Wednesday, June 3, 2026

श्री त्रिशुंड मयूरेश्वर गणपती,पुणे

 श्री त्रिशुंड मयूरेश्वर गणपती,पुणे 


त्रिशुंड्या गणपती हे पुण्यातील सोमवार पेठेत असलेले एक मंदिर आहे. पुण्यातील सर्व गणपती मंदिरांमधले शिल्पकलेने नटलेले हे सर्वोत्तम देऊळ आहे. हे मंदिर गिरी गोसावी पंटाचे आहे. ह्या तीन सोंड्या गणपतीच्या देवळातल्या मूर्तीच्या खाली तळघरात मंदिराचे संस्थापक महंत श्री दत्तगुरू गोस्वामी महाराज यांची समाधी आहे. मूर्तीवर अभिषेक केला की, तळघरात असलेल्या समाधीवर ते जल ओघळते.मंदिरात एक भूमिगत तळघर आहे, जे वर्षातून फक्त एकदाच  (गुरुपौर्णिमेला) भक्तांसाठी उघडले जाते.हे तळघर पाण्यात बुडलेले असते आणि त्यात विशेष पूजा-अर्चा होते.

 

हे मंदिर गिरिगोसावी पंथीयांच्या तंत्रमार्गीयांचे असल्याने सर्वसामान्य भाविकजन इथे फिरकत नव्हते. मंदिरात सध्याची मुख्य मूर्ती त्रिशुंड गजाननाची असली तरी शिवमंदिर उभारण्याची मूळ कल्पना असावी.

 


इतिहास

शाहाजीराजांनी इ.स. १६०० मध्ये शाहापुरा पेठ वसवली.पुढे थोरले बाजीराव पेशव्यांनी १७३५ मध्ये या भागाचा विकास करून त्याला सोमवार पेठ असे नाव दिले.

हे मंदिर भीमगीरजी गोसावी महंतानी २६ ऑगस्ट १७५४ रोजी बांधून पूर्ण केले. त्यांचे वंशज इंदूरला घामपूर गावात राहत. सरकारी नोंदीत इ.स. १९१७ पर्यंत मंदिराला मालकच नव्हता. मंदिरासमोर असलेल्या झाडाची एक फांदी जवळच्या नेर्लेकर यांच्या घरावर गेली म्हणून त्यांनी पालिकेत तक्रार केली; तेव्हा पालिकेने चौकशी केली. मंदिराचे मालक इंदूरला गोसावी नावाचे गृहस्थ असल्याचे समजले. त्यांना इंदूरहून बोलावून आणले. त्यांनी झाड समूळ तोडून टाकले. नंतर मंदिराच्या पुढच्या भागात लाकडाची वखार चालू केली; तर मंदिराच्या सभामंडपाला कोळशाचे गोदाम केले. पुढे ही वखार कुलकर्णी नावाच्या मित्राला देऊन ते इंदूरला निघून गेले. १९४५ साली वहिवाटदार म्हणून कैलासगीर गोसावींचे नाव लागले. पण, कागदोपत्री पुरावा देता न आल्याने त्यांचा मंदिरावरचा हक्क गेला. सन १९८५ साली मंदिराच्या देखभालीसाठी एक ट्रस्ट स्थापन झाला.


मंदिराची मांडणी करताना वर मंदिर व खाली तळघर, समाधी व हठयोग्यांची पाठशाळा चालावी, अशी योजना होती. सर्व दिनचर्येची सोय तळघरात होती. प्रातर्विधीसाठी नागझरीजवळ जाण्याची भुयारी पाऊलवाट होती. विहिरीच्या भिंतीत पाण्याच्या पातळीवर एक मोठी खोली होती. तेथे तंत्रसाधकांच्या प्रमुख गुरुवर्यांसाठी स्नानाचा संगमरवरी चौरंग होता.


तळघरातील खोल्यांना दरवाजे व खोल्यांच्या भिंतींना कोनाडे आहेत. खोलीच्या छताला दगडात दोन खाचा असून त्या खोबणीतून दोराच्या साह्याने छताला उलटे टांगून घेऊन पेटत्या निखाऱ्यावर काही ठराविक वनस्पतींचा धूर करून तो तोंडावर घ्यावयाचा, हा धूर साधनेचा विधी असे.


 मंदिराच्या गर्भगृहातील तीन शिलालेखांपैकी उल्लेखानुसार , येथील बांधकाम २६ ऑगस्ट १७५४ रोजी धामपूर (इंदूरजवळ) येथील भीमजीगिरी गोसावी यांनी सुरू केले. हे मंदिर १६ वर्षांनंतर, १७७० मध्ये पूर्ण झाले.मंदिराची वास्तुकला राजस्थानी, माळवा आणि दक्षिण भारतीय शैलींचे मिश्रण आहे. एकेकाळी गर्भगृहावर एक उंच शिखर होते, जे काही काळापूर्वी नष्ट झाले, किंवा कदाचित ते कधीच पूर्ण झाले नाही.


मंदिराच्या बाहेरील भिंतींवर अत्यंत सुंदर कोरलेली शिल्पे आहेत.ज्यातलं सर्वात आश्चर्यकारक शिल्प आहे एका गेंड्याचे !!पुण्यात तर गेंडे नव्हते तर हे चित्रण का केले गेले ?



एक गैंडा लोखंडी साखळदंडांनी बांधलेला आहे. ब्रिटिश सैनिक किंवा इंग्रज सैनिक त्याला नियंत्रित करत आहेत. काही शिल्पांमध्ये एकापेक्षा जास्त ब्रिटिश सैनिक दाखवले आहेत.

प्रतीकात्मक अर्थ असा आहे  किती गेंडा हा  आसाम ,बंगालचे प्रदेशाचे प्रतीकमानले गेले गैंड्याला साखळदंडांनी बांधणे याचा अर्थ  ब्रिटिशांनी बंगाल आणि आसामवर विजय मिळवल्याचे आणि नियंत्रण प्रस्थापित केल्याचे प्रतीक.हे शिल्प १७५७ च्या प्लासी युद्धानंतरच्या ब्रिटिश विजयाचे ऐतिहासिक चित्रण मानले जाते.ज्या खाली दोन हत्तीची झुंज दाखविली आहे .जे भारतीय सत्ता अंतर्गत एकमेकांशी लढत आहेत हे दाखवायचे आहे का ??या शिल्पावरच सुरेख कोरलेले देवकोष्टक कोरलेले आहे ,ज्यावर अप्रतिम मोर रचना दाखवल्या आहेत.

स्तंभांवर साखळदंड, घंटा आणि भारवाहक यक्ष यांची सुंदर नक्षी आहे.प्रवेशद्वाराजवळ ऊंच  द्वारपालांची शिल्पे आहेत.

मंदिराच्या बाहेरील व आतील दोन द्वारशाखावरील ललाटबिंब हे सर्वार्थाने सुबक आणि कोरीव लेणे आहे जी पाहत राहावे असे आहे .

१.बाहेरील द्वार 

येथे सर्वात वरती शेषशायी विष्णू आहे .तर गजांत लक्ष्मीचे चित्र आहे.मकरमुखातून निघालेले तोरण आहे .तीन मोर आहेत,ज्यापैकी मधल्याने पिसारा फुलवला आहे  वानर शिल्पमाला आहे .तसेच एक अद्भुत गजव्याल आहे जो दुर्मिळ आहे.तसेच विठ्ठल रुक्मिणी ,विष्णू ,राम यांचे शिल्प आहे .









२.सभामंडप 

येथील द्वारशाखेवरील पट्टीवरील गजांत लक्ष्मीचे शिल्प स्पष्ट पाहता येते .तसेच येथून आत प्रवेश करताना भाविकांच्या डोक्याचा स्पर्श गणेशयंत्राशी होईल अशा प्रकारे ते कोरले आहे .





३.गर्भगृह 

येथे ललाटबिंबावरील मनुष्यरूपी शिल्पात शिव आहे ,ज्याचा मांडीवर एका बाजूला शक्ती (बाजूला सिंह वाहन दिसते )तर दुसर्या बाजूला गंगा असावी (वाहन नंदी दिसतो ).




त्रिशुंड गणपती मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर एकूण तीन शिलालेख आहेत. हे शिलालेख मंदिराच्या इतिहास, बांधकाम आणि धार्मिक संदर्भाबद्दल महत्त्वाची माहिती देतात.




१. पहिला शिलालेख (संस्कृत भाषा, देवनागरी लिपी)-“पुण्यनगरीपुरी” -पुण्याचे प्राचीन नाव पुण्यनगरी किंवा पुणेश्वर दर्शवतो.

यात मंदिराच्या बांधकामाची तारीख स्पष्टपणे नमूद आहे-२६ ऑगस्ट १७५४ (मंदिर बांधकाम सुरू किंवा स्थापना).मंदिर रामेश्वर (शिव) मंदिर म्हणून सुरू झाल्याचे उल्लेख.|| श्री गणेशाय नमः || श्री || सारखे मंगलाचरण.


२. दुसरा शिलालेख (संस्कृत भाषा, देवनागरी लिपी)यात भगवद्गीतेतील श्लोक कोरलेला आहे (सामान्यतः प्रारंभिक श्लोक).मंदिरातील आध्यात्मिक आणि वेदिक संदर्भ दर्शवतो.


३. तिसरा शिलालेख (फारसी भाषा) मंदिर गुरुदेव दत्तात्रेय यांचे असल्याचे उल्लेख.गोसावी संप्रदायाशी (दत्त परंपरा) संबंध दर्शवतो.


गर्भगृहातील गणपती मूर्ती 





या गणपतीचं मूळ नाव हे श्री त्रिशुंड मयूरेश्वर गणपती असे आहे . ही भारतातील एकमेव गणेश मूर्ती आहे ज्यात तीन सोंड (त्रिशुंड) आणि सहा हात आहेत.सामान्य गणपती उंदरावर (मूषक) बसतात, पण हे मोरावर (मयूर) बसलेले आहेत. यामुळे त्यांना मयूरेश्वर असेही म्हणतात.काळ्या बेसाल्ट दगड पासून कोरलेली मूर्ती.

मुख: एक मुख (एक चेहरा) आणि तीन सोंड आहेत.


उजवी सोंड ही  मोदकाच्या पात्राला स्पर्श करत आहे.मधली सोंड पोटावर किंवा शरीरावर रुळत आहे वा मोराला स्पर्श करत आहे .डावी सोंड ही  डाव्या मांडीवर बसलेल्या शक्ती देवी च्या हनुवटीला स्पर्श करत आहे(त्यामुळे हा तांत्रिक उच्छिष्ट गणेश असावा का ?). सहा हात असून ज्यात आयुधे आहेत.उजवा बाजू: अंकुश, त्रिशूल मोदकपात्र.डावा बाजू: परशू, पाश , आणि खालचा हात शक्ती देवीला आधार देत आहे. मोरावर आरूढ, शांत आणि शक्तिशाली मुद्रेत गणपती दिसत आहे .


या मूर्तीचा प्रतीकात्मक अर्थ असा लावता येतो की ,तीन सोंडा या तीन जग (भूलोक, स्वर्गलोक, पाताललोक) किंवा सृष्टी, पालन आणि संहार यांचे प्रतीक,वा भूत,वर्तमान,भविष्यकाळ , काहींनुसार त्रिगुण (सत्त्व, रज, तम) यांचे प्रतीक आहे .गणपती आरूढ असलेले मोर वाहन ब्रह्मांडाच्या विस्ताराचे किंवा सौंदर्य/ऊर्जेचे प्रतीक आहे .शक्ती आणि गणेश यांचा मिलाफ, तांत्रिक/हठयोगी परंपरेशी संबंध.

मूर्तीच्या मागे भिंतीवर शेषशायी विष्णू आणि गणेश यंत्र कोरलेले आहे.ही मूर्ती पेशवाई काळातीलआहे. मंदिर मूळतः शिव मंदिर म्हणून बांधले गेले होते, नंतर गणेश मूर्ती स्थापित झाली.

बाह्य प्रदक्षिणा मार्गात तीन भिंतीवर तीन विविध सहसा दुर्मिळ असे शिल्प आहेत.

दक्षिण भिंत शिल्प- नटराज 


शिवाचे नृत्यरूप (Cosmic Dance).हातात डमरू, अग्नी आणि विशिष्ट मुद्रा. विश्वातील सूक्ष्म ऊर्जा, काळ, कंपन आणि सृष्टी-संहार चक्र याचे हे प्रतीक आहे .


२. पश्चिम भिंत - लिंगोद्भव शिव 




शिव लिंगाच्या रूपात प्रकट होताना, ब्रह्मा (हंस रूपात) आणि विष्णू (वराह रूपात) त्यांचा शोध घेताना दाखवलेले.

ही कथा पुराणातील प्रसिद्ध आहे .शिव ही अनंत ऊर्जा आहे, ज्याची सुरुवात किंवा अंत सापडत नाही.

या मंदिरातील लिंगोद्भव शिल्प वैशिष्ट्यपूर्ण आणि गहन अर्थाने कोरलेले आहे.

कथा अशी आहे कि ,जेव्हा विष्णू आणि ब्रह्मा यांच्यात श्रेष्ठत्वासाठी संघर्ष झाला होता. येथे लिंगाच्या रूपात दर्शविलेल्या शिवाने (जरी कथेत तो कधीकधी ज्योत किंवा प्रकाशाच्या स्तंभाच्या रूपात दिसतो), त्यांना आपला उगम शोधण्याचे आव्हान दिले. विष्णूने वराहाचे रूप धारण केले आणि तळाशी शिवाच्या पायांचा शोध घेऊ लागला, तर ब्रह्माने हंसाचे (हंसाचे) रूप धारण केले आणि शिवाच्या मस्तकाचा शोध घेण्यासाठी उंच आकाशात उड्डाण केले.


ब्रह्मा आणि विष्णू दोघेही आपल्या शोधात अयशस्वी झाले आणि भगवान शिवाकडे परत आले. विष्णूने जाहीर केले की त्याला भगवान शिवाचे चरण सापडले नाहीत आणि त्याने आपल्या अहंकाराबद्दल पश्चात्ताप व्यक्त केला. तथापि, ब्रह्माने दावा केला की त्याने भगवान शिवाचे मस्तक पाहिले होते आणि पुरावा म्हणून त्याने केतकीचे फूल, तुळस आणि एक गाय साक्षीदार म्हणून आणली.भगवान शिवाने घोषित केले की अनंततेच्या मर्यादा मोजणे अशक्य आहे. त्यांनी शाप दिला की पृथ्वीवर ब्रह्मदेवाचे मंदिर असणार नाही आणि त्यांच्या पूजेसाठी केतकीचे फूल व तुळस कधीही वापरली जाऊ नये. भगवान शिवाने गाईलाही शाप दिला की, तिने तोंडाने खोटे बोलल्यामुळे तिचे तोंड यापुढे अपवित्र राहील. आज शिवरात्रीचा अपवाद वगळता, शिवपूजेमध्ये केतकीच्या फुलांचा वापर मोठ्या प्रमाणावर निषिद्ध मानला जातो.



३. उत्तर भिंत - हरिहर 



एकाच मूर्तीत विष्णू (हरि) आणि शिव (हर) यांचा अर्ध-अर्ध मिलाफ दिसतो .दोन्हीही हातात शिवाचे डमरू आणि विष्णूचे आयुध आहेत .शिव आणि विष्णू एकच आहेत (अद्वैत).हे शिल्प शिव-विष्णू ऐक्य दर्शवते. “शिवाय विष्णुरूपाय, विष्णवे शिवरूपिणे...”

मागेले बाजूला छताकडे पाहातांनाही अश्व,व्याल /सिंह ,हत्ती कोरलेले दिसतात जे आता जीर्ण होत आहेत .


मंदिराचा आत सम्राट सरोदे यांनी मंदिर रचनेचा लावलेला एक माहिती फलक दिसला .जो बराच रोचक आहे .जो वैज्ञानिक, ज्योतिषीय आणि आध्यात्मिक अर्थाने लिहिले आहे. यात वेद, शिल्पशास्त्र, नक्षत्र आणि वास्तुशास्त्र यांचा मेळ सांगितला आहे.यातला क्रमांक १३ मुद्दा फारच वेगळा आहे .




क्रमांक १३ - सूक्ष्म ऊर्जा आणि स्थूल ऊर्जा (Subtle Energy and Gross Energy)

Energy = Natraj Shilp, M = Inner sculptures of Garbhgraha, C² = Lingodbhav Shilp

सविस्तर मराठी स्पष्टीकरण:


या शिल्पकलेत वैज्ञानिक सूत्र E=MC² (आइनस्टाइनचे ऊर्जा-सूत्र) याचाच आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रीय अर्थ सांगितला आहे.


E (Energy) = नटराज शिल्प

नटराज मूर्ती ही सूक्ष्म ऊर्जा (Subtle Energy) चे प्रतीक मानली आहे.

नटराज हे काल, कंपन, ऊर्जा आणि सृष्टीच्या गतिमान स्वरूपाचे प्रतीक आहे. त्यांचे नृत्य हे विश्वातील सतत चालणारे ऊर्जेचे रूपांतर दर्शवते.

M (Mass) = गर्भगृहातील अंतर्भागातील शिल्पे

गर्भगृहाच्या आत असलेल्या विविध शिल्पांना स्थूल पदार्थ (Gross Matter) किंवा स्थूल ऊर्जा चे प्रतीक मानले आहे.

म्हणजे मंदिरातील दृश्य स्वरूपातील देवता, आकृत्या यांच्यात स्थूल ऊर्जा आहे.

C² = लिंगोद्भव शिल्प

पश्चिम भिंतीवरील शिव लिंगोद्भव शिल्प हे C² (प्रकाशाच्या वेगाच्या वर्गाचे) प्रतीक आहे.

लिंगोद्भव शिल्प अनंत सूक्ष्म ऊर्जेचे (Infinite Subtle Energy) प्रतीक मानले जाते.


संपूर्ण समीकरण:

E = MC²सूक्ष्म ऊर्जा = स्थूल पदार्थ × (प्रकाशाचा वेग)²मंदिरातील शिल्परचनेत हे सूत्र दृश्य रूपात मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. म्हणजे


नटराज = ऊर्जा

गर्भगृहातील शिल्पे = पदार्थ (Mass)

लिंगोद्भव = C² (अनंत गती/ऊर्जेचे रूप)


बाकीचा फलक मराठीत -


क्र.विषय (Topic)माहिती (Information)
1मुख्य देवतात्रिशुंड गणपती (तीन सोंड असलेले अनोखे गणपती)
2“गणपती” चा सामान्य अर्थत्रिशुंड गणपती (तीन सोंड असलेले अनोखे गणपती)
3“गणपती” चा वैदिक अर्थसर्व प्राणिमात्रांचा स्वामी (सर्व गटांचा प्रमुख)
4गणपतीचा वैज्ञानिक अर्थविश्व हे असंख्य सूक्ष्म, घनाकृती ऊर्जा-भरलेल्या अणूंपासून बनलेले आहे. सर्व गटांचा स्वामी गणपती आहे.
5त्रिशुंडचा अर्थवास्तुकलेच्या दृष्टीकोनातून विश्वाच्या तीन आयामांचे प्रतीक – लांबी, रुंदी, उंची (३ आयाम)
6विश्वाचा चौथा आयाम (४थे dimension)नटराज मूर्ती (काळ / ऊर्जा / कंपन / निरपेक्ष काळ)
7दक्षिण भिंतीवर नटराज आणि हातातील प्रतीकशिव नृत्य = निरपेक्ष काळ, डमरू → ॐ ध्वनी, अग्नी → ॐ प्रकाश
8गर्भगृहातील विष्णू मूर्तीस्थूल जगाचे (Gross world) प्रतीक
9गर्भगृहातील विष्णू मूर्तीच्या वरची यंत्रवरच्या त्रिकोण = पुरुष/अग्नी/उर्ध्व ऊर्जा, खालचे त्रिकोण = स्त्री/प्रकृती/अधो ऊर्जा. दोन्ही केंद्रस्थानी एकत्र होणे म्हणजे सृष्टीची उत्पत्ती.
10ब्रह्मदेवाचे पाच चेहरेपाच वेदांचे प्रतीक – प्रणव, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद (स्रोत: श्रीमद् भागवत महापुराण, स्कंद)
11शिव लिंगोद्भव शिल्पअनंत सूक्ष्म ऊर्जेचे प्रतीक (सूक्ष्म ऊर्जा)
12पश्चिम भिंतीवरील लिंगोद्भव शिल्पाची गुप्त कथाप्रणव वेदाचे चार भाग – ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद (स्रोत: श्रीमद् भागवत महापुराण, अध्याय ९, अध्याय १४, श्लोक ४८)
13सूक्ष्म ऊर्जा आणि स्थूल ऊर्जाऊर्जा = नटराज शिल्प, M = गर्भगृहातील अंतर्भागातील शिल्पे, C² = लिंगोद्भव शिल्प
14उत्तर भिंतीवरील हरिहर शिल्पE = MC²
15मोरावर गणपतीमोर = ब्रह्मांडाच्या विस्तारित रूपाचे प्रतीक. गणपती मोरावर बसणे म्हणजे विश्वातील सर्व ऊर्जा-घनाकृती (कॉस्मिक क्यूब्स) सर्व दिशांनी विस्तार पावत आहेत.
16मंदिराचे निर्मातेभीमजीगिरी गोसावी महाराज यांचा नक्षत्र = मूळा
17गर्भगृहातील देवतेचा नक्षत्रत्रिशुंड गणपती - शततारका (संदर्भ: डॉ. गणपती शास्त्री - “Who Created God”)
18कार्तिकेय देवतेचा नक्षत्रविशाखा नक्षत्र
19पुण्याच्या नावाचा नक्षत्रउत्तर फाल्गुनी नक्षत्र
20गर्भगृहाची लांबी व रुंदी८'२"–११/१६ × ८'२"–११/१६
21अंगुलानुसार गर्भगृहाचा परिमिती२८७ किष्कु अंगुल
22गर्भगृहाचा नक्षत्रअश्विनी (भगवान कार्तिकेय आणि दत्तात्रेय यांना अनुकूल)
23गर्भगृहाचा वारशनिवार (भयंकर)
24गर्भगृहाची रासवृश्चिक रास
25गर्भगृहाच्या ऊर्जेचे आयुष्य (Life Span)बांधकामाच्या वर्षापासून ४९० वर्षे
26हस्तानुसार गर्भगृहाचा परिमिती१२ किष्कु हस्त (परिमिती)
27ऊर्जेची दिशा४ (कुत्रा) → संघर्ष
28वारमंगळवार → आर्थिक नुकसान
29निष्कर्ष (यादीप्रमाणे)या मंदिराचे मापदंड भगवान मुरुगन (कार्तिकेय) आणि दत्तात्रेय यांच्या नक्षत्राशी अधिक जुळते.
30सुधारणेचा सल्ला२८३ किष्कु अंगुल परिमिती गणपतीसाठी अधिक शुभ आहे.



संदर्भ -https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0


https://kevinstandagephotography.wordpress.com/2020/06/04/trishund-ganpati-temple-pune-trishunda/


https://youtu.be/Cw1BRT7jqU4?si=-02MrQZWgC7evug0


https://youtu.be/MorEQTQnlbA?si=MTlsqDGsWJT9cz6M


Friday, May 29, 2026

बिजापूर डायरी- लेखिका - डॉ. ऐश्वर्या रेवडकर

 बिजापूर डायरी

लेखिका - डॉ. ऐश्वर्या रेवडकर


विकसित भारताची चमकदार प्रतिमा आपण नेहमी पाहतो. मोठमोठी शहरे, आधुनिक सुविधा, वेगाने धावणारे जीवन आणि विकासाच्या गप्पा. पण या सगळ्याच्या पलीकडे अजूनही एक भारत असा आहे, जो जंगलात हरवलेला आहे. जिथे आजही रस्ते, आरोग्यसेवा, शिक्षण आणि सुरक्षित आयुष्य या मूलभूत गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो. छत्तीसगडमधील बस्तर विभागातील बिजापूर हा असाच एक दुर्गम, नक्षलवादाच्या सावटाखाली जगणारा भाग. या भागात एक तरुण स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर म्हणून पोहोचते.बस्तर विभागातील बिजापूर, दंतेवाडा, नारायणपूर आणि सुकमा या जिल्ह्यांतील सकारात्मक बदलांविषयीची लेखमालिका डॉ. ऐश्वर्या यांनी साधना साप्ताहिकासाठी लिहिली होती. त्याच लेखांतुन पुढे तिच्या अनुभवांतून जन्माला येते ती “बिजापूर डायरी”.
याआधीही डॉ. ऐश्वर्या यांनी सर्च, स्पर्श आणि आरोही या संस्थांमार्फत वंचित समाजासाठी स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून सेवाकार्य केले होते.
डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांनी लिहिलेली ही डायरी केवळ एका डॉक्टरच्या अनुभवांची नोंद नाही, तर ती बस्तरच्या माणुसकीची, संघर्षाची आणि आशेची कहाणी आहे. इथल्या आदिवासी जीवनाचे वास्तव, त्यांच्या वेदना, निसर्गाशी असलेले त्यांचे नाते, त्यांच्या डोळ्यांतील भीती आणि तरीही न हरवणारी जगण्याची जिद्द या पुस्तकातून अत्यंत संवेदनशीलपणे समोर येते.
पुस्तकातील अनेक प्रसंग मन हेलावून टाकतात. गर्भवती स्त्रिया अनेक किलोमीटर चालत, कधी जंगलातून जीव धोक्यात घालून रुग्णालयात पोहोचतात. काही वेळा त्यांची अवस्था इतकी गंभीर असते की जगण्याची आशाच उरत नाही. पण अशा परिस्थितीतही डॉक्टर म्हणून डॉ. ऐश्वर्या शांतपणे, संयमाने आणि कौशल्याने उपचार करत राहतात. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात निर्माण होणारा विश्वास पुस्तकात अत्यंत हळुवारपणे उमटतो.
या भागातील वास्तव फक्त दारिद्र्याचे नाही, तर सततच्या संघर्षाचे आहे. एका बाजूला नक्षलवादी, दुसऱ्या बाजूला पोलीस आणि प्रशासन यांच्या संघर्षात सामान्य आदिवासी माणूस भरडला जातो. संशय, भीती, असुरक्षितता आणि हिंसा या वातावरणातही इथली माणसे जगण्याचा प्रयत्न करत राहतात. तरीही या पुस्तकात निराशेपेक्षा आशेचा सूर अधिक जाणवतो.
डॉ. ऐश्वर्या यांनी फक्त समस्याच मांडलेल्या नाहीत, तर या भागात काम करणाऱ्या सकारात्मक व्यक्तींची ओळखही करून दिली आहे. बारसूरमधील गोडबोले दांपत्य, शिक्षणासाठी झटणारे कार्यकर्ते, मुलांच्या भविष्यासाठी सुरू असलेले “बचपन बनाओ” अभियान, खेळातून मुलांना नवी दिशा देणारी बिजापूर स्पोर्ट्स अकादमी, सेंद्रिय शैलीच्या शेती प्रसारासाठीचा भूमगादी प्रकल्प, पर्यटनासाठी झटणारे निसर्गप्रेमी जीतसिंह आर्य,आदिवासी संस्कृती जपणारे विविध उपक्रम या सगळ्यांमुळे बस्तरचा एक वेगळाच चेहरा समोर येतो.
IAS अधिकारी डॉ. अय्याज तांबोळी, IPS अधिकारी डॉ. दिव्यांग पटेल यांसारखे अधिकारी केवळ प्रशासन चालवत नाहीत, तर लोकांच्या आयुष्यात बदल घडवण्याचा प्रयत्न करतात, हे पुस्तकातून जाणवते. पंचशील आश्रमसारख्या संस्थांमुळे आदिवासी मुलांना शिक्षणाची आणि सुरक्षित आयुष्याची नवी संधी मिळताना दिसते.
“बिजापूर डायरी”चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील माणुसकी. पुस्तक कुठेही कृत्रिम वाटत नाही. प्रत्येक अनुभव हा जगलेल्या वास्तवातून आलेला असल्याने तो थेट मनाला भिडतो. आदिवासी समाजाविषयी सहानुभूती निर्माण करतानाच त्यांच्या संघर्षशील वृत्तीबद्दल आदरही निर्माण होतो.
बस्तरमधील आदिवासी समाजाचे जीवन जंगलाशी घट्ट जोडलेले आहे. आदिवासी संस्कृती जंगलातील विविध झाडे, फुले आणि फळांपासून ते पारंपरिक पेये तयार करतात. महुआच्या फुलांपासून बनवलेले पेय हे त्यांच्या सण, समारंभ आणि धार्मिक विधींचा महत्त्वाचा भाग आहे. तसेच सल्फीच्या झाडातून मिळणारा गोड रस पौष्टिक आणि ऊर्जा देणारे पेय मानले जाते.
तेंदू, इमली आणि इतर वनफळांपासूनही स्थानिक पेये तयार केली जातात. ही पेये केवळ खाद्यसंस्कृतीचा भाग नसून आदिवासींच्या निसर्गाशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचे प्रतीक आहेत.
बिजापूर डायरीमध्ये इंद्रावती नदीचा उल्लेख केवळ एका नदीप्रमाणे नाही, तर बस्तरच्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून आलेला दिसतो. दाट जंगलातून शांतपणे वाहणारी इंद्रावती बस्तरच्या निसर्गसौंदर्याला अधिक गूढ आणि मोहक बनवते.
सलवा जुडूम चळवळीमुळे बस्तरचे सामाजिक जीवन हादरून गेले. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. तरीही इथला आदिवासी समाज पूर्णपणे कोसळला नाही. संघर्ष हा त्यांच्या जीवनाचा भागच बनून गेला आहे. निसर्गाशी एकरूप होऊन जगणाऱ्या या लोकांमध्ये जगण्याची विलक्षण ताकद आहे, हे पुस्तक वारंवार जाणवून देते.
' बिजापूर डायरी ' वाचताना आपण फक्त एका प्रदेशाची माहिती घेत नाही, तर एका वेगळ्या भारताला भेटतो. संवेदनशील मनाने समाजाकडे पाहण्याची दृष्टी हे पुस्तक देते. वंचितांसाठी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या संघर्षामागे किती माणुसकी आणि समर्पण दडलेले असते, याची जाणीव करून देणारे हे पुस्तक मनाला अंतर्मुख करते.
हे पुस्तक वाचून संपल्यावर बस्तर, तिथली माणसे आणि त्यांचे जगणे दीर्घकाळ मनात रेंगाळत राहते. 'बिजापूर डायरी' ही फक्त डायरी नसून, अंधारातही आशेचा दिवा जपणाऱ्या माणसांची जिवंत कहाणी आहे.


Thursday, May 21, 2026

हंपीचा ध्यास-२ विरुपाक्ष मंदिर

 




विरुपाक्ष मंदिर, हंपी.

ज्याप्रमाणे शहरात थोड्या उंचीवर गेलात तर कधी  सपाट जागेवरून ‘चांदबिबी महाल’ दिसतोच, तसेच हंपीतलं विरुपाक्ष मंदिरही शहरातून कुठूनही सहज दिसतं. माझी रूम जिथे होती, तिकडूनही उत्तरेकडे नीट ठराविक उंचीवरून विरुपाक्ष मंदिराचे गोपुर दिसायचे. अगदी अंजनेरी पर्वतावरूनही हंपीचे गोपुर स्पष्ट दिसतात.

मंदिराच्या मुख्य गोपुरासमोर बाह्य प्रांगणात एक उंच आणि देखणा लाकडी रथ उभा होता. चैत्र पौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने हा रथ बाहेर काढण्यात आला असावा.

विरुपाक्ष किंवा पंपापती मंदिर हे हम्पी (विजयनगर) येथील सर्वात प्राचीन आणि पवित्र मंदिर मानले जाते. शतकानुशतके हे मंदिर विजयनगर साम्राज्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे केंद्र राहिले आहे. पंपापती म्हणजे ब्रह्मदेवाची कन्या पंपा नदीची स्वामी किंवा पंपा-तीर्थाचा स्वामी. येथे तुंगभद्रा नदीला पंपा नदी म्हणूनही ओळखले जाते.हे मंदिर तुंगभद्रा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर, हेमकूट डोंगराच्या उत्तरेला, अतिशय देखण्या निसर्गरम्य ठिकाणी वसले आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे.विरुपाक्ष मंदिराची मूळ स्थापना ७व्या शतकात बदामी चालुक्य काळात झाली. सुरुवातीला हे एक छोटे शिवमंदिर होते, ज्यात विरुपाक्ष किंवा पंपापती लिंगाची स्थापना करण्यात आली होती. ९व्या आणि १०व्या शतकातील उपलब्ध शिलालेखांमध्ये याचा उल्लेख आढळतो. १२व्या शतकात उत्तर चालुक्य काळात मंदिराचा लक्षणीय विस्तार झाला. याच काळातील पार्वती आणि भुवनेश्वरी ही दोन मंदिरे आजही अस्तित्वात आहेत. या मंदिरांमधील काळ्या दगडाचे लेथ-टर्न केलेले सुंदर स्तंभ हे त्या काळाचे जिवंत साक्षी आहेत.म्हणजेच, विजयनगर साम्राज्य स्थापन होण्यापूर्वीच हे मंदिर सुमारे ५०० ते ६०० वर्षे जुने होते.

१४व्या शतकापासून विजयनगर राजांनी या मंदिराला संरक्षण व संवर्धन दिले. देवराय दुसरा (१४२२–१४४६) यांच्या काळात मुख्य पूर्व गोपुर बांधण्यात आला. मात्र मंदिराचा सर्वात मोठा आणि वैभवशाली विस्तार कृष्णदेवराय (१५०९–१५२९) यांच्या काळात सुमारे १५१० मध्ये झाला. यावेळी रंगमंडप -महामंडप, आंतर गोपुर, अनेक उपमंदिरे, स्तंभयुक्त क्लॉइस्टर आणि इतर सजावटीचे काम पूर्ण करण्यात आले. लक्कण दंडेश (कृष्णदेवरायाचे सेनापती) यांनी या विस्तारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यामुळे विरुपाक्ष मंदिर विजयनगर साम्राज्याचे मुख्य देवस्थान बनले.

 विरुपाक्ष मंदिराचा हा गोपुर उंचीने ५० मीटर आहे. त्याचे बाह्यरूप फ्रॅक्टल या गणितीय संकल्पनेतून तयार झाल्यासारखे दिसते (अर्थात ‘फ्रॅक्टल’ ही संकल्पना नंतर प्रसिद्ध झाली).


फ्रॅक्टल स्थापत्यशास्त्र

फ्रॅक्टल ही गणितीय संकल्पना आहे जी स्वसदृशता वर आधारित आहे. म्हणजे एका आकाराचा छोटा भाग संपूर्ण आकारासारखाच दिसतो. हे नमुने वेगवेगळ्या स्केलवर आकारमानांवर पुनरावृत्ती होतात. बेनॉइट मॅन्डेलब्रॉट यांनी १९७५ मध्ये या संकल्पनेला औपचारिक स्वरूप दिले. प्रकृतीत फ्रॅक्टल्स सर्वत्र दिसतात. झाडाची फांदी, हिमकण, ढग, समुद्रकिनारा, रक्तवाहिन्या इत्यादी.

स्थापत्यशास्त्रात फ्रॅक्टल्सचा वापर केल्यास इमारती ज्यात पुनरावृत्ती, स्केलिंग आणि स्वसदृशता यांचा समावेश असतो. यामुळे इमारत नैसर्गिक, जटिल पण सुसंगत वाटते. हे अनैच्छिक असू शकते ज्यात सौंदर्य किंवा संरचनात्मक कारणांसाठी फ्रॅक्टल रचना वापरली जाते. तर काही वेळा हे औपचारिक असते ज्यात आधुनिक काळात संगणकाच्या मदतीने डिझाइन केले जाते. उदाहरणार्थ फ्रँक लॉइड राइट यांच्या काही इमारती किंवा समकालीन आर्किटेक्चर यात मोडतात. फ्रॅक्टल डिझाइनमुळे इमारती अधिक बायोफिलिक निसर्गाशी जोडणारी होतात ज्यामुळे मानवी मनःशांती, एकाग्रता आणि कल्याण वाढते.

भारतीय हिंदू मंदिर वास्तुकला ही फ्रॅक्टल्सची सर्वोत्तम उदाहरणे आहेत. फ्रॅक्टल थिअरी आविष्कार होण्यापूर्वी शेकडो वर्षे आधीच भारतीय स्थापत्यकारांनी ही रचना वापरली होती. मंदिरांच्या शिखर किंवा गोपुरात मुख्य शिखराभोवती लहान शिखरे त्याभोवती आणखी लहान शिखरे अशी रिकर्सिव स्वसदृशता दिसते. यामागे प्रतीकात्मक अर्थ आहे. मंदिर हे ब्रह्मांडाचे सूक्ष्म प्रतिरूप आहे. पूर्णता प्रत्येक भागात प्रतिबिंबित होते हा हिंदू दर्शनाचा सिद्धांत फ्रॅक्टल संकल्पनेत स्पष्ट दिसतो.हिंदू मंदिरांमध्ये मोठ्या आकारात जे आहे, ते लहान आकारातही तसेच असते. हीच गोष्ट फ्रॅक्टल गणितात “स्वसदृशता” म्हणून ओळखली जाते. प्राचीन भारतीय स्थापत्यकारांनी हे तत्त्व हजारो वर्षांपूर्वी मंदिरांमधून अमलात आणले असावे का ?

विरुपाक्ष मंदिर हंपी याचे गोपुर हे फ्रॅक्टल रचनेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. मुख्य आकार त्रिकोणी असून वर चढताना नमुने पुनरावृत्ती होतात जे स्नोफ्लेक सारखे दिसतात. हे १५व्या शतकातील विजयनगर साम्राज्यातील बांधकाम आहे. याचप्रमाणे खजुराहोचे कंदरिया महादेव मंदिर, मदुराई मंदिर आणि राणकपूर जैन मंदिर यांमध्येही फ्रॅक्टल रचना स्पष्टपणे दिसते.

इतर संस्कृतींमध्येही फ्रॅक्टल आर्किटेक्चर आढळते. आफ्रिकन गावे, घरं आणि कापड यांमध्ये स्केलिंग आणि रिकर्शनचे उत्कृष्ट नमुने आहेत ज्यांचा अभ्यास रोन एग्लॅश यांनी केला आहे. युरोपातील गॉथिक आणि बारोक कॅथेड्रल्स तसेच आधुनिक काळातील फ्रँक लॉइड राइट यांच्या ऑर्गेनिक आर्किटेक्चरमध्येही फ्रॅक्टल तत्त्वे आढळतात.

गोपुरातील स्वसदृशता म्हणजे मोठ्या आकारातील रचना लहान आकारात पुन्हा पुन्हा दिसणे. एकच नमुना वेगवेगळ्या आकारमानांवर पुनरावृत्ती होणे ही फ्रॅक्टलची मूलभूत वैशिष्ट्ये गोपुरांमध्ये स्पष्ट दिसून येते. विरुपाक्ष मंदिर हंपी याचे मुख्य राजगोपुर सुमारे पन्नास मीटर उंच आणि नऊ मजली आहे. यात स्वसदृशता अशी दिसते की संपूर्ण गोपुराचा मुख्य आकार त्रिकोणी आहे आणि खालच्या मोठ्या स्तरांवरील रेषा कोन व नक्षी वरच्या लहान स्तरांवरही त्याच रूपात पुनरावृत्ती होतात. प्रत्येक मजला हा खालच्या मजल्याचा लहान प्रतिरूप असतो. वर चढताना प्रत्येक पातळीवर नमुने लहान होत जातात तरी संपूर्ण गोपुरासारखेच दिसतात. ही रचना रिकर्सिव स्वसदृशता दर्शवते. म्हणजे गोपुराचा एखादा छोटा भाग वेगळा केला तरी तो संपूर्ण गोपुरासारखाच भासतो. याचप्रमाणे खजुराहोच्या कंदरिया महादेव मंदिरात मुख्य शिखराभोवती असलेल्या लहान शिखरांमध्येही आणखी लहान शिखरे दिसतात. मदुराई मीनाक्षी मंदिरातील गोपुरांवर प्रत्येक स्तरावर मुख्य गोपुरासारखीच नक्षी, देवमूर्ती आणि छोट्या शिखरांची पुनरावृत्ती होते. हिंदू दर्शनानुसार, गोपुर हे मेरु पर्वताचे प्रतीक आहे. ब्रह्मांडातील पूर्णता प्रत्येक छोट्या भागात असते, हेच तत्त्व गोपुरातील स्वसदृशतेतून व्यक्त होते. “पूर्णमदः पूर्णमिदम्” -पूर्णातून पूर्ण निघते, तरी पूर्णच उरते या वेदान्तातील कल्पनेशी हे जुळते.

विरुपाक्ष मंदिराच्या गोपुरात ही स्वसदृशता इतकी स्पष्ट आहे की, फ्रॅक्टल थिअरी आविष्कार होण्यापूर्वी शेकडो वर्षे आधी १५वे शतकात ती वापरली गेली होती?

या गोपुराच्या बाह्य भागावर अनेक सुंदर आणि अर्थपूर्ण शिल्पे कोरलेली आहेत. विशेषतः पहिल्या स्तरावर मैथुन शिल्पे स्पष्ट दिसतात. ही शिल्पे प्राचीन भारतीय परंपरेनुसार सृष्टीची सर्जनशीलता आणि जीवनचक्र दर्शवतात.

गोपुरावर विविध देवदेवतांची शिल्पेही मोठ्या प्रमाणात आहेत. शिव, विष्णू, गणेश, नंदी, राम-लक्ष्मण-सीता यांसारख्या देवमूर्ती, पौराणिक कथांमधील दृश्ये, यक्ष-यक्षिणी, गंधर्व आणि इतर सैद्धांतिक आकृत्या येथे कोरलेल्या आहेत. प्रत्येक मजल्यावर शिल्पांची रचना वेगळी असून, खालच्या स्तरांवर मानवी जीवन, प्रेम, सृष्टी आणि पौराणिक कथा यांचे दर्शन घडते, तर वरच्या स्तरांवर अधिक आध्यात्मिक आणि देवी-देवतांच्या रूपांचे चित्रण आहे.

एक सुंदर गजरा विकत घेऊन ,केसांत माळला ...चार पाच रील्स काढल्यावरच मंदिराकडे वळाले ,हे वेगळे सांगायला नको .


मंदिरात आत शिरताच तीन शिरे असणारा त्रिमुखी नंदी दिसतो. एका भिंतीवर विजयनगर साम्राज्याचे चिन्ह म्हणजे  वराह (जंगली डुक्कर), तलवार, सूर्य आणि चंद्र यांचा संयुक्त कोरीव आकृतिबंध दिसतो .वराह चिन्हाची सुरुवात मूळ चालुक्य राजवंशात झाली. बादामी चालुक्य (६व्या ते ८व्या शतक) यांनी सर्वप्रथम वराह (विष्णूचा तिसरा अवतार) याला आपले कुलचिन्ह स्वीकारले. चालुक्य राजे विष्णूचे परम भक्त होते आणि त्यांनी पृथ्वीला समुद्रातून वाचवणाऱ्या वराह अवताराला आपल्या राजकीय आणि सांस्कृतिक प्रतीक बनवले.

विजयनगर साम्राज्याने चालुक्य राजवंशाकडून हे चिन्ह आपल्या राजकीय चिन्ह म्हणून स्वीकारले. विजयनगर साम्राज्याच्या स्थापनेनंतर (१३३६) हरिहर आणि बुक्का राय यांनी चालुक्यांच्या परंपरेचा वारसा चालू ठेवला. विशेषतः कृष्णदेवराय आणि त्यानंतरच्या राजांच्या काळात हे चिन्ह सर्वत्र प्रसिद्ध झाले आणि साम्राज्याच्या वैभवाचे प्रमुख प्रतीक बनले.

चिन्हातील घटक आणि त्यांचा अर्थ-

हे चिन्ह सामान्यतः वराह, तलवार, सूर्य आणि चंद्र यांच्या संयोजनात दाखवले जाते. वराह हे शक्ती, साहस, धर्मरक्षण आणि विजयाचे प्रतीक आहे. तलवार युद्धक्षमता, न्याय आणि साम्राज्य संरक्षण दर्शवते. तर सूर्य आणि चंद्र “आचंद्रार्क” (सूर्य-चंद्र अस्तित्वात असेपर्यंत) हे साम्राज्य टिकावे, असा शुभ आणि चिरंतन अर्थ देतात.

विरुपाक्ष प्रांगणात डावीकडे लक्ष्मी हत्तिणीचे दर्शन झाले. ती झुलत-झुलत लुसलुशीत हिरव्या चाऱ्यावर ताव मारत होती.

समोरच्या मोठ्या प्रांगणात दोन मंडप आहेत . एक मोठा व एक छोटा. यांना फलपुजा मंडप/कल्याण मंडप/सभामंडप अशी अनेक नावे आहेत. यातील मोठ्या मंडपात जवळपास १०० खांब आहेत. या खांबांवर सिंह, कृष्ण, पौराणिक कथा इत्यादी अनेक शिल्पे कोरलेली आहेत. मी खूप वेळ इथे रेंगाळले . प्रत्येक खांबावर वादकांची शिल्पे ही खूपच वेगळी आणि रोचक आहेत. छोट्या मंडपात मधोमध एक शिळा आहे, जिला कुंपण घातले आहे व भोवती खांब आहेत.

पुढे गोपुराच्या आतल्या भागावर आणखी एक मोठे प्रांगण आहे. त्याच्या समोर प्रथम दीपमाळ, नंदीमंडप, मग मोकळी जागा आणि पुन्हा विरुपाक्ष मंदिराचे प्रसिद्ध रंगमंडप येते. त्यानंतर अंतराल (अंतःप्रकोष्ठ) आणि गर्भगृह. गर्भगृहात ‘पंपापती’ विरुपाक्ष म्हणजे शंकराचे पिंड आहे.

रंगमंडपात ८ खांब आहेत, जे ससा, बकरी, घोडा, मंगर, सिंह, व्याघ्र, हत्ती अशा विविध प्राण्यांपासून बनवलेल्या व्यालकृती (याली) स्वरूपात आहेत. विजयनगर साम्राज्यात बाजार, कल्याण मंडप, सभा मंडप, वादक शिल्पे यांसारखे व्यालकृती खांब खूप प्रसिद्ध आहेत. 

विरुपाक्ष मंदिरातील रंगमंडपाच्या पायऱ्यांजवळ शिलालेखात कृष्णदेवराय यांचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो, ज्यामुळे त्यांना या मंदिराचे सर्वात मोठे संवर्धक आणि दाता मानले जाते. विशेषतः १५१० ईसाली (त्यांच्या राज्याभिषेकाच्या काळात) कोरलेल्या कन्नड भाषेतील शिलालेखात कृष्णदेवरायांनी विरुपाक्ष देवतेच्या नावाने मोठ्या प्रमाणात दान आणि बांधकाम केल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. यात त्यांनी रंगमंडप (महामंडप), आंतर गोपुर, मुख्य गोपुराची दुरुस्ती आणि इतर अनेक सजावटीचे काम पूर्ण केल्याचे नमूद आहे. त्यांनी मंदिराच्या देखभालीसाठी सिंगनायकनहळ्ळी या गावाचे दान दिले, तसेच सोन्याचे ताट, सोन्याचे आणि चांदीचे दिवे, अमृतपदीसाठी जमीन आणि उत्पन्नाची व्यवस्था केली.


यापुढे तिन्ही बाजूंनी ओसरी आहेत. त्यात एक भव्य दगडी रांजण दिसले, ज्यात पंचामृत करून प्रसाद तयार केला जात असे . त्याशेजारीच एक मीटर रुंद अशी दगडी चूल दिसली, जी चंदन उगाळण्यासाठी वापरली जाते असे समजले.

हम्पीतील विरुपाक्ष मंदिर हे विजयनगर चित्रकलेचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. रंगमंडपाच्या छतावर ही चित्रे काढली आहेत. ही हम्पीतील एकमेव जिवंत विजयनगर चित्रे मानली जातात. यातील प्रमुख विषय म्हणजे विदुरण्य महर्षींची मिरवणूक, अर्जुनाने मत्स्ययंत्र भेदून द्रौपदीचा स्वयंवर, दशावतार, शिव-कामदहन, त्रिपुरारी, कल्याणसुंदरम (शिव-पार्वती विवाह) आणि गिरिजाकल्याणम (पंपा-विरुपाक्ष विवाह) यांसारख्या पौराणिक घटना आहेत. ही चित्रे १६व्या शतकातील आहेत आणि विजयनगर चित्रकलेची उत्कृष्ट उदाहरणे मानली जातात.विजयनगर चित्रकलेचा नंतरच्या काळात मैसूर आणि तंजावर चित्रकला शैलींवर मोठा प्रभाव पडला

मी आपली मन लावून चित्र पाहत असताना एका मर्कटाने चपळाईने माझ्या केसांतील गजरा जोरात ओढला आणि निवांत खात बसला ,अशा मर्कट लीला मंदिरात सतत सुरु होत्या.

पंपा-भुवनेश्वरी देवीचे मंदिर विरुपाक्ष मंदिराच्या अगदी जवळ, उत्तरेकडील शांत कॉरिडोरमध्ये विराजमान आहे. या प्राचीन मंदिरात पाऊल टाकताच सुंदर अलंकार-वस्त्रांनी सजलेली देवीची मूर्ती पाहून मन एक वेगळ्याच भक्तीभावाने भरून जाते. १२व्या शतकातील चालुक्य शैलीतील हे छोटेसे मंदिर इतके सुंदर आणि पवित्र आहे की, येथे उभे राहिल्यावर आपण इतिहासाच्या काळात हरवल्यासारखे वाटते. याच ठिकाणी हम्पीच्या महान सम्राटांची संपूर्ण वंशावळ दगडावर इंग्रजीत रंगविली आहे .जी वाचताना  जणू हजारो वर्षांच्या गौरवशाली इतिहासाने आपल्याशी बोलत आहे असे वाटले.चार बाजूला स्तंभयुक्त क्लॉइस्टर भोवती फिरणारा मंडप-ओसरीवजा मार्गक्रमण भाग आहे.

मंदिराच्या उजव्या कोपऱ्यात काही पायऱ्या चढून गेल्यावर एक छोटी, रहस्यमय आणि अंधारी खोली आहे. त्या खोलीत प्रवेश करताच मनात एक अपूर्व कौतुक आणि आश्चर्य जागे होते. खोलीच्या पूर्व भिंतीवर असलेल्या एका छोट्याशा छिद्रातून बाहेरच्या भव्य ५२ मीटर उंच पूर्व गोपुराची उलटी प्रतिमा भिंतीवर स्पष्ट दिसते. प्राचीन काळातील हे पिनहोल कॅमेरा तंत्र पाहून,ही  किती अद्भुत कला होती. त्या काळातील भारतीयांचे विज्ञान आणि कलेचा हा संगम आहे .

पिनहोल कॅमेरा हा जगातील सर्वात सोपा आणि प्राचीन कॅमेरा आहे. यात कोणतीही लेन्स (काच) वापरली जात नाही. फक्त एका अंधार्‍या खोलीत भिंतीवर एक अत्यंत छोटे छिद्र (pinhole) केले जाते. या छोट्या छिद्रातून बाहेरचा प्रकाश आत येतो आणि भिंतीवर उलटी प्रतिमा तयार होते.हे तंत्र “Camera Obscura” नावाने ओळखले जाते.

प्रकाश नेहमी सरळ रेषेत प्रवास करतो, ही मूलभूत भौतिकशास्त्रीय सत्यता विरुपाक्ष मंदिरातील पिनहोल कॅमेरा तंत्रामागील मुख्य रहस्य आहे. जेव्हा बाहेरचा तेजस्वी प्रकाश त्या छोट्याशा छिद्रातून आत येतो, तेव्हा प्रकाश किरण एकमेकांत मिसळत नाहीत किंवा एकत्र होत नाहीत. प्रत्येक किरण सरळ मार्गाने आत शिरतो आणि विरुद्ध भिंतीवर आपली छाप सोडतो. यामुळे बाहेरच्या गोपुराची प्रतिमा पूर्णपणे उलटी तयार होते .वरचा भाग खाली, खालचा भाग वर, डावा भाग उजवीकडे आणि उजवा भाग डावीकडे दिसतो.

मंदिराच्या उत्तरेकडील दाराने बाहेर पडताच, समोर एक पवित्र पुष्करणी दिसते. त्या वेळी उन्हाची तीव्रता वाढली होती, तरीही त्या ठिकाणचे शांत आणि पवित्र वातावरण मनाला मोहिनी घालते. हम्पी मंदिरासमोरून पुन्हा जाताना आम्ही हेमकूट टेकडी चढण्यास सुरुवात केली. प्रत्येक पाऊल उचलताना हृदयात एक वेगळाच रोमांच जाणवत होता 



















Wednesday, May 13, 2026

जंगलातील दिवस -व्यंकटेश माडगूळकर



" जंगलातील दिवस " या आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत व्यंकटेश माडगूळकर म्हणतात ,

****आपल्या जीवनाला फुरसदीचा एक भरजरी,लांबलचक पदर असावा, असे मनापासून वाटत असते, तरी चरितार्थ चालविण्यासाठी कामधंदा करावयातच आपण फार खर्ची पडतो. आवडोचे, पण चरितार्थ साधेल, असे नसलेले आपण बाजूला टाकतो किंवा पुढे कधी तरी करू, म्हणून पुढे ढकलतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सतत धावपळ चाललेली असते. सारखी गती. गती. रिक्षातून, बसमधून, रेल्वेतून, विमानातून धावायचे. सगळे जीवन या यांत्रिक गतीने व्यापून टाकले आहे. कधी अंगावर चांदणे पडत नाही. कधी झाडाच्या पानांची सळसळ ऐकु येत नाही. कधी ओढ्यात अंघोळ होत नाही. कधी उताणे शोधून चांदण्यांनी गच्च भरलेले आकाश पाहता येत नाही.****


या व्यावहारिक जीवनातून मग तात्यांनी जवळपास दहा वर्षे (१९७४-८४)या काळात विविध जंगलांना ,मूळ प्राणी-पक्षी-ऐतिहासिक धरोहरे यांना भेटी दिल्या .व्यंकटेश माडगुळकर हे 'बंदुक टाकून हातात दुर्बिण घेतलेले जंगल-जीवन रेखाटनकार आणि शब्दचित्रकार' म्हणून मराठी वाचकांना परिचित आहेत.ही सगळी भटकंती ते वेळोवेळी विविध प्रसिद्ध नियतकालिकांमधून लिहीत होते.या  जंगलातल्या अनोख्या अद्भुत अपरिचित  गोष्टी ,आठवणी,अनुभूती एकत्रित करून ही जंगलाची शिदोरी एकत्रितपणे "जंगलातील दिवस"या पुस्तक रूपाने वाचकांना मिळाली .हे पुस्तक व्यंकटेश माडगूळकरांच्या जंगलप्रेम आणि निसर्गकुतूहलचा सुंदर वृतांत आहे.हे केवळ "प्रवासवर्णन" नाही, तर जंगलातील जीवन, प्राणी-पक्षी, निसर्गसौंदर्य, शिकारी अनुभव आणि जंगलातील छोटे-छोटे क्षण यांचे जिवंत चित्रण आहे. लेखक स्वतः शिकारीचा छंद असलेले, चित्रकार आणि साहित्यिक असल्याने त्यांचे वर्णन खूपच जिवंत आणि रंगीत आहे.

काझिरंगा आणि मानस, कांचनमृग ,नवेगाव बांध, भरतपूर, राजस्थानच वाळवंट,शेल्लरच्या अभ्यासिकेत,खजुराहोची शिल्पकला,शोध,मगर आणि वान, काळवीट पाहायला रेहेकुरीला ,पेरियार,मेळघाट याच त्या लेखमालिकेतल्या चिरतरू !ज्या आजही वाचतांना वनांची पाने दूर सारत तिथल्या प्राण्यांचे ,पक्ष्याचे अद्भुत जग माडगूळकरांच्या लेखणी सामर्थ्याने आपण जणू याची डोळी प्रत्यक्ष पाहत असतो .

यातली पशु पक्ष्यांची कमाल रेखाचित्रे व्यंकटेश माडगूळकर यांनीच त्या त्या जंगलातल्या भेटी दरम्यानच रेखाटली आहेत .काझीरंगाचा गेंडा, हत्ती,नवेगावच्या  वाघाचा माग काढणे, रेहेकुरीला ,राजस्थानात काळवीटाचे जीवनक्रम जवळून अभ्यासणे , मगर ,माकड इत्यादी  प्राण्यांचे वर्तन, त्यांचे संघर्ष आणि सौंदर्य यांचे वर्णन रसाळ आहे .

काझीरंगा प्रकरण वाचतांना समजतेच की जंगलातला सर्वश्रेष्ठ योद्धा म्हणून गेंड्याकडे पाहिले जाते.

तसेच इतरही रोचक निरीक्षणे नव्याने समजतात जसे गंड्यांच्या पाठीवर बसणारे पक्षी जसे कोतवाल, मैना, बगळे हे तिथे आयुष्यभरही असतात .तर कीटकांपासून बचावासाठी गेंडे पाण्यात उभे राहतात.असलेल्या कीटकांपासून विशेषतः गोचीड बचाव करण्यासाठी काळा कोतवाल, मैना आणि बगळे त्यांच्या पाठीवर बसतात. हे पक्षी गेंड्याच्या अंगावरील कीटक खाऊन त्याला मदत करतात आणि स्वतःसाठी अन्न मिळवतात , ही एक परस्पर लाभाची -Symbiotic संस्था आहे.जंगल सफारीसाठी हत्तीवर स्वार होतांनाचा प्रसंग वाचतांना वाचकाला खरोखर हत्तीवर बसल्यासारखे आणि गंड्यासमोर उभे राहिल्यासारखे वाटते.

नवेगावला अंजेनाचे झाड पाहतांना एक प्रसंग घडतो. हा भाग खूपच सुंदर आणि प्रभावी आहे.

****आणखी थोडे पुढे गेलो, आणि तो वृक्षविशेष दिसला. खोल, खडकाळ नाल्याच्या काठी एक उंचा, पुरा अंजन ताठ उभा होता. एखाद्या कुशल शिल्पकाराच्या नाजूक हत्यारानं नक्षीकाम करावं, असं त्याचं सगळं खोड खुशोभित झालं होतं.

माघवराव म्हणाले,

“हे अस्वलाचं झाड आहे. वर लागलेली मधाची पोळी खाण्यासाठी ह्यावर अस्वल चढतात आणि उतरतात. त्यांच्या नखांनी हे नक्षीकाम केलंय, असं.”

पुढे तात्या म्हणतात ,"आपल्या हाती कॅमेरा नव्हता म्हणून हळहळ वाटली. हे नक्षीकाम रेखाचित्रात दाखवण्यापेक्षा अधिक सुंदर होतं."


राजस्थानच्या शुष्क, काटेरी वाळवंट  भागातील भटकंतीचे वर्णन  राजस्थानातील वाळवंट या प्रकरणात करतात. हिरव्या जंगलापेक्षा पूर्णपणे वेगळ्या, कठोर आणि निर्जन निसर्गाचे चित्रण यात आहे.चिंकारा छोट्या, सुंदर हरणांचे कळप, त्यांचे वर्तन आणि सौंदर्य,रोहिडा फुले ही वाळवंटात फुलणारी सुंदर केसरी फुले.वनस्पती जशा  केर, काटेरी झुडुपे आणि टिकाऊ वनस्पती.वाळवंटात राहणारे लोकांचे जीवनमान , उंट, शेळ्या-मेंढ्या आणि पाण्याची दुर्मिळता यांचे वर्णन यात आहे.

वाळवंटातील कठोर परिस्थितीतही टिकून राहणाऱ्या प्राणी, वनस्पती आणि माणसांच्या जिवंतपणाचे आणि टिकाऊ शक्तीचे सुंदर चित्रण दिसते .


व्यंकटेश माडगूळकर यांनी आपल्या भ्रमंतीदरम्यान मुख्यतः फॉरेस्ट बंगले आणि डाक बंगले येथे राहणे पसंत केले. त्यांचे वर्णन खूप रसाळ आहे.

माडगूळकर डाक बंगल्यांचे खूप कौतुक करतात. ते लिहितात:

“डाक बंगला ही संस्थाच मोठी लोभस आहे... गावापासून दूर, नदी-ओढा-तळ्याच्या काठी... जुना बंगला जितका जुना तितके बांधकाम उत्तम... आराम, सौंदर्य, शांतता... हात पडेल तिथे सोय... थोडी सोय, माफक गैरसोय... डाक बंगल्याला पर्याय नाही!”

ते म्हणतात की फॉरेस्ट डिपार्टमेंटचे बंगले असले तर तर सोन्याहून पिवळे!

अजून किती किती ...खूप काही या पुस्तकातल्या जंगलातल्या रसाळ ,सहज वर्णनांची यात सुंदर माला आहे.

"जंगलातील दिवस" हे पुस्तक निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी आणि साहित्यरसिकांसाठी एक अमृतवर्षी अनुभव आहे. एकदा वाचायला सुरुवात केली की, जंगलाची हाक सोडवत नाही.

नक्की वाचा... जंगल तुम्हाला हाक मारत आहे!
















Tuesday, May 12, 2026

हंपीचा ध्यास १-हंपीचा ग्रॅनाईट दगड

 

 हंपीचा ध्यास १-हंपीचा ग्रॅनाईट दगड 




हंपी: निसर्ग आणि इतिहासाचा अद्भुत संगम

हंपी (विजयनगर) हे केवळ प्राचीन मंदिरे आणि भव्य अवशेषांसाठी प्रसिद्ध नाही, तर त्याच्या अद्भुत गोलाकार ग्रॅनाइट दगडांसाठी देखील जगभरात ओळखले जाते. हे विशाल, गोलाकार, एकावर एक रचलेले खडक पाहून अनेकांना प्रश्न पडतो .हे दगड कसे तयार झाले? हे कसे इतके गोल आणि टिकाऊ आहेत?

या लेखात आपण हंपीतील दगडांची निर्मिती, ग्रॅनाइट कसे बनते, बेसाल्टशी त्याचा फरक आणि संपूर्ण भूवैज्ञानिक कथा समजून घेऊ.


१. धारवाड क्रेटॉन – पृथ्वीचे प्राचीन संग्रहालय

हंपीतील सर्व दगड धारवाड क्रेटॉन या प्राचीन भूपट्टाचा भाग आहेत.

  • हे खडक ३ अब्ज वर्षांपूर्वी तयार झाले.
  • धारवाड क्रेटॉन हा भारतातील सर्वात जुना आणि स्थिर भूप्रदेश आहे.
  • यातील क्लोसपेट ग्रॅनाइट हा हंपीतील बहुतेक गोलाकार खडकांचा मुख्य स्रोत आहे.

हे खडक पृथ्वीच्या प्रारंभिक काळात ज्वालामुखी क्रियांमुळे आणि मेंटलमधील उष्णतेमुळे तयार झाले.


२. ग्रॅनाइट कसे बनते?

ग्रॅनाइट हा इंट्रुसिव्ह इग्निअस रॉक आहे.

निर्मिती प्रक्रिया:

  1. पृथ्वीच्या खोल भागात (१०-३० किलोमीटर खाली) मॅग्मा (पाघळलेला खडक) साचतो.
  2. हा मॅग्मा खूप हळूहळू थंड होतो (लाखो ते कोट्यवधी वर्षे लागतात).
  3. हळू थंड होण्यामुळे मोठे खनिज स्फटिक तयार होतात -क्वार्ट्झ, फेल्डस्पार आणि मायका.
  4. परिणामी, खडक मोठ्या दाण्यांचा (Coarse-grained) आणि कठीण बनतो.

रंग: फिकट गुलाबी, धुरकट किंवा पांढरट. रासायनिक स्वभाव: फेल्सिक (सिलिका जास्त).


३. हंपीतील गोलाकार दगड कसे तयार झाले? (Spheroidal Weathering)

ही हंपीच्या खडकांची सर्वात रोचक कथा आहे.

स्फेरोइडल वेदरिंग प्रक्रिया (Step-by-Step):

  1. ग्रॅनाइट खडकात नैसर्गिक जॉइंट्स (फटी) तयार होतात.
  2. पाणी या फटींमधून आत शिरते.
  3. पाणी + हवा + कार्बन डायऑक्साइड यामुळे रासायनिक अपक्षय होते.
  4. खडकाच्या कोपऱ्या आणि कडा चार-दोन बाजूंनी झिजतात, तर सपाट भाग फक्त एका बाजूने.
  5. त्यामुळे कोपरे गोल होतात आणि बाहेरील थर कांद्याच्या पाकळ्यांसारखे सोलून पडतात.
  6. अब्जावधी वर्षांच्या या प्रक्रियेनंतर कोरस्टोन्स (गोल कठीण दगड) उरतात.
  7. वरची माती आणि मऊ भाग झिजून गेल्याने आज आपल्याला दिसणारे गोलाकार बोल्डर्स तयार झाले.

तुंगभद्रा नदीने या प्रक्रियेला अधिक वेग दिला .खडकांना पोखरले, गुळगुळीत केले आणि बेटे, तळी तयार केली.


४. ग्रॅनाइट आणि बेसाल्ट यातील मुख्य फरक

वैशिष्ट्यग्रॅनाइटबेसाल्ट
उत्पत्तीखोल आत (Intrusive)पृष्ठभागावर (Extrusive)
थंड होण्याचा वेगखूप हळूखूप वेगवान
दाण्यांचा आकारमोठा (Coarse)बारीक (Fine)
रंगफिकट (गुलाबी, धुरकट)काळा किंवा गडद राखाडी
सिलिका प्रमाणजास्त (७०%+)अम्लीयकमी (४५-५२%) मूलभूत
टिकाऊपणाअत्यंत टिकाऊकठीण पण कमी टिकाऊ
उदाहरणहंपीचे खडक, ताजमहाल, माउंट रशमोरदख्खन पठार (महाराष्ट्र), हवाई बेटे

सोप्या भाषेत: ग्रॅनाइट = हळू थंड झालेला फिकट आणि मजबूत खडक. बेसाल्ट = वेगाने थंड झालेला काळा आणि बारीक खडक.


५. प्राचीन विजयनगर काळातील दगड वापर

विजयनगर साम्राज्याने हंपीतील स्थानिक ग्रॅनाइटचा कुशल वापर केला:

  • क्वारrying तंत्र: दगडात घनाकार छिद्रे पाडून लाकडी wedges घालणे, भिजवणे आणि दगड फोडणे.
  • याच दगडांपासून भव्य मंदिरे, स्तंभ, गाड्या, भिंती बांधल्या.
  • ग्रॅनाइट इतका टिकाऊ आहे की ५०० वर्षांनंतरही आजही अवशेष मजबूत आहेत.

सारांश

हंपीतील दगड हे केवळ निसर्गसौंदर्य नाहीत, तर पृथ्वीच्या ३ अब्ज वर्षांच्या इतिहासाची साक्ष आहेत.

  • ग्रॅनाइट खोल आत हळू थंड होऊन बनला.
  • अब्जावधी वर्षांच्या स्फेरोइडल वेदरिंगने त्याला गोलाकार आकार दिला.
  • तुंगभद्रा नदीने त्याला अंतिम आकार दिला.
  • आणि मानवाने त्यावर आपली संस्कृती कोरली.

हंपी हे ठिकाण भू-विज्ञान, पुरातत्व आणि स्थापत्यकला यांचा अद्भुत संगम आहे. UNESCO ने याला जागतिक वारसा स्थळ का दिले हे या सर्व प्रक्रियांमुळे स्पष्ट होते.

जेव्हा तुम्ही हंपीत जाल आणि त्या विशाल गोल खडकांकडे पाहाल, तेव्हा लक्षात ठेवा . तुम्ही ३ अब्ज वर्षांच्या पृथ्वीच्या इतिहासासमोर उभे आहात!