#माचीवरला_बुधा
लेखक - #गोनीदांडेकर
आयुष्याच्या संध्याकाळी म्हणजेच निवृत्तीनंतर काय करायचे? कसे शांत जगायचे? आणि आलेल्या काळाच्या मिठीत तृप्ततेने विलीन व्हायचे! याविषयी प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅन असतात.बाह्य आयुष्यातून अंतर्मुखतेकडे, समाजातून निसर्गाकडे, गोंगाटातून शांततेकडे या संक्रमणाचा शोध घेणारी ही कादंबरी आहे. बुधाची वाट मात्र मुळांकडे जाणारी आहे ....माचीकडे ...तिच्या टोकाकडे !
आयुष्यभर मुंबईत गिरणीत टाचा घासल्यानंतर बुधाची सुरकुतलेली पावले आपल्या मुळगावी राजमाचीकडे वयाच्या शेवटच्या टप्प्यातही अक्षरश:धावू लागतात. डोळ्यांवर उतरलेली धूसर पुटेही त्याच्या मनातील डोळ्यांना त्या माचीचे सौंदर्य अनुभवण्यापासून अडवू शकत नाहीत.
निसर्ग सजीव पात्र म्हणून उभा राहतो.गोनीदांच्या लेखनाची ही ठळक खूण.आपल्या वाडवडिलांच्या घरात उत्तरायुष्य व्यतीत करायचे, असा बुधाचा निश्चय असतो. हे घर अगदी एकांताच्या टोकावर आहे,जसे घराजवळचा कडा एकांताच्या टोकावर उभा आहे. बुधा हळूहळू प्रतिनिसर्ग सोबती जमा करू लागतो. बुधा निसर्गाशी संवाद साधतो, कारण तो त्याला वस्तू म्हणून नव्हे, तर सहजीवन म्हणून स्वीकारतो.
आवळीचे झाड त्याची लेक 'आवळीबाई' होते, उंबराचे झाड 'उंबरबाबा' झाले.भाकरीवर ताव मारायला, खारुताईचे कुटुंब तिची पिले त्याची कायमस्वरूपी पाहुणे होतात.चिमण्यांचे पंख दाण्यासाठी बुधाच्या स्वयंपाक घरात हक्काने उतरतात. बुधाने पाळलेला कुत्रा त्याचा मैतर होतो. कधी त्याला शिव्यांचाही प्रेमळ भाकरतुकडा मिळतो. बकरीचा विसावा त्याचे खोपटे होतात.कड्यावरचे नांदुरीचे झाड, दरीच्या खाली दिसणारी शेते बुधाच्या रोजच्या अस्तित्वखुणांचा भाग होऊन जातात. या सगळ्या मूक चेतनांशी बुधाचा संवाद अखंड सुरू असतो.बरं, यांना तरी चेतना आहे, पण बरोबर ठरलेल्या ठरलेल्या वेळी माचीवरून जवळून उडणाऱ्या 'विमान' या यंत्राशीही बुधा मनापासून जोडला गेलेला असतो.माचीवरून ठरलेल्या वेळी उडणाऱ्या विमानाशी बुधाचे भावनिक नाते जुळते. यंत्राचा आवाज त्याच्या दैनंदिन लयीचा भाग बनतो.
कुत्र्याच्या मृत्यूचा प्रसंग ही कादंबरीतील भावनिक वळणाची जागा आहे. तो केवळ पाळीव प्राणी गमावण्याचा प्रसंग नाही, तर बुधाच्या एकांतावर उमटलेली खोल जखम आहे.जखमी म्हैस बुधाच्या दारी झालेला प्रवेश ही कादंबरीतील प्रतीकात्मक परिपूर्णता आहे. बुधा तिची शुश्रूषा करताना प्रत्यक्षात स्वतःचाच सांभाळ करीत असतो. काळाच्या मिठीत तो निसर्गाच्या राजीखुशीने विलीन होतो.इथे मृत्यूची भीती नसून स्वीकार आहे. निवृत्ती म्हणजे संपत्ती नसून समर्पण आहे.
अस्सल गो. नी. दा. लेखनशैलीत निसर्ग सजीव होतो, दुर्गाचे भूगोल मानवी भावनांशी एकरूप होतात, आणि शब्दसंपदेच्या सौंदर्यातून माणसाच्या आदिम प्रवृत्ती जाग्या होतात. ही कादंबरी म्हणजे निसर्गात स्वतःला शोधण्याची, एकटेपणातून पूर्णत्वाकडे जाण्याची हळुवार पण खोलवर भिडणारी यात्रा आहे.
-भक्ती












.jpeg)




