Wednesday, April 1, 2026

#हंपी_इतिहास_६ ----विजयनगर साम्राज्य आणि हनुमान भक्ती

 #हंपी_इतिहास_६ ----विजयनगर साम्राज्य आणि हनुमान भक्ती

विजयनगर साम्राज्य आणि हनुमान भक्ती यांचा संबंध खूप गहन आणि रोचक आहे. विजयनगर साम्राज्य (१३३६ ते १५६५) हे दक्षिण भारतातील एक शक्तिशाली हिंदू साम्राज्य होते, ज्याने इस्लामी आक्रमणांविरुद्ध हिंदू संस्कृतीचे रक्षण केले. या साम्राज्यात हनुमानजींची भक्ती ही केवळ धार्मिक नव्हती, तर राजकीय, सैन्यिक आणि सामाजिक महत्त्वाची होती.





हंपि अंजनाद्री पर्वत (अंजनेयाद्री बेट्टा किंवा अंजनी पर्वत) 







हंपी जवळ अनेगुंडी भागात, तुंगभद्रा नदीच्या काठी हा पर्वत आहे.रामायण काळातील किष्किंधा -वानर राज्य चा भाग मानला जातो.हनुमानजींचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. हनुमानजींच्या आईचे नाव अंजना देवी, म्हणून या पर्वताला अंजनाद्री म्हणतात. खालून शिखरापर्यंत ५७५ पायऱ्या चढाव्या लागतात. साधारण ३०-४५ मिनिटे लागतात.चढाई थोडी कठीण आहे, पण जय बजरंगबली म्हणत चढताना खूप आनंद येतो. वरून तुंगभद्रा नदी, हंपीचे खडकाळ लँडस्केप, विजयनगर साम्राज्याचे अवशेष आणि दूरवरचा विहंगम दृष्य अफलातून दिसतो.तुम्ही दोन दिवस अख्ख दक्षिण हंपी पालथं घातलेले असते.त्यामुळे अंजनाद्री पर्वताहून दूरवर दिसणारे दक्षिण हंपीतले मंदिर शोधायला मजा येते .वळण वळण घेऊन येणारी पंपा नदी ,मधेच चंद्रकोरीसारखं वळण घेते.तिथे दूर विजय विठ्ठल मंदिर आणि रथ पाहायचा .चक्रतीर्थ वरचे ते खडक,विरुपाक्ष पहायला मंदिरापासून थोडं दूर दक्षिणेकडे यायचं.

वरून दिसते की, हजारो-लाखो वर्षांपूर्वी देवांनी खेळल्यासारखे मोठे-मोठे गोलाकार, अनियमित खडक सर्वत्र पसरलेले आहेत. काही खडक इतके मोठे की, त्यावर संपूर्ण मंदिरे बांधली गेली होती! हे खडक लाल-तांबड्या रंगाचे, सूर्यप्रकाशात सोनेरी दिसतात.

खडकांमधील खोऱ्यात आणि नदीकाठी भातशेती हिरवीगार दिसतात.जणू हिरव्या पट्ट्यांचा जिगसॉ पझल! त्यामध्ये नारळी वृक्ष रांगेत उभे आहेत. हे हिरवे पट्टे खडकाळ भागात खूप स्पष्ट दिसतात .

रामाच्या वनवासादरम्यान, हनुमान किष्किंधेत (उत्तर हंपी ) त्यांना भेटला आणि त्यांना आपला शाश्वत स्वामी म्हणून ओळखले . रामासोबतच्या त्याच्या पहिल्याच भेटीतून भक्ती, नम्रता आणि सेवेची आजीवन शपथ घेतली गेली .

संदेश पोहोचवण्यापासून ते समुद्र ओलांडण्यापर्यंत , लंकेला आग लावण्यापासून ते संजीवनी आणण्यापर्यंत , हनुमानाने निस्वार्थपणे सेवा केली .



हंपीतील यंत्रोद्धारक हनुमान मंदिर 



श्री व्यासराज (१४४७–१५३९) हे विजयनगर साम्राज्याचे राजगुरू होते. ते कृष्णदेवराय यांचे गुरू होते. ते चार राजांच्या काळात राजगुरू म्हणून राहिले.

ते द्वैत दर्शनाचे महान विद्वान होते आणि पुरंदरदास, कनकदास यांचे गुरूही होते.

हनुमान भक्तीचा प्रसार: व्यासराज यांनी ७३२ हनुमान मूर्ती दक्षिण भारतात  स्थापित केल्या. यातील बहुतेक वीर हनुमान (वीर मुद्रेत) होत्या.

व्यासराज यांनी ७३२ जैन विद्वानांना शास्त्रार्थात हरवले आणि प्रत्येक विजयानंतर एक हनुमान मूर्ती स्थापित केली.राज्यात हिंदू धर्माचे रक्षण आणि लोकांच्या मनोबल वाढवण्यासाठी वीर हनुमान पूजेला प्रोत्साहन दिले.

हंपीत यंत्रोद्धारक हनुमान मंदिर चक्रतीर्थ जवळ हे व्यासराज यांनी स्थापित केले.यामागची कथा अशी कि,व्यासराज रोज खडकावर कोळशाने हनुमानजींचे चित्र काढायचे, पण ते नाहीसे व्हायचे. १२ दिवसांनी हनुमानजी प्रकट झाले आणि षट्कोण यंत्र मध्ये स्वतःला बांधून (यंत्रोद्धारक) स्थापित करण्यास सांगितले.

ही मूर्ती पद्मासन या योग मुद्रेत बसलेल्या अवस्थेत आहे .


माधवरंग मंदिरातील विशाल हनुमान मूर्ती ...

लोटस महलजवळ माधव मंदिर, ज्याला रंग मंदिर असेही म्हणतात  मंदिर आहे. मुख्य गर्भगृहाच्या दरवाजाबाहेर, हनुमानाची एक विशाल मूर्ती आहे.जी मोनोलिथिक म्हणजे एकाच दगडात कोरली असून तीन मीटर इतकी उणचं आहे ..ज्यात त्याचा उजवा हात वर उचललेला, डावी मूठ (जी खराब झालेली आहे) मांडीवर आणि कमानदार शेपूट डोक्यावर आहे. त्याच्या कमरेला खंजीर असलेला एक पट्टा आहे .जे विजयनगरच्या अधिकृत चिन्हांपैकी एक आहे. हनुमानाच्या खाली एक रांगणारा राक्षस आहे, ज्याला हनुमानाने ठार मारले आहे. हे राक्षसी दुष्टतेचे क्षुद्रत्व आणि हनुमान प्रतीक  चांगुलपणाचे महत्त्व अधोरेखित करतात.यातील हनुमानाच्या गळ्यातील माळा.कंबरेवरचे आणि इतर दागिनेही अतिशय सुबक आहेत.इतका सालंकृत हनुमान खूप वेळ डोळेभरून पाहावा असा आहे .



 इस्लामी आक्रमणांविरुद्ध लढताना हनुमानजींना वीर रक्षणदेवता मानले गेले. हनुमान मूर्ती राज्यभर ठेवून लोकांचे मनोबल वाढवले.

हंपी_इतिहास ४ देवराय पहिला १४०६ ते १४२२/१४२३



 #हंपी #हंपी_इतिहास४ #hampi_history

देवराय पहिला १४०६ ते १४२२/१४२३
देवराय पहिल्याचे प्रेमप्रकरण हे मुख्यतः फेरिश्ता यांच्या वर्णनावर आधारित आहे. हे "War of the Goldsmith's Daughter" म्हणून प्रसिद्ध आहे. ही गोष्ट बहामनी आणि विजयनगर यांच्यातील १४०६-०७ च्या युद्धाचे कारण सांगते.ही कथा फेरिश्ता यांच्या "तारीख-ए-फेरिश्ता" मध्ये आहे. बहामनी दृष्टिकोनातून लिहिलेली असल्याने काही अतिशयोक्ती असू शकते.
काही आधुनिक इतिहासकार ही गोष्ट अपूर्ण सत्य किंवा अतिरंजित मानतात. देवराय हा युद्धप्रिय आणि राज्यविस्तार करणारा राजा होता, त्यामुळे केवळ प्रेमासाठी युद्ध करणे त्याच्या स्वभावाशी जुळत नाही, असे काहीजण सांगतात.
**देवराय पहिला सिंहासनावर आल्यानंतर , एक ब्राह्मण संत काशी यात्रेतून परत आला. त्याने देवरायला मुदगल येथील एका सोनाराच्या मुली बद्दल सांगितले.
मुलीचे नाव पार्थल असे होते.ती अत्यंत सुंदर, गुणी, संगीतात निपुण आणि इतर गुणांनी युक्त होती.देवराय तिच्या वर्णनाने मोहित झाला. त्याने त्या ब्राह्मणाला मुदगलला पाठवले आणि मुलीला विवाहाचा प्रस्ताव दिला.
पार्थलने प्रस्ताव नाकारला कारण त्यावेळची परिस्थिती होती
विजयनगरच्या राजघराण्यातील अलीकडील सिंहासनाच्या संघर्षामुळे (त्याचे भाऊ एकमेकांना मारले गेले होते) तिला भीती वाटली.
राजाच्या राजवाड्यात गेलेल्या मुली कधीही कुटुंबाकडे परत येत नाहीत, अशी अफवा होती.तिने सती प्रथेची भीती व्यक्त केली.त्याऐवजी ती इस्लामिक राजकुमाराशी लग्न करू इच्छित असल्याचे सांगितले.
ब्राह्मण रिकाम्या हाताने परत आला. यामुळे देवरायचा प्रेम वेडा झाला. त्याने मोठ्या सैन्यासह मुदगलवर हल्ला करण्याचे ठरवले.
देवरायने ५००० निवडक घोडदळ घेऊन, “देश दौरा” च्या बहाण्याने निघाला. तुंगभद्रा नदी ओलांडून तो मुदगल जवळ पोहोचला.
त्याने आपल्या सैन्याला रात्री-दिवस वेगाने जाऊन मुदगल गाव घेरण्याचे आणि पार्थलला तिच्या संपूर्ण कुटुंबासह बंधक बनवून आणण्याचे आदेश दिले. मित्रांनी विरोध केला तरी त्याने ऐकले नाही.
देवरायने ब्राह्मणाला पार्थलच्या कुटुंबाला पूर्वसूचना देण्यासाठी पाठवले नव्हते.विजयनगर सैन्य येत असल्याची बातमी मुदगलला पोहोचताच गावकरी पळून गेले. पार्थल आणि तिचे कुटुंबही पळाले.सैन्य रिकाम्या गावात आले. रागात त्यांनी आसपासचे प्रदेश लुटले आणि नष्ट केले.
बहामनी फौज फौलाद खानच्या नेतृत्वात देवरायच्या विरोधात आल्यावर विजयनगरच्या सैन्यावर हल्ला केला. यात विजयनगरचे २००० सैनिक मारले गेले.
***बहामनी गव्हर्नर फौलाद खान याने देवरायच्या सैन्याला पराभूत केले.यामुळे बहामनी सुलतान फिरोज शाह स्वतः मोठ्या फौजेसह आला.
देवराय पहिला या युद्धात पराभूत झाला.शांतता करारात देवरायला मोठी खंडणी द्यावी लागली.
बंकापूर किल्ला आणि प्रदेशद्यावा लागला आपल्या एक मुलीचे लग्न फिरोज शाहच्या मुलाशी करावे लागले .
५० हत्ती, मोती, पैसा आणि २००० नर्तकी-गायिका इ.द्यावे लागले.
पार्थल हीने फिरोज शाहच्या कुटुंबातील हसन खान यांच्याशी लग्न केली.
या युद्धानंतर देवरायने आपली सेना सुधारली तुर्की धनुर्धारी, अरेबियन घोडे यांचा समावेश केला आणि नंतर पंगळ युद्धात फिरोज शाहला पराभूत केले.
***पंगळ युद्धाची रणनीती (सुमारे १४१८-१४२० ई.) हे युद्ध बहामनी सुलतान फिरोज शाह यांनी सुरू केले होते, पण शेवटी देवराय पहिला यांच्या रणनीतीने विजयनगरला निर्णायक विजय मिळवून दिला.
पंगळ किल्ला (आजच्या तेलंगणा/नालगोंडा भागात) जिंकणे. हा किल्ला रेचरला नायक किंवा विजयनगरच्या प्रभावाखाली होता. त्यावर नियंत्रण मिळवल्याने बहामनी साम्राज्य दक्षिणेकडे विस्तारित होऊ शकले असते.
मोठ्या फौजेसह पंगळ किल्ल्याचा दोन वर्षांचा वेढा घातला.किल्ल्याभोवती छावणी टाकली, पुरवठा मार्ग तोडण्याचा प्रयत्न केला.किल्ला जिंकण्यासाठी सतत हल्ले आणि दबाव टाकला.
वेढा खूप लांबला म्हणजे २ वर्षे लांबला. यामुळे बहामनी सैन्यात दुष्काळ, उपासमार आणि रोगराई पसरली. सैन्य कमकुवत आणि थकले.
देवरायने सुरुवातीला थेट सामना टाळला आणि संधीची वाट पाहिली. पूर्वीच्या पराभवानंतर त्याने तुर्की धनुर्धारी , अरेबियन आणि पर्शियन घोडे आणून घोडदळ आणि तोफखाना सुधारला होता. युद्धाच्या वेळी नवीन, ताज्या फौजा गोळा केल्या.वेलमा सरदार आणि इतर हिंदू सरदारांची मदत घेतली. यामुळे अतिरिक्त सैन्य आणि स्थानिक पाठिंबा मिळाला.
बहामनी सैन्य वेढ्यात व्यस्त असताना देवरायने बहामनी छावणीला बाहेरून घेरले.विजयनगरची मुख्य फौज आल्यावर दोन बाजूंनी हल्ला केला.
जेव्हा बहामनी सैन्य कमकुवत आणि रोगाने ग्रस्त झाले, तेव्हा पंगळ किल्ल्यातील विजयनगर/नायकांच्या सैन्याने बाहेर पडून शत्रूच्या छावणीवर हल्ला केला.
यामुळे बहामनी फौज दोन आगीत सापडली एकीकडे देवरायची बाहेरची फौज, दुसरीकडे किल्ल्यातून येणारा हल्ला.
बहामनी सैन्याची संपूर्ण हानी झाली. हजारो सैनिक मारले गेले. फिरोज शाह पळून गेला. काही वर्णनांनुसार विजयनगर सैन्याने शत्रूच्या डोक्यांचा मोठा ढीग उभारला.विजयनगरची फौज फिरोज शाहच्या प्रदेशात घुसली, अनेक गावे, मशीदी नष्ट केल्या आणि मुस्लिम नागरिकांवर मोठा हल्ला केला.
***फिरोज शाहला शांतता मागावी लागली.
त्याने दक्षिणी आणि पूर्वीचे जिल्हे मुख्यतः गुलबर्गा आणि बीजापूरच्या दक्षिणेकडील भाग देवरायला सोडून द्यावे लागले.
१४२२ पर्यंत देवराय पहिल्याने कृष्णा-तुंगभद्रा दोआब संपूर्ण नियंत्रणात आणले, ज्यात पंगळ किल्ला समाविष्ट होता.
या पराभवानंतर फिरोज शाह खूप निराश झाला. त्याने सिंहासन आपल्या भावाला अहमद शाहला सोपवले आणि स्वतः धार्मिक जीवन जगत मरण पावला.
हे युद्ध देवराय पहिल्याच्या कारकीर्दीतील सर्वात मोठे यश मानले जाते. यामुळे विजयनगर साम्राज्य दक्षिण भारतात पुन्हा मजबूत झाले.
***वारंगल चे विभाजन आणि संधी
वारंगलच्या वेलमा राजघराण्यात आंतरिक भांडण झाले.देवरायने याचा फायदा घेत वारंगलशी युती करून रेड्डी राज्याचे विभाजन केले.
यामुळे दख्खनमध्ये सत्ता संतुलन बदलले आणि विजयनगरला फायदा झाला.
***गोलकोंडा आणि तेलंगणा भागातील वेलमा सरदारयांच्याशी सतत छोटे-मोठे युद्धे आणि छापे चालू होते.
देवराय पहिल्याने वेलमांना अनेक वेळा पराभूत केले किंवा त्यांच्याशी युती केली.
हे संघर्ष मुख्यतः तुंगभद्रा-कृष्णा सीमेवर आणि तेलंगणा भागात होते.
***गजपती यांच्याशी तणाव (ओडिशा/कलिंग)
पंगळ युद्धानंतर बहामनी कमकुवत झाल्याने गजपती भानुदेव याने राजमहेन्द्री भागावर हल्ला केला.यामुळे युद्ध होण्याची शक्यता निर्माण झाली.
पण विजयनगरच्या डोड्डा अल्ला या कुशल मंत्री यांच्या डिप्लोमसीने युद्ध टळले. समझोता झाला आणि गजपती मागे हटले.म्हणजे प्रत्यक्ष मोठी लढाई झाली नाही, फक्त सीमेवर तणाव होता.
देवराय पहिला यांचा मृत्यू २५ फेब्रुवारी १४२३ रोजी झाला.
१. रामचंद्र राय (Ramachandra Raya)
देवराय पहिल्याचा मुलगा.
सिंहासनावर १४२२/१४२३ मध्ये आला.
त्याचा कारकीर्द फार छोटा होता .काही महिने किंवा ६-७ महिन्यांपर्यंत.
त्याच्या काळात कोणतेही विशेष युद्ध, विकास किंवा घटना घडली नाही. तो कमकुवत राजा मानला जातो.
२. वीर विजय बुक्का राय / विजय राय
देवराय पहिल्याचा दुसरा मुलगा (रामचंद्र रायचा भाऊ).
रामचंद्र रायनंतर लगेचच १४२२-१४२४ पर्यंत सिंहासनावर आला.त्याचाही कारकीर्द खूप छोटा (१-२ वर्षे) आणि कमकुवत होता.त्याच्या काळातही साम्राज्य स्थिर राहिले नाही. कोणतीही मोठी कामगिरी नोंदवली गेली नाही.
***३. देवराय दुसरा
देवराय पहिल्याचा मुलगा वा वारस होता.जो १४२४ ई. मध्ये सिंहासनावर आला. कारकीर्द १४२४ ते १४४६ ई. पर्यंत होती.
तो संगम वंशातील सर्वात महान राजा मानला जातो. त्याने बहामनी सुलतानांविरुद्ध अनेक यशस्वी युद्धे केली, सेना सुधारली जसे मुस्लिम धनुर्धारी नेमले, साम्राज्य विस्तारले आणि कन्नड साहित्य व वास्तुकलेचा पुरस्कार केला.त्याला गजबेटेकर ही उपाधी मिळाली.


Sunday, March 29, 2026

#हंपी_इतिहास_३ हरिहर दुसरा (१३७७ ते १४०४)

 #हंपी५ #हंपी_इतिहास_३ #hampi_history 



**अडोनीचा वेढा (इ.स. १३७५–१३७८)

बहामनी साम्राज्याच्या मुहम्मद शाह प्रथमने इ.स. १३५८ ते १३७५ या काळात राज्य केले.त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा मुजाहिद गादीवर आला.त्याने सत्तेवर येताच विजयनगरचा राजा बुक्का राय प्रथम याला 'बंकापूर'चा किल्ला आणि रायचूर दोआबमधील काही प्रदेश सोडून देण्याची मागणी केली. बुक्का रायांनी ही मागणी हास्यास्पद ठरवून फेटाळली, ज्यामुळे युद्धाला तोंड फुटले. 

मुजाहिदने प्रचंड सैन्यासह विजयनगरवर चाल केली. बुक्का रायांनी समोरासमोर लढण्याऐवजी राजधानी सोडून जंगलात आश्रय घेतला आणि गनिमी काव्याने  लढायला सुरुवात केली.सुलतान मुजाहिदने सुमारे ६ महिने बुक्का रायांचा जंगलात पाठलाग केला, पण त्याला यश आले नाही. सरतेशेवटी, बुक्का राय आपल्या राजधानीत परतले आणि स्वतःला किल्ल्यात बंदिस्त करून घेतले. 

मुजाहिदने विजयनगरच्या बाह्य तटबंदी भेदल्या, पण मुख्य शहर जिंकणे त्याला अशक्य झाले.

विजयनगरमध्ये यश मिळत नाही हे पाहून मुजाहिदने आपला मोर्चा अडोनीच्या किल्ल्याकडे वळवला, जो अत्यंत सामरिक महत्त्वाचा होता.मुजाहिदने आपला सेनापती सफदर खान सिस्तानी याला अडोनीला वेढा घालण्यास सांगितले.हा वेढा सुमारे ९ महिने चालला. अडोनीचा किल्ला अजिंक्य होता. बहामनी सैन्याला अन्नधान्याचा तुटवडा आणि साथीच्या रोगांचा सामना करावा लागला .जेव्हा पावसाळा सुरू झाला, तेव्हा किल्ल्यातील पाण्याचे साठे भरले गेले, ज्यामुळे किल्ल्यातील सैन्याची स्थिती मजबूत झाली. उलटपक्षी, मुजाहिदच्या छावणीत पुरामुळे आणि चिखलामुळे प्रचंड हाल झाले.आपला वजीर सैफुद्दीन घोरी याच्या सल्ल्यानुसार मुजाहिदने अखेर वेढा उठवला आणि माघार घेण्याचा निर्णय घेतला. मुजाहिदची हत्यायुद्धातून माघार घेत असताना १६ एप्रिल १३७८ रोजी मुजाहिद शाहची त्याचा चुलता दाऊद खान याने हत्या केली. या अंतर्गत कलहामुळे बहामनी सैन्य माघारी फिरले आणि विजयनगरवरील संकट तात्पुरते टळले.

वेढा बुक्का रायांच्या काळात सुरू झाला, पण तो अनिर्णित राहून संपला तेव्हा द्वितीय हरिहर सत्तेवर येत होते.


***हरिहर दुसरा (१३७७ ते १४०४)

बुक्का रायांच्या मृत्यूनंतर वारसाहक्कासाठी कोणताही मोठा संघर्ष झाला नाही. हरिहर दुसरा हे बुक्का रायांचे ज्येष्ठ पुत्र होते. त्यांनी 'महाराजाधिराज' आणि 'राजपरमेश्वर' या पदव्या धारण केल्या. विशेष म्हणजे, विजयनगरच्या राजांपैकी ही पदवी धारण करणारे ते पहिलेच होते, कारण त्यांच्या आधीचे शासक  स्वतःला 'राय' म्हणवून घेत असत.

बुक्का रायांच्या काळात साम्राज्य हे अनेक अर्ध-स्वायत्त प्रांतांमध्ये विभागलेले होते (भाई-भावंड आणि चुलत भाऊ यांच्याकडे).

हरिहर द्वितीय यांनी हे बदलले. त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलांना महत्त्वाच्या प्रांतांचे गव्हर्नर केले.

विरुपाक्षला  तमिळ प्रदेश,,देवराय (भविष्यातील देवराय प्रथम) याला उदयगिरीइम्मडी बुक्का याला  मुलबागल नियुक्त केले.यामुळे कुटुंबातील अंतर्गत बंडखोरी कमी झाली आणि प्रशासन अधिक केंद्रित झाले.


***हरिहर दुसरा सत्तेवर येताच त्यांना दक्षिण भारतातील तमिळ आणि कानडी प्रदेशातील बंडाचा सामना करावा लागला. त्यांनी आपले सेनापती आणि पुत्र विरुपाक्ष याच्या मदतीने ही बंडे मोडून काढली आणि कावेरी नदीच्या दक्षिणेकडील प्रदेशावर आपली पकड घट्ट केली. 


***कोकण आणि पश्चिम किनारपट्टीचा विजय केला .हरिहर दुसरा यांनी पश्चिमेकडे आपले साम्राज्य विस्तारले. त्यांनी बहमनींच्या ताब्यात असलेली गोवा, चौल आणि दाभोळ ही महत्त्वाची बंदरे जिंकून घेतली. २९ ऑगस्ट १३८० रोजी माधव मंत्रि यांच्या नेतृत्वात विजयनगर फौजांनी गोवा ताब्यात घेतला.यामुळे अरबी समुद्रातील व्यापारावर विजयनगरचे नियंत्रण निर्माण झाले.


***बहमनी सुलतानाशी संघर्ष (इ.स. १३९८)त्यांच्या काळात बहमनी सुलतान ताजुद्दीन फिरोझ शाह याने विजयनगरवर आक्रमण केले. हरिहर दुसरा यांचा मुलगा बुक्का दुसरा (इम्मडी बुक्का)याने रायचूर दोआब जिंकण्याचा प्रयत्न केला होता, ज्याला उत्तर म्हणून फिरोझ शाहने चाल केली.या युद्धात विजयनगरच्या सैन्याचा पराभव झाला आणि हरिहरदुसरा यांना तह करावा लागला, ज्यामध्ये त्यांना मोठा दंड द्यावा लागला.


***त्यांनी आंध्र प्रदेशातील कोंडाविदुच्या रेड्डी राज्यांवर आक्रमण केले. त्यांनी उदयगिरी, श्रीशैलम आणि कर्नूल यांसारखे महत्त्वाचे प्रदेश जिंकून घेतले. यामुळे विजयनगरची सीमा कृष्णा नदीपर्यंत पोहोचली.असे मानले जाते की, हरिहर दुसरा यांच्या काळात विजयनगरच्या नौदलाने श्रीलंकेवर (जाफना) स्वारी केली होती आणि तेथून खंडणी वसूल केली होती. 

***त्यांच्या दरबारात संस्कृत आणि कन्नड साहित्याला मोठा राजाश्रय मिळाला. 'मधुरा' नावाच्या प्रसिद्ध जैन कवीने त्यांच्याच काळात 'धर्मनाथ पुराण' लिहिले, जे त्यांच्या धार्मिक सहिष्णुतेचे दर्शन घडवते.

हंपीमधील अनेक मंदिरांचा विस्तार त्यांच्या काळात झाला. विरूपाक्ष मंदिराच्या काही भागांचे बांधकाम आणि दुरुस्ती त्यांच्या देखरेखीखाली झाली.

गोवा आणि चौल सारखी बंदरे जिंकल्यामुळे अरबी घोड्यांचा व्यापार थेट विजयनगरच्या नियंत्रणात आला. यामुळे विजयनगरचे सैन्य अधिक शक्तिशाली झाले.त्यांनी सोन्याची आणि तांब्याची नाणी पाडली, ज्यावर शिव-पार्वती आणि इतर देवतांच्या प्रतिमा होत्या.


***इ.स. १४०४ मध्ये द्वितीय हरिहर यांच्या निधनानंतर विजयनगर साम्राज्यात सत्तेसाठी त्यांच्या मुलांमध्ये तीव्र संघर्ष सुरू झाला. हा वारसाहक्काचा संघर्ष साधारण दोन वर्षे चालला.


***विरुपाक्ष राय प्रथम (१४०४–१४०५)

सिंहासनावर बसल्यानंतर त्याचे शासन फक्त काही महिने अंदाजे १ वर्ष किंवा त्याहून कमी टिकले. त्याच्या स्वतःच्या पुत्रांनी किंवा भावांनी त्याला ठार मारले किंवा गादीवरून खाली खेचले. या काळात साम्राज्य कमकुवत झाले आणि काही प्रदेश विशेषतः पश्चिम किनाऱ्यावरील गोवा, दाभोल, चौल सारखी बंदरे बहमनी किंवा इतरांकडे गेले.


***बुक्का राय द्वितीय (१४०५–१४०६)

विरुपाक्ष राय नंतर बुक्का राय द्वितीयने सिंहासन घेतले. त्याचे शासनही फक्त १–२ वर्षे टिकले. तोही अशक्त आणि अकार्यक्षम ठरला. त्याच्या काळातही गोंधळ आणि प्रदेश गमावण्याची प्रक्रिया चालू राहिली.


***देवराय प्रथमचा विजय (१४०६)

या दोघांनंतर देवराय प्रथम (हरिहर द्वितीय यांचा पुत्र) याने संघर्ष जिंकला आणि १४०६ मध्ये स्थिरपणे सिंहासनावर बसला. त्याने साम्राज्याला पुन्हा स्थिरता दिली आणि नंतरच्या काळात मोठा विस्तार केला.

 दोन वर्षांच्या गृहयुद्धामुळे विजयनगर साम्राज्य कमकुवत झाले. प्रशासन ढिले पडले आणि सीमावर्ती प्रदेशांवर नियंत्रण ढिले झाले.

प्रादेशिक नुकसान: पश्चिम किनाऱ्यावरील महत्वाची बंदरे गमावली गेली. बहमनी सुलतान फिरोज शाह यांना फायदा झाला.

देवराय प्रथमने या गोंधळानंतर साम्राज्य पुन्हा मजबूत केले. त्याने बहमनींविरुद्ध युद्धे केली, प्रशासन सुधारले आणि विजयनगरला नवीन उंची दिली .

हरिहर द्वितीय यांनी आपल्या मुलांना वेगवेगळ्या प्रांतांचे गव्हर्नर नेमून प्रशासन केंद्रित करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांच्या मृत्यूनंतर त्याच कुटुंबातील अंतर्गत स्पर्धा बाहेर आली.

Saturday, March 28, 2026

हंपी ४ (हंपी इतिहास -२) हरिहर, बुक्का

 


इ.स. १४०६ च्या ताम्रपटांमध्ये नोंदवल्यानुसार, राजा हरिहरचे पाच पुत्र, जे पंच संगम बंधू म्हणून ओळखले जातात , ते भारतातील १५ व्या शतकातील विजयनगर साम्राज्यातील प्रमुख व्यक्ती होते. हरिहर, कंपा, बुक्का, मारप आणि मुद्दप या बंधूंनी संगम घराण्याची स्थिरता आणि वंश टिकवून ठेवण्यात मोलाची भूमिका बजावली. 

विजयनगर साम्राज्य च्या पहिल्या घराण्याला संगम घराणे -Sangama Dynasty म्हणतात. हे घराणे १३३६ ते सुमारे १४८५ ई. पर्यंत राज्य करत होते.

संगम घराण्याचे राजे 

हरिहर प्रथम-१३३६ ते १३५६

बुक्का राय प्रथम -१३५६ ते १३७७

हरिहर द्वितीय -१३७७ ते १४०४

विरूपाक्ष राय -१४०४ ते १४०५

बुक्का राय द्वितीय -१४०५ ते १४०६

देव राय प्रथम -१४०६ ते १४२२

रामचंद्र राय -१४२२

वीर विजय बुक्का राय -१४२२ ते १४२४

देव राय द्वितीय -१४२४ ते १४४६

मल्लिकार्जुन राय -१४४६ ते १४६५

विरूपाक्ष राय द्वितीय -१४६५ ते १४८५


हरिहर पहिला (इ.स. १३३६-१३५६)

संगम राजवंशाचा संस्थापक, हरिहर प्रथम याने इ.स. १३४४ मध्ये दख्खनमधून मुस्लिमांना हाकलून देण्याच्या उद्देशाने, वारंगलच्या कृष्ण नायकाच्या नेतृत्वाखालील संघराज्यात सक्रियपणे भाग घेतला होता.त्याने अनेगुंडी ही आपली पहिली राजधानी म्हणून आणि नंतर विजयनगर ही दुसरी राजधानी म्हणून स्थापित केली.

पहिल्या दोन दशकांत, हरिहर प्रथमने तुंगभद्रा नदीच्या दक्षिणेकडे आपल्‌या साम्राज्याचा विस्तार केला आणि पूर्वपश्चिम समुद्रधिश्वर  ही उपाधी मिळवली. त्याने टप्प्याटप्प्याने कोकण आणि मलबार किनारपट्टीच्या प्रदेशांपर्यंत आपला विस्तार केला.

कालादगी पर्यंतचा विस्तार केला.उत्तर कर्नाटकातील (आजचे बागलकोट-बीजापूर भाग) प्रदेश जिंकण्यासाठी स्थानिक कदंब आणि इतर छोट्या राजवटींवर मोहीम राबवली. यात हरिहरांच्या भावंडांनी मरप्पा, कांपण  मदत केली. 

होयसळ राज्याच्या र्हासाचा फायदा घेऊन, हरिहर आणि बुक्का यांनी आपल्या नव्याने स्थापन केलेल्या राज्याचा विस्तार केला आणि अखेरीस १३४६ पर्यंत संपूर्ण होयसळ राज्य आपल्या नियंत्रणाखाली आणले.होयसळ साम्राज्य हे दक्षिण भारतातील एक प्रमुख हिंदू राजवंश होते. त्यांनी सुमारे ९५०–१३४६ ई.पर्यंत राज्य केले.

कन्ननूर  येथील युद्ध १३४२ ते १३४३ हे युद्ध होयसळ साम्राज्य आणि मदुराई सुलतानत यांच्यात झाले. हे दक्षिण भारतातील मध्ययुगीन इतिहासातील एक महत्वाचे आणि दुःखद युद्ध मानले जाते.

वीर बल्लाळ तृतीय यांच्या मृत्यूबाबत इब्न बतूताचे वर्णन उपलब्ध आहे .

इब्न बतूता स्वतः मदुराई शहरात उपस्थित होता जेव्हा कन्ननूर  येथील युद्धानंतर होयसळ राजा वीर बल्लाळ तृतीय (तेव्हा सुमारे ८० वर्षांचे) पकडले गेले.

त्याने प्रत्यक्ष पाहिलेल्या घटनेचे वर्णन असे आहे .

सुलतानाने बल्लाळ तृतीय यांना जिवंत पकडले.त्यांची कातडी काढली.कातडी भरून (stuffed with straw) केली.ही भरलेली कातडी मदुराई किल्ल्याच्या भिंतींवर किंवा खांबावर सार्वजनिक प्रदर्शन करण्यात आली इतर हिंदू राजांना इशारा म्हणून हा क्रूर कृत्य केले .

काही वर्णनांनुसार त्यांचे डोके देखील भिंतीवर लटकवले गेले होते.

इब्न बतूता याने मदुराई सुलतानाच्या अत्यंत क्रूर स्वभावाचे विस्तृत वर्णन केले आहे. 

हिंदू कैद्यांना जिवंत खांबांवर लटकणावे त्यांच्या पत्नी आणि मुलांना त्यांच्यासमोर मारणे.जंगल तोडताना कैद्यांना क्रूरपणे मारणे.

एका प्रसंगी सुलतान समोर बसलेल्या इब्न बतूताच्या डोळ्यादेखत एका हिंदू पुरुष, त्याची पत्नी आणि ७ वर्षांच्या मुलाचा शिरच्छेद केला गेला.

इब्न बतूता याने लिहिले की, “अशी क्रूरता मी इतर कोणत्याही राजाकडे पाहिली नाही.”

हरिहर प्रथम यांच्या निधनानंतर, त्यांचे बंधू बुक्का प्रथम हे संगम राजवंशाचे पाचवे सम्राट म्हणून सिंहासनावर बसले.

तिकडे तुघलकाकडे बंड होऊन बहमनी सत्ता नव्याने स्थापन झाली.विजयनगर आणि बहामनी सत्ता यात कायम संघर्ष होत राहिले 

फरिश्ता सारख्या मध्ययुगीन इतिहासकारांनी सांगितलेल्या लोकप्रिय आख्यायिकेवर बहमनी सत्ता स्थापन कथा आधारित आहे. आधुनिक इतिहासकार या कथेची पूर्णपणे पुष्टी करत नाहीत आणि अलाउद्दीन बहमन शाह यांच्या मूळ उत्पत्तीबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. तरीही बहमनी साम्राज्याच्या उदयाच्या कथांमध्ये ही आख्यायिका प्रसिद्ध आहे.

हसनचा जन्म १२९० साली अत्यंत साध्या-सरळ परिस्थितीत झाला असे सांगितले जाते. त्याच्या आयुष्यातील पहिल्या ३० वर्षांपर्यंत तो गंगू नावाच्या ब्राह्मणाच्या शेतात साधा शेतमजूर म्हणून काम करत होता.

हसन मेहनती आणि प्रामाणिक स्वभावाचा होता, त्यामुळे ब्राह्मण गंगूने त्याच्या कष्टाची दखल घेत त्याला एक छोटेसे शेत आणि दोन बैल भेट म्हणून दिले.

एके दिवशी आपल्या शेतात नांगर चालवत असताना हसनला एक प्राचीन सोन्याच्या नाण्यांचा साठा सापडला. त्याने ताबडतोब तो गंगू ब्राह्मणाकडे नेला. या गरीब मजुराच्या प्रामाणिकपणाने गंगू खूप प्रभावित झाला.

गंगू ब्राह्मण हा राजघराण्यातील ज्योतिषीही होता, त्यामुळे त्याने सुलतानाला हसनच्या प्रामाणिकपणाची माहिती दिली.

त्या काळचे सुलतान गियासुद्दीन तुगलक होते. त्यांनी हसनला बक्षीस म्हणून सैन्यात सेनाधिकारी बनवले आणि घोडदळात १०० घोड्यांचा अधिकारी म्हणून नेमले.

गंगू ज्योतिषी असल्याने, आपल्या एकेकाळच्या नोकराच्या पूर्णपणे बदललेल्या परिस्थिती पाहून त्याने हसनचा कुंडली घातला. कुंडलीत असे दिसले की, हसन एक दिवस राजा होईल.

ही माहिती लपवून न ठेवता गंगूने हसनला ही भविष्यवाणी सांगितली आणि त्याच्याकडून वचन घेतले की, जेव्हा तो राजा होईल तेव्हा तो गंगूचे नाव स्वीकारेल आणि त्याला आपल्या भविष्यातील राज्याचा वित्तमंत्री  बनवेल.

नंतर हसन हसन गंगू झाला. मुस्लिम इतिहासकारांनी त्याला ‘कंगोह’ (Kangoh) असेही उल्लेख केला आहे.हसनने आपल्या जुन्या मालकाला दिलेल्या वचनाचा सन्मान करण्यासाठी 'बहमन' हे नाव स्वीकारले, कारण 'ब्राह्मण' या शब्दाचा उच्चार पूर्वी आणि आजही अनेकदा 'बहमन' असाच केला जातो. फरिश्ता यांचा आग्रह आहे की, हसन हा एका निम्न-कुलीन अफगाण होता.


बुक्क-१ (१३५६ ते १३७७)

बुक्का प्रथमाच्या काळात विजयनगर साम्राज्य शक्तिशाली झाले आणि दक्षिण भारतात हिंदू वर्चस्व प्रस्थापित झाले.

अलाउद्दीन बहमन शाह यांचे कापय्या नायक आणि इतर नायकांशी युद्ध. त्यांनी काही किल्ले जिंकले आणि विजयनगरच्या सीमेपर्यंत छापे टाकले.मृत्युशय्येवर असताना, बहमन शाहने राजकुमार मुहम्मद यांना आपला वारस म्हणून घोषित केले मुहम्मद गादीवर आल्यावर, वारंगलहून तेलंगणावर राज्य करणाऱ्या कपयाने आणि नव्याने स्थापन झालेल्या विजयनगर साम्राज्यावर राज्य करणाऱ्या बुक्काने, कौलाचा प्रदेश वारंगलला आणि रायचूर दोआबचा प्रदेश विजयनगरला परत देण्याची मागणी नव्या सुलतानाकडे केली. 

रायचूर दोआब  या सुपीक प्रदेशावर नियंत्रण मिळवण्यासाठी दोघांचा रस होता.कृष्णा नदी आणि तुंगभद्रा नदी यांच्यामधील सुपीक, काळी मातीचा प्रदेश रायचूर दोआब ओळखला जाई .

बहमनी सुलतान मोहम्मद शाह प्रथम यांनी आडोनी किल्ल्यावर हल्ला करण्याची तयारी केली होती. याची माहिती मिळताच बुक्का राय प्रथम यांनी आडोनी किल्ल्याला आपले मुख्य तळ बनवले. त्यांनी आपल्या बहिणीच्या मुलाला  होजे मुल राय आडोनीचे संरक्षण सोपवले आणि स्वतः मोठ्या सेनेसह तुंगभद्रा नदीच्या दक्षिण काठावर तैनात झाले.

मोहम्मद शाह प्रथम यांनी मोठ्या सेनेसह (१५,००० घोडदळ आणि ५०,००० पायदळ) तुंगभद्रा नदी ओलांडली (सिरुगुप्पा जवळ). त्यांनी खान मुहम्मद यांच्या नेतृत्वाखाली पुढील तुकडी पाठवली (१०,००० घोडदळ, ३०,००० पायदळ आणि तोफखाना).

दोन्ही सेनांमध्ये कौथल तुंगभद्रा नदीजवळ  जवळ निर्णायक लढाई झाली.विजयनगर सेनेचे नेतृत्व  होजे मुल राय यांच्याकडे होते.

बहमनी सेनेच्या केंद्रात खान मुहम्मद,  मुसा खान आणि  इसा खान होते.

लढाई अतिशय भीषण होती. प्रारंभी विजयनगर सेनेने बहमनींच्या  मुसा खान आणि इसा खान यांना ठार केले. बहमनी सेना जवळजवळ पराभूत होत होती.

या निर्णायक क्षणी मोहम्मद शाह प्रथम स्वतः ३,००० ताज्या घोडदळासह आले. त्यामुळे बहमनी सेनेत नवीन उत्साह संचारला.

खान मुहम्मद यांचा हत्ती शेर-ए-शिकार याने विजयनगर सेनेच्या मध्यभागात घुसून मल्लिनाथ यांना गंभीर जखम केली. हातोहाती लढाई झाली. विजयनगर सेना पूर्णपणे पराभूत झाली आणि पळून गेली. युद्धानंतर बहमनींची लूटमार आणि नरसंहार केला .

विजयानंतर बहमनी सेनेने आडोनी भागात उरलेल्या विजयनगर सैनिकांचा बंदोबस्त केला.

नंतर मोहम्मद शाह प्रथम यांनी विजयनगर शहराकडे कूच केले. या मोहिमेदरम्यान बहमनी सेनेने विजयनगर प्रदेशात मोठ्या प्रमाणात लूटमार, जाळपोळ आणि नरसंहार केला.इतिहासकार फरिश्ता यांच्या मते, या युद्धात हिंदू बाजूचे ५ लाखांपर्यंत लोक मारले गेले गर्भवती स्त्रिया आणि लहान मुलांसह.बहमनी सेनेने क्रूरपणे हल्ला चढवला.फरिश्तानुसार, मोहम्मद शाहने “ काफिरांच्या वध” चा आदेश दिला.

बुक्का राय प्रथम यांनी वन्य आणि डोंगराळ भागातून गनिल्ला (छापामार) युद्धतंत्र वापरले. त्यांच्या सैनिकांनी बहमनी सेनेच्या पुरवठा मार्ग तोडले, छोट्या-छोट्या हल्ल्यांमधून त्रास दिला आणि बहमनी सेनेला सतत हैराण केले.

बहमनी सेनेत अन्न-पाण्याची टंचाई आणि थकवा निर्माण झाला. शेवटी मोहम्मद शाह प्रथमला माघार घ्यावी लागली.

शांतता स्थापित झाली. बुक्का राय प्रथम यांना काही प्रदेश गमावावे लागले किंवा वार्षिक कर द्यावा लागला. या युद्धानंतर १३६७ ते १३७५ पर्यंत दोन्ही बाजूंमध्ये काही वर्षे शांतता राहिली.

१३६६ च्या पराभवानंतर त्यांनी दक्षिणेकडे लक्ष केंद्रित केले.

त्यांनी दक्षिणेकडील छोट्या राजवटी आणि प्रदेश जिंकले.गोवा आणि कोकण भागात नियंत्रण मिळवले.पूर्वेकडे ओडिशा -गजपती च्या काही भागांवर छापे टाकले.श्रीलंका (जाफना राज्य) आणि मालाबार (केरळ) च्या राजांना कर देण्यास भाग पाडले.

मदुराई सुलतानाचा पराभव हा बुक्का राय प्रथम यांच्या काळातील सर्वात महत्वाचा आणि गौरवशाली विजय होता.

कुमारा कम्पण्णा बुक्का राय प्रथम यांचा मुलगा याने या मोहिमेचे नेतृत्व केले.सुमारे १३६५ ते १३७०/१३७१ ई. (

कम्पण्णाने प्रथम तोंडैमंडलम (आजचे उत्तर तामिळनाडू) जिंकले.नंतर मदुराई सुलतानत वर मोठी मोहीम राबवली.

शेवटचा मदुराई सुलतान अलाउद्दीन सिकंदर शाह  याला मदुराईच्या युद्धात पराभूत केले आणि शिरच्छेद केला.

मदुराई सुलतानतचा पूर्ण अंत झाला .विजयनगर साम्राज्याने रामेश्वरम् पर्यंत दक्षिणेकडे विस्तार केला.

कम्पण्णाने मदुराईतील नष्ट झालेल्या मंदिरांचे (मीनाक्षी मंदिर, श्रीरंगम इ.) जीर्णोद्धार केले. हिंदू धर्म आणि मंदिर संस्कृतीचे पुनरुज्जीवन केले.

या विजयाचे वर्णन कम्पण्णाची पत्नी गंगादेवी यांनी मधुरा विजयम् या संस्कृत महाकाव्यात केले आहे. यात मदुराई सुलतानांच्या अत्याचारांचे आणि विजयनगरच्या विजयाचे सुंदर वर्णन आहे.

बुक्का राय प्रथम यांचा राज्यकाल १३५६ ते १३७७ ई. पर्यंत होता . ते विजयनगर साम्राज्याचे दुसरे सम्राट होते आणि संगम घराण्याचे प्रमुख शासक मानले जातात.

Friday, March 27, 2026

हंपीचा उगम (हंपी इतिहास -१) History of Hampi -1

हंपीचा उगम


हंपीविषयक पौराणिक कथाही सांगितल्या जातात .तेथील प्रसिद्ध विरुपाक्ष मंदिराच्या तीर्थक्षेत्र माहात्म्यामुळे!!

**पौराणिक

हम्पी हे नाव तुंगभद्रा नदीच्या 'पम्पा' या प्राचीन नावावरून आले आहे . तसेच, पम्पा ही सृष्टिकर्ता देव ब्रह्मदेवाची कन्या होती. ती संहारक देव शिवाची एकनिष्ठ भक्त होती. तिच्या निष्ठेने प्रभावित होऊन शिवाने तिला एक वरदान दिले आणि तिने त्याच्याशी विवाह करण्याचे ठरवले! अशाप्रकारे ते ठिकाण पम्पाक्षेत्र (पम्पाची भूमी) आणि शिव पम्पापती (पम्पाचा पती) म्हणून ओळखले जाऊ लागले.

पौराणिक कथेनुसार, हंपीमधील हेमाकुटा टेकडीवर शिवाने पंपाशी विवाह करण्यापूर्वी तपश्चर्या केली होती. कामदेवा पंपा शिवांना मिळावे म्हणून कामदेव (मन्मथ) याने शिवांच्या ध्यानात व्यत्यय आणला.

शिव क्रोधित झाले आणि त्यांनी आपल्या तीसऱ्या अग्निमय डोळ्याने कामदेवाला भस्म केले. त्यामुळे शिवाचा क्रोध भडकला. आपल्या क्रोधासाठी प्रसिद्ध असलेल्या शिवाने आपल्या तिसऱ्या अशा अग्निमय डोळ्याने कामाला जाळून टाकले. कामदेवाची पत्नी आणि कामदेवाची देवी रतीने शिवाकडे दयेची याचना केली. शिवाने कामाला जीवन परत दिले, परंतु केवळ एक पात्र म्हणून, भौतिक अस्तित्व म्हणून नाही.त्यामुळे पार्वतीने-पंपाने पुन्हा उग्र तपश्चर्या करत शिवाला प्रसन्न करून घेतले .

शिवाचा पंपा हिच्याशी विवाह झाल्यावर स्वर्गातील देवांनी त्या जागेवर सोन्याचा वर्षाव केला. हम्पीमधील या टेकडीला 'हेमाकुटा' म्हणतात, ज्याचा शब्दशः अर्थ 'सोन्याचा ढिगारा' असा होतो.

आजही वार्षिक विवाह सोहळा आणि वाग्दान हे हम्पीमधील महत्त्वाचे सण आहेत . कालांतराने, येथे शिव विरुपाक्ष म्हणून अधिक लोकप्रिय झाले. विरुपाक्ष, शिवाचा एक अवतार, याचा शब्दशः अर्थ 'तिरकस डोळा असलेला' असा होतो. यावरून शिवाला तीन डोळे आहेत हे सूचित होते. जेव्हा ते संहार करतात, तेव्हा त्यांच्या कपाळावरील तिसरा अग्निमय डोळा उघडतो .७वी शतक मध्ये बादामी चालुक्य राजवंशाच्या काळात पुलकेशी द्वितीय यांच्या काळात छोट्या मंदिर स्वरूपात बांधले गेले.९व्या आणि १०व्या शतकातील शिलालेखांमध्ये विरुपाक्ष स्वामीचा उल्लेख आढळतो.

चालुक्य आणि होयसळ काळात (८वे ते १४वे शतक) काही जोडणी आणि विस्तार झाले. यात उप-मंदिरे, मंडप आणि काही संरचना समाविष्ट आहेत.

मंदिर सुरुवातीला फक्त एक छोटे पूजा स्थळ होते, ज्याभोवती पंपा देवी  यांचीही पूजा होत असे.१५ व्या शतकात देवराय आणि कृष्णदेवराय यांच्याकडून मंदिर विस्तार झाला .

कन्नड भाषेत पंपा → हम्पा → हम्पे झाले. इंग्रजीत Hampi म्हणून प्रसिद्ध.

हम्पी ही किष्किंधा वानर राज्य मानली जाते. येथे बाली-सुग्रीव,अंजनाद्री डोंगर हनुमान जन्मस्थळ यांच्याशी संबंधित स्थळे आहेत .

**ऐतिहासिक काळ 

विजयनगर साम्राज्याआधी इथे विविध राजवटी होत्या 

मौर्य साम्राज्य अशोक काळ, हा तिसरे शतक ई.पू.बेळगाव जिल्ह्यात होते अशोकाच्या शिलालेखांचे पुरावे मिळाले आहेत, म्हणजे हम्पीचा परिसर मौर्य साम्राज्यात समाविष्ट होता.

मध्ययुगीन काळ काळात 

*बदामी चालुक्य (६–८वे शतक)-येथे पंपापुर म्हणून उल्लेख.

*कल्याण चालुक्य (१०वे शतक)-धार्मिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित. विरुपाक्ष मंदिराला जमीन दान दिल्याचे शिलालेख.

*होयसळ साम्राज्य (१२वे–१४वे शतक)-हम्पीला दुसरे राजवाडे म्हणून वापर. एका होयसळ राजाला हम्पेय ओडेय (हम्पीचा स्वामी) म्हटले जाते. दुर्गा, हम्पादेवी आणि शिव मंदिरे बांधली.

*कंपिली राज्य (१४वे शतक सुरुवात)-तुंगभद्रा नदीजवळील छोटेसे स्वतंत्र हिंदू राज्य होते.

 तिकडे उत्तर भारतात  परकीय आक्रमणांचा जोर १००१-१४३० पर्यंत हाहाकार माजवत होता .

इ.स. १००१ मध्ये, त्यांचे महान नेते गझनी महमूद यांच्या नेतृत्वाखाली मुहम्मदींनी वायव्य सीमेवरून भारतात पहिले आक्रमण केले. त्यांनी प्रथम पंजाबच्या मैदानी प्रदेशावर, नंतर मुलतानवर आणि त्यानंतर इतर ठिकाणी आक्रमण केले. वर्षानुवर्षे ते पुढे सरकत आणि पुन्हा मागे हटत असत

* १०२१ मध्ये ते कलिंग येथे होते.१०२३ मध्ये काठियावाडमध्ये.परंतु कोणत्याही परिस्थितीत ते देशावर आपले पाय घट्ट रोवू शकले नाहीत. तथापि, त्यानंतर एकापाठोपाठ एक आक्रमणे झाली आणि दोन शतकांनंतर मुहम्मदी दिल्लीत दृढपणे आणि कायमस्वरूपी स्थापित झाले. एकापाठोपाठ एक युद्धे होत गेली आणि त्या काळापासून उत्तर भारताला विश्रांती मिळाली नाही. 

*तेराव्या शतकाच्या अखेरीस मुहम्मदींनी दक्षिणेकडे दख्खनच्या दिशेने पुढे सरकण्यास सुरुवात केली. १२९३ मध्ये दिल्लीच्या राजाचा पुतण्या अलाउद्दीन खिलजीने देवगिरी जिंकली. चार वर्षांनंतर गुजरातवर हल्ला झाला. १३०३ मध्ये वारंगल जिंकण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

*१३०६ मध्ये देवगिरीवर नवीन मोहीम काढण्यात आली. १३०९ मध्ये प्रसिद्ध सेनापती मलिक काफूरने प्रचंड सैन्यासह दख्खनमध्ये प्रवेश केला आणि वारंगल जिंकले. १३१० मध्ये होयसळ बल्लळांची जुनी राजधानी द्वारसमुद्र ताब्यात घेण्यात आली आणि मलिक काफूर मलबार किनाऱ्यावर गेला जिथे त्याने एक मशीद बांधली आणि नंतर प्रचंड लूट घेऊन आपल्या स्वामीकडे परत आला.

*१३१२ मध्ये पुन्हा लढाई झाली. सहा वर्षांनंतर दिल्लीच्या मुबारकाने देवगिरीवर स्वारी केली आणि तेथील दुर्दैवी राजकुमार हरिपाला देव याला निर्दयपणे जिवंतपणी सोलून काढले व त्याचे शीर स्वतःच्याच शहराच्या वेशीवर उभारले. १३२३ मध्ये वारंगलचा पाडाव झाला.

 विंध्य पर्वतरांगांपर्यंतचा संपूर्ण उत्तर भारत मुस्लिमांच्या घट्ट अधिपत्याखाली होता, तर त्याच धर्माच्या अनुयायांनी दख्खन पादाक्रांत केले होते आणि दक्षिणेलाही त्याच भवितव्याची धमकी देत ​​होते. कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील संपूर्ण प्रदेश अजूनही हिंदूंच्या वर्चस्वाखाली होता,

 *१३२५ मध्ये दिल्लीच्या मुहम्मद तघलकच्या राज्यारोहणाने परिस्थिती आणखीच बिघडली. त्याच्या विलक्षण कारवायांच्या अद्भुत कथा द्वीपकल्पातील रहिवाशांमध्ये पसरल्या होत्या आणि त्याची असहिष्णुता, महत्त्वाकांक्षा व क्रूरता यांना जणू काही सीमाच उरली नव्हती.हिंदू प्रांतांचा विनाश आणि विध्वंस; त्यांच्या प्राचीन राजघराण्यांचा नाश, त्यांच्या धर्माचा, त्यांच्या मंदिरांचा, त्यांच्या शहरांचा विध्वंस. दक्षिणेकडील रहिवाशांना सर्वात प्रिय असलेले सर्व काही पतनाच्या उंबरठ्यावर डगमगत असल्याचे दिसत होते.

***अचानक, सुमारे इसवी सन १३४४ च्या सुमारास, परकीय आक्रमणांच्या या लाटेला आळा बसला आणि त्यानंतर विरोधाची एक भक्कम भिंत उभी राहिली; आणि २५० वर्षांसाठी दक्षिण भारत वाचला.***

हा अडथळा लहान हिंदू राज्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे निर्माण झाला होता .त्यांपैकी दोन, वारंगल आणि द्वारसमुद्र, आधीच पराभूत झाल्यामुळे बहुधा फारसा आत्मविश्वास नसलेली होती. आणि तिसरे म्हणजे अनेगुंडीचे छोटेसे संस्थान. ही भक्कम भिंत म्हणजे अनेगुंडीचे विजयनगरच्या महान साम्राज्यात झालेले रूपांतर. या घराण्याच्या राजांपुढे दक्षिणेकडील सर्व राष्ट्रे शरण गेली.

मध्यभागी तुंगभद्रा नदीच्या उत्तर तीरावर, सुमारे १३३० साली अनेगुंडी नावाचे एक तटबंदीयुक्त शहर होते, जे आपल्या इतिहासातील 'नागुंडीम' म्हणून ओळखले जाते. हे शहर परिसरातील एका लहानशा राज्याच्या मालकीच्या सरदारांच्या कुटुंबाचे निवासस्थान होते. त्यांनी पूर्वीच्या काळात,त्या प्रदेशाला व्यापणाऱ्या ग्रॅनाइटच्या उंच टेकड्यांचा फायदा घेऊन, नदीच्या काठावर एक मजबूत किल्ला बांधला होता. अनेक मैलांच्या परिसरात नदी कुठेही ओलांडता येत नसली तरी, ती वर्षभरातील सर्व ऋतूंमध्ये वाहत्या पाण्याने भरलेली असायची आणि पुराच्या वेळी तिच्या अरुंद पात्रातून एक खवळलेला, वेगाने वाहणारा प्रवाह तयार व्हायचा, ज्यात अनेक ठिकाणी धोकादायक धबधबे होते. परंतु ते बहुधा होयसाला बल्लालांचे मांडलिक असावेत. 

नुनिझच्या इतिवृत्तात विजयनगरच्या सम्राटांनी नंतर इतकी व्यापक झालेली सत्ता कशी मिळवण्यास सुरुवात केली याचे निश्चित वर्णन आहे. 

त्याच्या मते, दिल्लीच्या मुहम्मद तघलकने गुजरात जिंकल्यानंतर, दखन बालाघाट, म्हणजेच पश्चिम घाटाच्या वरील उंच प्रदेशातून दक्षिणेकडे कूच केली आणि १३३६ सालाच्या थोडे आधी अनेगुंडी शहर आणि किल्ला ताब्यात घेतला. तेथील प्रमुखाला त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह ठार मारण्यात आले. एका प्रतिनिधीमार्फत या प्रदेशावर राज्य करण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर, मुहम्मदने राज्याच्या प्रमुखपदी बढती दिली. 

नुनिझ ज्याला 'देवा राया' किंवा 'हरिहर देव पहिला' यावरून 'देवराव' म्हणतात, त्या व्यक्तीला प्रमुखपदी बसवले. या नवीन प्रमुखाने महान धर्मशिक्षक माधव यांच्या मदतीने, अनेगुंडीच्या समोर नदीच्या दक्षिण तीरावर विजयनगर शहराची स्थापना केली आणि तेथे आपले निवासस्थान बनवले. त्याने शहाणपणाने असा विचार केला की, आपल्या आणि सतत हल्ले करणाऱ्या मुस्लिमांच्या मध्ये नदीला ठेवल्यास, तो स्वतःला आणि आपल्या लोकांना पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित स्थितीत स्थापित करू शकेल. त्याच्यानंतर 'बुकाराओ' (बुक्का) नावाचा एक व्यक्ती गादीवर आला, ज्याने सदतीस वर्षे राज्य केले आणि त्यानंतरचा राजा त्याचा मुलगा, 'पुरोयेरे देव' (हरिहर देव दुसरा) होता.

हरिहर पहिला आणि बुक्का हे पहिले दोन राजे होते आणि ते भाऊ होते. इब्न बतूता, जो १३३३ ते १३४२ पर्यंत भारतात होता, असे नमूद करतो की त्याच्या काळातही पश्चिम किनारपट्टीवरील एक मुस्लिम सरदार हरिहर प्रथम याच्या अधिपत्याखाली होता, ज्याला तो 'हरैब' किंवा 'हरिब' म्हणतो, जे राजाच्या नावाचे दुसरे रूप 'हरियप्पा' वरून आले आहे; तर शंभर वर्षांनंतर, पर्शियाचा राजदूत अब्दुर रज्जाक आपल्याला सांगतो की, विजयनगरचा राजा तेव्हा संपूर्ण दक्षिण भारताचा, एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत आणि दख्खनपासून केप कोमोरिनपर्यंत स्वामी होता 

जुनी दक्षिणेकडील राज्ये  सर्वसाधारणपणे नवीन राजेशाहीच्या शासनाला शांततेने शरण गेली असे दिसतेआणि अशाप्रकारे झपाट्याने ते छोटे राज्य एका साम्राज्यात रूपांतरित झाले आणि त्या राज्याचा विस्तार होऊन त्याचे साम्राज्य बनले. मुहम्मदी लोकांमध्ये झालेल्या यादवी युद्ध आणि बंडांमुळे हरिहरा आणि बुक्का यांना त्यांच्या कार्यात मदत झाली.

*मुहम्मद तघलाकच्या जुलूम आणि अत्याचारांना कंटाळून १३४७ मध्ये दखान लोकांनी बंड केले आणि काही काळासाठी बहमनींचे स्वतंत्र राज्य भक्कमपणे स्थापित झाले.

**एके दिवशी तो राया -राजा तुंगभद्रा नदीच्या दक्षिणेकडील डोंगरांमध्ये शिकार करत होता. तेव्हा एक ससा त्याच्या कुत्र्यांपासून पळण्याऐवजी उलट त्यांच्यावर धावून गेला आणि त्यांना चावू लागला. हा चमत्कार पाहून राजा आश्चर्यचकित झाला.

शिकार सोडून तो ध्यानमग्न अवस्थेत घरी परतत असताना, नदीकिनारी त्याची भेट माधवाचार्य/विद्यारण ऋषींशी झाली. 

विद्यारण्य स्वामींनी राजाला सल्ला दिला की, याच ठिकाणी एक शहर वसवा. राजाने त्यांचा सल्ला मानला. त्याच दिवशी त्याने घरांचे बांधकाम सुरू केले आणि शहराभोवती कुंपण घातले. नंतर तो  अनेगुंडी सोडून नवीन शहरात राहायला गेला. लवकरच हे शहर लोकांनी भरले.

राजाने या नवीन शहराचे नाव विद्याजुन ठेवले, कारण ज्या तपस्व्याने शहर बांधण्याचा सल्ला दिला होता, तो स्वतःला असे म्हणवत असे.

अशा प्रकारे, इ.स. १३३६ च्या सुमारास हम्पीतील विजयनगर या महान शहराचा उदय झाला, जे पुढे जगप्रसिद्ध आणि अत्यंत भव्य ठरले.

इतर नावे:विजयनगर -विजयाचे शहर,विद्यानगर -ज्ञानाचे शहर विद्यारण्य स्वामींमुळे. भास्कर क्षेत्र, हम्पे.


संदर्भ-Robert Sewell -“A Forgotten Empire: Vijayanagar – A Contribution to the History of India”