निर्माण होते.पुस्तक प्रदर्शनात "बुद्ध आणि त्यांचा धम्म " पुस्तक घेतल्यावर तिथल्या वृध्द पुस्तक विक्रेत्याने मला "ह्या सावित्रीबाईच्या शिक्षिका होत्या आपल्या नगरच्या वाच.तुला आवडेल "असं म्हणत एक छोटेखानी पुस्तक दिले.कामिल पारखे यांचे "सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार "हे ते पुस्तक होते .पुस्तकाच्या मुखपृष्ठावर क्लेरा ब्रूस हायस्कुल फॉर गर्ल्स चे चित्र होते.आता शाळेच्या समोरच्या रस्त्याहून तर मी रोजच येते.शहरात मुख्य ठिकाणी खूप भव्य मैदान या शाळेचे आहे .पुढे गेले की अहमदनगर कॉलेज ,पलीकडे बूथ हॉस्पिटल ,तिकडून पुन्हा बाजारात जाण्याच्या रस्त्यावर ह्यूम चर्च आहे.पुढे माळीवाड्याचा राहण्याचा उल्लेख लक्ष्मीबाई टिळक (रेव्ह. नारायण वामन टिळक यांच्या पत्नी)यांनी आपल्या स्मृतिचित्रे पुस्तकात केला आहे.

तर सिंथिया फरार यांचे सावित्रीबाईच्या शिक्षिका म्हणून तर कार्य खूप महान आहे.पण तत्कालीन नगरच्या मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी खूप कष्ट केले हे पुस्तक वाचतांना लक्षात आले.तरीही सिंथिया फरार हे फारच अपरिचित नाव राहिले आहे .याविषयी मग अजून उहापोह ,सन्दर्भ वाचले.त्याचा हा लेखाजोखा असा आहे.


भारतातील मुलींच्या शिक्षणाचा इतिहास हा १९व्या शतकात खूप महत्वाचा टप्पा आहे. त्यात मिशनरी शाळा, सिंथिया फरार यांचे काम, सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षिका होण्याची प्रक्रिया आणि नंतर स्वदेशी म्हणजेच भारतीयांनी सुरू केलेल्या शाळा सुरू होणे हे सर्व क्रमाने घडले. 


फुलेंपूर्वी मुलींसाठी शाळा कशा होत्या? आधी मुख्यतः मिशनरी शाळा असायच्या.

१८४८ पूर्वी भारतात मुलींसाठी शिक्षण खूपच कमी होते. बहुतेक मुलींना शाळेत पाठवले जात नव्हते. बालविवाह, जातीव्यवस्था, समाजाचा विरोध आणि स्त्रियांना घराबाहेर जाण्याची बंदी यामुळे मुली अशिक्षित राहत होत्या. पण ब्रिटिश काळात ख्रिश्चन मिशनरी (धर्मप्रचारक) लोकांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्या. हे मिशनरी मुख्यतः अमेरिकन, ब्रिटिश किंवा इतर युरोपियन देशांतून आले होते.

 १८२०-१८३० च्या काळात मुंबई , कलकत्ता, मद्रास इत्यादी शहरांत मिशनरी शाळा सुरू झाल्या.

उदाहरणार्थ मुलींसाठीची पहिली शाळा ज्याचा आपल्याला उल्लेख आढळतो ती मार्च १८२४ मध्ये मुंबईतील अमेरिकन मिशनने सुरू केली होती. ती गंगाबाई नावाच्या एका स्थानिक महिलेने शिकवली होती. असे मानले जाते की, भारतात अशा प्रकारची ही पहिली शाळा होती. 

१८४० पर्यंत मुंबई, अहमदनगर, पुणे परिसरात १०-२० मिशनरी शाळा होत्या. काही शाळांमध्ये १००-४०० मुली शिकत होत्या.

मुख्य उद्देश मुलींना शिक्षित करून ख्रिश्चन धर्माकडे वळवणे होता, पण त्यामुळे शिक्षणाची सुरुवात झाली.

या शाळा परदेशी प्रभावाखालील होत्या. भारतीय समाजातील लोक स्वतंत्रपणे अशा शाळा सुरू करत नव्हते, कारण समाजाचा प्रचंड विरोध होता.


सिंथिया फरार (Cynthia Farrar, १७९५-१८६२) ह्या अमेरिकन ख्रिश्चन मिशनरी होती. त्या  १८२७ मध्ये भारतात आल्या आणि अविवाहित अमेरिकन महिलांपैकी पहिल्या मिशनरींपैकी एक होत्या.

 १८२७-१८३७ पर्यंत त्यांनी मुंबईत मुलींच्या शाळा वाढवल्या. १८२९ पर्यंत ४००+ मुली शिकत होत्या. तिने शाळा चांगल्या पद्धतीने चालवल्या .परीक्षा घेतल्या, हस्तकला शिकवली.१८३९ मध्ये त्या  अहमदनगरला गेली आणि तिथे ४-५ शाळा चालवल्या. १८४५-४६ मध्ये १००+ मुली शिकत होत्या.

त्यांच्या  शाळा चांगल्या संघटित होत्या. तिने भारतीय मुलींना शिक्षण देण्याचा मार्ग मोकळा केला. 

तेव्हा जोतीराव फुले यांनी १८४५-४६ मध्ये शाळांचे निरीक्षण करण्यासाठी अहमदनगरला त्यांनी चालविलेल्या शाळा पाहिल्या आणि प्रभावित झाले. १८५३ मध्ये दिलेल्या भाषणात ते म्हणतात,


"एका मैत्रिणीसोबत मी अहमदनगरमधील मुलींच्या शाळांना भेट दिली, ज्या अमेरिकन मिशनरी विभागाच्या फरार मॅडम यांनी व्यवस्थापित केल्या होत्या. त्या शाळा पाहून मला खूप आनंद झाला कारण त्या खूप चांगल्या प्रकारे चालवल्या जात होत्या. पुण्यात परतल्यानंतर, मी लगेच मुलींसाठी एक शाळा सुरू केली जिथे वाचन, लेखन, गणित आणि व्याकरण हे विषय शिकवले जात होते."


जना त्चुरेनेव्ह आणि सुमीत म्हसकर यांनी एमजी माली यांचा हवाला देत त्यांच्या "वेक अप फॉर एज्युकेशन" या पेपरमध्ये म्हटले आहे की वसाहतवाद, सामाजिक परिवर्तन आणि भारतातील जातिविरोधी चळवळीची सुरुवात, सावित्रीबाई फुले यांनी स्वतःची अध्यापन कारकीर्द सुरू करण्यापूर्वी काही महिने फरार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले.


सिंथिया फरार सावित्रीबाईंच्या शिक्षिका कशा झाल्या?

सावित्रीबाई फुले जन्मतः निरक्षर होत्या. लग्नानंतर जोतिराव फुले यांनी घरीच तिला वाचायला-लिहायला शिकवले. पण व्यावसायिक शिक्षिका होण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक होते.सावित्रीबाईंनी दोन शिक्षक प्रशिक्षण कोर्स केले.

पहिला अहमदनगर मध्ये सिंथिया फरार यांच्या संस्थेत काही महिने केला. फरार यांनी त्यांना शिक्षण आणि शिक्षक कसे होतात हे शिकवले.आणि 

दुसरा पुण्यातील नॉर्मल स्कूल मध्ये. हे प्रशिक्षण घेतल्यानंतर सावित्रीबाई व्यावसायिक शिक्षिका झाल्या. त्या भारतातील पहिल्या प्रशिक्षित महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका मानल्या जातात.

.

 नंतर स्वदेशी मुलींच्या शाळा कशा सुरू करण्यासाठी भारतात चळवळ उभी राहू लागली.मिशनरी शाळांनी पाया घातला, पण भारतीयांनी स्वतःच्या समाजासाठी शाळा सुरू केल्या तेव्हा क्रांती झाली.यात फुले दांम्पत्य यांचा मोलाचा वाटा आहे.

जोतिराव आणि सावित्रीबाईंनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाडा येथे भारतातील पहिली स्वदेशी मुलींची शाळा सुरू केली. सुरुवातीला ६-९ मुली होत्या यात सर्व जातीतील दलित, मागासवर्गीय यांचा सहभाग विशेष होता .शाळा भारतीयांनी चालवलेली होती. जातीव्यवस्था आणि स्त्रीदास्याविरुद्ध होती. या शाळेला विरोध खूप होता लोक शेण-दगड फेकत, बहिष्कार टाकत, पण सावित्रीबाई रोज शिक्षणाचा वसा राबवत राहिल्या.

१८४८-१८५२ पर्यंत फुले दांपत्याने एकूण १८ शाळा पुणे आणि आसपास सुरू केल्या. १८५२ मध्ये २७३ मुली शिकत होत्या.मिशनरी शाळा धर्मप्रचारासाठी होत्या, पण फुलेंच्या शाळा सामाजिक क्रांतीसाठी दलित-महिला शिक्षण, सर्व जाती एकत्र शिकणे.१८४७ मध्ये बंगालमध्ये प्यारी चरण सरकार यांनी, मुंबईत नाना शंकर शेठ यांनी शाळा सुरू केल्या, पण फुलेंच्या शाळेला सर्वसमावेशक आणि क्रांतिकारी म्हणून ओळख मिळाली.

१८६२ मध्ये सिंथिया फरार यां मृत्यूपर्यंत फरार अहमदनगरमध्ये राहत आणि काम करत.


सिंथिया फरार यांच्या अमेरिकन मिशनरी संस्थेत मुख्य प्रेरणा आणि व्यावहारिक प्रशिक्षण.प्रशिक्षण घेतल्यानंतरच त्यांनी मुलींच्या शिक्षणाची क्रांती सुरू केली. सिंथिया फरार यांचे काम फुलेंच्या शाळांसाठी पाया ठरले. आजही सावित्रीबाईंना "भारतातील पहिल्या महिला शिक्षिका" म्हणून ओळखले जाते!

-भक्ती 



संदर्भ: विकिपीडिया, पुस्तके- MG Mali  संशोधन पेपर-Jana Tschurenev आणि Sumeet Mhaskar यांचेआणि मिशनरी रिपोर्ट्समध्ये सांगितले आहे. काही नवीन संशोधनात २०१० पूर्वीचा पुरावा कमी यावर वाद आहे, पण बहुतेक इतिहासकार हे मान्य करतात की फरार यांचा प्रभाव होता

https://thesatyashodhak.com/cynthia-farrar-missionary-woman-who-inspired-jotirao-phule/

https://seedbed.com/5-women-who-changed-the-face-of-missions/

https://www.punekarnews.in/cynthia-farrar-social-reformer-and-teacher-of-savitribai-phule/

https://www.esakal.com/education-jobs/american-marathi-mission-misses-cynthia-farrar-girls-education-at-early-age-ddn96


Sunday, February 22, 2026

वाचाल_तर_समृद्ध_व्हाल

 #वाचाल_तर_समृद्ध_व्हाल 

#कवीला_ऐकाल_तर_जाणीवा_विस्ताराल



वाचन का करायचे? ,वाचनालय वाचणाऱ्यासाठी का सुरु ठेवायचे? तर या पुस्तकांमधले विचार मनात झिरपत राहतात ,नकळत शबदांचा ओलावा आयुष्य सुखकारक,ताकदीचे करते.

सकाळ पुस्तक महोत्सवात अहिल्यानगर येथे दुसऱ्यांदा रंगला. पुस्तकांची मांदियाळी पुस्तक वाचन,वाचनालय या विविध मार्गांनी फुलवणाऱ्या वाचनवेड्याना मान्यवराकडून गौरवपत्रक दिले गेले.

यानिमित्ताने कविसंमेलन आयोजित होते.खूप दिवसांनी कवी संमेलन अक्षरशः अनुभवले.काव्य ही भावभावनांचा ,विचारांचा अनोखा मेळ सर्वांना लाभत नाही.म्हणूनच जाणलं पाहिजे "जे न देखे रवी ते ते देखे कवी "


माजी आमदार लहू कानडे, ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, तुकाराम धांडे, भरत दौंडकर, संदीप जगताप, अमोल बागूल यांच्या काळजाला हात घालणाऱ्या कविता अनुभवता आल्या.


ज्येष्ठ कवी **अरुण म्हात्रे यांनी अनेक मराठी कवींच्या कविता नारायण सुर्वे ,पाडगावकर कार्यक्रमात वेळोवेळी सादर केल्या .त्यात अत्रे व इतर साहित्यिकांच्या खुमदसार किस्से पेरून वातावरण अलगद हास्यमयही केले.त्यांचा उत्साह वय विसरायला लावणारा होता . म्हात्रे यांनी वेळ निराळी आहे' ही कविता आणि अखेर उंच माझा झोका हे गीत सुरांच्या साथीने सादर केले.


**तुकाराम धांडे यांनी 'आई होती तेव्हा' ही कविता सादर केली."आई होती तेव्हा,जातं जतंगाण गाण गायचं उखळामध्ये नाचताना, मुसळ छतापर्यंत उड्या मारायचं" अहाहा डोळ्यासमोर नाचत आकाशाकडे झेपावणारे मुसळ उभं राहील.थेट ग्रामीण रंगढंगातला हा कवी नक्की ऐका https://www.facebook.com/share/v/1BjrThSPEv/

तुकाराम आणि आजोबा या कवितेत दोघांमधलं साम्य काय तर "डोंगर"तुकारामांचा भंडाऱ्याचा तर आजोबांचा गावातला खूप वेगळी निसरग-माणूस यांच्या नात्याची कविता आहे ."भूगोल "कविता तर जंगल.गाव गिळणाऱ्या ससत्तांधला चपराक आहे .


नाशिकचे कवी व शिक्षक **संदीप जगताप हे त्यांच्या शेतकऱ्यांच्या समस्या, आई आणि सामाजिक विषयांवरील भावूक व प्रेरणादायी कवितांसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. 'शेतकरी मुलाशीच लग्न करा' अशी साद घालणाऱ्या त्यांच्या कविता तरुण वर्गात खूप व्हायरल झाल्या आहेत.https://www.facebook.com/share/v/1CNhjdyTYP/ लहानपणीची "इन्स्पेक्शन "कविता आई-तिचे कष्ट अधोरेखित करतात .


 ''बैलावानी राबणारा बाप गाईवानी होता.. हात त्याचा खरबुडा पण आईवानी होता..'' कवी **भरत दौंडकर यांची ही कविता आणि "मुलगा काय करत होता पुस्तक वाचत होता ",गुंठा गुंठा जमीन विकून आज गोफ आली गळ्यात , पण एक प्लेट मातीचा वास हुंगायला उद्या रक्त येईल डोळ्यात, -गोफ या कवीची या कविता आजचे वास्तव दाखवतात https://youtu.be/uzeNUZ0dfCI?si=_oj5_z4tfBv3BtE_ 


स्वतःचा वेगळा असा ठसा उमटविणारी कविता म्हणून 'क्रांतीपर्व', 'टाचाटिभा', 'तळ ढवळताना' या कवितासंग्रहांचे निर्माते माजी आमदार **लहू कानडे यांनी "लोकशाही "कवितेत सत्य स्वीकारायचे धैर्य देते हे दिसले .


नगरचे प्रसिद्ध ,हरहुन्नरी कलावंत कवी **अमोल बागुल यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ठ सूत्रसंचालन तर केलेच पण त्यांच्या "सुलभ आत्महत्या सेतू केंद्र" या कवितेने आत्महत्या आणि मनाची अवस्था याचा निराळा आयाम सादर केला .


अशा काव्याने भरलेल्या संध्याकाळी मन हरखून गेले आणि मोबाइल हातात घेण्याची इच्छाच राहिली नाही. हा एक उत्तम उपाय आहे मोबाइल व्यसन कमी करण्याचा मनाला उभारी देणारा, आनंद देणारा. आता असे कविसंमेलन नियमित हजेरी लावण्याचा निश्चय केला :)

-भक्ती

Saturday, February 21, 2026

‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी

 ‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी



युवाल नोव्हा हरारी हा असा इतिहासकार आहे की, जो केवळ इतिहासात रमायला शिकवत नाही, तर इतिहासाने माणसाचे जीवन कसे बदलत गेले हे पाहायला शिकवतो. म्हणूनच तो आता केवळ इतिहासतज्ज्ञ नाही, तर एक ‘विचारवंत’ म्हणूनही ओळखला जात आहे.


नेक्सस या पुस्तकाची हेडलाईन आहे .“अश्मयुगापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत-माहितीच्या जाळ्यांचा संक्षिप्त इतिहास.”पुस्तकाची सुरुवात करण्यापूर्वी मुखपृष्ठावरील ‘कबूतर’ लक्ष वेधून घेते. या कबूतराची गोष्ट पुढे पुस्तकात आहेच.

शेर आमी (प्रिय मित्र) हा अमेरिकन आर्मी सिग्नल कोरचा एक होमिंग पिजन होता.सैनिकांनी त्याला संदेश पायाला बांधून  हवेत सोडले. जर्मनांनी त्याच्यावर जोरदार गोळीबार केला .एक शेल त्याच्या खाली फुटला, त्याच्या छातीला गोळी लागली, डावा डोळा आंधळा झाला, उजवा पाय पूर्णपणे कापला गेला.तरीही शेर आमी उडत राहिला! तो ४० किलोमीटर उडून ४५ मिनिटांत डिव्हिजन मुख्यालयापर्यंत पोहोचला. तिथे त्याने संदेश पोहोचवला, ज्यामुळे अमेरिकन तोफखान्याने हल्ला थांबवला आणि जवळपास २०० सैनिकांचे प्राण वाचले.हरारी ही गोष्ट पुस्तकात माहितीच्या शक्ती दाखवण्यासाठी सांग

माहिती केवळ मानवी बनवलेली नसते तर कबूतरासारखा प्राणीही माहिती वाहून नेऊ शकतो.एक छोटी माहिती किती मोठे जीवन वाचवू शकते.


पुस्तक तीन भागांत विभागले आहे.


भाग १ -मानवी नेटवर्क्स 


‘सत्य’ शोधण्याच्या प्रयत्नात लोकांनी जे काही वापरले असेल, ते म्हणजे माहिती. वास्तव समजून घेण्यासाठी आपण माहितीचा वापर करतो. जेव्हा माहिती वास्तवाचे अचूक प्रतिनिधित्व करते, तेव्हा ती ‘सत्य’ ठरते. माहितीचे काम केवळ जोडणी करणे हे असते. परंतु मानवी समाजातील बहुतांश माहिती आणि खरंतर इतर जैविक व भौतिक व्यवस्थांतील बहुतांश माहिती कशाचाही अचूक प्रतिनिधित्व करत नाही. हा व्यामिश्र मुद्दाच पुस्तकाचा पाया आहे.


मौखिक परंपरा, कथा, मिथके, चित्रलिपी, दस्तऐवज, कागदी लिखाण, छापखाना अशा विविध टप्प्यांतून माहितीची रूपे बदलत गेली आणि ‘माहितीची जाळी’ समाजासाठी निर्माण झाली.


सेपियन्स पुस्तकाप्रमाणेच येथेही हरारी ‘कथांची शक्ती’ अधोरेखित करतो. कथा सामूहिक श्रद्धा निर्माण करतात, लोकांना एकत्र आणतात. पुस्तके या कल्पनांचा आणि कथांचा प्रसार करतात. पण जेव्हा यामुळे लोकसमूह नियंत्रित करता येतो हे लक्षात आले, तेव्हा माहिती सत्ताव्यवस्थेचा भाग बनली.मग चुकीची माहिती दोष निर्माण करू लागली.छापील चुकीच्या माहितीच्या प्रसाराचे उदाहरण म्हणून ‘विच हंटिंग’ -जादूटोणा शोध मोहिमा दिले आहे. भीती पसरवून, छळाला कारणीभूत ठरवता येते. स्टॅलिन आणि हिटलर यांची माहितीचे नियंत्रण करून सत्ता टिकवणे व विरोधकांचा बिमोड करणे कसे शक्य झाले, याची अनेक उदाहरणे येथे दिली आहेत.


भाग २ आणि ३-संगणकाचे राजकारण,डेटा वसाहत ,ए आय 


पुढील भागांत संगणक, इंटरनेट आणि अल्गोरिदम यांमुळे ‘सत्य’ आणि ‘शास्त्र’ यातील समतोल कसा ढळत आहे, हे स्पष्ट केले आहे. माहितीला आकार देऊन आणि निर्णयप्रक्रियेत सहभागी होऊन मानवी राजकारण ‘मानव व यंत्र संवाद’ या मिश्र स्वरूपात रूपांतरित होत आहे. संगणक आता ‘AI’च्या रूपात स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात आणि कल्पना निर्माण करू शकतात.


‘सिलिकॉन पडदा’ ही संकल्पना मांडताना हरारी सांगतो की, संगणक-सत्ता केंद्रीकरण होऊ शकते. नव्या साम्राज्यवादात मानवजात फुटून प्रतिस्पर्धी डिजिटल साम्राज्ये निर्माण होऊ शकतात. प्रत्येक राजवट स्वतंत्र एआय प्रणाली तयार करेल. परिणामी परस्परसंवाद कठीण होईल.


एआयची स्फोटक शक्ती नियंत्रणात ठेवणे कठीण होऊ शकते. औद्योगिक क्रांतीत मागे राहिलेल्या राष्ट्रांवर प्रगत राष्ट्रांनी वर्चस्व प्रस्थापित केले. एआयच्या बाबतीतही असेच काही घडेल का, हा प्रश्न हरारी उपस्थित करतो.आजच्या काळात युद्धासाठी बंदुका आवश्यक नाहीत. केवळ डेटा गोळा करून, कॉर्पोरेशन किंवा सरकार ‘डेटा-वसाहती’ निर्माण करून माहितीच्या आधारे नियंत्रण मिळवू शकतात. त्यामुळेच अनेक देशांत विविध अॅप्सवर बंदी घातली जाते.

पूर्वी साम्राज्यवादासाठी जमीन, नंतर औद्योगिक युगात यंत्रे व इंधन महत्त्वाचे होते.आता डिजिटल डेटा आणि अल्गोरिदम जगावर नियंत्रण मिळवू शकतात. एआय व स्वयंचलनामुळे विकसनशील देशांसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते. नफा वाढवण्यासाठी स्वयंचलन वाढेल आणि अकुशल कामगारांची गरज कमी होईल.


हार्डवेअर प्रत्येक देशात वेगळे असल्याने स्थानिक उपकरणांची सक्ती करण्याचे महत्त्व वाढू शकते. सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर जगभरात देशांनुसार वेगळे होत राहिल्यास जग ‘माहितीच्या कोशां’मध्ये विभागले जाऊ शकते.


एआय, ओळख आणि भविष्य


एआयमुळे केवळ नोकऱ्या आणि राजकीय बदल होणार नाहीत, तर सांस्कृतिक बदलांनाही सामोरे जावे लागेल. ‘शरीर’ आणि ‘ऑनलाइन ओळख’ यातील नाते काय? विविध सभ्यतांनी मन व शरीर प्रश्नाला वेगवेगळी उत्तरे दिली आहेत.


जोपर्यंत भौतिक शरीर हीच ओळख मानली जाते, तोपर्यंत एआयला व्यक्ती म्हणून स्वीकारले जाणार नाही. परंतु समाजाने शरीराचे महत्त्व कमी केले, तर एआयला व्यक्ती म्हणून अधिकार देण्याचा प्रश्न उद्भवू शकतो.जर जग परस्परविरोधी डिजिटल कोशांत विभागले गेले, तर एका कोशातील अस्तित्वे दुसऱ्या कोशातील लोकांना दुर्बोध व अनाकलनीय वाटू शकतात.


स्वतःला अतिहुशार समजणाऱ्या माणसाने निर्माण केलेल्या एआय आणि अल्गोरिदमवर तो नियंत्रण ठेवू शकेल का? याचे ठोस उत्तर नसतानाही माणूस एआय विकसित करत आहे. माहितीच्या जाळ्याचा हा दोष आहे .सत्यासाठी नव्हे, तर व्यवस्थेसाठी ही निर्मिती होत चालली आहे.


नेक्सस -अश्मयुगापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत माहितीच्या जाळ्यांचा संक्षिप्त इतिहास.

अनुवादक- प्रणव सखदेव

प्रकाशक-मधुश्री पब्लिकेशन

ISBN-978-81-980859-5-5.

पृष्ठसंख्या-४६४ पाने 

मूळ किंमत-₹५००.

Monday, February 9, 2026

माचीवरला बुधा

 

Friday, January 30, 2026

"बौद्ध मूर्तीशास्त्र"

सर्वांना वाटेल की मी अतीच सिनेमे पाहते काय(आता कोणाच्या वाटण्याने आपण बदलू नाही ,हा बेसिक नियम मान्यच असेल असे..:))

तर मी माझ्या क्षेत्राशिवाय अजूनही काही विशेष पाहत असते.मुळात अज्ञानी राहायला आवडत नाही.३ इडियट मधल्या रांचोचा एक डायलॉग मला फार रिलेट होतो,कायमच... "चारो तरफ ज्ञान बट रहा है, जहाँ से मिले लपेट लो".अशाप्रकारे ज्ञान मिळवणं जीवनाच्या आनंदाचं झाड आहे.

तर मी नुकताच "बौद्ध मूर्तीशास्त्र" अभ्यासक्रम झूमद्वारे पाहत होते.भारतीय संतांची ओळख व्हावी त्या आधीपासूनच मला बुद्धाने आकृष्ट केले होते.शांतपणे डोळे मिटून,तो ध्यानस्थ बुद्ध मला आवडायला लागला.पुढे दुःखाचे कारण शोधायला सर्वांचा त्याग केला याचे खूप अप्रूप वाटत गेले.मग मी वैदिक परंपरासंबंधित गोष्टींचे ज्ञान मिळवण्यात खूप जिद्द धरली.याला "वैदिक" म्हटलं जात हे मला त्याला अभ्यासल्यावर समजले. या माहितीचा उहापोह करतानाच रणवीर अल्हाबादियाचे खूप शो पाहिले.तिथे मला पहिल्यांदा 'पालगा रिनपोछे' या तरुण बौद्ध भिक्षूंचे विचार ऐकायला मिळाले अगदी सुरुवातीच्या काळातच पालगा रिनपोछे त्यांना समजले की भौतिकवाद हा दीर्घकालीन आनंदाचा उपाय नाही.कमी वयातच त्यांनी अब्जाधीश होऊन सपंत्तीही उपभोगली पण अखेर अध्यात्माचा खरा उद्देश कळला.मासेराती विकणारा मोन्क अशा विशेषणाने ते प्रसिद्ध आहेत.त्याच भागात मला तारा देवीचा  "ॐ तारे तुत्तरे तुरे सोहा" आणि "ओम मणि पद्मे हं" हा बौद्ध धर्मातील सर्वात प्रसिद्ध सहा अक्षरी मंत्र,विशेषतः अवलोकितेश्वर बोधिसत्वयाच्याशी संबंधित आहे.यांची दिक्षा मिळाली .मी सकाळच्या कामात जेव्हा आठवेल तेव्हा हे मंत्र यु ट्यूबवरलावायचे.इतकीच बौद्ध देवतांची ओळख होती.

सह्याद्री ट्रेकर्स सामाजिक संस्थेचे वर्षभरातले शैव दृश्य संस्कृती,वैष्णव दृश्य संस्कृती,हिंदू लेणी स्थापत्य असे ऑनलाइन अभ्यासक्रम आवडीखातर केले आहेत.यावेळी त्यांनी बौद्ध मूर्तिशास्त्र हा अतिशय कमी शिकवला जाणारा विषय आयोजित केला होता. मी प्रवेश घेतला होता. 

या अभ्यासक्रमात हीनयान (थेरवाद) आणि महायान या दोन्ही बौद्ध मूर्तीशास्त्रातील फरक समजला.

सुरुवातीच्या काळात बुद्धाची मानवी रूपात मूर्ती बनवली जात नव्हती.खर म्हणजे बुद्धानी स्वतः त्याची कोणतेही मूर्तीपूजा होऊ नये असे सांगितले होते .परंतु बुद्धांनंतर ४००-५०० वर्षांनंतर अनुयायींना त्यांच्या प्रतीकांची गरज वाटली.

तेव्हा प्रारंभी बुद्धाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बुद्धपाद,धर्मचक्र, बोधीवृक्ष, स्तूप यांसारखी प्रतीके वापरली गेली. बुद्धाला महापुरुष,शिक्षक मानले गेले ,देव नाही.

त्रिरत्न-ज्यामध्ये बुद्ध हे गुरू,धम्म शिक्षण आणि संघ समुदाय यांचा समावेश होतो.

बुद्ध अवशेषांच्या कास्केट ज्यामध्ये बुद्ध किंवा बौद्ध भिक्षूंचे शारीरिक अवशेष हाडे, राख, केस किंवा वैयक्तिक वस्तू ठेवल्या जातात .ज्या स्तुपांमध्ये पूजेसाठी ठेवल्या जातात.







पुढे महायानमध्ये बुद्धाला देव मानून त्यांची मानवी रूपात भव्य मूर्ती बनवली गेली.

तथागत -पाच बुद्ध म्हणजे एकाच पूर्ण बुद्धत्वाच्या पाच वेगवेगळी रूपे आहेत. प्रत्येक बुद्ध एका विशिष्ट दोषाचे रूपांतर करून ज्ञानात बदलतो. ते मंडळात नेहमी एकत्र दिसतात – मध्यभागी वैरोचन आणि चार दिशांना चार बुद्ध.अक्षोभ्य, अमिताभ, अमोघसिद्धी, रत्नसंभव आणि वैरोचन हे पाच बुद्ध आहेत. ... बौद्ध धर्मात, तीन रत्ने म्हणजे बुद्ध, धर्म आणि संघ आणि रत्नसंभव हे बुद्ध देणारे मानले जातात.




बोधिसत्त्वचा समावेश त्यानंतर होतो.'बोधी' म्हणजे ज्ञान + 'सत्त्व' म्हणजे जीव = ज्ञानी जीव. बोधिसत्व म्हणजे निर्माण होणारा बुद्ध, जो आपल्या सहकाऱ्यांचे दुःख कमी करण्यासाठी निर्वाण प्राप्ती पुढे ढकलतो.यातही विविध रुपांचा एक क्रम आहे. जो नीटसा समजाला नाही.  

बोधिसत्व विविध आहेत पण त्यातील काही प्रसिद्ध आहेत .

अवलोकितेश्वर - हातात कमळ, जपमाळ, खूप हात असलेले रूप

मंजुश्री -उजव्या हातात त्रिशूळासारखा खड्ग , डाव्या हातात प्रज्ञापारमिता ग्रंथ

वज्रपाणी - वज्र धारण केलेला, रक्षक रूप

क्षितिगर्भ -नरकातील प्राण्यांना सोडवणारा

समंतभद्र -घोड्यावर बसलेला





इतर परंपरांनुसार शक्ती /स्त्री बौद्धदेवताहीची प्रचलित झाल्या .

तारा देवी- "सर्व बुद्धांची आई" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, त्या करुणा, ज्ञान आणि "आठ महान भयांपासून" संरक्षणाचे प्रतीक आहेत.

सर्वात लोकप्रिय "हिरवी तारा -संरक्षण" आणि "पांढरी तारा-उपचार" आहे.


इतर प्रमुख बौद्ध देवी 

महामायुरी-या संस्कृत नावाचा अर्थ 'महान मोरणी' असा होतो.जी 'गुप्त विज्ञानांची राणी आहे.

प्रज्ञापारमिता- सर्व बुद्धांची आई, ज्ञानाच्या परिपूर्णतेचे प्रतीक.

मारिची- पहाट, प्रकाश आणि सूर्याची देवी, बहुतेकदा संरक्षणाशी संबंधित.

भृकुटी -बहुतेकदा ती क्रोधाने संरक्षणाशी संबंधित असते.

जांगुली- साप चावणे आणि आजार बरे करण्यात विशेषज्ञ असलेली देवी.

हरिती- जिचे आधीचे काम मुले पळवून नेणाऱ्या राक्षसी म्हणून झाला होता जिला बुद्धाने संरक्षक देवतेत रूपांतरित केले.हरितीला अनेकदा मुलांभोवती किंवा मुलांना धरून ठेवणारी एक सुंदर स्त्री म्हणून चित्रित केले जाते.ती डाळिंबाशी संबंधित आहे, जी तिला मुलांऐवजी खाण्यास शिकवली जात असे.



काही बौद्धदेवता अष्टभयापासून संरक्षण करतात,जे बौद्ध ग्रंथांत सांगितले आहेत.सिंह, हत्ती ,अग्नि, सर्प, चोर, जल, राक्षस, राज यांच्यापासून भयमुक्ती देतो.

मी काही अभ्यासक नाही हे माझं या विषयीचे अल्प आकलन आहे.

परंतु सह्याद्री ट्रेकर्स सामाजिक संस्था विविध विषयातील तज्ञाचे असे अभ्यासक्रम आयोजित करत असते ,ज्याचा मीही ज्ञानवृद्धीसाठी फायदा घेत असते.

कायप्पा संपर्क - डॉ.सुदर्शन बैरागी - 


-भक्ती