Friday, January 30, 2026

"बौद्ध मूर्तीशास्त्र"

सर्वांना वाटेल की मी अतीच सिनेमे पाहते काय(आता कोणाच्या वाटण्याने आपण बदलू नाही ,हा बेसिक नियम मान्यच असेल असे..:))

तर मी माझ्या क्षेत्राशिवाय अजूनही काही विशेष पाहत असते.मुळात अज्ञानी राहायला आवडत नाही.३ इडियट मधल्या रांचोचा एक डायलॉग मला फार रिलेट होतो,कायमच... "चारो तरफ ज्ञान बट रहा है, जहाँ से मिले लपेट लो".अशाप्रकारे ज्ञान मिळवणं जीवनाच्या आनंदाचं झाड आहे.

तर मी नुकताच "बौद्ध मूर्तीशास्त्र" अभ्यासक्रम झूमद्वारे पाहत होते.भारतीय संतांची ओळख व्हावी त्या आधीपासूनच मला बुद्धाने आकृष्ट केले होते.शांतपणे डोळे मिटून,तो ध्यानस्थ बुद्ध मला आवडायला लागला.पुढे दुःखाचे कारण शोधायला सर्वांचा त्याग केला याचे खूप अप्रूप वाटत गेले.मग मी वैदिक परंपरासंबंधित गोष्टींचे ज्ञान मिळवण्यात खूप जिद्द धरली.याला "वैदिक" म्हटलं जात हे मला त्याला अभ्यासल्यावर समजले. या माहितीचा उहापोह करतानाच रणवीर अल्हाबादियाचे खूप शो पाहिले.तिथे मला पहिल्यांदा 'पालगा रिनपोछे' या तरुण बौद्ध भिक्षूंचे विचार ऐकायला मिळाले अगदी सुरुवातीच्या काळातच पालगा रिनपोछे त्यांना समजले की भौतिकवाद हा दीर्घकालीन आनंदाचा उपाय नाही.कमी वयातच त्यांनी अब्जाधीश होऊन सपंत्तीही उपभोगली पण अखेर अध्यात्माचा खरा उद्देश कळला.मासेराती विकणारा मोन्क अशा विशेषणाने ते प्रसिद्ध आहेत.त्याच भागात मला तारा देवीचा  "ॐ तारे तुत्तरे तुरे सोहा" आणि "ओम मणि पद्मे हं" हा बौद्ध धर्मातील सर्वात प्रसिद्ध सहा अक्षरी मंत्र,विशेषतः अवलोकितेश्वर बोधिसत्वयाच्याशी संबंधित आहे.यांची दिक्षा मिळाली .मी सकाळच्या कामात जेव्हा आठवेल तेव्हा हे मंत्र यु ट्यूबवरलावायचे.इतकीच बौद्ध देवतांची ओळख होती.

सह्याद्री ट्रेकर्स सामाजिक संस्थेचे वर्षभरातले शैव दृश्य संस्कृती,वैष्णव दृश्य संस्कृती,हिंदू लेणी स्थापत्य असे ऑनलाइन अभ्यासक्रम आवडीखातर केले आहेत.यावेळी त्यांनी बौद्ध मूर्तिशास्त्र हा अतिशय कमी शिकवला जाणारा विषय आयोजित केला होता. मी प्रवेश घेतला होता. 

या अभ्यासक्रमात हीनयान (थेरवाद) आणि महायान या दोन्ही बौद्ध मूर्तीशास्त्रातील फरक समजला.

सुरुवातीच्या काळात बुद्धाची मानवी रूपात मूर्ती बनवली जात नव्हती.खर म्हणजे बुद्धानी स्वतः त्याची कोणतेही मूर्तीपूजा होऊ नये असे सांगितले होते .परंतु बुद्धांनंतर ४००-५०० वर्षांनंतर अनुयायींना त्यांच्या प्रतीकांची गरज वाटली.

तेव्हा प्रारंभी बुद्धाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बुद्धपाद,धर्मचक्र, बोधीवृक्ष, स्तूप यांसारखी प्रतीके वापरली गेली. बुद्धाला महापुरुष,शिक्षक मानले गेले ,देव नाही.

त्रिरत्न-ज्यामध्ये बुद्ध हे गुरू,धम्म शिक्षण आणि संघ समुदाय यांचा समावेश होतो.

बुद्ध अवशेषांच्या कास्केट ज्यामध्ये बुद्ध किंवा बौद्ध भिक्षूंचे शारीरिक अवशेष हाडे, राख, केस किंवा वैयक्तिक वस्तू ठेवल्या जातात .ज्या स्तुपांमध्ये पूजेसाठी ठेवल्या जातात.







पुढे महायानमध्ये बुद्धाला देव मानून त्यांची मानवी रूपात भव्य मूर्ती बनवली गेली.

तथागत -पाच बुद्ध म्हणजे एकाच पूर्ण बुद्धत्वाच्या पाच वेगवेगळी रूपे आहेत. प्रत्येक बुद्ध एका विशिष्ट दोषाचे रूपांतर करून ज्ञानात बदलतो. ते मंडळात नेहमी एकत्र दिसतात – मध्यभागी वैरोचन आणि चार दिशांना चार बुद्ध.अक्षोभ्य, अमिताभ, अमोघसिद्धी, रत्नसंभव आणि वैरोचन हे पाच बुद्ध आहेत. ... बौद्ध धर्मात, तीन रत्ने म्हणजे बुद्ध, धर्म आणि संघ आणि रत्नसंभव हे बुद्ध देणारे मानले जातात.




बोधिसत्त्वचा समावेश त्यानंतर होतो.'बोधी' म्हणजे ज्ञान + 'सत्त्व' म्हणजे जीव = ज्ञानी जीव. बोधिसत्व म्हणजे निर्माण होणारा बुद्ध, जो आपल्या सहकाऱ्यांचे दुःख कमी करण्यासाठी निर्वाण प्राप्ती पुढे ढकलतो.यातही विविध रुपांचा एक क्रम आहे. जो नीटसा समजाला नाही.  

बोधिसत्व विविध आहेत पण त्यातील काही प्रसिद्ध आहेत .

अवलोकितेश्वर - हातात कमळ, जपमाळ, खूप हात असलेले रूप

मंजुश्री -उजव्या हातात त्रिशूळासारखा खड्ग , डाव्या हातात प्रज्ञापारमिता ग्रंथ

वज्रपाणी - वज्र धारण केलेला, रक्षक रूप

क्षितिगर्भ -नरकातील प्राण्यांना सोडवणारा

समंतभद्र -घोड्यावर बसलेला





इतर परंपरांनुसार शक्ती /स्त्री बौद्धदेवताहीची प्रचलित झाल्या .

तारा देवी- "सर्व बुद्धांची आई" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, त्या करुणा, ज्ञान आणि "आठ महान भयांपासून" संरक्षणाचे प्रतीक आहेत.

सर्वात लोकप्रिय "हिरवी तारा -संरक्षण" आणि "पांढरी तारा-उपचार" आहे.


इतर प्रमुख बौद्ध देवी 

महामायुरी-या संस्कृत नावाचा अर्थ 'महान मोरणी' असा होतो.जी 'गुप्त विज्ञानांची राणी आहे.

प्रज्ञापारमिता- सर्व बुद्धांची आई, ज्ञानाच्या परिपूर्णतेचे प्रतीक.

मारिची- पहाट, प्रकाश आणि सूर्याची देवी, बहुतेकदा संरक्षणाशी संबंधित.

भृकुटी -बहुतेकदा ती क्रोधाने संरक्षणाशी संबंधित असते.

जांगुली- साप चावणे आणि आजार बरे करण्यात विशेषज्ञ असलेली देवी.

हरिती- जिचे आधीचे काम मुले पळवून नेणाऱ्या राक्षसी म्हणून झाला होता जिला बुद्धाने संरक्षक देवतेत रूपांतरित केले.हरितीला अनेकदा मुलांभोवती किंवा मुलांना धरून ठेवणारी एक सुंदर स्त्री म्हणून चित्रित केले जाते.ती डाळिंबाशी संबंधित आहे, जी तिला मुलांऐवजी खाण्यास शिकवली जात असे.



काही बौद्धदेवता अष्टभयापासून संरक्षण करतात,जे बौद्ध ग्रंथांत सांगितले आहेत.सिंह, हत्ती ,अग्नि, सर्प, चोर, जल, राक्षस, राज यांच्यापासून भयमुक्ती देतो.

मी काही अभ्यासक नाही हे माझं या विषयीचे अल्प आकलन आहे.

परंतु सह्याद्री ट्रेकर्स सामाजिक संस्था विविध विषयातील तज्ञाचे असे अभ्यासक्रम आयोजित करत असते ,ज्याचा मीही ज्ञानवृद्धीसाठी फायदा घेत असते.

कायप्पा संपर्क - डॉ.सुदर्शन बैरागी - 


-भक्ती 

Wednesday, January 28, 2026

"प्राइड अँड प्रेज्युडिस"




अनेकदा 'फील गुड मुव्ही' असं लिहुन सिनेमे शोधून पाहावे.नितांत सुंदर मनाचं तळ शांत होणारे काही सिनेमे हाती लागतात.

 "प्राइड अँड प्रेज्युडिस" १८०० च्या शतकात इंग्लंडमधली प्रतिभावंत लोकप्रिय लेखिका जेन ऑस्टेनची सर्वात लोकप्रिय कादंबरी आहे.त्या काळात स्त्री लेखिका दुर्मिळच त्यामुळे तिच्या पुस्तकांवर  "लेडी रायटर " असे लिहिले जात.तिने Sense and Sensibility ,Pride and Prejudice ,Mansfield Park ,Emma ,Northanger Abbey ,Persuasion अशा वेगळ्या धाटणीच्या अनेक कादंबरी लिहिल्या.पण सर्वात जास्त लोकप्रिय ठरली ती "प्राइड अँड प्रेज्युडिस"!!

पुस्तकांमधून, चित्रपटांमधून आणि टीव्ही रूपांतरांमधून पुन्हा पुन्हा सांगितली आणि नव्याने सादर केली गेली आहे.तिने अनेक नवीन कथानकांना प्रेरणा दिली आहे. तिच्या नायिका फेमिनीसम आणि प्रेम यांचे अद्भुत मिश्रण असत."प्राइड अँड प्रेज्युडिस" ही  एका क्लासिक थीमची सुरुवात मानली जाते. ज्यात सुरुवातीला दोघे नायक नायिका एकमेकांचा तिरस्कार करतात असे वाटते, पण शेवटी ते चक्क एकमेकांच्या आकंठ प्रेमात पडलेले असतात.जो राईट २००५ मधील हा सिनेमा ऑस्करसाठी चार नामांकनाचा मानकरी ठरला.यासाठीचे श्रेय यातले कलाकार (पैकी नायिकालाही उत्कृष्ट नायिकेचे नामांकन होते),सिनेमाटोग्राफी,पोशाख यांना तर होतेच.परंतु याची मोठी शिलेदार होती पटकथालेखिका डेबोरा मोग्गाच यांनी पटकथेवर दोन वर्षांहून अधिक काळ घालवला.

 १९व्या शतकाच्या सुरुवातीच्या इंग्लंडमध्ये घडते. नायिका एलिझाबेथ बेनेट,स्वतंत्र विचारांची आणि थोडी जिद्दी मुलगी आहे. तिला कुटुंबात ५ बहिणी आहेत.   आईची एकच इच्छा असते की सर्व मुलींचे लग्न लवकरात लवकर श्रीमंत आणि चांगल्या घराण्यातील पुरुषांशी व्हावे.मिस्टर बिंगले आणि जेन बेनेट यांच्या प्रेमाची ,लग्नाची गोष्ट पुढे सरकत असतानाच त्यांचा मित्र मिस्टर डार्सी एक अतिशय श्रीमंत पण अहंकारी वाटणारा माणूस कथेचा एक प्रमुख पात्र होतो. एलिझाबेथ आणि डार्सीची पहिली भेट होते.पण डार्सीच्या अभिमानी 'वागणुकीमुळे' pride आणि एलिझाबेथच्या पूर्वग्रहांमुळे 'prejudice' त्यांच्यात गैरसमज निर्माण होतात.पुढे कथेत अनेक मजेशीर,काही गंभीर,हृदयस्पर्शी घटना होतात.शेवटी दोघेही आपल्या चुका ओळखतात, गैरसमज दूर होतात आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडतात.

या कथेमध्ये तेव्हाच्या स्त्रियांनाही 'लग्न ' योग्य वयात व्हायला समस्या असत हे पाहून आश्चर्य वाटले.अनेक स्त्रियांच्या लग्नाची ही कथा अनेक सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधते. त्यातही नायिका  एलिझाबेथ हिची हिम्मत ,स्पष्टवक्तेपणा ,सहजता तरीही वागण्यातली शिष्टचारता मंत्रमुग्ध करते . एलिझाबेथला समजले नसले तरी डार्सी हा तिच्यासाठी खूप खूप योग्य आहे हे चाणाक्ष प्रेक्षकांना नक्कीच संमजते.आणि आता तो कसा तिचा गैरसमज कसा कुठवर दूर करणार याची उत्सुकता असते.

"You must allow me to tell you how ardently I admire and love you" ते "You have bewitched me, body and soul" असा डार्सीचा झालेला प्रेमळ बदल फार रोमँटिक आहे.

लिझी शेवटी जेव्हा वडिलांना सांगते ,"I do love him. I love him very much. Indeed he has no improper pride. He is perfectly amiable. You do not know what he really is."

 तेव्हा वडील आनंदून म्हणतात ,"I could not have parted with you, my Lizzy, to any one less worthy."

ते तिला मान्यता देतात आणि आनंदमिश्रित खूप खूप सुहास्य करतात.सिनेमा संपतो पण आपल्याही मुखावर सहज सुहास्य उमलते.

-भक्ती 


Tuesday, January 27, 2026

"मंतरलेले बेट" -व्यंकटेश माडगूळकर



 "मंतरलेले बेट" हे व्यंकटेश माडगूळकरांनी अनुवादित केलेले एक अतिशय सुंदर आणि वेगळे पुस्तक आहे. मूळ इंग्रजी नाव "Big City, Little Boy" आणि लेखक Manuel Komroff. हे पुस्तक १९५३ मध्ये प्रकाशित झाले असून, ते लेखकाच्या स्वतःच्या बालपणावर आधारित आहे .१८९८ ते १९०० च्या आसपासच्या न्यूयॉर्क शहरातील मॅनहॅटन बेटावरचे जीवन.

पुस्तकाची सुरुवातच खूप जादुई आहे. नायक असलेला लहान मुलगा म्हणतो, "जन्माला यावे ते एखाद्या रम्य बेटावर. हे भाग्य मला लाभले. न्यूयॉर्कमधल्या मॅनहॅटन या रम्य बेटावर माझा जन्म झाला. मॅनहॅटन म्हणजे एक लहानसे जगच होते." त्याला हे बेट "मंतरलेले" वाटते ,कारण ते त्याच्यासाठी जादुई, छोटे, स्वतंत्र आणि भरपूर आश्चर्यांनी भरलेले आहे. पहिल्या चार-पाच वर्षांच्या आयुष्यात तो शहरात मोकळेपणाने भटकतो, रस्ते, इमारती, लोक, दुकाने, पार्क हे सर्व त्याच्या बालक नजरेतून जिवंत होतात.

तेव्हा अमेरिका आणि क्युबा यांच्यात तणाव होता, स्पॅनिश-अमेरिकन युद्धाची धमकी होती. लहान मुलगा सैनिक होण्याची स्वप्ने पाहतो, तशी इटुकली पिटुकली मित्रांबरोबर तयारी करतो .हे सगळे त्याच्या बालसुलभ उत्सुकतेने आणि गमतीने वर्णन केले आहे. शहरात अनेक इमिग्रंट्स राहतात .वेगवेगळ्या देशांतील लोक, त्यांच्या संस्कृती, भाषा, खाद्यपदार्थ, व्यवसाय, एकमेकांशी तालमेल हे सगळे मुलाच्या डोळ्यातून खूप रोचक दिसते. ते "मेल्टिंग पॉट" सारखे आहे, जिथे सगळे एकत्र येऊन नवीन अमेरिकन जीवन बनवतात.

१९०० साल सुरू झाल्यावर विज्ञान आणि वैद्यकीय प्रगतीमुळे जीव वाचवले जाण्याचे अनुभव येतात. मुलाला हे आश्चर्य वाटते. नंतर तो न्यूयॉर्क जवळच्या खेड्यात -Countryside जातो (मला लहानपणापासून Countryside शब्द फार आवडतो.) तिथे पहिल्यांदा दूध काढणे पाहतो, कुत्र्याशी मैत्री होते, निसर्ग आणि ग्रामीण जीवन त्याला नवीन जग दाखवते. शहर आणि खेडे यांच्यातील फरक त्याच्या मनात रुजतो.

मोठा होताना तो विचार करतो .जीवनात काय करावे? धावपटू व्हावे की नाटकात काम करावे, की दुसरे काही? अनेक वाटा धुंडाळतो. शेवटी अब्राहम लिंकनवर एक लेख लिहितो, तो न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध होतो आणि पदक मिळते. तेव्हा त्याला खात्री होते , "आपण लेखक व्हायचे!" आणि तिथूनच त्याचे लेखनकार्य सुरू होते.

हे पुस्तक लहान मुलांसाठी तर नक्कीच वाचण्यासारखे आहे .भाषा सोपी, उत्सुकता कायम ठेवणारी, आणि शहर,देश,संस्कृती यांची ओळख करून देणारी. पण मोठ्यांनाही आवडते, कारण २०व्या शतकाच्या सुरुवातीचे न्यूयॉर्कचे जिवंत चित्रण आहे. व्यंकटेश माडगूळकरांच्या मराठी अनुवादामुळे ते मराठी वाचकांना खूप जवळचे वाटते .जणू आपल्याच भाषेत न्यूयॉर्क फिरत आहोत!

न्यूयॉर्क करून आठवले, असाच न्यूयॉर्क जवळच्या 'स्टेटन आयलंडचा' 'नानास' सिनेमा मी पाहिला होता.तेव्हापासून इथल्या मंतरलेल्या बेटांच्या  मोहात आहे...आता ब्रूकलिन, क्वीन्स या बेटांवर आधारित खुसखुशीत पुस्तक किंवा सिनेमा पाहायचा ,शोधायचा आहे.

-भक्ती 





Saturday, January 24, 2026

महामाया निळावंती (लेखक-सुमेध)

 महामाया निळावंती 

लेखक-सुमेध



दोन वर्षांत  २५ वी आवृत्ती प्रकाशित झालेली ही मराठी साहित्यातील आताची उत्कृष्ट कादंबरी आहे.

जीवनाची लालसा मृत्यूला हरवायला पाहते. जीवनदेवी महामाया निळावंती सतत सूचवत असते,

"गेलेल्याला आपल्या ठिकाणी जाऊ द्यावे,तुझ्यामध्ये विश्व आहे, त्याचा शोध घे!"

सह्याद्रीच्या घनदाट जंगलातून उगवलेली एक प्राचीन दंतकथा, रहस्यमयी निळावंतीची कथा, आजच्या काळात पुन्हा जिवंत होते. चारशे वर्षांपूर्वी निळावंती ही एक रहस्यमयी स्त्री होती .ती पशु-पक्ष्यांची, झाडांची, निसर्गातील मूक चेतनांची भाषा जाणत होती. तिच्याकडे मृत्यूला आव्हान देण्याची, प्राण फुंकण्याची कला होती.काळाच्या अनंत चक्रात निळावंती पुन्हा पुन्हा जागी होते.काळपुरुषाचा अवतार हा निळावंतीचा साथीदार हाही पृथ्वीच्या जन्मापासून तिचा शोधक आहे. काळाच्या अनंत उलथापालथीनंतर माणूस स्वार्थी-आत्मकेंद्रित होत गेला. 

निळावंतीशी निगडित एक प्राचीन पोथी आहे, जी जीवन-मृत्यूच्या सीमारेषेवर खेळते. आधुनिक काळात एक बाप आपल्या वैयक्तिक दु:खातून या पोथीचा शोध घेत सह्याद्रीत येतो, आणि तिथून कथा उलगडू लागते.कादंबरीत अनेक रहस्य एकात एक गुंफलेले आहेत. विक्रम, बाजिंदा, हेलबर्ग यांच्या रूपाने निळावंतीची प्राणप्रतिष्ठा करण्याची कला त्या स्वार्थी माणसाला आपल्या कडे पाहिजे. तेव्हा निळावंतीचा भाबडा जीव, मूक प्राणीमात्रांचे अस्तित्व याचा त्याला सतत विसर पडत राहतो.निळावंती मात्र निसर्गाशी एकरूप असते, ती मायाजाळ सहज पार करते, प्राण फुंकते, पण स्वार्थी मनाच्या काळ्या बाजू तिला पूर्णपणे समजत नाहीत आणि शेवटपर्यंत दगाफटका होत राहतो.

लेखक सुमेध यांनी अठरा पौराणिक पोथ्या, ऐतिहासिक दस्तऐवज आणि तांत्रिक आख्यायिकांचा अभ्यास करून ही मेटाफिक्शन कादंबरी निर्माण केली आहे. वाचकांना खिळवून ठेवते आणि वाचून झाल्यावरही विचार करायला लावते.

आणि हो, त्या ताम्हण फुलाच्या गूढाबद्दल तर खूप चर्चा झाली होती! काही आवृत्त्यांमध्ये वाचकांसाठी ताम्हण फुलांच्या बिया दिल्या होत्या.कोणाकोणाला मिळाल्या ताम्हण फुलांच्या बिया ?? कोणाकोणाचे त्या बिया रुजल्या?

लेखकाच्या हस्ते हस्ताक्षरीत अशी प्रत मिळालेली मी एक भाग्यवान वाचक आहे!

-भक्ती 




Thursday, January 22, 2026

पक्षी रूपके

 #पक्षी_रूपके 



पक्षिणी प्रभाती चारियासी जाये ।

पिलुवाट पाहे उपवासी ॥

तैसे माझे मन धरी वो तुझी आस ।

चरण रात्रंदिवस चिंतीतसे ॥२॥

तान्हे वत्स घरी बांधलेसे देवा ।

तया हृदयी धावा माउलीचा ॥३॥

नामा म्हणे केशवा तु माझा सोईरा ।


इवलाश्या पक्ष्यांचे दाणे टिपयाची सकाळची लगबग रोज पाहते हे दाणे टिपून त्यांना पिल्लाना भरवायचे असते.संतांनी यात रूपक शोधलं .मराठी संतांची निसर्गातील घटना रूपक म्हणून वापरायची प्रतिभा अभंग ओव्या वाचताना एका प्रतिसृष्टीत डोकवायचा आनंद देतात.या अभंगात ईश्वराच्या मातृत्वपूर्ण कृपेचे प्रतीक आहे. जसे आई पक्षी आपल्या पिल्लांसाठी दाणे आणते आणि ते उपाशी राहून वाट पाहतात तरी आई येऊन पोसते, तसे भक्त विरहात असला तरी विठ्ठल त्याच्याकडे धावतो.


 आणि हे दाणे संचय करणे हे पक्षांत नाही ते रोजच्या रोज येणार दाणे टिपणारी ...हवे तेव्हडेच मग अजून रूपक यावर आहे ,

पक्षी अजगर न करी संचित ।

तयासी अनंत प्रतिपाळी ॥२॥

तुका म्हणे तया भार घातलिया ।

उपेक्षीना दयासिंधु माझा ॥३॥

निसर्गातील प्राणी -पक्षी, अजगर, बेडूक हे उदाहरण देत तुकोबा सांगतात की, जो संचित करत नाही, त्यालाही ईश्वर पोसतो. भक्तानेही प्रपंच करावा, पण त्यात गुंतून जाऊ नये..सर्व ईश्वरावर सोपवावे.


पक्ष्यांचे हि वागणूक इसापनीतीतही रूपकाने कथांमध्ये गुंफली गेली.चतुर कावळा कथा तर प्रसिद्धच आहे .


असाच एक चतुर कावळा मला रविवारी भेटला.एक कावळा इतका काव काव करत होता. तब्बल १५ मिनिटे न थांबता तो काव काव करत होता ..काय आज पाहुणे येणार का ? वगैरे विचार झाले .पण हा आपला काव काव करीत होता .मग लक्षात आलं कठड्यावर उरलेली खिचडी ठेवली होती. याला ती पाहिजे तो मला काव काव संदेश देऊन तिथून उठायला सांगतोय .मी हळूच उठून दूर गेले .तर पटदिशी आला आणि खिचडी खात बसला.एक मोठा घास घेऊन उडून गेला .खरंच कावळा किती हुशार त्या दिवशी पटले.


त्याच्या काव काव ने मला ज्ञानेश्वर माउलींचा अभंग/विरहिणी आठवली .भक्ताची विठ्ठलभेटीची तळमळ इतकी तीव्र आहे की साधा कावळा ओरडला तरी तो शुभशकुन वाटतो. कावळ्याला प्रेमाने, सन्मानाने बोलावले जाते ,जसे आई मुलाला बोलावते


पैल तो गे काऊ कोकताहे ।

शकुन गे माये सांगताहे ॥१॥

उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ ।

पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥

दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी ।

जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ॥३॥

दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी ।

सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥

आंबया डहाळी फळें चुंबी रसाळीं ।

आजिचे रे काळीं शकुन सांगे ॥५॥

ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणें ।

भेटती पंढरीराये शकुन सांगे ॥६॥

-ज्ञानेश्वर महाराज