Saturday, July 11, 2026

हंपीचा ध्यास -५ (कंपा भूपा मार्ग ,अच्युतराय मंदिर ,मातंग टेकडी सूर्यास्त )

हंपीमधले अजून एक भव्य पण अगदीच कोपऱ्यात असणारे "अच्युतराय मंदिर ' आहे .
प्रसन्न वीरूपाक्षाचे दर्शन घेऊन रिक्षाने पुन्हा मुख्य विरुपाक्ष मंदिराजवळ पोहचलो .आणि थेटच अच्युतरराय मंदिर पाहण्यासाठी तुंगभद्रा नदीच्या काठेने पुढे निघालो.

"चक्रतीर्थ घाट "



तिथेच त्या नदीवरील नैसर्गिक घाटाचे नाव आहे "चक्रतीर्थ घाट "या नावामागे दोन वेगवेगळ्या आख्यायिका आहेत.
येथे भगवान शिवाने विष्णूला सुदर्शन चक्र दिले होते, अशी आख्यायिका आहे. 
तर 'चक्रतीर्थ' म्हणजे 'पाण्याचे पवित्र आवर्तन' तुंगभद्रा नदी विरुपाक्ष मंदिराच्या जवळून पूर्वेकडे वाहते  आणि सुमारे एक किलोमीटर पुढे जाऊन उत्तरेकडे एक तीव्र वळण घेते. नदीचे हे जवळजवळ ९० अंशांचे वळण,ज्यामुळे अनेक भोवरे आणि अधोप्रवाह निर्माण होतात. ज्या कोपराच्या वळणावर नदी पूर्वेकडून उत्तरेकडे आपली दिशा बदलते,त्याला चक्राकार वळण जाणून याचे नाव चक्रतीर्थ असे पडले .


कोदंड राम

पुढे चढ चढून जात असतांना उजवीकडे कोदंड रामाचे मंदिर आहे.या मंदिरात अजूनही पूजा होते हे समाधानकारक होते. हे मंदिर तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर आहे, चक्रतीर्थ नावाच्या पवित्र स्नानघाटासमोर काही पायऱ्या चंदन वर गेल्यावर आहे.गर्भगृहात एका एका मोठ्या नैसर्गिक खडकातून कोरलेल्या राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या उंच सुमारे १५ फूट -मूर्ती आहेत.

राम धनुष्य म्हणजेच कोदंड धरलेल्या मुद्रेत आहेत, म्हणून नाव कोदंडराम- धनुष्यधारी राम.
काही कथेनुसार सुग्रीवही रामासमोर वाकलेला दाखवला आहे.रामायण कथेनुसार हे ठिकाण किष्किंधा राज्याशी जोडलेले आहे.
भगवान राम सीतेला शोधत हम्पी -किष्किंधाप्रदेशात आले.सुग्रीवाने वालीशी युद्ध करण्यासाठी रामाची मदत मागितली.रामाने वालीला मारले आणि लक्ष्मणाने सुग्रीवाला किष्किंधेचा राजा म्हणून अभिषेक केला.या घटनेच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले गेले असल्याचे मानले जाते.काही स्थानिक कथांनुसार रामाने सुग्रीवाला राज्याभिषेक केल्याचे ठिकाण हे आहे.तर सुग्रिव याने ही मूर्ती बनवून घेतल्याची धारणा आहे .
पावसाळ्यात तुंगभद्रा नदीचे पाणी मंदिरापर्यंत पोहचते .


यंत्रोद्धारक हनुमान 

या मंदिराच्या वरच्या बाजूलाच हंपीतील यंत्रोद्धारक हनुमान मंदिर आहे.श्री व्यासराज (१४४७–१५३९) हे विजयनगर साम्राज्याचे राजगुरू होते. ते कृष्णदेवराय यांचे गुरू होते. ते चार राजांच्या काळात राजगुरू म्हणून राहिले.

ते द्वैत दर्शनाचे महान विद्वान होते आणि पुरंदरदास, कनकदास यांचे गुरूही होते.हनुमान भक्तीचा प्रसार: व्यासराज यांनी ७३२ हनुमान मूर्ती दक्षिण भारतात  स्थापित केल्या. यातील बहुतेक वीर हनुमान (वीर मुद्रेत) होत्या.
व्यासराज यांनी ७३२ जैन विद्वानांना शास्त्रार्थात हरवले आणि प्रत्येक विजयानंतर एक हनुमान मूर्ती स्थापित केली.राज्यात हिंदू धर्माचे रक्षण आणि लोकांच्या मनोबल वाढवण्यासाठी वीर हनुमान पूजेला प्रोत्साहन दिले.
हंपीत यंत्रोद्धारक हनुमान मंदिर चक्रतीर्थ जवळ हे व्यासराज यांनी स्थापित केले.यामागची कथा अशी कि,व्यासराज रोज खडकावर कोळशाने हनुमानजींचे चित्र काढायचे, पण ते नाहीसे व्हायचे. १२ दिवसांनी हनुमानजी प्रकट झाले आणि षट्कोण यंत्र मध्ये स्वतःला बांधून (यंत्रोद्धारक) स्थापित करण्यास सांगितले.
ही मूर्ती पद्मासन या योग मुद्रेत बसलेल्या अवस्थेत आहे.


कंपा भूपाचा मार्ग










या दोघांचे दर्शन घेऊन पुढे अच्युतराय मंदिराकडे निघालो .पण आता गडबड झाली.मंदिर उजवीकडे होते.पण कोण जाणे कशी मी वळाले डावीकडे !! आणि तिथे पहिल्यादा दिसले "वराह मंदिर" ! भव्य प्रवेशदाराच्या आतच विजयनगरचे राजचिन्ह असलेले वराह चिन्ह मोठ्या आकारात कोरलेले भिंतीवर दिसले.मंदिर छोटे आणि साधे आहे परंतु हे मंदिर वराह कि विष्णू मंदिर या बाबत मतभेद आहेत.

पुढे चालत राहीले अच्युतराय मंदिर का येईना हे कळेना .मग हा मार्ग जरा चढ़ायाकडे जातो त्या आधी अजून एक मंदिर आहे .ज्याला काही पायऱ्या दिसतात .या भागात अजिबात वर्दळ नव्हती जी मला वेरूळच्या अगदी कोपर्यातल्या अशाच कमी व वर्दळीच्या जैन मंदिरांची आठवण करून देत होती .हे मंदिर कोणते हे ओळखू शकले नाही .आता अजून पुढे गेल्यावर एक दुमजली देखरेख करायला असलेले गेट (Two Storied Gateway) दिसले .समोरून एक जण येत होता ,त्याला विचारले इकडे पुढे काय आहे ? तो म्हणाला "विठ्ठल टेम्पल"!!
हाय राम तर मी थेट विठ्ठल मंदिराच्या जवळ पोहचले होते तर ....पण मला विठ्ठल मंदिर अगदी निवांत पाहायचे होते ,आणि आता वाजले होते चार ! म्हणून पुन्हा मागे फिरले.नंतर नेटवर शोधल्यावर समजले की मी आता जो इतका मोठा मार्ग चालत आले त्याला म्हणतात "कंपा भूपाचा मार्ग"!!
 हा हम्पीमधील एक ट्रेक मार्ग आहे, जो त्याच्या आकर्षक खडकाळ भूभागासाठी ओळखला जातो. हा सुमारे २ किलोमीटर लांबीचा ट्रेक मार्ग आहे. हा ट्रेक मार्ग हम्पी बाजारापासून सुरू होतो आणि प्रसिद्ध विठ्ठल मंदिराच्या जवळ संपतो.ज्यात वराह मंदिर,नदीकाठच्या १०८ शिवलिंग रांगा नरसिंह मंदिर,सुग्रीव गुहा आहे.ज्यातील मी फक्त वराह मंदिर आणि नरसिंह मंदिर पाहू शकले .

अच्युतराय मंदिर/तिरुवेंगलनाथ मंदिर


आता पुन्हा अच्युतराय मंदिर कोठे आहे हे पाहत मागे त्याच मार्गाने निघाले.आता जरा धावतच सुटले.अखेरीस डावीकडे भव्य पुष्करणी आणि बाजाराचा भाग आणि ३०० मीटर अंतरा दूर अच्युतराय मंदिर दिसत होते .आधी मंदिराकडे निघाले.एका बाजूला अच्युतराय बाजाराच्या पडव्या/व्हरांडा होत्या पूर्वी दुकाने आणि निवासासाठी वापरला जात असे.तर दुसरीकडे विस्तीर्ण पुष्करणीही होती.मंदिर आणि त्याच्या समोरील गजबजलेला बाजार मिळून 'अच्युतपुरा' हा हंपीच्या पवित्र केंद्राचा एक महत्त्वाचा भाग बनला होता. मंदिरासमोरील रस्ता 'वेश्यांचा रस्ता' किंवा 'सूलाई बाजार' म्हणून ओळखला जातो. 

अच्युतरायाचे मंदिर म्हणूनही ओळखले जाणारे तिरुवेंगलनाथ मंदिर, इ.स. १५३४ मध्ये बांधले गेले. अच्युतराय हे महान विजयनगर सम्राट कृष्णदेवराय यांचे धाकटे बंधू होते.
 सामान्यतः राजा अच्युत देव राय यांच्या नावाने हे मंदिर ओळखले जाते तरी, ऐतिहासिक शिलालेखांमधून असे उघड झाले आहे की याचे बांधकाम अच्युत राय यांचे मेहुणे आणि दरबारातील एक उच्चपदस्थ अधिकारी हिरिया तिरुमला होते.  हे मंदिर ‘तिरुवेंगलनाथ’ या देवतेच्या नावापेक्षा, ज्यांच्या काळात ते बांधले गेले त्या अच्युतराय मंदिर या नावाने अधिक ओळखले जाते.
या मंदिर संकुलाला दोन आवार आहेत, आणि प्रत्येक आवारात एक प्रवेशद्वार व गोपुर आहे. मुख्य मंदिर दुसऱ्या आवारात वसलेले आहे. मंदिराच्या समोर गरुडाचे मंदिर आहे. आतील अंगणाच्या भोवती खां











या मंदिर संकुलातही एक कल्याण मंडप होता, जिथे देवतेचा वार्षिक विवाह सोहळा आयोजित केला जात असे. जवळपास १००  खांबांवर कुशलतेने कोरलेली शिल्पे आहेत.

अजिबात गर्दी नसलेल्या या मंदिराला मला कमी वेळ देता आला कारण वाजले होते पाच आणि आता मला सूर्यास्त पाहण्यासाठी मातंग टेकडी चढायची होती.पुन्हा चक्रतीर्थ मार्गे बाहेर पार्किंगच्या आलो. 

मोनोलिथिक नंदी

उजवीकडेच भव्य मोनोलिथिक नंदी एका मोठ्या मंडपात दिमाखात होता .नंदी शांत मुद्रेत बसलेला आहे आणि त्याचे लक्ष विरुपाक्ष मंदिराकडे आहे.

मातंग टेकडी 


मातंग टेकडी अजून चढायला सुरुवात असल्यामुळे  नंदीसमोर  रेंगाळता ,टेकडी चढायला सुरुवात केली.मोठं मोठ्या उंच शिळा चढणे सुरुवातीला सोपे वाटत होते पण नंतर जरा चढाई अवघड वाटू लागली ,कारण दिवसभराचा थकवा आणि खूपच कमी वेळात खूप चढाई केली होती.त्यात मी स्पेशल साडी नेसली होती .मला पाहून अनेक जण अय्यो साडीत ही हा कठीण ट्रेक करतेय असे आश्चर्यपूर्ण  कुजबुज जाणवत होती .थोडा स्वतःचा अभिमान  वाटला पण माझी ट्रेक इन सारी ची मात्र हौस फिटली होती ..जिरली होती.अखेर मातंग टेकडी पूर्ण न चढता एका टप्प्यावर जेथून हंपीच्या प्रचंड शिळा अगदी खेळण्यातल्या चौकोनी ठोकळ्यासारख्या सगळीकडे विखुरलेल्या मनोरम वाटत होत्या.

वानरराज वालीने दुंदुभी म्हशीला ठार मारून त्याचे प्रेत मातंग पर्वतावर फेकले. यामुळे मातंग ऋषींनी वालीला शाप दिला की तो त्या पर्वतावर पाऊल ठेवू शणार नाही.नंतर दुंदुभीचा पुत्र मायावी युद्धासाठी वालीला गुहेत घेऊन गेला. वालीचा भाऊ सुग्रीव गुहेचे दरवाजे बंद करून बाहेर राहिला. वाली गुहेतून बाहेर आल्यावर सुग्रीवावर विश्वासघाताचा आरोप करून त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागला. प्रभू रामाने वालीचा वध केल्यावर सुग्रीवाला वानरराज्य मिळाले.
आता किष्किंधा-हंपी नगरीतले वानर इथेही लीला करतांना दिसू लागले ,कोणाची बॅग ,पाण्याची बाटली,खाऊ पळवं !
त्या शिळांवर बसून इतरत्र नजर फिरवली तर वेगवेगळ्या देशातले पर्यटकही दिसू लागले .जे सर्वजण समोर सोनेरी किरणांत न्हाहलेल्या हंपीच्या विशेष अशा शिळा ते सौंदर्य वीरुपाक्षच्या साक्षीने अनुभवत होते .खरोखर जगातल्या अनेक सूर्यास्त स्थळामध्ये हा एक उत्तम सूर्यास्तबिंदू आहे .



हंपी विजयनगर बाजार



मावळतीचे रंग माखून आनंदाचे किरण घेत खाली उतरलो तर समोर विविध रोषणाईत विरुपाक्ष मंदिर नटलेले दिसत होते .१५ व्या शतकातलया जगप्रसिद्ध अशा विरुपाक्ष/ हंपी विजयनगर बाजारपेठेतून मी पुढे पुढे निघाले होते.  प्राचीन काळी युरोपियन, अरबी, पर्शियन आणि चिनी व्यापारी येथे येत असत., विविध परदेशी देशांतील व्यापारी येथे मौल्यवान खडे, दागिने, रेशमी वस्त्रे इत्यादींसारख्या अनोख्या वस्तू विकत असत. तसेच, येथे गायी आणि घोड्यांचा व्यापारही होत असे.परदेशी प्रवासी जसे अब्दुर रज्जाक, निकोलो कोंती, डोमिंगो पेस,फर्नाओ न्युनीझ यांनी हंपी बाजाराची प्रशंसा करताना येथील प्रचंड समृद्धी आणि विविधतेचे वर्णन केले आहे.

पोर्तुगीज प्रवासी पेस आणि नुनिझ यांनी हम्पी बाजाराचे वर्णन केले आहे, "या रस्त्यावर अनेक व्यापारी राहत होते आणि तिथे तुम्हाला सर्व प्रकारचे माणिक, हिरे, पाचू, मोती, लहान मोती, कापड आणि पृथ्वीवर अस्तित्वात असलेली व तुम्हाला खरेदी करण्याची इच्छा होईल अशी प्रत्येक वस्तू मिळेल." 
पुढे ते शहरातील काही रहिवाशांचे त्यांच्या सर्व मौल्यवान दागिन्यांनी नटलेले वर्णन करतात. "या प्रत्येक स्त्रीने आपल्या अंगावर जे काही बाळगले आहे, त्याची किंमत आणि मूल्य कोण सांगू शकेल? त्यांनी बाळगलेल्या बांगड्या, सोने आणि दागिन्यांचे वजन इतके जास्त आहे की त्यांच्यापैकी अनेकांना ते पेलवत नाही, आणि स्त्रिया त्यांचे हात धरून त्यांना मदत करत सोबत असतात."
अशा या भूतकाळातल्या वैभवाचे दृश्य मनात तराळत ठेऊन पुन्हा एकदा मंद समईच्या ,दिव्यांच्या उजेडात उभ्या वीरूपाक्षाचे दुरून दर्शन घेत आजचा  हंपी दर्शनाचा पहिला दिवस संपला होता . 
-भक्ती 
संदर्भ -
https://www.karnataka.com/hampi
https://www.pickpackgo.in/2015/09/achyuta-rayas-temple-complex.html
https://hampi.in


Tuesday, July 7, 2026

RoseApple-रोज ॲपल जॅम.




 घराच्या जवळ सापडलेल्या रोज ॲपल पासून बनवलेलं स्वादिष्ट जॅम!🍎✨RoseApple 


मी आणि माझे घरचे अचंबित होतात ते याच गोष्टीने! आमच्या भागात फणस, जांभूळ, पपई, विड्याची पाने, विविध फुले... कसे काय सापडतात तेही फक्त मलाच ? 😅 

जिज्ञासा असेल तर माणूस निरीक्षण करतो आणि त्याला दृष्टीआड सृष्टीचे अद्भुत दर्शन होते. 


मागच्या दोन आठवड्यापूर्वी रविवारी सकाळी फिरायला निघालो आणि तिसऱ्या गल्लीतच एक झाड दिसलं रोज ॲपल (जांब)च्या लाल-गुलाबी फळांनी लगडलेलं! नायर काकू फळं तोडत होत्या. मी गेटच्या आत शिरले आणि विचारलं, “काकू, काही फळं मिळतील का?” 


काकूंनी हसत-हसत कंपाउंडच्या भिंतीवर चढून मला पिशवीभर ताजी फळं दिली. दोन महिन्यांपूर्वी कोकणात ५० रुपयांना वाटा घेतली होती ती आठवण डोक्यात आली. तेव्हा जॅम करायचा विचार होता, पण जमला नव्हता. आणि आज? *किलोभर ताजी, रसाळ फळं घरापासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर!*


रस्त्याने आंबट-गोड फळं खात-खात घरी पोहोचलो. घरच्यांनी आश्चर्याने विचारलं, “अरे, तू आज कोकणात गेली होतास का?” मी हसत म्हणाले , “नाही बाई... तिसऱ्या गल्लीतूनच आणलीयेत ही!” सगळे थक्क झाले. “तुलाच बाई असं छान-छान सापडतं?” अशी टिप्पणी आलीच.


मग काय, रविवारचा दिवस आणि ताजी फळं... लगेच कामाला लागलो. गूगल केलं आणि समजलं की रोज ॲपल जॅम बनवणं खूप सोपं आहे. फक्त तीन साहित्य आणि थोडंसं प्रेम पुरेसं!


रोज ॲपल जॅम पाककृती

(Rose Apple Jam )


साहित्य

 अंदाजे १ छोटा बाउल जॅम होईल

- १ वाटी रोज ॲपलचा रस (किंवा २-२.५ वाट्या फळं)

- १ वाटी साखर (चवीप्रमाणे समायोजित करा)

- अर्ध्या लिंबाचा रस


कृती:


१.फळं चांगली धुवा.मागचा आणि पुढचा शेंडा काढू टाका. फळाचे बारीक तुकडे करा.


२.ब्लेंडरमध्ये फळांची बारीक प्युरी करा. चाळणीने गाळून स्वच्छ १ वाटी रस घ्या.


३. जॅम शिजवा- जाड तळाच्या कढईत रस आणि साखर एकत्र करा. मंद ते मध्यम आचेवर ठेवा. सतत ढवळत राहा. साखर विरघळल्यावर अर्ध्या लिंबाचा रस घाला. 


४. घट्ट होईपर्यंत शिजवत राहावे लागते.मिश्रण जाडसर होईपर्यंत (साधारण १५-२० मिनिटं) शिजवा. 

5. थोडासा जॅम थंड प्लेटवर टाका. बोटाने ओढला की रेष पडली तर तयार! गरम असतानाच स्वच्छ काचेच्या बरणीत भरून झाकण लावा.


५.थंड झाल्यावर फ्रिजमध्ये ठेवा. १ ते १.५ महिने सहज टिकेल..  

- गरमागरम पोळी सोबत jam चाखला...स्वाद अविस्मरणीय!स्वादही इकडं ताज्या फळांची आठवण करून देत होता. 😊


असा एक साधा रविवार, घराजवळ सापडलेली फळं आणि त्यापासून बनवलेलं घरगुती जॅम... केवळ चव  नाही तर एक rose apple आख्यान झालं. 😅


तुम्हीही आजूबाजूला नजर फिरवा. कदाचित तुमच्या गल्लीतही एखादं जादूई झाड लपलेलं असेल! 

-भक्ती

Monday, June 29, 2026

आंत्रप्रेन्युअर- शरद तांदळे

 



आंत्रप्रेन्युअर या शब्दाचा मागमूसही नसताना एक जिद्दी आणि मेहनती व्यक्ती सरकारी कामाचा काँट्रॅक्टर बनते आणि पुढे ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स चार्ल्स हस्ते प्रतिष्ठित पुरस्कार लंडन येथे मिळवते. ही व्यक्ती म्हणजे मराठी साहित्यातील लोकप्रिय लेखक, ‘न्यू इरा पब्लिशिंग हाऊस’चे संस्थापक आणि यशस्वी उद्योजक शरद तांदळे सर होय.

वडील शिक्षक असल्यामुळे शरद तांदळे यांना लहानपणापासूनच वाचनाची आवड जडली. बारावीनंतर त्यांना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. मात्र या वयात अभ्यासाकडे दुर्लक्ष करणे, मैत्री, राजकारणाची ओढ आणि वडिलांचे सल्ले न ऐकणे अशा अनेक अजाणत्या चुका घडल्या. अनेक तरुणांच्या महाविद्यालयीन जीवनात असेच स्वप्नांचे जग असते, त्यामुळे शरद सरांचा हा संघर्ष अनेकांना आपल्या जीवनाशी जोडल्यासारखा वाटतो.

शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेच यश मिळाले नाही. पुण्यात नोकरीसाठी अनेक ठिकाणी उंबरे झिजवले, पण यश मिळत नव्हते. आई-वडिलांच्या अपेक्षांचे ओझे अधिकच वाढले होते. अशा निराशेच्या काळात सरकारी विविध कामांचे काँट्रॅक्टर होण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला. बँक खाते उघडणे, विविध लायसन्स मिळवणे यासारख्या छोट्या-छोट्या गोष्टी ते स्वतः करत. इतरांना ते नेहमी सल्ला देत की, “बेसिक गोष्टी स्वतः करा, म्हणजे तुमची इमारत भक्कम उभी राहील.” कामाच्या बोज्यात अनेकदा तोटा झाला, तरीही सतत मेहनत करण्याची उर्मी आणि जिद्द त्यांना पुढे नेत राहिली. या प्रवासात अनेक चांगली माणसे जोडली गेली आणि त्यांच्या हातून अनेकांचे भलेही झाले.

या व्यस्त उद्योग जीवनात वडिलांच्या मायेपासून काहीसे दूर जावे लागले. अशा अवघड प्रसंगी बहुविविध वाचनाने त्यांना मोठी मानसिक ताकद मिळाली. वाचनामुळे मिळालेल्या प्रेरणेचा उल्लेख ते आपल्या लेखनात वारंवार करतात. त्यांच्या ‘रावण – राजा राक्षसांचा’ या कादंबरीची जन्मकथा देखील त्यांनी आपल्या अनुभवांतून सांगितली आहे.

शरद तांदळे यांना ब्रिटन राजघराण्याकडून दिल्या जाणाऱ्या Young Entrepreneur of the Year २०१३ या जागतिक पुरस्कारासाठी भारतातून निवडलेल्या मोजक्या नवउद्योजकांमध्ये स्थान मिळाले. अनेक मुलाखती आणि छाननीनंतर शेवटी लंडनमध्ये एका भव्य कार्यक्रमात प्रिन्स चार्ल्स यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिल्या पिढीतील (First Generation) उद्योजक म्हणून विशेष उल्लेखनीय आहेत.

‘रावण – राजा राक्षसांचा’ ही केवळ रामायणातील रावणाची पारंपरिक कथा नाही, तर पराक्रमी, विद्वान, वेदपंडित, कट्टर शिवभक्त, आयुर्वेदज्ञ आणि दूरदर्शी शासक म्हणून रावणाला नव्या दृष्टिकोनातून मांडणारी ऐतिहासिक कादंबरी आहे. लेखकाने रावणाला खलनायक न मानता त्याच्या गुणवत्तेवर, महत्वाकांक्षेवर आणि निर्मितीक्षमतेवर भर दिला आहे. ही कादंबरी मराठीत लोकप्रिय झाली असून तिचे इंग्रजी भाषांतरही (‘Ravan: The King of Rakshasas’) प्रकाशित झाले आहे.

हे पुस्तक वाचताना शरद तांदळे सरांचा प्रामाणिकपणा आणि खुल्या मनाने केलेला आत्मपरीक्षण वाचकाला जिंकून घेतो. जणू आपला एखादा जवळचा मित्रच आपल्याशी आपल्या यश-अपयशाची, संघर्षाची आणि शिकवणुकीची गोष्ट सांगत आहे, असा प्रत्यय येतो. त्यांचे बोलणे ऐकण्याची संधी मिळाली तर नक्की ऐका — उत्साहाचा फेसाळता झरा त्यांच्या अखंड आणि जोमदार भाषणातून तुम्हाला भरपूर प्रेरणा देईल.

शरद तांदळे यांचे ‘द आंत्रप्रेन्युअर’ हे आत्मकथनात्मक पुस्तक आणि ‘रावण’ ही कादंबरी मराठी उद्योजक साहित्य आणि ऐतिहासिक कादंबरी या दोन्ही क्षेत्रांत महत्त्वाचे योगदान आहेत. त्यांचा जीवनप्रवास आणि लेखन नव्या पिढीला मेहनत, जिद्द आणि सकारात्मक दृष्टिकोन यांची प्रेरणा देत राहील.

Saturday, June 20, 2026

हंपीचा ध्यास-४ (कृष्ण मंदिर,लक्ष्मी नरसिंह,बदवी लिंग ,प्रसन्न विरुपाक्ष मंदिर )


कृष्ण मंदिर
दोन्ही गणेशाचे दर्शन घेऊन मग आम्ही पुढे चालू लागलो.ऊन बरेच होते तेव्हा नारळ पाणीने जीवाला थंडावा देत.कृष्ण मंदिरापाशी पोहचलो.त्याचे ते भव्य ,ऊंचच ऊंच  प्रवेशद्वार विजयनगर साम्राज्याची भव्यता पुन्हा अधोरेखित करत होती .उदयगिरी किंवा उत्कल (सध्याच्या ओरिसा राज्यात) या पूर्वेकडील राज्याच्या विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी राजा कृष्णदेवराय यांनी १५१३ मध्ये त्यांचे मंदिर बांधले.
मंदिरात स्थापित केलेली मुख्य मूर्ती बाळकृष्णाची होती. ही मूर्ती आता चेन्नई येथील राज्य संग्रहालयात आहे.इ..स. १५१३ च्या एका शिलालेखात नमूद केल्यानुसार, या मोठ्या आणि सुशोभित, पूर्वेकडे तोंड असलेल्या मंदिराची प्रतिष्ठापना कृष्णदेवराय यांनी उदयगिरी (ओरिसा) येथून आणलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीने केली होती. पंचायतन शैलीत दोन आवारांसह बांधलेल्या या मंदिर संकुलात गर्भगृहासह मुख्य मंदिर, एक प्रवेशकक्ष, स्तंभयुक्त मंडप आणि सभागृहे, एक देवी मंदिर आणि अनेक उप-मंदिरे आहेत. याव्यतिरिक्त, मुख्य मंदिराच्या आग्नेय दिशेला एक स्वयंपाकघर आणि नैऋत्येकडील पहिल्या आवारात एक स्वतंत्र भांडार आहे. भव्य मनोरा असलेले पूर्वेकडील प्रवेशद्वार हे विजयनगर वास्तुकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. मंदिराच्या भिंतींवर भगवान कृष्णाची पौराणिक कथा असलेल्या भागवताचे आणि त्या काळातील जीवनाचे चित्रण कोरलेले आहे. महामंडपाच्या स्तंभांवर भगवान विष्णूच्या दहा अवतारांची शिल्पे आहेत. मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडे ५०० मीटरच्या रस्त्यावरील बाजाराकडे आणि त्यानंतर एका पवित्र पाण्याच्या तलावाकडे घेऊन जाते. मंदिराच्या आवारात स्थापित केलेल्या एका मोठ्या शिलालेखावर या मंदिराची कथा आणि विजयाची कहाणी कोरलेली आहे.

आत शिरलो तर दोन्ही भिंतींवर कोरलेली शिल्पे दिसली अगदी वरपर्यंत साधारण १२- १५ फूटापर्यंत हे कोरीव शिल्पे होती.मी यापूर्वी कृष्णमंदिरातील शिल्पाविषयी एक व्हिडियो पाहिला होता.त्यानुसार यावरील विष्णूचे दशावतार शोधू लागले .अगदी पायथ्याशी लतासुंदरीचे आखीव शिल्प आणि त्या तिने हातात धरलेल्या लता -वेली वरपर्यंत गेल्या आहेत आणि त्यावर गोलात हे दशावतार कोरलेले आहेत.

अगदी वर पाहिल्यावर या द्वाराच्या छतावर एक अनोखे कोरीवकाम आहे-चंद्रग्रहणाचे दृश्य.!त्यात चंद्रातील ससा आणि त्याच्याकडे सरकत येणारे राहू-केतू स्वरूपातील दोन सर्प दाखवले आहेत. हे चंद्रग्रहणाच्या पौराणिक कल्पनेचे कलात्मक चित्रण मानले जाते.या शिल्पात राहू हा सर्पाकार अथवा राक्षसी आकृतीच्या स्वरूपात दाखवला असून तो चंद्राला गिळण्याचा प्रयत्न करताना दिसतो. 
भारतीय पुराणांनुसार समुद्रमंथनाच्या वेळी अमृतपान केलेल्या राहूचे डोके भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने छाटले. मात्र अमृत पिल्यामुळे तो अमर झाला. तेव्हापासून सूर्य आणि चंद्र यांनी त्याची तक्रार केल्याचा राग मनात धरून राहू वेळोवेळी त्यांना गिळण्याचा प्रयत्न करतो. सूर्य किंवा चंद्र काही काळ झाकले गेले की ग्रहण होते, अशी लोकमान्यता होती.ही कथा केवळ धार्मिक श्रद्धेपुरती मर्यादित नाही तर  ती सामान्य जनतेला आकाशातील घटनांचे स्पष्टीकरण देणारी लोकप्रिय आख्यायिका होती. त्यामुळे मंदिरातील शिल्पकारांनी ग्रहणासारख्या खगोलीय घटनेलाही कलात्मक रूप दिले.

समोर असणारे भव्य प्रांगण आणि मुख्य मंदिर आणि उपमंदिरांचे आकर्षक छोटी छोटी कलात्मक शिखरे पाहून मी थक्क झाले.अशी तीन उपमंदिरे या मंदिराच्या प्रांगणात आहेत.

आता बाहेर पडतांना लक्ष समोरच्या गोपुराच्या शिल्पाकडे जाते .गुलाबी-लालसर रंगाचे हे काम अतिशय मोहक आहे,परंतु हवामान, वर्षाव आणि जीर्णता यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे, तरीही उरलेले भाग अद्भुत आहेत.त्यामुळेच ASI कडून तिथे डागडुजीचे  काम सुरु असून अनेक रॉड लावले होते .कृष्ण मंदिराच्या गोपुरावर मूळत विष्णूचे विविध अवतार,कृष्णलीला,देव-देवता,गंधर्व,अप्सरा.याली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे 'युद्धप्रसंग' दाखवले आहे .
ही शिल्पे स्टुको (stuscco)शिल्पे आहेत.स्टुको ही चुनखडी, वाळू, गूळ, वनस्पतीजन्य घटक, शंखचूर्ण आणि कधी कधी अंड्याचा बलक किंवा इतर बांधणीकारक पदार्थ यांचे मिश्रण करून तयार केलेली सजावटीची कलाशैली आहे. या मिश्रणापासून मूर्ती, नक्षीकाम, देव-देवतांच्या आकृती आणि वास्तूवरील अलंकार घडवले जातात.दगड कोरून शिल्प तयार करण्याऐवजी स्टुकोमध्ये ओल्या मिश्रणाला आकार देऊन आकृती तयार केली जाते. नंतर ते वाळल्यावर त्यावर रंगकामही केले जात असे.

हे शिल्प दृश्य कृष्णदेवरायांच्या १५१२-१५१३ च्या कालिंग/उदयगिरी/ओडिशा मोहिमेतील विजय दर्शवते. त्यांनी गजपती राजा प्रतापरुद्रावर विजय मिळवला.हे शिल्पे त्या विजयाचे स्मारक आहेत.काही संशोधकांना हे फक्त "विजय" नव्हे तर युद्धातील हानी आणि मानवी भावनाही दाखवतात असे वाटते . उदाहरणार्थ, सैनिकांच्या चेहऱ्यांवरील विविध भाव.
हा लेख नक्की वाचा,हा युद्ध प्रसंगाचे खूप सुंदर वर्णन आहे .
https://www.spottedowlets.com/2019/11/krishna-temple-in-hampi-decoding…

या युद्धप्रसंगात योद्धे ढाली घेऊन.घोडे काही जोमदार, काही राजाच्या समोर,हत्ती युद्धरथ किंवा सैन्याच्या रांगेत(हे मला ओळखता आले नाही)
सैन्याची रचना, राजा कृष्णदेवराय  एका घोड्यावर स्वार दिसत आहेत,काही वर्णनांनुसार गंभीर चेहऱ्याने दिसत आहे. सैनिकांच्या चेहऱ्यावरील भाव काही हसरे, काही गंभीर किंवा दुखी दिसत आहेत.युद्धातील हालचाल, पडलेले सैनिक इत्यादी दाखविले आहे .व दुसऱ्या बाजूला गोपुरावर भगवान कृष्णाच्या लीला  संबंधित शिल्प आहेत.

 

आता आम्ही बाहेर पडलो.मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडे ५०० मीटरच्या रस्त्यावरील बाजाराकडे आणि त्यानंतर एका पवित्र पाण्याच्या तलावाकडे घेऊन जाते.हा खरं तर मुख्य रस्ता -सपाट असा -रथांचा रस्ता होता, जो एकेकाळी 'कृष्ण बाजार' म्हणून ओळखल्या जाणाऱ्याबाजाराकडे जात असे. अनेक मंडपात बाजारातील दुकाने होती.












कृष्ण मंदिराच्या दक्षिणेला,२०० ते ३०० मीटर अंतरावर विशाल एकाश्म नरसिंह मूर्ती आहे. दक्षिण भारतात  नरसिंह पूजा खूप प्रचलित आहे.हंपीतील ही मूर्ती त्या परंपरेचे एक प्रमुख उदाहरण आहे.ही मूर्ती कृष्णदेवराय १५२८ ई. यांच्या काळात, कृष्णभट्ट या शिल्पकाराने एकाच दगडातून घडवली. विजयनगर साम्राज्याच्या शिखर काळातील ही एक अत्यंत महत्त्वाची कलाकृती आहे. कृष्णदेवराय वैष्णव भक्त होते आणि नरसिंह हे धर्मरक्षणाचे प्रतीक मानले जाते.मूर्ती सुमारे २२ फूट उंच असून ती एका अखंड ग्रॅनाइट शिळेतून घडवण्यात आली आहे.

विशेषतः होयसळ आणि विजयनगर स्थापत्यामध्ये उग्र नरसिंह, योग नरसिंह आणि लक्ष्मी नरसिंह ही रूपे प्रामुख्याने दिसून येतात.

१. उग्र नरसिंह 
उग्र नरसिंह हे विष्णूच्या क्रोध आणि धर्मसंरक्षणाचे प्रतीक मानले जाते. या रूपात नरसिंह हिरण्यकश्यपूचा वध करताना दाखवला जातो. सिंहमुख, मोठे गोल डोळे, बाहेर आलेले दात, फुगलेल्या आयाळीचे केस आणि अनेक हातांत शस्त्रे अशी त्याची वैशिष्ट्ये असतात.
बहुतेक मंदिरांच्या बाह्य भिंतींवर, द्वारशाखांवर किंवा मंडपातील शिल्पपट्टिकांमध्ये हे रूप कोरलेले आढळते. यामागील संकल्पना अशी की मंदिरात प्रवेश करणाऱ्या भक्तांचे आणि देवालयाचे संरक्षण करणारा उग्र देव बाह्य भागात असावा.

२. योग नरसिंह
योग नरसिंह हे पूर्णतः वेगळे आणि शांत स्वरूप आहे. हिरण्यकश्यपूचा वध झाल्यानंतर क्रोध शांत होऊन नरसिंह योगध्यानात स्थिरावला आहे, अशी या रूपामागील कल्पना आहे.या मूर्तीमध्ये पद्मासन किंवा योगासन,गुडघ्यांभोवती योगपट्टा,ध्यानस्थ मुद्रा,प्रसन्न किंवा गंभीर मुखमुद्रा अशी वैशिष्ट्ये दिसतात.
होयसळ स्थापत्यातील अनेक नरसिंह मंदिरांच्या गर्भगृहात योग नरसिंहाची प्रतिष्ठा करण्यात आली आहे. भक्तांना भय नव्हे तर आध्यात्मिक शांततेचा अनुभव देणे हा यामागील उद्देश असावा.

३. लक्ष्मी नरसिंह
हे नरसिंहाचे सर्वाधिक लोकप्रिय आणि भक्तिपर स्वरूप आहे. या रूपात लक्ष्मी देवी नरसिंहाच्या मांडीवर किंवा शेजारी बसलेली असते.लक्ष्मीच्या उपस्थितीमुळे उग्रतेचे रूपांतर करुणा आणि संरक्षणात होते. त्यामुळे ही प्रतिमा शक्ती आणि सौम्यता यांचा सुंदर समन्वय दर्शवते.

हंपीतील नरसिंह कोणत्या प्रकारचा?

लक्ष्मी नरसिंह ह्या हंपीतल्या मूर्तीबाबत एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागते. आज ती 'उग्र नरसिंह' म्हणून प्रसिद्ध असली तरी ती हिरण्यकश्यपूचा वध करणारी पारंपरिक उग्र नरसिंह प्रतिमा नाही. त्या मूर्तीमध्ये राक्षस नाही, युद्धदृश्य नाही आणि वधप्रसंगही दाखवलेला नाही.

मूळतः ती लक्ष्मी नरसिंह प्रतिमा होती. नरसिंहाच्या मांडीवर लक्ष्मी बसलेली होती. कालांतराने ताळिकोटच्या युद्धानंतर झालेल्या विध्वंसात लक्ष्मीचा बहुतांश भाग तुटून गेला.यामुळे मूर्तीचे मूळ सौम्य रूप हरवले आणि आज ती अधिक उग्र वाटते.  लक्ष्मीची मूर्ती नष्ट झाल्यामुळे आज केवळ विशाल सिंहमुखी नरसिंह दिसतो आणि त्याच्या तीव्र मुखमुद्रेमुळे त्याला "उग्र नरसिंह" म्हणण्याची प्रथा पडली.म्हणून शिल्पशास्त्रीय दृष्टीने हंपीची मूर्ती लक्ष्मी नरसिंह आहे, तर लोकप्रिय पर्यटनपर भाषेत ती उग्र नरसिंह म्हणून ओळखली जाते. हा फरक समजून घेणे अभ्यासकांसाठी महत्त्वाचे आहे.
यात अजून एक भर पडली ती ही मूर्ती योग नरसिंहही  आता भासते.हंपीतील लक्ष्मी नरसिंह मूर्तीचा योग पट्टा हा मूर्तीच्या सर्वात चर्चित आणि लक्षात येणारा भाग आहे.योग पट्टा हा योगासनातील स्थिरतेसाठी वापरला जाणारा पट्टा आहे. तो गुडघ्याभोवती किंवा पायांना बांधला जातो, जेणेकरून दीर्घकाळ ध्यान/योग मुद्रेत बसता येते.ही मूर्ती क्रॉस-लेग्ड (पद्मासनासारखी) योग मुद्रा मध्ये आहे. पाय ओलांडलेले, हात गुडघ्यांवर आणि गुडघे एकत्र धरलेले दिसतात.१९८० च्या दशकात ASI ने जीर्णोद्धार केला.नवीन गुडघे आणि दगडी योग पट्टा जोडला गेला. हा पट्टा गुडघ्यांना एकत्र बांधतो.
यामुळे मूर्ती आता योग नरसिंह किंवा लक्ष्मी नरसिंह म्हणून ओळखली जाते. काहीजण या जीर्णोद्धाराला वादग्रस्त मानतात, कारण मूळ उग्र रूप बदलले गेले.


परंतु या एकाच मूर्तीने तिन्ही उग्र,योग,लक्ष्मी नरसिंह म्हणून ओळखले जाणे खरंच खूप अद्भुत योगायोगच म्हणावे लागेल :)
नरसिंह हा विष्णूचा चौथा अवतार जो मानवी शरीर + सिंहमुख दर्शवतो.जिथे मानव = बुद्धी ,सिंह = शक्ती म्हणजेच शक्ती आणि विवेक यांचा समतोल सृष्टीत दाखवतात .मूर्ती पाहताक्षणी सर्वांत प्रथम लक्षात येतात बाहेर आलेले  डोळे आणि उग्र चेहरा. सिंहाचे केस, तीक्ष्ण दात आणि भयावह अभिव्यक्तीमुळे तिला उग्र नरसिंह म्हणून ओळखले जाते. पण त्याच वेळी ती योगासनात बसलेली आहे. गुडघ्याभोवती योग पट्टा (बांधलेला, जो दीर्घकाळ ध्यानस्थ राहण्यासाठी वापरला जातो.
मूर्ती अदिशेषनागाच्या तीन वळणांवर बसलेली आहे. शेषनागाचे सात फणे  डोक्यावर उभे राहून एक दिव्य छत्र तयार करतात.भारतीय तत्त्वज्ञानात शेष म्हणजे अनंत काळ,विश्वाचे आधारतत्त्व,ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणून ही मूर्ती केवळ देवप्रतिमा नसून "विश्वरक्षक" संकल्पना दर्शवते .मूळतः नरसिंहाच्या मांडीवर लक्ष्मीदेवी बसलेल्या होत्या आता केवळ तिचा एक हात कंबरेभोवती दिसतो. हात, अलंकार आणि लक्ष्मीची पूर्ण आकृती १५६५ च्या तालीकोटा युद्धानंतरच्या आक्रमणात नष्ट झाली, तरीही ही मूर्ती आजही उभी आहे जणू इतिहासाला आव्हान देत!
जर तुम्हाला आवारात आत जाण्याची संधी मिळाली (मला मिळाली नाही,मूर्ती सामान्यांसाठी कारणपूर्णपणे बंदिस्त करण्यात आली आहे ), तर तुम्हाला देवीचा हात विष्णूच्या पाठीवर आलिंगन अवस्थेत विसावलेला दिसतो,असे सांगितले जाते .




बदवी लिंग 


नरसिंहापासून काही पावलांवरच शेजारीच बदवीलिंग आहे.हे हंपीतील सर्वात मोठ्या शिवलिंगांपैकी एक आहे-सुमारे ३ मीटर (९-१० फूट) उंच!!
एकाच दगडातून कोरलेले ह्या लिंगावर तीन डोळ्यांची नक्षी स्पष्ट दिसते.मंदिराचे गर्भगृह नेहमी पाण्याने भरलेले असते.ह्या शिवलिंगाचा पाया २ ते ३ फूट 
सतत पाण्यात  राहते. तुंगभद्रा नदीतून एक छोटी कॅनॉल ने पाणी मंदिरात आणले जाते, ज्यामुळे वर्षभर पाणी आटत नाही. गर्भगृह नेहमी पाण्याने भरलेले असते.पूजा करणारे भक्त किंवा पुजारी पाण्यात चालत लिंगाजवळ जातात.

"बदवी" किंवा "बडाव" म्हणजे कन्नड भाषेत गरिब किंवा दरिद्री असा होतो.
कथेनुसार, हे लिंग एक गरिब शेतकरी स्त्री  ने आपल्या भक्तिभावाने बनवले किंवा बनवण्यास प्रेरणा/अर्थ साहाय्य दिले. तिच्या साध्या-सोप्या श्रद्धेमुळे हे नाव पडले. ही कथा हंपीच्या लोकपरंपरेत प्रसिद्ध आहे.

नरसिंह आणि बदवीलिंग शेजारीच का?हा प्रश्न अनेक संशोधकांना पडतो.वैष्णव आणि शैव परंपरा अनेकदा वेगळ्या मानल्या जातात.परंतु विजयनगरमध्ये दोन्ही परंपरांना समान महत्त्व होते.त्यामुळे नरसिंह  'विष्णू' आणि बदवीलिंग 'शिव' या दोन प्रतिमा एकत्र उभ्या राहून धार्मिक समन्वय दर्शवतात.

पुढच्या ठिकाणाकडे आता चालू लागलो -प्रसन्न विरुपाक्ष मंदिराकडे ...रस्त्याच्या दोन्ही बाजूला केळीच्या बागा होत्या ,त्यामुळे चालायला मजा येत होती .पण नंतर लक्षात आले कि मंदिराकडचे अंतर खूप आहे ,तेव्हा रिक्षा करून तिकडे गेलो.


प्रसन्न विरुपाक्ष मंदिर 



प्रसन्न विरुपाक्ष मंदिर हे हंपीतील सर्वात रहस्यमय आणि अनोख्या मंदिरांपैकी एक आहे. याला सामान्यतः भूमिगत शिवमंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर विजयनगर काळात बांधले गेले असून, जमिनीच्या पातळीपेक्षा काही मीटर खाली स्थित आहे. मंदिराकडे जाताना अनेक पायऱ्या उतरत खाली जावे लागते .मग चारी बाजुंना चिरेबंदी दगडांसारखे दगड वापरून भिंती बांधल्या आहेत .यामुळे हे ठिकाण अजूनच गूढ वाटते.

आजच्या जमिनीच्या पातळीवरून पाहिले तर मंदिराचे छप्पर जवळजवळ जमिनीच्या समांतर दिसते, परंतु मुख्य सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह खालच्या स्तरावर आहेत. यामुळे संपूर्ण मंदिर जमिनीत दडलेले असल्याचा भास होतो, म्हणूनच त्याला भूमिगत मंदिर म्हणतात.
या मंदिराचे आणखी एक गूढ वैशिष्ट्य म्हणजे त्यातील पाणी. गर्भगृह आणि आतील भाग वर्षभर पाण्याने वेढलेले असतात. पावसाळ्यात पाण्याची पातळी आणखी वाढते. काही संशोधकांच्या मते हे पाणी तुंगभद्रा नदीशी जोडलेल्या जलमार्गांमुळे येत असावे, मात्र याचे नेमके कारण आजही निश्चितपणे ज्ञात नाही. पाण्यात बुडालेले असलेले शिवलिंगाचे दर्शन येथे खास अनुभवास येते.
हे मंदिर विजयनगर स्थापत्यशैलीचे असले तरी हंपीतील इतर भव्य मंदिरांपेक्षा वेगळे आहे. येथे साधे दगडी स्तंभ, अलंकरणाचा कमीतकमी वापर, प्रशस्त महामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी साधी आणि प्रभावी रचना दिसते. हजारराम मंदिर किंवा कृष्ण मंदिरातील सूक्ष्म नक्षीकाम येथे आढळत नाही. त्यामुळे काही अभ्यासकांच्या मते हे मंदिर राजघराण्याच्या खासगी पूजेसाठी वापरले जात असावे.
या मंदिराबाबत एक रोचक बाब म्हणजे ते जवळजवळ चारशे वर्षे माती आणि गाळाखाली पूर्णपणे झाकले गेले होते. १९८० च्या दशकात उत्खनन आणि संवर्धनाच्या कामांदरम्यान ते पुन्हा प्रकाशात आले.
प्रसन्न विरुपाक्ष नावाचे विशेष महत्त्व आहे. हंपीतील मुख्य विरुपाक्ष मंदिर हे भव्य सार्वजनिक तीर्थक्षेत्र आहे, तर हे भूमिगत मंदिर शिवाच्या प्रसन्न, शांत आणि कृपाळू स्वरूपाला समर्पित मानले जाते.
आता आम्ही पुन्हा मुख्य विरुपाक्ष मंदिराकडे निघालो ....

-भक्ती

 

संदर्भ

 https://www.spottedowlets.com/2019/11/krishna-temple-in-hampi-decoding.html

https://hampi.in/krishna-temple

https://kevinstandagephotography.wordpress.com/2015/04/18/krishna-temple-hampi/

https://nanchi.blog/2020/03/27/lakshmi-narasimha-statue-hampi-monolith-statueplaces-to-visit-in-hampi/

Tuesday, June 16, 2026

तुर्की येथील ऐतिहासिक स्थळांशी निगडित वेब सीरीज-द गिफ्ट आणि राईज ऑफ एम्पायर्स: ऑटोमन

 #तुर्की येथील ऐतिहासिक स्थळांशी निगडित वेब सीरीज



माझ्यासारख्या इतिहासाची आवड असणाऱ्या सामान्य मुलीच्या बकेट लिस्टमध्ये इराणच्या ऐतिहासिक आणि आकर्षक स्थळांनंतर तुर्कीतील इस्तांबूल या शहराचे नाव आवर्जून येते. प्रत्यक्षात तिथे जाण्याची संधी कधी मिळेल याची शाश्वती नसली, तरी आजच्या डिजिटल युगात मनाने जगभर भटकण्याची सुविधा आपल्याला मिळाली आहे. अशाच मनस्वी प्रवासात मला तुर्कीच्या इतिहास, पुरातत्त्व आणि संस्कृतीशी संबंधित दोन उत्कृष्ट नेटफ्लिक्स वेब सीरीज पाहायला मिळाल्या. एक म्हणजे रहस्य, अध्यात्म आणि कल्पनारम्यतेचा संगम असलेली द गिफ्ट (Atiye) आणि दुसरी म्हणजे इतिहासाला जिवंत करणारी राईज ऑफ एम्पायर्स: #ऑटोमन


द गिफ्ट (#Atiye) ही तुर्कीतील जगप्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ गोबेकली टेपेच्या पार्श्वभूमीवर आधारित फँटसी-मिस्ट्री मालिका आहे. इस्तांबूलमध्ये राहणारी आतीये नावाची चित्रकार मुलगी तिच्या आयुष्यात अचानक समोर आलेल्या एका गूढ चिन्हामुळे प्राचीन इतिहास, स्वतःचा भूतकाळ आणि विश्वाच्या रहस्यमय शक्तींशी जोडली जाते. Şengül Boybaş यांच्या Dünyanın Uyanışı या कादंबरीवर आधारित असलेल्या या मालिकेत रहस्य, आध्यात्मिकता, विज्ञान आणि मानवी भावविश्व यांचे अनोखे मिश्रण पाहायला मिळते. तीन सीझन्स आणि चोवीस भागांमध्ये उलगडणारी ही कथा केवळ मनोरंजन करत नाही, तर गोबेकली टेपेसारख्या प्राचीन स्थळाविषयी कुतूहलही निर्माण करते. प्राचीन संस्कृतींचे संकेत, प्रतीके आणि मानवाच्या अस्तित्वाविषयीचे प्रश्न यांना आधुनिक कथानकाशी जोडण्याचा या मालिकेचा प्रयत्न प्रभावी वाटतो.


दुसरीकडे राईज ऑफ एम्पायर्स: #ऑटोमन ही मालिका इतिहासप्रेमींसाठी पर्वणीच आहे. डॉक्युमेंट्री आणि नाट्यमय पुनर्निर्मिती  यांचा सुरेख संगम असलेल्या या मालिकेत ऑटोमन साम्राज्याच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या घटनांपैकी एक असलेल्या १४५३ मधील कॉन्स्टँटिनोपलच्या विजयाची कथा मांडली आहे. सुलतान मेहमेद दुसरा याने बायझंटाईन साम्राज्याची राजधानी जिंकण्यासाठी केलेली तयारी, विशाल तोफांचा वापर, नौकादलाला जमिनीवरून नेण्यासारख्या अभिनव लष्करी युक्त्या आणि निर्णायक युद्धांचे चित्रण अत्यंत प्रभावीपणे करण्यात आले आहे. दुसऱ्या सीझनमध्ये मेहमेद आणि व्लाद द इम्पेलर यांच्यातील संघर्ष दाखवण्यात आला आहे. इतिहासतज्ज्ञांच्या माहितीपूर्ण मुलाखती आणि नाट्यमय दृश्यांमुळे ही मालिका केवळ माहितीपर न राहता अत्यंत रंजकही बनते.


ऑटोमन साम्राज्याची स्थापना उस्मान प्रथम याने इ.स. १२९९ मध्ये केली. पुढे मेहमेद दुसऱ्याने १४५३ मध्ये कॉन्स्टँटिनोपल जिंकून इतिहासात नवे पर्व सुरू केले. सुलतान सुलेमान द मॅग्निफिसंटच्या काळात हे साम्राज्य सर्वाधिक विस्तारले आणि अनेक शतकांपर्यंत युरोप, आशिया व आफ्रिकेच्या विस्तीर्ण प्रदेशांवर त्याचे वर्चस्व राहिले. अखेरीस १९२२ मध्ये ऑटोमन साम्राज्याचा अस्त झाला आणि आधुनिक तुर्कस्तानाचा उदय झाला.


या दोन्ही मालिका तुर्कीच्या समृद्ध वारशाचे दोन वेगळे पैलू दाखवतात. 'द गिफ्ट' प्राचीन पुरातत्त्व, गूढता आणि आध्यात्मिकतेच्या माध्यमातून कल्पनाशक्तीला चालना देते, तर 'राईज ऑफ एम्पायर्स: ऑटोमन' इतिहासातील महत्त्वपूर्ण घटनांना जिवंत स्वरूपात आपल्या समोर उभे करते. इस्तांबूल आणि तुर्कीची भटकंती प्रत्यक्षात शक्य नसली तरी या मालिका पाहताना मन मात्र त्या भूमीत सहज पोहोचते. त्यामुळे माझ्या बकेट लिस्टमध्ये इस्तांबूलसोबत या दोन्ही वेब सीरीजनाही विशेष स्थान आहे.

https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi3oa-D003zuw2NDHl__rG_mafi1BTwl5-gMDib1eA4T6_2xaXnzG31qva9kCiUa4UoVSgUS8Py8Oi07dYZ-LbFDxwJJsfPw04rs3PhMcMlywgn2rjJrTAJous86E9DlKVDTMIOMxM77f6d21vJD00FO4OswvxnAc5CnYjX9cgE0lGY4h-Jb3lcR3y2ioVX/s1536/ChatGPT%20Image%20Jun%2017,%202026,%2011_45_34%20AM%20(1).png