Thursday, April 16, 2026

फॉरेन बायोग्राफीज ऑफ राजा शिवछत्रपती

 बखर + दप्तर + शकावळी + परकीय वर्णने + पत्रे यांचा एकत्र वापर करून इतिहासकार संतुलित इतिहास लिहितात. बखर-दप्तर हे मुख्य मराठी स्रोत आहेत तर परकीय घटना लेख  हे बाह्य दृष्टिकोन देतात.

Foreign Biographies of Shivaji (Extracts and Documents relating to Maratha History, Vol. II) पुस्तक याचे लेखक सुरेंद्रनाथ सेन जे कलकत्ता विद्यापीठातील इतिहासाचे लेक्चरर होते. त्यांनी मराठा इतिहासावर अनेक महत्त्वाचे ग्रंथ लिहिले.

पुस्तकाची पहिली आवृत्ती १९२७ तर दुसरी सुधारित आवृत्ती १९५४/१९५८ दरम्यान प्रसिद्ध झाली.

हे पुस्तक मराठा इतिहास संशोधनातील एक महत्त्वाचे संदर्भग्रंथ आहे. यात शिवाजी महाराजांच्या जीवनावरील परकीय  लेखकांच्या मूळ लेखनांचे इंग्रजी अनुवाद एकत्रित केले आहेत.अशा मराठा इतिहासातील महत्वाच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद रोहित पवार यांनी केला आहे -फॉरेन बायोग्राफीज ऑफ राजा शिवछत्रपती.जे पुस्तक मी नुकतेच वाचले आहे .


रोहित पवार यांनी सुरेंद्रनाथ सेन यांच्या इंग्रजी अनुवादाचा मराठीत अनुवाद केला आहे. यात शिवाजी महाराजांच्या जीवनावरील परकीय विशेषतः युरोपियन लेखकांच्या मूळ लेखनांचे इंग्रजीतून मराठीत अनुवाद समाविष्ट आहेत:

यात परकीय प्रवासी ,वखारीत युरोपीय कर्मचारी यांनी शिवाजी महाराजांच्या काळात काहींनी नंतर अभ्यासांतर्गत वर्णने लिहिलेली आहेत.

कोस्मी द ग्वार्ड (पोर्तुगीज) :शिवाजींचे पहिले व्यवस्थित चरित्र.

जॉन थिवेनो (फ्रेंच).

बार्थेलेमी कारे (फ्रेंच) :इतिहास आणि त्याचा दुसरा भाग.

फ्रांस्वा मार्टिन (फ्रेंच) :कर्नाटक मोहीम.

फ्रांस्वा व्हॅलेंटाइन (डच) : सुरत शहराचे वर्णन.

डच रेकॉर्ड्स आणि इंग्रजी दूतावास संबंधी निवडक दस्तऐवज.

सुरेंद्रनाथ सेन यांनी या सर्व स्रोतांना एकत्र करून इंग्रजी अनुवाद केला होता. रोहित पवार यांनी तो मराठी वाचकांसाठी सोपा आणि उपलब्ध केला आहे.

हे काही  युरोपियन व्यापारासाठी या देशात येत असल्याने अनेकदा जहाज -जहाजावरील मालाला -वखारीला परवानगी यावर अधिक वाचायला मिळते .सुरतची लूट ,महाराजांची कनार्टक मोहीम याविषयी खूप नवी माहिती मिळते.

Vida e Acçoens do famoso e felicissimo Sevagy हे कोस्मी द ग्वार्ड (पोर्तुगीज) लिखित पुस्तक शिवाजी महाराजांचे पहिले व्यवस्थित चरित्र मानले जाते. युरोपियन लेखकांपैकी पहिला लेखक ज्याने शिवाजींच्या संपूर्ण जीवनावर एकात्मिक पुस्तक लिहिले.शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १६९५ ला हे पुस्तक लिहीले जे १७३०  ला लिस्बन, पोर्तुगालमध्ये प्रकाशित झाले.हे लेखन शिवाजी महाराजांना युरोपियन जगात ओळख करून देण्यात महत्त्वाचे ठरले.या पुस्तकाचा संपूर्ण जवळपास १००-११० पानांत येथे दिला आहे .शिवाजीं महाराजांच्या  धैर्य, न्याय आणि प्रजाभिमान यांचे उत्साही वर्णन करते.

जॉन थिवेनो हे १७व्या शतकातील एक शिक्षित फ्रेंच जगप्रवासी होते. त्यांनी शिवाजी महाराजांना “छोटे उंचीचे, पिवळसर वर्णाचे, तेजस्वी डोळ्यांचे आणि बुद्धिमान” असे वर्णन केले. त्यांचे लेखन The Travels of Monsieur de Thévenot into the Levant शिवाजींच्या उदयकाळातील बाह्य दृष्टिकोन देते, पण पूर्ण अचूक नाही.थिवेनो हे १० जानेवारी १६६६ रोजी सुरत बंदरात पोहोचले. त्यांनी शिवाजी महाराजांच्या सुरत लुटीचे (६ जानेवारी १६६४) थोडक्यात पण रोचक वर्णन केले आहे.थिवेनो यांच्या मते, शिवाजी महाराजांनी एका विश्वासू मुगल अधिकाऱ्याच्या मदतीने रात्री शाइस्ताखानच्या खोलीत घुसून हल्ला केला. या हल्ल्यात शाइस्ताखानचा मुलगा मारला गेला आणि एक मुलगी पळवून नेली गेली म्हणजेच सन्मानाने ठेवली. हा हल्ला मुगल सैन्यासाठी मोठा धक्का होता.


बार्थेलेमी कारे, उर्फ अब्बे कारे हा  फ्रेंच धर्मगुरू प्रवासी, लेखक आणि फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीशी संबंधित. होता .तो सुरत, गोवा, बीजापूर, राजापूर, दामण इ. ठिकाणी फिरला. त्याने शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांना प्रत्यक्ष भेटले असल्याचे उल्लेख आहेत.कारे यांनी अफझलखान वधाचे वर्णन आपल्या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात (Sequel to the History of Seva-Gy / Suite de l’Histoire de Seva-gy) केले आहे. हे त्यांच्या पहिल्या भारत भेटीनंतर (१६७१ नंतर) गोळा केलेल्या माहितीवर आधारित आहे.अफझलखानच्या मृत्यूची बातमी पसरताच विजापूर सैन्यात भय आणि गोंधळ पसरला. शिवाजी महाराजांनी अफझलखानचे डोके कापून विजयाचे प्रतीक म्हणून दाखवले.या यशाने शिवाजी महाराजांची शक्ती आणि प्रतिष्ठा मोठ्या प्रमाणात वाढली. विजापूरच्या सैन्याला मोठा धक्का बसला आणि शिवाजींच्या स्वराज्याच्या पायाभरणीला बळकटी आली.



फ्रांस्वा मार्टिन यांचे कर्नाटक मोहिमेचे वर्णन- Memoirs चा "The Karnatak Expedition" शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाचे बाह्य आणि तटस्थ नसलेले पण मौल्यवान चित्र देते. ते शिवाजींच्या यशस्वी मोहिमी, जिंजी किल्ला, पाँडिचेरीशी संबंध आणि प्रशासन यावर प्रकाश टाकते, पण मराठा सैन्याच्या “क्रूरते”वर भर देते.

मार्टिन यांनी पाँडिचेरीजवळील घटनांचे दैनंदिन स्वरूपात वर्णन केले आहे. त्यांच्या नजरेतून मुख्य मुद्दे:


मराठा सैन्याची क्रूरता: शिवाजी महाराजांच्या सैन्याने कर्नाटकातील गावे, शेतं आणि शहरं लुटली. अनेक ठिकाणी आग लावली, लोकांना मारले किंवा पळवले. मार्टिन लिहितात की, मराठा सैन्य आले की “देश हाडापासून सोलला गेला” (peeled to the bones) असे दिसत असे. एक महिन्यानंतरही धूर निघत असल्याचे त्यांनी पाहिले.

शिवाजी महाराजांच्या सैन्याने पाँडिचेरीला घेरले. फ्रेंच लोकांना भीती वाटली. मार्टिन यांनी शिवाजींकडे दूत पाठवला दूताने तीन वेळा शिवाजींची भेट घेतली.

पहिली भेट: फ्रेंचांवरच्या तक्रारी (वल्दौर किल्ला घेणे, गोलकोंडा जहाज पकडणे).

दुसरी भेट: शिवाजींनी फ्रेंचांना तटस्थ राहण्याची सूचना दिली. वेल्लोर किल्ला घेण्यास मदत मागितली, पण फ्रेंचांनी नकार दिला.

तिसरी भेट: शिवाजींनी फर्मान पाठवले  “फ्रेंच तटस्थ राहिले तर पाँडिचेरी सुरक्षित राहील, अन्यथा राजापूर आणि पाँडिचेरी दोन्ही ठिकाणाहून हाकलले जातील.”

 शिवाजींनी जिंजी किल्ला जिंकला. मार्टिन यांनी किल्ल्याचे आकारमान आणि मजबुतीचे वर्णन केले. शिवाजींनी किल्ल्याचा काही भाग पाडण्याचे आणि नवीन किल्लेबंदी करण्याचे आदेश दिले.

शेर खान लोदी  याला शिवाजींनी पराभूत केले. तो फ्रेंचांचा मित्र होता, तसेच त्याच्याकडे कर्जाऊ रक्कम येणे बाकी होते त्यामुळे मार्टिन चिंतित होते.

प्रशासन: शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या प्रदेशात ताबडतोब हवलदार आणि सुभेदार नेमले. यावरून मार्टिन यांना वाटले की, शिवाजी हे प्रदेश कायमचे ठेवण्याचा विचार करत आहेत

मार्टिन शिवाजी महाराजांना “बुद्धिमान रणनीतिकार” म्हणून मान्यता देतात, पण त्यांच्या सैन्याला “निर्दयी लुटारू” म्हणून निंदा करतात. त्यांना मराठा प्रशासन “अत्याचारी” वाटले.


फ्रांस्वा व्हॅलेंटाइन-Oud en Nieuw Oost-Indiën (Old and New East-Indies) हा १७२४-१७२६ मध्ये ८ खंडांत प्रकाशित. हे एक विशाल संकलन आहे ज्यात डच ईस्ट इंडिया कंपनी (VOC) चा इतिहास, भूगोल, नकाशे, चित्रे, वनस्पती-प्राणी आणि भारत-आशियातील वर्णने आहेत.सुरतेची पहिली लूट (१६६४) किंवा दुसरी लूट (१६७०) याविषयक यात विस्तृत वर्णने आहेत.व्हॅलेंटाइन यांच्या मते, १६७० च्या दुसऱ्या लुटीत शिवाजी महाराजांनी ३ दिवस सुरत शहर निवांत लुटले. युरोपियन कारखान्यांना अभय दिले, पण मुगल आणि स्थानिक श्रीमंत व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट केली. ही लूट मुगल साम्राज्यासाठी अपमानजनक आणि डच व्यापारासाठी हानीकारक ठरली.


इंग्रजी दूतावास English Embassies to the Court of Shivaji हे इंग्रजी ईस्ट इंडिया कंपनी च्या Bombay, Surat, Rajapur इ. फॅक्टरींच्या पत्रे, डायरी आणि रिपोर्ट्सचे निवडक भाग आहेत.

हेनरी ऑक्सेंडेन १६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडावरील राजाभिषेक (६ जून १६७४) वेळी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे प्रतिनिधी म्हणून हेनरी ऑक्सेंडेन  हजर होते. ते या सोहळ्यात उपस्थित असलेले एकमेव ब्रिटिश अधिकारी होते. ते २२ मे १६७४ रोजी रायगडावर पोहोचले आणि १३ जूनपर्यंत तेथे राहिले. त्यांनी या काळातील घटनांचे विस्तृत डायरी स्वरूपात वर्णन केले आहे, ज्यात राजाभिषेक सोहळ्याचे काही तपशील आहेत.

राजाभिषेकानंतर २६ मे रोजी ऑक्सेंडेन यांना शिवाजी महाराजांशी भेट झाली. महाराजांनी त्यांना सांगितले की, इंग्रज कंपनीचे व्यापारी त्यांच्या राज्यात मुक्तपणे व्यापार करू शकतात. ऑक्सेंडेन यांनी या भेटीचे वर्णन मुंबईला पाठवलेल्या पत्रांमध्ये केले आहे.

Stephen Ustick, Nicholls, Oxinden इ. दूत आणि तोफा-दारूगोळा खरेदीचा प्रयत्न करत होते .

राजाभिषेकाच्या आसपास आणि आधीच्या काळात ईस्ट इंडिया कंपनीने शिवाजी महाराजांशी व्यापारी आणि राजकीय संबंध प्रस्थापित करण्यासाठी अनेक दूत पाठवले होते. यामागील मुख्य कारण होते.

राजापूर लूट (१६६० च्या दशकात) झालेल्या ब्रिटिश कारखान्याच्या नुकसानीबद्दल भरपाई  मिळवणे.

शिवाजी महाराजांना तोफा, दारूगोळा आणि युद्धसामग्री विकणे किंवा पुरवणे, ज्यामुळे कंपनीला नफा मिळावा आणि संबंध दृढ व्हावेत.


क्रमानुसार दूत-


Stephen Ustick (लेफ्टनंट) १६७१ च्या आसपास शिवाजी महाराजांकडे पाठवला गेला. राजापूर नुकसानीबद्दल चर्चा आणि शस्त्रास्त्रांच्या मुद्द्यावर बोलणे.

Nicholls त्यानंतर पाठवला गेला, मुख्यतः राजापूर आणि हुबळी येथील नुकसानीबद्दल वाटाघाटी करण्यासाठी.

Henry Oxenden १६७४ मध्ये राजाभिषेकाच्या वेळी मुख्य दूत म्हणून गेले. ते व्यापाराच्या स्वातंत्र्याबाबत चर्चा करत होते. शिवाजी महाराज शस्त्रसामग्री खरेदी करू इच्छित होते, पण राजापूर प्रकरण पूर्णपणे सोडवले गेले नाही.


या दूतांच्या माध्यमातून कंपनीने मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, ज्यात शस्त्र पुरवठा हा एक महत्त्वाचा भाग होता. मात्र, पूर्ण सहमती झाली नाही; शिवाजी महाराजांनी राजापूरची भरपाई दिली नाही, तरी व्यापाराच्या काही सवलती मिळाल्या.

हे संबंध मुख्यतः व्यापारी हित साधण्यासाठी होते. शिवाजी महाराज स्वतंत्र हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना, इंग्रज कंपनीने त्यांच्याशी संतुलित संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. ऑक्सेंडेन यांचे डायरी आणि कंपनीचे रेकॉर्ड्स हे या काळातील महत्त्वाचे स्रोत आहेत.

Monday, April 13, 2026

वेळास कासव महोत्सव -2026

 वेळास कासव महोत्सव पाहण्याची अनेक वर्षांची तीव्र इच्छा मला अखेर काल या पिटुकल्या कासवांच्या जन्मसोहळ्याला घेऊन गेली.



जाणार तर एखाद्या सहल आयोजित करणाऱ्या ग्रुपसोबत हे नक्की होत.इन्स्टा ,फेसबुक धुंडाळले.अनेक नंबर रील्स सेव्ह केले .मग फेसबुकवर एक खणखणतीत आवाजात वेळास कासव महोत्सवाची माहिती देणारा "सह्याद्री मेट्स "Sahyadri Mates ओमचा व्हिडीओ सापडला .जो आवडला.यावेळी आईला ट्रीपला न्यायचं ,आई -लेकीने धमाल करायचं ठरवलं.ट्रिपची संध्याकाळ उगवली डेक्कनला भटकंती वेडे जमा झाले .ट्रॅव्हलरमध्ये शिरताच २४ तासाच्या ट्रीपसाठी ट्रॉलीभर कपडे आणणारा आणि एनर्जीने भरलेला मैत्रिणींचा -त्यांचा मुलांचा मोठा ग्रुप ट्रीपमध्ये धमाल आणणार हे समजलं .मग काय हम गड्डी लेकरं निकले वेळास कि और ..

पहाटेच्या थंड वारा झेलत ,समुद्राची धीर-अधीर गाज कानी भरत वेळास किनाऱ्याकडे कूच केले .जाताना कांदळवनाच्या मुळांनी जमिनीला घट्ट धरलेलं पाहून निसर्गाच्या प्रत्येक मॅनेजमेंटचे कौतुक अक्षरशः आश्चर्य चकित करत राहते .पुढे किनाऱ्यावर गेल्यावर वेध लागले कासवांच्या पिलांना पाहायचे .

एका बंद जाळीच्या आत कासवांची अनेक घरटी समुद्राच्या मऊशार मातीत खोल केलेली असतात त्यावर एक बांबूचे मोठे टोपडे झाकलेले असते .खूप वेळ त्या बंद जाळीच्या बाहेर वाट पाहिल्यावर तेथील वन संवर्धन करायला मदत करणारे गावकरी आले .इथे निसर्गाने धीर ,संयम किती महत्वाचा याचा प्रत्ययच जणू दिला .त्यांनी सर्व घरटे उघडून पहिले,दुसरे,तिसरे पण अंडे फोडून बाहेर आलेले पिल्ले सापडले नाही.तेव्हा आज पिल्ले दिसणार कि नाही अशी शंका आली ,कारण कधी कधी अजिबात एकही पिल्ले बाहेर पडत नाही.पण अखेर चौथ्या टोपल्या खालच्या घरट्यात दोन छोटुले कासव दिसले..आणि ओह वाह अशा जमलेल्या लोकांच्या आनंदाच्या आवाजाने परिसर घुमला .चला रिकाम्या हाती नाही तर थोड्या तरी उत्तम अनुभव आपल्याला मिळणार याचे समाधान वाटले .




मग हि पिल्ले समुद्र किनाऱ्यावर सोडण्यासाठी नेण्यात आली .जिथे दोरीचे एक छोटे कुपन करून तिन्ही बाजूने पर्यटक उभे राहून हा सोहळा अनुभवणार होते .या आधी तेथील वनरक्षक अधिकाऱ्यांनी कासव संवर्धनाची खूप मोलाची माहिती दिली.

यात महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाकडून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये समुद्री कासवांच्या (Sea Turtles) संरक्षणासाठी केल्या जाणाऱ्या कामाची माहिती दिली. महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर ५ प्रकारचे समुद्री कासव आढळतात. त्यात सर्वात जास्त ऑलिव्ह रिडले (Olive Ridley) कासव असतात. समुद्री कासव आणि जमिनीवरील कासव यात फरक सांगितला आहे .समुद्री कासवांना फ्लिपर्स (पंखासारखे पाय) असतात, ते समुद्रात राहतात. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात मादी कासव किनाऱ्यावर येऊन ९० ते १०० अंडी घालते. नंतर ती समुद्रात परत जाते. अंडी वाचवण्यासाठी स्थानिक लोक (वन विभागाकडून मानधन घेऊन) रात्री पेट्रोलिंग करतात. लाल दिवा वापरतात जेणेकरून कासवांना त्रास होऊ नये. अंडी घालल्यानंतर लगेचच काढून घेऊन हॅचरी (सुरक्षित जागी) ठेवतात. तिथे ५२ ते ५८ दिवसांत पिल्ले (हॅचलिंग्स) बाहेर पडतात. पिल्लांचे लिंग (मादी/नर) अंड्यांच्या तापमानावर अवलंबून असते, त्यामुळे तापमान नियंत्रित ठेवले जाते.ज्यात गार पाण्याने भिजलेले पोत इत्यादी वापरले जाते. पिल्ले बाहेर पडल्यानंतर लगेच समुद्रात सोडले जातात. त्यांना मानवी हस्तक्षेप टाळावा लागतो कारण एक हजार पैकी फक्त एक पिल्लू जगते. कासव महोत्सव दरम्यान पिल्ले सोडण्याची प्रक्रिया आणि लोकांना आवाहन केले की, पिल्ले सोडल्यानंतर एक तास समुद्राकडे कमी यावे जेणेकरून पिल्लांना अडचण येऊ नये.

सांगितलेल्या ठराविक काळानंतर समुद्राच्या लाटांशी खेळण्याची मजा अनुभवली. मग नाशत्यासाठी एका कोकणी घरी निघालो.अत्यंत आपुलकीने हे कुटुंब आम्हांला हवं नको ते पुरवत होते ...खरंच की कोकणची माणसं साधी भोळी ,यांच्या काळजात भरली शहाळी !!!

पुढचा भटकंती टप्पा होता 'बाणकोट' उर्फ हिम्मतगड ! या किल्ल्याची ,किल्ल्याला हिम्मतगड नाव देणारे कान्होजी आंग्रे खुप महत्वाची माहिती आमचे sahyadri mates चे टीम लीडर ओम याने दिली. हिम्मतगड उर्फ बाणकोट किल्ला (ज्याला फोर्ट व्हिक्टोरिया म्हणूनही ओळखले जाते) हा रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात, सावित्री नदीच्या मुखावर (समुद्राला मिळण्याच्या ठिकाणी) एका ३०० फूट उंच टेकडीवर वसलेला सागरी किल्ला आहे. हा किल्ला मुख्यतः खाडीतील व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी बांधला गेला.  ग्रीक प्रवासी टॉलेमी (१ल्या शतकात) याने याचा उल्लेख मंदगोर/मंदारगिरी म्हणून केला. चिनी प्रवासी ह्युएन त्सांग याने इ.स. ६४० मध्ये येथे वास्तव्य केल्याची नोंद आहे. १५४८ ला बीजापूरच्या आदिलशहाकडून पोर्तुगीजांनी किल्ला जिंकला. १७०० ला मराठा सरसेनापती कान्होजी आंग्रे यांनी किल्ला जिंकून त्याला "हिम्मतगड" हे नाव दिले. तो मराठा आरमाराचा महत्त्वाचा तळ बनला. १७५५ ला तुळाजी आंग्रे आणि पेशव्यांमधील वादामुळे पेशव्यांनी इंग्रजांशी युती केली. इंग्रज कमोडोर जेम्स याने सुवर्णदुर्ग जिंकल्यानंतर बाणकोटही ताब्यात घेतला आणि "फोर्ट व्हिक्टोरिया" नाव दिले. नंतर इंग्रजांना किल्ला ठेवणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे नसल्याने तो पेशव्यांकडे परत दिला. १८३७ ला मामलेदार कार्यालय मंडणगड किल्ल्यावर हलवले गेले. हा किल्ला ट्रेकिंगसाठी सोपा आहे. समुद्र, खाडी आणि हिरवीगार निसर्गाचा अप्रतिम नजारा येथून दिसतो. तो कोकणातील सागरी वर्चस्व आणि मराठा आरमाराच्या शौर्याची साक्ष देतो.


किल्ल्यास भेट दिल्यांनतर ठरलेल्या ठिकाणी पुन्हा रुचकर जेवणाचा आस्वाद घेऊन हरिहरेश्वरकडे रवाना झालो .वेळास ते हरिहरेश्वर पोचण्यासाठी समुद्री जेट्टीने जायचे हा एक रोमांचक अनुभव घेण्याच्या वाट पाहत होतो. वेळास (रत्नागिरी जिल्हा, मंडणगड तालुका) ते हरिहरेश्वर (रायगड जिल्हा, श्रीवर्धन तालुका) जाण्यासाठी सावित्री नदी खाडी ओलांडण्यासाठी वेसवी जेट्टी ते बागमंडळे जेट्टी ही फेरी बोट सेवा उपलब्ध आहे.ही फेरी बोट घेतल्याने रस्त्याने लांबचा चकरा टाळता येतो. प्रवास फक्त १०-१५ मिनिटे लागतो. गाडी (कार, बाईक, छोटी बस) सुद्धा फेरीत घेता येते.

आणि उणापुऱ्या ३० मिनिटांत रत्नागिरीतून रायगड जिल्हात जेट्टी +ट्रॅव्हलर मार्गे हरिहरेश्वरला पोहचलो. १७२३ मध्ये आगीत मंदिर नष्ट झाल्यानंतर पहिले बाजीराव पेशवे यांनी पूर्ण जीर्णोद्धार केला. पेशव्यांचे कुलदैवत मानले जाते.चंद्रराव मोरे यांनी प्रदक्षिणा मार्ग बांधला.छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, कान्होजी आंग्रे आणि पेशवे यांनी येथे दर्शन घेतल्याच्या नोंदी आहेत.काळभैरव हे क्षेत्राचे रक्षक देवता मानले जातात. दर्शनाची पद्धत म्हणजे प्रथम काळभैरव, नंतर हरिहरेश्वर आणि शेवटी पुन्हा काळभैरवाचे दर्शन घ्यावे अशी मान्यता आहे .

त्यानंतर सुप्रसिद्ध मंदिराभोवती एक खास डोंगर-समुद्र प्रदक्षिणा मार्ग-हरिहरेश्वर मंदिरातील "कोसाची प्रदक्षिणा" सुमारे १ ते १.५ किमी हा मार्ग कोकणातील एक अनोखा मार्ग चालायला सुरुवात केली .मार्ग डोंगर, खडकाळ कडा आणि समुद्रकिनाऱ्याजवळून जातो, ज्यामुळे तो केवळ धार्मिक नव्हे तर निसर्गरम्यही आहे. सुरुवातीलाच काही अंतरानंतर क्लिफ कट दिसतात . पायऱ्या खडकातच कोरलेल्या आहेत. मंदिरामागे दोन मोठ्या खडकांमधून मार्ग जातो. एक प्रसिद्ध आख्यायिका आहे की भीमने मार्गात अडथळा ठरत असलेला मोठा खडक दोन तुकड्यांत फोडला.

पुढे दिसणार्या हरिहरेश्वर प्रदक्षिणा मार्गातील खडक रचना ज्याला कॉम्ब खडक रचना म्हणतात. हा मार्ग डोंगर, खडकाळ कडा आणि समुद्रकिनाऱ्याजवळून जातो, जिथे लाटा, वारा आणि पाण्याच्या दीर्घकाळीन प्रभावामुळे खडकांमध्ये विविध आकार साकार झाले आहेत.समुद्राच्या लाटा आणि भरती-ओहोटीमुळे हे खडक वेव्ह-कट (wave-cut) झाले आहेत.खडकांच्या भिंती आणि उतारांवर मधमाशीच्या पोळ्यासारखी छोटी-छोटी खोबरे किंवा गुहा तयार झालेली दिसतात. हे टाफोनी म्हणून ओळखले जाते. हे शतकानुशतके वारा, पाणी आणि मीठ यांच्या weathering -क्षरण मुळे तयार झाले.खडकांमध्ये लाटांनी कोरलेल्या छोट्या गुहा आणि niches आहेत.लाटांच्या मार्‍याने तयार झालेले मनमोहक, नैसर्गिक आकार काही ठिकाणी गुळगुळीत, काही ठिकाणी खडबडीत आणि अद्भुत डिझाइन दिसतात. काही खडकांवर छोटे कोरल आणि शेवाळ देखील वाढलेले होते.

या खडकांमुळे मार्गावरून चालताना एकीकडे खडक आणि दुसरीकडे अथांग समुद्र यांचा थरारक नजारा मिळतो. अगदी प्रत्येकाने अनुभवी अशी ही रोमांचक प्रदक्षिणा आहे . पिटुकल्या जीवांचा समुद्राकडे सुरू होणारा प्रवास ,अथांग सुंदर वेळास किनारा ,बाणकोटची ऐतिहासिक माहिती,हरिहरेश्वरची धार्मिक व नैसर्गिक चमत्कारांची दृश्ये डोळ्यांत -मनात भरून एक सुंदर अविस्मरणीय अनुभव जीवन खाती जमा झाला .



या पूर्ण प्रवासात संपूर्ण अनोखळी पण भन्नाट-एनर्जेटिक मैत्रिणी अनुभवल्या,सर्वात छोट्या तीन वर्षाच्या लेकराचा समुद्र पाहून झालेला आनंद अनुभवला ,लहानपणी काळजीने आई समुद्र काठी तिकडे जाऊ नको म्हणायची ,तसेच काळजीने मी म्हणत होते "आई फार समुद्रात जाऊ नको "असा काळाचा गॉड उलट माहीम अनुभवला .कोणत्याही परिस्थितून टीम लीडरने कसे वातावरण हलके फुलके आणि आनंददायी ठेवायचे याचा अनुभव टीमलीडर ओम कडून मिळाला .मागे असणाऱ्यांना प्रोत्साहन देणारा सुमित याची चिकाटी अनुभवली .पियुष आणि रमझान यांनी चालत राहा ,खुश राहा हा अनुभव दिला .मैत्रिणीने "मुलींनो स्वतः:साठी वेळ द्या " या माझ्या एका वाक्यावर या ट्रीपवर येण्याचे ठरवले याचा समाधानकारक अनुभव मिळवला . सांसारिक जीवनातुन वाचन,अध्यात्म,लिखाण ,नवमैत्र यांचे अधिष्ठाण देताना स्वतःच्या भटकंतीच्या एक एक इच्छा पूर्ण करतांना ...मी मला पुन्हा पुन्हा सापडत राहते..पुन्हा नव्याने !!! -भक्ती





Thursday, April 9, 2026

हंपी_इतिहास _७ ( विजयनगर साम्राज्याचा दुसरा राजवंश - सालुवा राजवंश)



सालुवा राजवंशाची पार्श्वभूमी

विजयनगर साम्राज्याचा दुसरा राजवंश म्हणून सालुवा राजवंश ओळखला जातो. हा राजवंश उत्तर कर्नाटकातील कल्याणी (बसवकल्याण) प्रदेशातून उगम पावला. गोरंटला शिलालेखानुसार (आंध्र प्रदेश), सालुवा वंशीयांचा संबंध पश्चिम चालुक्य आणि कलचुरी वंशाशी जोडला जातो.

"सालुव" हा शब्द शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या बाज -falcon पक्ष्याशी संबंधित आहे. नागिरे  प्रांतात अनेक जैन बासडी (उदा. चतुर्मुख बसादी, गेरुसोप्पा) बांधण्यात त्यांचा सहभाग होता.

संस्थापक

मंगलदेव जे सालुव नरसिंह देव राय यांचे पणजोबा होते . सम्राट बुक्का राय प्रथम यांच्या काळात मदुराई सल्तनतीविरुद्धच्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली.

सालुव गौंडा हे नरसिंहाचे वडील, चंद्रगिरीचे राज्यपाल होते.

सालुवा राजवंशाचे तीन शासक (१४८५ ते १५०५ पर्यंत)

सालुवा राजवंश फार छोटा होता , पण त्याने साम्राज्याला विघटनापासून वाचवले. 


सालुव नरसिंह देव राय (सालुव नरसिंह प्रथम) (१४८५–१४९१)

संस्थापक आणि सर्वात महत्त्वाचा शासक.

१४५२ मध्ये सम्राट मल्लिकार्जुन राय यांच्या काळात त्यांना चंद्रगिरीचे महामंडलेश्वर पद मिळाले.

विरुपाक्ष राय द्वितीय आणि प्रौढ राय यांच्या दुर्बल कारकिर्दीत साम्राज्य अराजकतेत होते. नरसिंहाने आपल्या विश्वासू सेनापती तुलुव नरस नायक (तुलुव ईश्वर नायकाचा मुलगा) याला मदत करून प्रौढ रायचा पाडाव केला आणि १४८५ मध्ये गादी घेतली.


१. गजपती राजांशी युद्ध (मुख्यतः उदयगिरीसाठी, १४८९)

विरोधक: ओरिसाचे गजपती सम्राट पुरुषोत्तम देव.

कारण: उदयगिरी किल्ला (आंध्र प्रदेशातील महत्त्वाचा किल्ला) हा विजयनगर आणि गजपती यांच्यातील वादाचा मुख्य मुद्दा होता. सालुवा नरसिंहाने उदयगिरी जिंकण्याचा प्रयत्न केला.

परिणाम: हे युद्ध विनाशकारी ठरले. सालुवा नरसिंह यांना कैद करण्यात आले. त्यांची सुटका झाली तेव्हा त्यांना उदयगिरी किल्ला आणि आजूबाजूचा प्रदेश गजपतींना सोपवावा लागला.

प्रभाव: पूर्व किनाऱ्यावरील (आंध्र प्रदेश) काही भाग गमावला. हे त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे अपयश मानले जाते. काही स्रोतांनुसार कैद १ वर्षापर्यंत टिकली असावी.


उदयगिरी युद्धाचा सविस्तर इतिहास (१४८९ ई.)

उदयगिरी (आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील उदयगिरी किल्ला) हा विजयनगर साम्राज्य आणि गजपती साम्राज्य (ओडिशा) यांच्यातील वादाचा मुख्य केंद्रबिंदू होता. हा किल्ला पूर्व किनाऱ्यावरील सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा होता .व्यापार मार्ग, कृषी प्रदेश आणि दक्षिण भारतातील नियंत्रणासाठी तो रणनीतिक ठिकाण मानला जात असे.

सालुवा नरसिंह देव राय यांनी १४८५ मध्ये प्रौढ राय यांना पराभूत करून विजयनगरची गादी घेतली. त्यावेळी साम्राज्य आंतरिक अराजकतेत आणि बंडखोर राज्यपालांच्या दबावाखाली होते.

गजपती राजा कपिलेंद्र देव यांच्या काळात गजपतींनी उदयगिरीसह अनेक पूर्वेकडील प्रदेश ताब्यात घेतले होते.

कपिलेंद्र देव यांच्या मृत्यूनंतर गजपती घराण्यात उत्तराधिकार युद्ध झाले (हम्वीर विरुद्ध पुरुषोत्तम देव). या गोंधळाचा फायदा घेऊन सालुवा नरसिंह यांनी पूर्वी गमावलेले भाग (चंद्रगिरी, उदयगिरी इ.) पुन्हा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.

पुरुषोत्तम देव (१४६७–१४९७) गजपती सिंहासनावर बसल्यानंतर त्यांनी आपल्या दक्षिणेकडील प्रदेश मजबूत करण्यासाठी मोहीम हाती घेतली.

युद्धाची सुरुवात आणि घटनाक्रम (१४८९)

सालुवा नरसिंह यांनी उदयगिरी किल्ला जिंकण्यासाठी किंवा त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सैन्य पाठवले. काही स्रोतांनुसार ते स्वतः या मोहिमेत सहभागी होते.

पुरुषोत्तम देव यांनी याचा प्रतिकार केला. गजपती सैन्याने विजयनगरच्या सैन्याला रोखले.

 उदयगिरी किल्ल्याभोवती झालेल्या लढाईत गजपती सैन्याने विजयनगर सैन्याला पराभूत केले. सालुवा नरसिंह कैद झाले (काही वर्णनांनुसार ते किल्ल्यातच होते आणि तेथे कैद झाले).

गजपती सैन्याने किल्ला पुन्हा ताब्यात घेतला.

युद्धाचे परिणाम आणि शर्ती

सालुवा नरसिंह यांची सुटका झाली तेव्हा त्यांना उदयगिरी किल्ला आणि आजूबाजूचा प्रदेश (कोस्टल आंध्रचा काही भाग) पुरुषोत्तम देव यांना सोपवावा लागला.

काही स्रोतांनुसार ( ताम्रपट) सालुवा नरसिंह यांनी भीतीने किंवा विनवण्या करून उदयगिरी सोपवला आणि स्वतःची सुटका मिळवली.

काही इतिहासकारांच्या मते, कैद १ वर्ष किंवा त्याहून अधिक काळ टिकली असावी, पण बहुतेक स्रोत १४८९ च्या युद्धावर भर देतात.

या पराभवामुळे विजयनगरने पूर्व किनाऱ्यावरील महत्त्वाचा भाग गमावला. उदयगिरी किल्ला गजपतींकडे राहिला आणि तो १५१४ पर्यंत (श्रीकृष्णदेव राय यांच्या काळात) त्यांच्याकडेच राहिला.

स्रोत आणि वर्णने

 (प्रतापरुद्र गजपती यांचे): पुरुषोत्तम देव यांनी कर्नाटक राजा नरसिंहाला जिवंत पकडले आणि त्याने जीवन भीक मागितल्यावर सोडले.

 ताम्रपट (१५००): नरसिंहाने भीतीने उदयगिरी सोपवला.

नुनिझ (पोर्तुगीज इतिहासकार): युद्ध आणि पराभवाचे उल्लेख.

सलुवभूगीयम आणि इतर संस्कृत ग्रंथ: सालुवा नरसिंह यांच्या कालिंग (ओडिशा) विरुद्धच्या मोहिमेचे वर्णन.

काही लोककथा/कांची-कावेरी उपाख्यानात या युद्धाचे संदर्भ येतात, ज्यात प्रथम गजपती सैन्याचा पराभव झाल्याचेही सांगितले जाते, पण मुख्य १४८९ च्या युद्धात गजपतींचा विजय झाला.

सालुवा नरसिंह यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे अपयश मानले जाते. यामुळे त्यांची प्रतिष्ठा धक्का बसला आणि आंतरिक बंडखोरांना प्रोत्साहन मिळाले.


२. पश्चिम किनाऱ्यावरील यशस्वी मोहीम (मंगळूर, भटकळ, होन्नावर, बाकनूर)

विरोधक: मुख्यतः बहमनी सुलतानांच्या प्रभावाखालील स्थानिक शासक किंवा बंडखोर.

संपादित बंदरे:

मंगळूर

भटकळ

होन्नावर

बाकनूर (किंवा बांकनूर)

महत्त्व: या बंदरांवर नियंत्रण मिळवल्याने अरबी घोड्यांचा वेगवान पुरवठा शक्य झाला. यामुळे विजयनगरच्या घोडदळ आणि एकूण सैन्याची ताकद वाढली.

परिणाम: पश्चिम किनारा (कन्नड देश) मजबूत झाला. हे त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे सैनिकी यश मानले जाते.


३. बंडखोर राज्यपाल आणि स्थानिक प्रमुखांविरुद्ध युद्धे

सालुवा नरसिंहाला आपल्या स्वतःच्या राज्यात अनेक बंडखोरांना दाबण्यासाठी सतत लढावे लागले. यात मुख्य होते:

उम्मत्तूर (मैसूर प्रदेश) चे प्रमुख - होयसळ-मैसूर क्षेत्रातील पालयगर.

हडवल्लीचे सालुवास.

करकलचे संथारस  -किनारपट्टी कर्नाटकातील.

श्रीरंगपट्टण क्षेत्र.

कुड्डापा येथील पेरानिपाडू चे संबेटास .

विशेष मोहीम:

संबेटा प्रमुख विरुद्ध: पेरानिपाडू आणि मड्डिगुंडला  किल्ल्यांवर हल्ला. तोफखान्याच्या साहाय्याने किल्ले जिंकले. संबेटा प्रमुख आणि त्याचे अनुयायी मारले गेले.

उम्मत्तूर आणि तुळुनाडू मधील पालयगरांवर विजय.

मल्लिदेव विरुद्ध: बोम्मावरम  किल्ल्यावर हल्ला, तोफखान्याने किल्ला उद्ध्वस्त केला.

हे युद्धे मुख्यतः आंतरिक स्थिरता साठी होते. बंडखोरांना दाबल्याने साम्राज्य एकत्र ठेवणे शक्य झाले.

सांस्कृतिक योगदान: मध्व संत श्रीपादराय यांचे संरक्षक. संस्कृत ग्रंथ रामभ्युदयम लिहिला. कन्नड कवी कवी लिंग यांना आश्रय दिला. जैन मंदिरांशी संबंधित कार्य.

१४९१ मध्ये मृत्यू झाला. त्याचे दोन्ही मुलगे (थिम्म भूपाल आणि नरसिंह राय द्वितीय) लहान होते, त्यामुळे पालकत्व आणि प्रशासनाची जबाबदारी तुलुव नरस नायक वर सोपवली.


थिम्म भूपाल (१४९१)

सालुव नरसिंहाचे थोरले पुत्र.

फक्त काही महिने (किंवा एक वर्ष) सिंहासनावर राहिले.

सैन्यातील एका कमांडरने त्यांची हत्या केली (अराजकतेत).

त्यांचे राज्य फार छोटे आणि अस्थिर होते.


नरसिंह राय द्वितीय (इम्मडी नरसिंह) (१४९१–१५०५)

सालुव नरसिंहाचे धाकटे पुत्र.

नाममात्र सम्राट होते. वास्तविक सत्ता तुलुव नरस नायक (रिजेंट म्हणून) आणि नंतर त्याच्या मुलांकडे होती.

१५०५ पर्यंत सिंहासनावर राहिले, पण प्रत्यक्ष सत्ता नव्हती.

१५०५ मध्ये तुलुव नरस नायकाचा मुलगा विर नरसिंह याने त्यांची हत्या करून तुलुवा राजवंश सुरू केला.

महत्वाचे मुद्दे

सालुवा राजवंशाने संगम राजवंश नंतर (१४८५) सत्ता घेतली आणि साम्राज्याला विघटनापासून वाचवले.

तुलुव नरस नायक हा कळीचा व्यक्ती होता . सालुव नरसिंहाचा सेनापती, नंतर रिजेंट आणि तुलुवा राजवंशाचा पूर्वज.

या काळात नुनिझ (पोर्तुगीज इतिहासकार) यांनी विजयनगरची स्थिती आणि नरस नायकाच्या कारवाया यांचे वर्णन केले आहे.

राजवंश जरी छोटा असला तरी सालुव नरसिंह देव राय यांच्या सैनिकी यशामुळे पश्चिम किनारा मजबूत झाला

तुलुव नरस नायक 

विजयनगर साम्राज्याच्या इतिहासातील एक महत्त्वाची आणि प्रभावशाली व्यक्ती होते. ते सालुवा राजवंश आणि तुलुवा राजवंश यांच्यातील सेतु होते. त्यांनी साम्राज्याला पूर्ण विघटनापासून वाचवले आणि पुढील काळातील महान शासक श्रीकृष्णदेव राय यांच्यासाठी मजबूत पाया तयार केला.

पार्श्वभूमी आणि उत्पत्ती

कुटुंब: ते तुलुव ईश्वर नायक यांचे पुत्र होते. त्यांचे कुटुंब तुलु भाषिक प्रदेशातून (आधुनिक दक्षिण कर्नाटकातील किनारपट्टी, बंट समुदाय) होते.

सुरुवातीला ते सालुवा नरसिंह देव राय यांचे सेनापती होते. सालुवा नरसिंह यांनी प्रौढ राय यांचा पाडाव करताना नरस नायक यांची महत्त्वाची मदत घेतली होती.

सालुवा नरसिंहाच्या मृत्यूनंतरची भूमिका (१४९१)

सालुवा नरसिंह देव राय यांचा मृत्यू १४९१ मध्ये झाला. त्यावेळी त्यांचे दोन्ही पुत्र थिम्म भूपाल आणि इम्मडी नरसिंह (नरसिंह राय द्वितीय) लहान होते.

थिम्म भूपाल यांची एका सैन्य कमांडरने हत्या केली.

नरस नायक यांनी विश्वासूपणे उरलेल्या लहान राजकुमार नरसिंह राय द्वितीय यांना सिंहासनावर बसवले.

मात्र, वास्तविक सत्ता त्यांच्या हाती होती. त्यांना रक्षकर्ता , स्वामी , सेनाधिपती , महाप्रधान आणि कार्यकर्ता  अशा पदव्या मिळाल्या.

ते रिजेंट म्हणून १४९१ ते १५०३ पर्यंत साम्राज्य चालवत होते. नाममात्र राजा इम्मडी नरसिंह होते, पण सर्व प्रशासन आणि लष्करी निर्णय नरस नायक यांच्याकडे होते.

नरस नायक यांनी साम्राज्याला अनेक धोक्यांपासून वाचवले

बहमनी सुलतान आणि गजपती (ओडिशा) यांच्या आक्रमणांना यशस्वी प्रतिकार केला.

अनेक बंडखोर पालयगर आणि स्थानिक प्रमुखांना दाबले.

कावेरी नदीच्या दक्षिणेकडील संपूर्ण प्रदेश (केप कोमोरिनपर्यंत) -चोल, चेरा, मदुराई, श्रीरंगपट्टण आणि गोकार्णा - विजयनगरच्या नियंत्रणाखाली आणला. ही मोहीम १४९७ पर्यंत पूर्ण झाली.आंतरिक अराजकता आणि बाह्य शत्रूंना रोखून साम्राज्य स्थिर केले.

धार्मिक आणि सांस्कृतिक योगदान

ते सुरुवातीला शैव होते, पण नंतर वैष्णव धर्म स्वीकारला.

त्यांनी विद्वान आणि साहित्यिकांना आश्रय दिला. उदाहरणार्थ:

पारिजातापहरणमु (नंदी तिम्मना)

वराह पुराणमु (घंटा सिंगय्या)

मठ आणि मंदिरांना दान दिले.

मृत्यू आणि वारसा

१५०३ मध्ये नरस नायक यांचा मृत्यू झाला (काही स्रोतांनुसार बीजापूर परिसरात).

त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा थोरला मुलगा वीर नरसिंह राय याने इम्मडी नरसिंह यांची हत्या करून १५०५ मध्ये सिंहासन घेतले आणि तुलुवा राजवंश अधिकृतपणे सुरू केला.

नरस नायक यांचे आणखी पुत्र श्रीकृष्णदेव राय (सर्वात प्रसिद्ध) आणि अच्युत देव राय हे होते .

महत्व

नरस नायक यांनी दोन बलापहार  च्या दरम्यान साम्राज्य वाचवले .प्रथम सालुवा नरसिंह यांच्याद्वारे, नंतर स्वतः रिजेंट म्हणून.

त्यांच्या प्रयत्नांमुळे विजयनगर साम्राज्य १६व्या शतकात श्रीकृष्णदेव राय यांच्या काळात स्वर्णयुगाकडे गेले.

ते स्वतः कधीही राजा झाले नाहीत, पण त्यांना तुलुवा राजवंशाचे संस्थापक मानले जाते.

संक्षेपात, तुलुव नरस नायक हे एक कुशल सेनापती, प्रशासक आणि दूरदर्शी नेते होते. त्यांच्या निष्ठेने आणि सामर्थ्याने विजयनगर साम्राज्य टिकले आणि पुढे विस्तारले.

Saturday, April 4, 2026

#हंपीतील गणेश मंदिर

 #हंपीतील गणेश मंदिर

विरुपाक्ष मंदिरास आम्ही हेमकूट पर्वतावर पोहचलो .हेमकूट पर्वतावरून विरुपाक्ष मंदिराचा उंच सुंदर गोपुर पाहून टेकडीच्या  पायथ्याकडे निघालो . 

हम्पीच्या हेमाकुटा टेकड्यांच्या दक्षिणेकडील पायथ्याशी, गजमुखी देव गणेशाला समर्पित दोन मंदिरे आहेत. ससिवेकलु मंदिर आणि कडलेकू मंदिर या दोन्ही ठिकाणी भगवान गणेशाची वेगवेगळी रूपे आहेत.या दोन्ही मूर्ती एकाश्म मूर्ती म्हणजे एकाच दगडात कोरलेल्या अशा भव्य आहेत.


#ससिवेकलु गणेश मंदिर

ससिवेकलु मंदिर १५ व्या शतकातील आहे. हे एक अतिशय साधे खुले गर्भगृह असून, त्यावर अनेक चौकोनी खांबांवर फक्त छत आहे. येथील मूर्ती भगवान गणेशाची असून ती ८ फूट उंच, एकाच शिळेतून बनवलेली भव्य प्रतिमा आहे.

गणपतीच्या पोटाचा आकार मोहरीच्या दाण्यासारखा जवळजवळ गोलाकार असतो, म्हणूनच हे नाव ससिवेकलू पडले आहे,ज्याचा कन्नड अर्थ मोहरीचा दाणा आहे .


गणेशाला चार हात असून, प्रत्येक हातात विविध चिन्हे आहेत.

उजवा वरचा हात-अंकुश (goad)

उजवा खालचा हात- तुटलेला दात (broken tusk)

डावा वरचा हात -पाश (noose)

डावा खालचा हात-मोदक (लाडू)  हा हात तुटलेला आहे आणि पुनर्निर्माण केलेला नाही.


पोटाभोवती नाग गुंडाळलेला दिसतो .हिंदू पुराणानुसार, गणेशजी खूप खाणारे आहेत. एकदा त्यांनी इतके जेवण केले की पोट फुटण्याच्या बेतात आले. पोट वाचवण्यासाठी त्यांनी एक साप पकडला आणि त्याला कंबरेच्या भोवती पट्ट्यासारखा बांधला. याच कथेचे दर्शन या मूर्तीत आहे.


या मूर्तीला पार्वती गणेशही म्हणतात .कारण ही मूर्ती मागच्या  बाजूने पहिली असता ,मूर्तीच्या मागे पार्वतीचा हात दिसतो . गणेश आईच्या मांडीवर बसलेला असल्याचे दृश्यभास होतो.तर डोक्यावर पार्वतीची विशेष केशरचनाही दिसते .

एका साध्या सोळा-खांबी मंडपाच्या आश्रयाखाली, सशिवेकलु गणेश आपल्या आसनावर शांतपणे विराजमान आहेत. जवळच्याच एका शिलालेखात असा उल्लेख आहे की,इ.स. १५०६ , राजा नरसिंह द्वितीय यांच्या स्मरणार्थ बांधलेले हे मंदिर आहे .चंद्रगिरी (आताचे आंध्र प्रदेश) येथील एका श्रीमंत व्यापाऱ्याने हे मंडप बांधले आहे .जवळच कृष्ण मंदिर आहे.

मूर्तीला झालेल्या नुकसानीमुळे ती विधीपूर्वक पूजेसाठी अयोग्य ठरल्याने, आता येथे कोणतेही विधी किंवा पूजा केल्या जात नाहीत. 


#कडालेकालू गणेश मंदिर हंपी

ससिवेकलु मंदिराच्या अगदी जवळ कडलेकलु मंदिर आहे. ते हेमाकुटा टेकडीच्या ईशान्य उतारावर आहे. हे मंदिर एका बंदिस्त आवारात असून, त्यात अधिक सुंदर कोरीवकाम केलेले स्तंभ आहेत.हंपीमधील सर्वात मोठ्या एकाश्म गणेश मूर्तींपैकी एक येथे आहे, जी जवळपास ४.६ मीटर (१५ फूट) उंच असून एकाच ग्रॅनाइटच्या शिळेतून कोरलेली आहे.

गणपतीचे गोल पोट हरभऱ्याच्या दाण्यासारखे दिसते म्हणून मंदिराला कडलेकालु (कन्नडमध्ये हरभरा ) हे नाव मिळाले आहे. या स्तंभयुक्त सभागृहात विजयनगर स्थापत्यशैलीचे वैशिष्ट्य असलेले, बारीक घडवलेले स्तंभ असून त्यावर फुलांचे आणि पौराणिक कथांचे गुंतागुंतीचे कोरीवकाम आहे.

यांच्या बांधकामाचा काळ  इ.स. १५०० आसपास आहे .स्तंभयुक्त सभागृह असलेली विजयनगरची मंडप शैली येथे दिसते .

मंदिरात बऱ्यापैकी अंधार होता, त्यामुळे फोटो काढण्यासाठी मला फ्लॅश वापरावा लागला.मूर्ती चतुर्भुज आहे. एका हातात मोदक /लाडू धरलेला असून, सोंड त्याकडे वळलेली आहे. उरलेले हात आशीर्वाद मुद्रेत आहेत.राजेशाही खांब विजयनगर शैलीचे आहेत.बारीक, उंच, आणि अत्यंत सुंदर कोरलेले. खांबांवर फुलं, पौराणिक कथा, देवता आणि खोडकर बालकृष्ण झाडावर लपलेला, स्त्रियांचे कपडे चोरून लटकवलेला सारखी नक्षी कोरलेली आहे.

एका खांबावर हनुमान ची सुंदर मूर्तीही आहे.

हंपी_इतिहास _६ ( देव राय दुसरा आणि संगम साम्राज्याचा ऱ्हास )




हंपी_इतिहास _६  ( देव राय दुसरा आणि संगम साम्राज्याचा ऱ्हास )

 देव राय दुसरा. (इ.स. १४१९ ते १४४४ किंवा (?) १४४९)

बहमनी सुल्तानांविरुद्ध युद्धे

फिरोजचा मृत्यू २४ सप्टेंबर १४२२ रोजी झाला,आणि खानखानन अहमद शाह पहिला या नावाने कुलबर्गाचा सुलतान बनला.

त्याचा मुलगा हसन याने सिंहासन स्वीकारावे अशी त्याची इच्छा होती, परंतु त्याचा दुसरा मुलगा अहमद खानखानन याने या दाव्याला विरोध केला आणि फिरोजला त्याचा दावा मान्य करण्यास भाग पडले.पंगूळच्या पराभवाचा बदला घेण्याची शपथ घेऊन, त्याने एक प्रचंड सैन्य उभारले आणि विजयनगरवर हल्ला करण्यासाठी कूच केली. देव राय द्वितीय यांनीही तितकेच मोठे सैन्य घेऊन त्याच्यावर चाल केली आणि दोघांनी तुंगभद्रा नदीच्या विरुद्ध तीरांवर तळ ठोकला. देव राय द्वितीय यांनी वारंगलच्या शासकांना युद्धात मदत करण्याची विनंती केली होती आणि त्यांनीही आपले सैन्य पाठवले होते. मात्र, बहामनी सैन्याने केलेल्या अचानक हल्ल्यामुळे विजयनगरचे सैन्य गाफील राहिले आणि देवराय द्वितीय यांना, सरदार व काही इतर सैनिकांसह, विजयनगरला माघार घ्यावी लागली.

अहमद शाह प्रथमने देव राय द्वितीयचा विजयनगरपर्यंत पाठलाग केला. वाटेत त्याने मोकळ्या प्रदेशाचा मोठा भाग उद्ध्वस्त केला, मंदिरे पाडली आणि हिंदूंची निर्घृणपणे कत्तल केली. आपल्या मंदिरांच्या विटंबनेमुळे संतप्त झालेले सुमारे ५००० हिंदू एकत्र आले, त्यांनी त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आले की तो एका क्षणी आपल्या सैन्यापासून वेगळा झाला आहे, तेव्हा त्यांनी हल्ला केला. हा एक भयंकर हल्ला होता, ज्यात अनेक बहामनी सैनिक ठार झाले आणि सुलतान स्वतः जीवघेण्या धोक्यात होता. तथापि, अब्द-अल-कादिरने शेवटच्या क्षणी केलेल्या पिछाडीच्या संरक्षणामुळे सुलतान वाचला आणि त्यानेही हल्लेखोरांवर जोरदार प्रतिहल्ला चढवला. थोडक्यात बचावल्यानंतर, अहमद शाह प्रथमने विजयनगरवर हल्ला केला आणि बराच काळ वेढा घातला. देव राय द्वितीयला शांततेसाठी विनंती करण्यास भाग पडले आणि त्याने खंडणी देण्याचे मान्य करून एका करारावर स्वाक्षरी केली. १४२५ मध्ये, अहमद शाह प्रथमने वारंगलवर यशस्वीपणे ताबा मिळवला आणि ते राज्य संपुष्टात आले.

देवराय यांनी कोंडविडूच्या रेड्डी राजांकडून गमावलेल्या प्रदेशांकडे आपले लक्ष वळवले आणि १४३२ मध्ये तो किल्ला पुन्हा ताब्यात घेतला. रेड्डी राजांकडून गमावलेला बहुतेक प्रदेश परत मिळवण्यात आला. १४२७, १४३६ आणि १४४१ मध्ये ओडिशाच्या गजपतींसोबत झालेल्या सलग तीन लढायांमध्ये, त्यांनी त्यांना पराभूत करून गमावलेला प्रदेश परत मिळवला. दख्खनवर आपली पकड प्रस्थापित केल्यानंतर, देवराय द्वितीयने आपले लक्ष दक्षिणेकडील केरळ आणि सिलोनकडे वळवले. क्विलॉनपासून सिलोनपर्यंतचे शासक त्याला खंडणी देत ​​असत आणि पेगू, तानासेरिमचे बर्मी राजेसुद्धा त्याला खंडणी देत ​​असत. देवराय द्वितीयच्या राजवटीत, विजयनगरचा विस्तार कलिंगापासून मलबारपर्यंत आणि गुलबर्गापासून सिलोनपर्यंत झाला आणि पश्चिम किनारपट्टीवरील विविध बंदरांच्या ताब्यामुळे व्यापार भरभराटीस आला.


१४३५ मध्ये अहमद शाह प्रथमचा उत्तराधिकारी अल्लाउद्दीन शाह याच्याकडून झालेला आणखी एक पराभव आणि रायचूर, सोलापूर, विजापूर यांसारखे अनेक किल्ले गमावल्यामुळे देव राय द्वितीयला बहमनींचा सामना करण्याच्या मार्गांचा विचार करणे भाग पडले. देव राय द्वितीयने त्यांचा सामना कसा करायचा यावर उमराव आणि सल्लागारांसोबत एक बैठक घेतली, तेव्हा त्यांनी दोन मुद्दे उपस्थित केले. एक म्हणजे, बहमनी वापरत असलेले अरबी घोडे हे स्थानिक घोड्यांपेक्षा अधिक वेगवान आणि बलवान होते, जे थकवा सहन करू शकत नव्हते. बहमनींचा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यांच्या सैन्यातील सुप्रशिक्षित आणि व्यावसायिक धनुर्धारी, ज्याची विजयनगरकडे कमतरता होती. तेव्हाच देव राय द्वितीयने सैन्यात मुस्लिम धनुर्धाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला, जे त्याच्या सैनिकांना प्रशिक्षण देतील. या मुस्लिम धनुर्धाऱ्यांना त्यांच्या धर्माचे पालन करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले, त्यांना जहागिरी देण्यात आल्या आणि त्यांच्यासाठी विजयनगरमध्ये एक मशीदही बांधण्यात आली. ही चाल यशस्वी ठरली आणि आता विजयनगर सैन्याकडे हल्ल्यासाठी सज्ज असलेले २००० मुस्लिम आणि ६०,००० हिंदूंचे एक व्यावसायिक धनुर्विद्या पथक तयार झाले होते. १४३६ मध्ये, देवराय द्वितीयने मुद्गल किल्ल्यावर हल्ला चढवला आणि तो पुन्हा ताब्यात घेतला.


गजपती (उडीसा/ओडिशा) राजांविरुद्ध युद्धे

देव राय द्वितीय ने गजपती राजांविरुद्ध तीन प्रमुख युद्धे लढली होती .

कोंडाविडूची लढाई (१४२७)-गजपती राजा भानुदेव चौथा  विरुद्ध. विजयनगरने कोंडाविडू जिंकले.

राजमहेन्द्री (राजामुंद्री) ची लढाई (१४३६) -कपिलेंद्र देवने हल्ला केला तेव्हा पराभूत केले.

१४४१ ची लढाई - पुन्हा गजपतींना हरवले.

यामुळे आंध्र प्रदेशातील कोंडाविडू, राजमहेन्द्री भाग विजयनगरकडे आला. विजयनगरची पूर्व आणि उत्तर सीमा कृष्णा नदीपर्यंत विस्तारली.


नोव्हेंबर १४४२ ते एप्रिल १४४३ च्या दरम्यानच्या एका दिवशी, राजा देव राय यांच्या सर्वात जवळच्या नातेवाईकाने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला .

अब्दुर रझ्झाकच्या मते तो त्यांचा भाऊ होता, तर नुनिझच्या मते तो त्यांचा पुतण्या होता. या दोन्ही कथांपैकी अब्दुर रझ्झाकची कथा निःसंशयपणे अधिक विश्वसनीय आहे, कारण तो एक समकालीन साक्षीदार आहे. नुनिझने सांगितलेली कथा या खंडाच्या शेवटी असलेल्या इतिवृत्तात दिली आहे.अब्दुर रझ्झाक हा पर्शियाकडून कालिकत आणि विजयनगर येथे राजदूत होता, आणि त्याचे वर्णन विशेषतः महत्त्वाचे आहे कारण ते घटनेची तारीख निश्चितपणे सांगते.

या कथनाचा लेखक कालिकत येथे वास्तव्यास असतानाच्या काळात (नोव्हेंबर १४४२ ते एप्रिल १४४३) बिडजानगर शहरात एक विलक्षण आणि अतिशय विचित्र घटना घडली…

राजाच्या भावाने, ज्याने स्वतःसाठी एक नवीन घर बांधले होते, त्याने तेथे राजाला आणि साम्राज्यातील प्रमुख व्यक्तींना आमंत्रित केले. आता, एकमेकांसमोर कधीही जेवण न करणे ही काफिरांची एक प्रस्थापित प्रथा आहे. आमंत्रित केलेल्या सर्व लोकांना एका भव्य सभागृहात एकत्र जमवण्यात आले. थोड्या थोड्या वेळाने, राजकुमार एकतर स्वतः येत असे किंवा एखाद्या दूताला पाठवून सांगत असे की अमुक-तमुक थोर व्यक्तीने येऊन मेजवानीतील आपला वाटा खावा. शहरात सापडणारे सर्व ढोल, तुतारी, रणशिंगे आणि बासरी एकत्र आणण्याची काळजी घेण्यात आली होती, आणि ही सर्व वाद्ये एकाच वेळी वाजल्याने प्रचंड गोंधळ उडाला. ज्या व्यक्तीला बोलावण्यात आले होते, त्याने वर उल्लेखलेल्या घरात प्रवेश करताच, दबा धरून बसलेल्या दोन मारेकऱ्यांनी त्याच्यावर झडप घातली, त्याला एका खंजिराने भोसकले आणि त्याचे तुकडे तुकडे केले. त्याचे अवयव, किंवा खरे तर त्याच्या शरीराचे तुकडे काढून घेतल्यानंतर, त्यांनी दुसऱ्या एका पाहुण्याला बोलावले, जो या कत्तलीच्या ठिकाणी प्रवेश करताच गायब झाला... ढोलांचा आवाज, आरडाओरडा आणि गोंधळामुळे काय चालले आहे याची कोणालाही कल्पना नव्हती. अशाप्रकारे राज्यात नाव किंवा प्रतिष्ठा असलेल्या सर्वांची कत्तल करण्यात आली. आपल्या बळींच्या रक्ताने माखलेले घर सोडून तो राजकुमार राजाच्या महालात गेला आणि त्या राजवाड्यात तैनात असलेल्या रक्षकांना उद्देशून, गोड शब्दांनी त्यांना आपल्या घरी येण्याचे आमंत्रण दिले आणि त्यांना इतर बळींच्या पावलांवर पाऊल ठेवून जायला लावले. त्यामुळे महाल त्याच्या सर्व रक्षकांपासून वंचित झाला. त्यानंतर हा दुष्ट राजासमोर आला, त्याच्या हातात सुपारीने माखलेले एक पात्र होते, ज्याच्या खाली एक तेजस्वी खंजीर लपवलेला होता. तो राजाला म्हणाला, 'सभागृह तयार आहे आणि ते फक्त आपल्या सन्माननीय उपस्थितीची वाट पाहत आहेत.'

'श्रेष्ठ पुरुषांना स्वर्गातून प्रेरणा मिळते' या उक्तीनुसार राजा त्याला म्हणाला, 'आज माझी प्रकृती ठीक नाही.'

या अनैसर्गिक भावाने, राजाला आपल्या घरी बोलावण्याची आशा गमावल्यामुळे, आपली खंजीर उपसली आणि त्याने राजावर अनेक जोरदार वार केले, ज्यामुळे राजकुमार आपल्या सिंहासनाच्या मागे कोसळला. राजा मेला आहे असे समजून, त्या देशद्रोह्याने राजाचे शीर कापण्यासाठी आपल्या एका विश्वासू साथीदाराला तिथेच ठेवले; मग सभागृहातून बाहेर पडून तो राजवाड्याच्या प्रवेशमंडपात चढला आणि लोकांना उद्देशून म्हणाला: 'मी राजा, त्याचे भाऊ आणि अमुक-अमुक अमीर, ब्राह्मण व वजीर यांना ठार मारले आहे; आता मी राजा आहे.'

दरम्यान, त्याचा दूत राजाचे शीर धडपासून वेगळे करण्याच्या उद्देशाने सिंहासनाजवळ आला होता, परंतु त्या राजकुमाराने, तो ज्या आसनामागे पडला होता ते आसन उचलून, त्या नराधमाच्या छातीवर इतक्या जोरात प्रहार केला की तो पाठीवर कोसळला. मग राजाने, हे भयंकर दृश्य पाहून एका कोपऱ्यात लपलेल्या आपल्या एका रक्षकाच्या मदतीने, त्या मारेकऱ्याला ठार मारले आणि अंतःपुराच्या मार्गाने राजवाड्यातून बाहेर पडला.

त्याचा भाऊ, अजूनही दरबाराच्या पायऱ्यांवर उभा राहून, जनसमुदायाला त्याला आपला राजा म्हणून मान्यता देण्याचे आवाहन करत होता. त्याच क्षणी राजा ओरडला, ‘मी जिवंत आहे. मी सुखरूप आहे. त्या नराधमाला पकडा.’जमलेल्या सर्व जमावाने दोषी राजकुमारावर झडप घातली आणि त्याला ठार मारले.

संस्कृती

देवराय दुसरा हा संगम वंशातील  सर्वात तेजस्वी राजा होता. तो कदाचित संगम वंशातील सर्वश्रेष्ठ सम्राट होता आणि त्याने त्याच्या काळातील काही सर्वात प्रसिद्ध कन्नड आणि तेलुगू कवींना आश्रय दिला. लक्कण्णा दंडेश, चमसा, जक्कनार्य आणि कुमार व्यास यांसारखे कन्नड कवी आणि श्रीनाथयांसारखे तेलुगू कवी त्यांच्यापैकी सर्वात प्रसिद्ध आहेत. असे म्हटले जाते की श्रीनाथाला दरबारात वरिष्ठ मंत्र्याचा दर्जा होता आणि तो सम्राटासोबत मुक्तपणे वावरत असे. राजा स्वतः एक विद्वान होता आणि राजा स्वतः एक कवी होते आणि त्यांनी ' सोबागिना सोणे' हा कन्नडमधील प्रणय कथांचा संग्रह लिहिला, ज्यात लेखक आपल्या पत्नीला कथा सांगतो.आणि संस्कृतमध्ये 'महानतक सुधानिधी' व 'ब्रह्मसूत्र' हे ग्रंथ लिहिले .

हजार राम मंदिर आणि विरुपाक्ष मंदिराचा विस्तार. विठ्ठल मंदिराची सुरुवातही त्याच्याच काळात झाली.त्याच्या कारकिर्दीतील अनेक शिलालेख उपलब्ध आहेत. एका शिलालेखात इ.स. १४२६ मध्ये राजाच्या नावाने केलेल्या घोषणेची नोंद आहे.त्याच वर्षी, बुधवार, १६ ऑक्टोबर रोजीच्या दुसऱ्या शिलालेखानुसार,त्याने राजधानीत "पान सुपारी बाजार" नावाच्या रस्त्यावर एक जैन मंदिर उभारले. 

संगम साम्राज्याचा ऱ्हास

देवराय द्वितीय यांच्या मृत्यूनंतर, १४४६ मध्ये मल्लिकार्जुन राय सिंहासनावर आरूढ झाले आणि त्यांना ओडिशापासून दक्षिणेपर्यंत पसरलेले राज्य वारसा हक्काने मिळाले. मल्लिकार्जुन रायाला सुरुवातीला बहमनी आणि गजपतींविरुद्ध काही प्रमाणात यश मिळाले असले तरी, तो एक कमकुवत आणि भ्रष्ट शासक होता. त्याच्या राजवटीत, विजयनगरने राजमुंद्रीपासून सुरू होणारा एक मोठा प्रदेश गमावला, जो गजपतींनी १४५४ मध्ये पुन्हा ताब्यात घेतला. आणि १४६४ मध्ये, जेव्हा गजपतींनी कोंडविडू आणि उदयगिरी परत मिळवले, तेव्हा संपूर्ण किनारपट्टीचा आंध्र प्रदेश गमावला गेला. दुसरी उल्लेखनीय घटना म्हणजे बहमनींना अरबी घोडे विकल्याच्या बदल्यात १०,००० मुस्लिमांची केलेली कत्तल. याच्या बदल्यात बहमनींनी विजयनगरवर हल्ला केला आणि १४५० पर्यंत हंपीजवळील बऱ्याच प्रदेशांवर त्यांचे नियंत्रण होते. दुसरीकडे, पोर्तुगीजांनी पश्चिम किनारपट्टीवरील बंदरे ताब्यात घेतली आणि एकेकाळच्या बलाढ्य विजयनगर साम्राज्याला एका अवशेषात रूपांतरित केले. १४६५  मध्ये मल्लिकार्जुन रायाचा पुतण्या विरूपाक्ष राय  दुसरा याने अखेरीस उत्तराधिकारी बनले.


इसवी सन १४६९ च्या मध्यास, जेव्हा राजशेखर किंवा विरुपाक्ष पहिला हा विजयनगरचा राजा होता, तेव्हा मुहम्मदचा मंत्री महमूद गवान पश्चिमेकडे निघाला आणि एका बऱ्यापैकी यशस्वी मोहिमेनंतर त्याने विजयनगरच्या रायाच्या ताब्यात असलेल्या गोव्यावर समुद्रमार्गे आणि जमिनीवरून हल्ला केला. तो पूर्णपणे विजयी झाला आणि त्याने ते ठिकाण ताब्यात घेतले..मल्लिकार्जुन रायाने केलेल्या मुस्लिमांच्या हत्याकांडाचा हा बदलाही होता, ज्यानंतर अनेक जण पश्चिम किनाऱ्यावर पळून गेले होते. कृष्ण-तुंगभद्रा दोआब देखील बहामनी सुलतानांच्या हाती लागला, तर गजपतींनी तिरुवनमलाई ताब्यात घेतले. उ विजयनगरच्या मोठ्या भागांनी बंड केले आणि साम्राज्याचे विघटन होऊ लागले. १४८५ मध्ये, त्याचा स्वतःचा मुलगा प्रौद देव राय याने त्याला पदच्युत केले, जो संगम राजवंशाचा शेवटचा शासकही होता.प्रौदाचे राज्यही तितकेच सामान्य होते, आणि अखेरीस त्याचा सेनापती साळुव नरसिंह राय याने त्याला पदच्युत केले, ज्याने साळुव राजवंशाची स्थापनाही केली.


बहमणी सत्तेत गृहयुद्ध -एकसंध बहामनी साम्राज्य आता ५ राज्यांमध्ये विभागले गेले.

१४५८ मध्ये अल्लाउद्दीन शाह मरण पावला आणि त्याचा मुलगा हुमायून गादीवर बसला. आपल्या क्रूर स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या हुमायूनचा राज्यकाळ क्रूरता आणि जुलूमशाहीने गाजला. त्याने देवराकोंडावर हल्ला केला, परंतु कडव्या प्रतिकारानंतर त्याला माघार घ्यावी लागली. सप्टेंबर १४६१ मध्ये त्याचे निधन झाले आणि त्याच्यानंतर निजाम शाह गादीवर आला, ज्याच्यानंतर १४६३ मध्ये त्याचा भाऊ मुहम्मद शाह गादीवर आला. मुहम्मद शाहपेक्षा त्याचा मंत्री महमूद गवान याने राज्यात अधिक महत्त्वाची भूमिका बजावली. १४७० च्या सुमारास, दख्खनमध्ये भीषण दुष्काळ पडला आणि कोंडापल्लेच्या रहिवाशांनी बंड करून तत्कालीन मुस्लिम गव्हर्नरला पदच्युत केले. त्यांनी आपल्या लढाईत मदत करण्यासाठी गजपती शासकांना आमंत्रित केले, तथापि सुलतानाने त्यांना पराभूत केले आणि ओडिशावरही मोहीम चालवली, ज्यामुळे अंदाधुंद विध्वंस आणि कत्तल झाली. कोंडापल्लेला कठोर शिक्षा देण्यात आली. तेथील मंदिरे जमीनदोस्त करण्यात आली, ब्राह्मण पुजाऱ्यांची सामूहिक कत्तल करण्यात आली आणि त्या जागी मशिदी बांधण्यात आल्या. राजमुंद्रीचाही पूर्णपणे विध्वंस झाला. महमूद गवानच्या हत्येमुळे, ज्यांच्यामध्ये तो लोकप्रिय होता ते सरदार आणि लोक संतप्त झाले आणि लवकरच मुहम्मद शाहला पदच्युत करण्यात आले. १४८२ मध्ये मुहम्मद शाह द्वितीयने सत्ता हाती घेतली असली तरी, संपूर्ण राज्यात बंडे उफाळून आली आणि अनेक प्रदेशांनी आपले स्वातंत्र्य घोषित केले. गोव्याचा गव्हर्नर हा त्यांपैकी पहिला होता, कारण तो राज्यापासून वेगळा झाला आणि त्याने बहुतेक महत्त्वाची बंदरे ताब्यात घेतली. 

युसूफ आदिल खान हा मुहम्मद शाहच्या अधिपत्याखालील एक गुलाम होता आणि तो मूळचा जॉर्जियाचा होता, पण त्याला इराणमध्ये विकत घेण्यात आले होते.  जेव्हा बहामनी साम्राज्याचा ऱ्हास झाला, तेव्हा त्याने आपले स्वातंत्र्य घोषित केले आणि १४८९ मध्ये विजापूर येथे आदिलशाही राज्याची स्थापना केली. 

आदिल खानच्या विपरीत, बिदर येथील बरीदशाही राज्याचा संस्थापक, कासिम बरीद हा एक तुर्क होता आणि त्याने मुहम्मद शाहच्या अधिपत्याखाली मीर जुमला  म्हणून काम केले.  मुहम्मद शाहच्या मृत्यूनंतर तो आणखी शक्तिशाली झाला. १५२७ मध्ये जेव्हा हा राजवंश संपुष्टात आला, तेव्हा बिदर एक स्वतंत्र राज्य बनले. 

१४९० मध्ये, गवळीचा (आताचा अमरावती जिल्हा, महाराष्ट्र) गव्हर्नर इमाद-उल-मुल्क यानेही आपले स्वातंत्र्य घोषित केले आणि बेरार येथे इमाद शाही घराण्याची स्थापना केली. 

त्याच वर्षी, जुन्नरचा गव्हर्नर मलिक अहमद शाह बकरी याने आपले स्वातंत्र्य घोषित केले, जहांगीर खानच्या नेतृत्वाखालील बहामनी सैन्याचा पराभव केला आणि निजाम शाही घराण्याची स्थापना केली, जे पुढे अहमदनगर शहरातून राज्य करणार होते.

१५१८ मध्ये, तेलंगणा प्रदेशाचा गव्हर्नर कुली कुतुब-उल-मुल्क याने स्वातंत्र्य घोषित केले आणि गोलकोंडा येथे कुतुब शाही घराण्याची स्थापना झाली. 

आणि अशाप्रकारे, एकेकाळचे एकसंध बहामनी साम्राज्य आता ५ राज्यांमध्ये विभागले गेले.

 विजापूरचा आदिल शाही, बेरारचा इमाद शाही, बिदरचा बरीद शाही, अहमदनगरचा निजाम शाही आणि गोलकोंडाचा कुतुब शाही.


संगम साम्राज्याचा ऱ्हास आणि बहामनी साम्राज्याचे विघटन हे साधारणपणे एकाच काळात घडले,ज्यामुळे गोंधळ, संभ्रम आणि अराजकता माजली. 


संदर्भ -एक विस्मृत साम्राज्य - रॉबर्ट सेवेल.

History Under Your Feet-Ratnakar Sadasyula