Wednesday, December 27, 2023

राजमा गस्सी



गुगला विचारले असता त्याने गस्सी म्हणजे "थिक करी" असं सांगितलं आहे 😀 तर दक्षिण भारतात इडली,डोशासाठी वापरल्या जाणाऱ्या पोडीची तर मी फैन झालेच आहे अगदी डबा भरून ठेवते,लेकीला भातावर कधी चटणी तेल म्हणूनही आवडते.यात डाळी वापरल्या जातात हे आवडतं.त्याचाच एक पुढचा पदार्थ समजला गस्सी भाजी.यात मसाला ताजा बनवून वापरल्या गेल्याने चविष्ट पदार्थ होतो.मी राजमा वापरला.गस्सीसाठी हरभरे,वाटाणे,चवळी असे भिजवून -शिजवून वापरले जाऊ शकतात.

साहित्य -

१ वाटी आठ तास भिजवलेला राजमा

१/२ वाटी चिरलेला बटाटा

१/२ वाटी चिरलेले गाजर

मसाला

२ चमचे धने

२-२ चमचे उडीद डाळ,हरभरा डाळ

१ चमचा तीळ,जिरे

१/२ चमचे मेथी दाणे

१ वाटी ओले वा सुके खोबरे

३-४ लाल मिरच्या

चिंच गूळ कोळ छोटी १/२ वाटी

चिरलेला कांदा टोमॅटो -१/२ वाटी प्रत्येकी

कृती-


१.राजमा आणि बटाटा-गाजर स्वतंत्र मीठ आणि हळद टाकून कुकर मध्ये शिजवून घ्यायचे(कमीच शिट्ट्या कारण राजमा,भाज्या गाळ होऊ नये)

२.मसाला -धने व इतर सर्व मसाल्याचे पदार्थ एक चमचा तेलात परतून घ्यायचे.व परतलेला कांदा टोमॅटो, कोथिंबीर टाकून बारीक वाटायचा , खोबरे सुकं असेल तर किंचित पाणी टाकावं,सरभरीत होण्यासाठी.

३.मोहरीची, कडीपत्ता फोडणीनंतर भाज्या परतून घ्याव्यात. मग मसाला टाकून परतून घ्याव्यात.

४.चिंच-गुळ कोळ टाकावा.

५.१/२  वा १ फुलपात्र पाणी टाकून १० मिनिटे गस्सी भाजी शिजू द्यावी.

खोबर्याचा आणि चिंच गुळाचा स्वाद इतका फ्रेश लागतो की क्या बात है😊

पोळी वा डोसा वा अप्पे वा घावण बरोबर गस्सी करी फस्त करा!

-भक्ती

Saturday, December 16, 2023

डॉ.स्वामिनाथन -३ (भारतीय हरितक्रांती घडली)

 


फोटो सौजन्य - livemint.com

डॉ.स्वामिनाथन -३ (भारतीय हरितक्रांती घडली)

ब्रिटीश राज्यानंतर स्वतंत्र भारताकडे प्रमुख जबाबदारी होती प्रचंड वेगाने वाढणारी लोकसंख्येला पोसायची.ब्रिटीश धोरणांमुळे शेतीमध्ये क्रांती ऐवजी शेतकरी शोषण आणि दुष्काळ यांसारख्या समस्या सतत आजूबाजूला असता.अजूनही ‘जहाजाच्या अन्नावर ‘अवलंबून असणाऱ्या भारताचे प्रतिमा बदलण्यासाठी प्रथम पंतप्रधान नेहरू यांनी शेतीमध्ये संरचनात्मक ,संस्थात्मक सुधारणा करण्यासाठी वैज्ञानिकांना उपाययोजना करण्यास सांगितले.१९४७-१९६१ पर्यंत अनेक पायाभूत सुविधनाचा समावेश शेतीत होत गेला.परंतु तंत्रज्ञानातील मागासलेपणामुळे अजुन्ही हवी तशी उत्पादकता मिळत नव्हती.याचा परिणाम असा की अजुनही पीएल-४८० सारख्या करारानुसार अमेरिकेकडून निकृष्ठ गव्हाची आयात भारताला सहन करावी लागत असे.१९६१ चीन युद्धानन्तर त्यात आणखीनच भर पडून दरही खूप वाढवले गेले.पण Begging Bowl to Bread Basket असा प्रवास लवकरच होणार होता.

१९६१ साली डॉ.ए.बी जोशी यांच्या नेतृत्वात एक टीम जगातील  विविध शेती संशोधन संस्था यांना भेट देत होती.तेव्हा मेक्सिकोतील बोरलॉग यांच्या संशोधनाने भारावलेल्या टीमने त्यांना भारतात पाचारण करण्याचे ठरवले.फोर्ड फोंडेशान यांनी याबाबत आर्थिक मदत देण्याचे ठरवले.यासाठी काही टन गहू बियाणे तात्काळ आयात करण्याची परवानगी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिली.

बोरलॉग यांची टीम आणि डॉ.स्वामिनाथन यांनी दुसऱ्या पंचवार्षिक योजने अंतर्गत ही योजना राबविण्याचे ठरविले.

डॉ .स्वामिनाथन आणि सहकाऱ्यांनी राबविलेले काही मुद्दे-

१.HYV high yeilding variety अधिक उत्पादन देणारे बियाणे शेतकऱ्यांना पुरवणे.यासाठी बोरलॉग यांनी बनविलेलेया चार ३.सोनोरा ६४  ४. सोनोरा ६३ ५.लर्मारोजा ६४ आणि मियो ६१४ या प्रजातींबरोबर segregrating lines(F2-F5) याही भारतात आणल्या गेल्या.

(या बुटक्या गव्हामुळे जनावरांना चार कमी पडेल अस म्हणत काही वैज्ञानिकानी याला विरोधही केला.पण या योजनेचा प्रमुख हेतू जनावरांपेक्षा माणसाच्या मुखात  अन्न पडावे हा स्पष्टच होता त्यामुळे याला विरोध मावळला.

२.प्रदेश निवड- प्राथमिक चरणासाठी पाण्याची व जमिनीची उपलब्धता अधिक असणारे राज्ये म्हणजे पंजाब,हरियाणा,पश्चिम उत्तर प्रदेश यांची निवड करण्यात आली.

३.सिंचन-सिंचन सुविधेसाठी अनेक विहिरीई,ट्युबवेल बनविण्यात आल्या.

४.रासायनिक खते-भारतात सैन्द्रीय खतांचा वापराच होत असे.तेव्हा पिकांमध्ये रोग पडू नये,त्यांची रोगप्रतिकार क्षमता सुधारावी यासाठी नायट्रोजन,पोटाशियm,सल्फर युक्त रासायनिक खत पुरविण्यात आले.

५. आधुनिक उपकरणे-ट्रक्टर,नांगर ,मुबलक वीज पुरविली गेली.

६. कृषी सहायत्ता दुप्पट करण्यात आली.

७.कृषी मूल्य आयोग बनवून हमीभाव देण्याचे मान्य केले.

८.कृषी विज्ञान केंद्राची स्थापना करून माहिती सहज मिळावी याची उपाय योजना केली.

या सर्व गोष्टींवर योग्य कार्यवाही करण्यात आली.अनेक शेतकर्यांनी याचा स्वीकार केला आणि १९६६-१९६८ या काळात गहू धान्याच्या उत्पादनात तिपटीने वाढ झाली.

याच बरोबर तांदूळाच्या विकसित प्रजाती जया,रत्ना या  तैवान जैपोनिक सुधारित जातीतून IRRI,Philippins यांनी विकसित करून भारतात पाठवल्या.इतर तीन पिके बाजरी,मका,ज्वारी या पिकांच्याही उत्पादनात वाढ झाली.

जून १९६८ साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतात हरितक्रांती घडली आहे याची घोषणा केली.८ मार्च १९६८ ला विल्ययम एस गौड यांनी जगातल्या वाढत्या शेती उत्पादाकेहून ग्रीन रिव्होल्युशन हा शब्द पहिल्यांदा वापरला होता.


फोटो सौजन्य -ट्विटर

दुसऱ्या टप्प्यात म्हणजे ७३-८३ मध्ये आंध्र,तामिळनाडू,कर्नाटक,गुजरात,महाराष्ट्र,पूर्व उत्तर प्रदेश याठिकाणी गहू ,तांदूळ बरोबरीनेच धने या पिकांत विक्रमी वाढ दिसली.महाराष्ट्रातीलं हरित क्रांतीसाठी पंजाबराव देशमुख आणि वसंत नाईक यांचे योगदानही बहुमुल्य होते.

तिसऱ्या टप्प्यात पूर्वेकडील राज्ये बिहार,उडीसा,बंगाल येथे हरित क्रांती घडली.

काही शेतकरी या उत्पादनातील गहू लाल आहे आणि पोळ्या नीट होत नाही याची तक्रार करू लागले तेव्हा segrigrating lines वापरून प्रयागांतीसोनालिका,कल्याण रोजा या सुधारित प्रजाती बाजारात आणल्या.(सध्या लोकवन,शरबती,राजवाडी,खपली गहू इ.या बनवलेल्या प्रजाती लोकप्रिय आहेत).

हरितक्रांतीचे सकारात्मक परिणाम-

१.अन्नधान्याच्या बाबतीत भारत आत्मनिर्भर झाला.

२.धान्याची निर्यात वाढून आयात थांबली

३.दुष्काळावर सहज मात करता येवू लागली.

४.अल्प भू धारक शेतकरी कमी उत्पादन,कर्जबाजारीपणा या समस्येतून सुटला.

५.उत्पादन वाढल्यामुळे आर्थिक सुबत्ता वाढली.एक संपन्न जीवनशैली शेतकरी जगू लागला.

६.गैर कृषी ग्रामीण समाज उदयाला आला.अनेक इतर शेतीपूरक व्यवसाय वाढले.

हरीक्रांतीचे नकारात्मक परिणाम

१.विषमता-हरितक्रांतीचा पहिला टप्पा यशस्वी पणे पंजाब हरियाणा भागात झाला इतरत्र यांची यशस्विता त्याप्रमाणात थोडी कमीच होती.त्यामुळे शेतकरी वर्गात विषमता आढळली.

२.जमीनीच्या किंमती वाढल्या.

३.रासायनिक खतांच्या अमर्यादित वापरांमुळे अनेक रोगांचा शिरकाव माणसांत झाला.पोटाश,सल्फर पाण्यात मिसळून संपर्कात येत गेले.कर्करोगाचा विळखा कित्येक कुटुंबात झाली. प्राणी-जनावरही यामुळे अधिक रोगांना बळी पडून वंध्यत्वही दिसले.

एव्हरग्रीन रिव्होल्युशन(Evergreen Revolution)

रासायनिक खतांच्या अमर्यादित वापरामुळे ही ग्रीन रिव्होल्युशन Green Revolution -ग्रीड रिव्होल्युशन(Greed Revolution)मध्ये बदलली होती.ही बाब डॉ.स्वामिनाथन यांना आता अस्वस्थ करीत होती.याबाबत त्यांना हरितक्रांती अशास्त्रीय पद्धतीने राबवल्याचे अनेक आरोप कायम सहन करावे लागले. इस्का,वाराणसी १९६८ मध्ये याबाबत  खंत बोलूनही दाखविली.गांधीजींचे अनुयायी असलेल्या डॉ.स्वामिनाथन यांनी यापुढे  एव्हरग्रीन रिव्होल्युशन(Evergreen Revolution)वर काम करण्याचे ठरवले आणि ते आजन्म केलेही....

-भक्ती

Monday, December 11, 2023

रॉबी डिसिल्वा –एका मनस्वी कलाकाराचा प्रवास -पुस्तक परिचय

 


लेखिका वीणा गवाणकर यांच्या सहज सोप्या भाषेतल्या प्रेरणादायी पुस्तकांपैकी एका आंतरराष्ट्रीय भारतीय कलाकाराची ओळख करून देणारे पुस्तक!

रॉबी डिसिल्वा वसई येथील पोपसाव भागात लहानाचे मोठे झाले.अत्यंत गरिबीतून वाट काढत होते पण आयुष्याशी प्रामाणिक  हा गुण त्यांच्यात होता.आई वारल्यानंतर सावत्र आईचे मायेचे छत्र लाभले,त्यामुळे कुटुंब हेच त्यांचा सतत अग्रस्थानी होते.कलाकार अपघाताने घडत नाही तर ती जाणं ,उर्मी जन्मजात असावी लागते.पण डिसिल्वा याला अपवादच म्हणावे लागतील.पदवीला प्रवेश घेण्यासाठीचे पैसे नव्हते ,वेळही गेली तेव्हा कमी फी मध्ये अर्धवेळ पदवी मिळवता येते ,हे समजल्यामुळे त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये रेशनिंग ऑफिसमध्ये काम करत असताना १९५१ साली प्रवेश घेतला.

            कलर अप्लिकेशनचे काम करत असतांना ते चुकले की शिक्षक सरळ तो कागद फाडत असत....नव्हे रॉबीचे काळीज फाटत असे .कारण एक आण्याचा पेपर रॉबी पायी चालत जावून बस भाडे वाचवून मग विकत घेत असत.कधी त्यांच्याच घराजवळ राहणा-या जे जे मधल्या सधन मुलाने खिडकीतून टाकलेले एका बाजूचे कोरे पेपर ते सरावासाठी वापरत.अशा या परिस्थितीनेच त्यांना चुकणे आपल्याया परवडणार नाही ,काम मन लावूनच व्हायला पाहिजे हे शिकवले असावे.लवकरच त्यांनी जेजे मध्ये अनेक विषयात नैपुण्य मिळवले.क्यलिओग्राफिमध्ये,टायपोग्राफीमध्ये त्यांना आवड होती.त्यामुळे त्यांना स्टुडन्त कॉग हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला.यापुढे प्रत्येक संधीचे रॉबी यांनी अक्षरशः सोनेच केले.

            अनेक बक्षीसे मिळवली.त्यामुळेच त्यांना ‘मेनी प्राईजेस’ असे टोपण नावही मिळाले.चतुर्थ वर्षात त्यांना अप्लाईड आर्टचा फेलोशिफही मिळाली.याच काळात त्यांनी स्पर्धेत पाठवलेले एक डिझाईन  भारतीय डाक विभागाने तिकिटावरही समाविष्ट केले होते.पुढील उच्च शिक्षणासाठी ते लंडन मधील प्रसिद्ध सेन्ट्रल स्कूल ऑफ आर्ट मध्ये गुणवत्तेच्या जोरावर प्रवेश मिळवला.या साठीच्या खर्च एक धार्मिक संस्थेने ठराविक व्याजदराने कर्ज देत उचलला.लंडनमध्ये शिकत असतानाही गरिबीशी संघर्ष सुरूच होता.अनेक रात्री उपाशी राहणारे,ना ना प्रकारच्या नोकरी करणारे,त्यामुळे शरीराची होणारी अवहेलना हे प्रसंग वाचतांना वाईट वाटते.पण यातूनच रोबींची गुणवत्ता कमालीची होती जी बहरतच गेली.त्यामुळे दुसऱ्या वर्षी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली.इथे त्यांना अनेक जागतिक दर्जाचे शिक्षण ,शिक्षक मिळाले.

            १९६० ला लंडनहून ते कला क्षेत्राची पंढरी इटली येथील बोजेरी स्टुडीओत काम शिकू लागले.तिथे ते ग्राफिक डिझाईन ,इंडस्ट्रीयलं पैकेझिंग ,जाहिरात क्षेत्रात उत्कृष्ट काम करत राहिले.पण त्यांचा ओढा लंडनकडे असल्यामुळे ते परत दीड वर्षांनी लंडनला परतले.केलॉग ,प्लेयर बचलोर,कालवे प्युअर ओई,स्टारलिंग हॉटेल,ब्रीटाइन सी फूड,इत्यादी इत्यादी अनेक उद्योगांसाठी ग्राफिक डिझायनर म्हणून काम केले.हे सर्व असतांनाच कौटुंबिक ओढही वाढू लागली १९६७ साली ते मुंबईत परत आले.

            भारतात ग्राफिक क्षेत्रातील कामाचा वेग लंडनपेक्षा १०-१५ वर्षांनी मागे होता.तसेच त्यांना इथल्या हितसंबंध जपणाऱ्या व्यवस्थेशी सामना करावा लागला.अनेक अनुभवानंतर रॉबीनी स्वत:ची  जाहिरात कंपनी सुरु केली.कैडबरी,ब्रीटाइना ,यांच्या उत्पादनाच्या आवरणाचे डिझाईन त्यांनी केले.आपल्या भावांना,भाच्यानाही त्यांनी या क्षेत्राची ओळख आणि सुंदर वाट दाखवली.पुढील प्रकरणात “गाव तसे चांगले”यात वसई गावातल्या लोकांना हा जागतिक दर्जाचा ,लंडनमधील प्रतिष्ठित FCSDपुरस्कार असणारा कलाकार आपल्यात आहे ही जाणीव तशी उशीरच झाली,तेव्हा अनेक पुरस्कार त्यांनी दिले,विविध कमिटीवर त्यांची नेमणूक केली.आयुष्याच्या उतार काळात योगा सतत ,नियमित केल्याने,गरजा नेहमीच कमी ठेवल्याने रॉबी तंदरुस्त होते.त्यांना राज्य नवशक्ती जीवनगौरव पुरस्कारही मिळाला. एका व्रतस्थासारखे अलौकिक तेजाने ते जगले.

 वीणा गवाणकर याही वसईत राहणाऱ्या,एके दिवशी बँकेत त्यांची रॉबीशी अचानक ओळख झाली.हळू हळू अनेक भेटीतून त्यांना समजले रॉबी हे जागतिक कलाकार आपल्यात आहेत हे अनोखे आहे.२०१६ साली हे पुस्तक त्यानी हे पुस्तक प्रकाशित केले.पुस्तकासाठी सुनील महाजन यांनी एका गोधडीची प्रस्त्वाना आकर्षक मांडणीत करत लिहिली आहे.रॉबी यांनी तयार केलेल्या अनेक लोगो,कलाकृतींची चित्रे यांची पुस्तकात रेलचेल आहे.शेवटच्या परिशिष्ट मध्ये रॉबी यांच्या कार्याची टाइम लाईन आहे.

२०२१ साली  वयाच्या ९१ व्या वर्षी रॉबी हे जग सोडून गेले.

 -भक्ती

Saturday, November 25, 2023

मखाना शुगर फ्री लाडू

 



साहित्य-



३ कप मखाना

दोन-तीन चमचे प्रत्येकी विविध वनस्पती बिया-भोपळा,सुर्यफुल,तीळ,बदाम ,काजू,अक्रोड,मनुके इत्यादी

२०० ग्रम खजूर

चार –पाच चमचे साजूक तूप


कृती-

१.सर्वात प्रथम मखाना तुपावर कुरकुरीत भाजून घ्यायचे .

२.वरील सर्व सुका मेवा (बिया) तुपात परतून घ्यायचे.

३.तुपात परतलेले मखाना आणि सुका मेवा मिक्सर मधून बारीक कुटून घ्यायचे.

४.सीडलेस खजूर तुपात परतून ,मिक्सर मधून फिरवून त्याची पेस्ट करून घ्यायची.

५.मखाना-सुकामेवा पावडर आणि खजूर पेस्ट एकत्र करून दोन –तीन चमचे तूप टाकून लाडू वळून घ्यायचे.  




-भक्ती


Thursday, November 23, 2023

डॉ.स्वामीनाथान-२( ग्रीन रिवोल्युशन-जागतिक हरितक्रांती)

 




एम.एस.स्वामिनाथन भारतात परत आल्यावर भारताने स्वातंत्र्याचे अर्धे दशक पूर्ण केले होते.पंतप्रधान नेहरू यांनी कृषीक्षेत्रातील सर्व वैज्ञानिकांच्या भेटीनन्तर “everything can wait but not Agriculture” मंत्र देऊन भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपोषी कसा होईल यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले.ब्रिटीश काळापासून सक्तीच्या कापूस ,नीळ यांची लागवड ,हवामान बदल इत्यादी गोष्टींमुळे भारत अजूनही दुष्काळाचा सामना करत होता.त्यामुळे अन्न धान्य आयात करावे लागे.भारताला “जहाजाच्या अन्नावर जगणारा देश –Ship to Mouth”, “Bowl Begging” असे म्हटले जात असे.

स्वामिनाथन यांना सुरुवातीला तांदळाच्या प्रजातींवर काम करण्याची संधी (CRRI,कटक)येथे Indica japonica hybridization programme मध्ये मिळाली.ADT२७ ,RASI या प्रजाती त्यांनी बनवून तामिळनाडूत लागवड केल्या.पुढे upsc परीक्षेत निवड होऊन ते बॉटनी विभागात asst.cytogentist म्हणून IARI,DELHI १९४५ ला रुजू झाले. बॉटनी  विभागाचे प्रमुख पुढे ते प्रमुख झाले.तिथे जेनेटिक्स विभाग सुरु केला.

स्वामिनाथन यांनी जेनेटिक्स या विषयाला लाईफ़ सायन्स पर्यंत सीमित न ठेवता ,बायोफिजिक्स याचाही समावेश केला हाई एलईटी ,लो एलईटी यांचा वापर करून रेडीओबायोलोजी हे क्षेत्रही खुले केले.तसेच विभागात द्रोसोफिला,ह्युमन सायटोजेनेटिक् ,ल्युकोसाईट ,क्रोमोसोमल कयरिओटाईप यावरही क्रोमोसोमल अभ्यास करणे जरुरी आहे हे लक्षात घेत त्यावरही काम सुरु ठेवले.कर्करोग हा ऑक्सिजन कमतरतेने होतो हेही रेडीओबायोलोजीने त्यांनी दाखविले होते.स्वामिनाथन यांना कोणतेही अभ्यासपूर्ण क्षेत्र वर्ज्य नव्हते.

कृषी क्षेत्रातील हेक्जाप्लोय्डी(hexaploidy)  गहू प्रजातीवर ते हाई एलईटी ,लो एलईटी वापरून ते काम करत होते .तसेच नवीन प्रजाती निर्मितीसाठी केमिकॅल म्युटाजेनेसिसवरही ते काम करत होते.

गव्हाच्या नव्या प्रजाती बनविण्यासाठी काही मुद्दे महत्वाचे होते.

१.नवीन प्रजातीनी खतांशी जुळवून घेतले पाहिजे.

२.गव्हाचे रोप मनुष्याच्या उंचीपर्यंत वाढू शकत असे ,त्यामुळे जेव्हा यात दाणे भरले जात तेव्हा हे  भाराने वाकून तुटून जात असे ,तेव्हा त्याची उंची कमीकरणे.

३.धान्य साठवणाऱ्या पेनिकॅलची उंची कमी करणे.

या मुद्द्यांवर म्युटेशन पद्धतीने काम करून ड्वार्फ,सेमी ड्वार्फ गहू बनवताना जापान मध्ये अशी नोरीन-लो ड्वार्फ जीन गव्हामध्ये तर डी –जी –वू-जेन ड्वार्फ हे जीन तांदळात आहेत हे समजले.सुरुवातीला वॉश्गिंटन युनिव्हर्सिटीला संपर्क केला असता,पुढील दुवा नॉर्मन बोरलॉग (सीआयएमएमटी,मेक्सिको) यांचा मिळालाआणि पुढे इतिहास घडला.

बोरलॉग आणि सेमी ड्वार्फ गहू निर्मिती प्रवास-

नैसर्गिक गहू प्रजाती

पूर्वी निसर्गात डिप्लोईड (diploid)boeticum * anestium हाच उपलब्ध असायचा.नैसर्गिकरित्या अनेकदा म्युटेशन होऊन हेक्साप्लोईडी गहू ट्रायटिकम (Triticum)गहू तयार झाला.परंतू वरती दिलेल्या मुद्द्यांनुसार अजूनही हे गहू उंच होते ,लोद्जिंग समस्या त्यात होते आणि उत्पादनही पुरेसे नव्हते.

जपान मधील सुधारित गहू प्रजाती-

जपानमध्ये आकाकामुगी (akaakomugi) ही ड्वार्फ नोरीन -१०(उंची ६२-११० सेमी) जीन्स असलेली प्रजाती होती(१९११).तर दुसरी दरोमा(उंची १४५ सेमी) प्रजाती .दरोमा (Daroma) आणि अमेरिकन फुल्झ(उंची १२७ सेमी)(Fulz) यांच्या संकाराची (दरोमाफुल्झ/शिरोदरोमा)प्रजाती तयार झाली. नोरीन -१० हा जीन असलेला अकाकोमोगी गहू इटालियन गव्हाबरोबर नाझारीनो या ब्रीडरने संकरित करून  आरडीतो आणि विल्लालोरी ह्या नवीन प्रजाती इटलीत बनवल्या,ज्यांनी इटलीत गहू उत्पादनात क्रांती केली.तसेच१९३४ पर्यंत तुर्की गव्हाबरोबर दोरोमाफुल्झ संकरित करून नोरीन -१० ही प्रजाती जपानने विकसित झाली होती.ह्या ड्वार्फ प्रजातीमध्ये प्रकाशसंश्लेषणसाठीचे विशिष्ठ जीन्स असल्याने ते वेगळे व अधिक उत्पादन देणारे होते.

१९४५ साली जपानने दुसरे महायुद्धात शरणागती स्वीकारली तेव्हा तेव्हा अमेरिकेच्या सैन्याबरोबर  डॉ.एस.सी.सोलामन (Dr.S.C.Solaman) हे शेती अभ्यासकही होते.त्यांच्या नजरेने हा बुटका गहू हेरला आणि त्यांनी त्याच्या अनेक प्रजाती/गहू बीज  आपल्यासोबत अमेरीकेत आणल्या.त्या त्यांनी डॉ.ओ .ए.वोगल (१९४६) (इंबीपीडब्लूपीएस-नॉर्थ वेस्ट पासिफिक व्हीट ब्रीडिंग स्टेशन NBPWPS)यांना अभ्यासासाठी दिल्या.त्यांनी त्या नोरीन १० चा  ब्रेवर -१४ ह्या गव्ह्याच्या प्रजातीशी संकर घडवून ग्रेन(१९५४) आणि न्यू ग्रेन(१९६५) ह्या प्रजाती बनवल्या.पण ह्या प्रचलित झाल्या नाहीत.

नॉर्मन बोरलॉग -

१९५३ ला नॉर्मन बोरलॉग ह्या नोरीन १० प्रजाती घेवून मेक्सिकोला(सिमीट CIMMYT) स्थानिक गहू प्रजातींशी संकरीत प्रयोग करू लागले.एकदा त्यांच्या प्रयोगशाळेत आगही लागली,गव्हांवर रोग पडला होता.तरीही जिद्दीने ते नोरीन १० आणि तिच्या लाईन्सवर प्रयोग  आणि स्थानिक गहू  प्रजातींवर संकरण  करत राहिले.अखेर त्यांनी पाच  सेमी ड्वार्फ प्रजाती तयार केल्या(१९५४).

Pitic 62 and Penjamo 62,Sonora 64,Lerma Roja 64 

१.पिटीक ६२ २.पंजावो ६२  ३.सोनोरा ६४  ४. सोनोरा ६३ ५.लर्मारोजा ६४ आणि मियो ६१४ ही सेग्रेगेटिंग लाईन  

या विविध प्रजाती वापरून मेक्सिको मध्ये व इतर ठिकाणी  गव्हाचे विक्रमी उत्पादन झाले.आणि जागतिक  हरित क्रांती जाहीर झाली तेच नॉर्मन बोरलॉग यांना फादर ऑफ ग्रीन रेव्होल्युशन आणि फादर ऑफ ड्वार्फ व्हीट असे सन्मानित करण्यात आले.यासाठी त्यांना १९७० साली शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला,कारण त्यांच्या महान कार्याने अनेक भुकेल्या लोकांची पोटाची खळगी भरली गेली होती.

आता भारतात ही हरित क्रांती होण्याची वेळ आली होती......

-भक्ती

Wednesday, November 15, 2023

रायरेश्वर शिवसृष्टी आंबेगाव

 पाडव्याला रायरेश्वर आणि केंजळगड आणि भाऊबीजेला शिवसृष्टी, आंबेगाव 'शिवदिवाळी' उत्साहाने साजरी झाली,व्हाया वाई 😊

तेरा तारखेला वाईला पोहचल्यावर उत्तर पेशवाईतील मुत्सद्दी नाना फडणीस यांचा मेणवलीचा शूटिंगसाठी प्रसिद्ध वाडा पाहिला.वाड्याची डागडुजी करून पर्यटनासाठी विकसित केला आहे.सोपा, दिवाणखाना,पंगतीचा चौक,हळदी कुंकवाचा सोपा पाहून मन गत काळातील वैभवात जाते.वाडा कृष्णासाठी बांधला आहे.तेथे विस्तृत सुंदर घाट बांधलेले आहेत.विष्णू, महादेवाचे मंदिर आहेत.वाडा पाहून दुसऱ्या दिवशी वाईचा प्रसिद्ध गणपती , काशी विश्वेश्वर मंदिर पाहिले.येथे बांधलेले घाटही मोठे आहेत.तसेच अफजलखान वाईला मुक्कामास होता तेव्हा कृष्णा नदीला शिवाजी महाराजांच्या विजयाचा नवस गावकऱ्यांनी केला महाराजांनी अफजलखानाच्या वधानंतर आठवणीत कृष्णामाई महोत्सव वाईत साजरा होतो.घाटांची स्वच्छता हा ऐरणीचा विषय आहे,याकडे लक्ष हवेच.त्यानंतर निघालो स्वराज्याची मुहूर्तमेढ राजांनी जेथे रोवली त्या रायरेश्वर पठारावर .वाईपासून केवळ;२६- ३०किमीवर हे ऐतिहासिक रायरेश्वर मंदिर आहे.पठारावर चढण्यासाठी असणार्या शिड्या नव्या ट्रेकर्सना आव्हानात्मक आहेत.वर पोहचल्यावर बांधलेल्या पायवाटेने पुढे जात जात रायरेश्वरपाशी पोहचतो.एक स्वराज्याच्या भारलेल्या वातावरणाचा एक अनोखा स्पर्श रोमांचित करतो.त्यानंतर तेथेच एक भौगोलिक आश्चर्य असणार्या वेगवेगळ्या सात रंगांची माती असणारे स्थळ पाहायला गेलो.साधारण २ किमी चालल्यावर तो एक खड्डा येतो जेथे या माती आढळतात.त्यापलीकडेच एक विस्तीर्ण पठार आहे.जिथे पावसाळ्यात अनेक फुले फुलतात.पठारवरून अनेक गड  दुरून पाहता येतात कमळगड, केंजळगड,नवरा नवरीचा डोंगर मला ओळखता आले.यानंतर केंजळगडाला धावतीच अपूर्ण भेट दिली.समोरचा नजारा अप्रतिम शांतीपूर्ण होता.वाईला परततांना नृसिंहचे मंदिर पाहिले.तिथे कासवाच्या पाठीवर बांधलेला आकर्षक दगडी कारंजा आहे.धोम धरणेचे दरवाजा दूरूनच पाहून पुढे स्ट्रॉबेरीच्या बागेत ताज्या स्ट्रॉबेरी तोडण्याचा आनंद घेतला.दुसर्या दिवशी शिवसृष्टी आंबेगावला अचानक जाण्याचा योग आला.शिवकालीन शस्त्रे जसे मुक्त विमुक्त हे प्रकार समजला.राज्याभिषेकाचा वृत्तांत,त्यावेळेस वापरलेले अनेक प्रतिके यांची माहिती समजते.आग्राहून सुटका हा प्रसंग व्हिडिओ मार्फत तर शिवाजी महाराजांचे रयतेला पत्र हा थ्रीडी अनुभव उत्तम आहे.पुढे देवगिरी, शिवनेरी, पुरंदर,पन्हाळगड, विशाळगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग,सिंहगड यांची प्रतिकृती सह अभ्यासू माहिती ध्वनीचितत्रफित समजते.

जय भवानी जय शिवाजी 🚩

-भक्ती












Sunday, October 15, 2023

सृष्टी माया

 


वाजे लडिवाळ  घुंगूरवाळा

चरितसे गोजिरी कपिला |


धरती गळा फुलांच्या माळा

फुलपाखरांनी श्वास रंगला |

वाहे धीरगंभीर निर्झर निळा

नाद ,सृष्टी मंदिरा घुमला |


स्पर्शाचा भोवरा, दाटे उमाळा

पाकळ्यांची बरसात रान सजला|


अवचित पावा वाजला सावळा

समाधी मनीची ,हरी हसला |


-भक्ती


Friday, September 29, 2023

ललितबंध -लेखक रा.चि.ढेरे पुस्तक परिचय

 

सर्वत्र धर्म, संस्कृती याविषयी उथळ चर्चांना उधाण आलेले असताना.रा.चि.ढेरे यांचे ललितबंध (प्रकाशित २०१७)हे पुस्तक वाचणे म्हणजे केवळ सुखद अनुभव होता.ऋषीचे कूळ आणि नदीचे मूळ विचारू नये अशी म्हण विनाकारण आहे ,हे पुस्तक वाचतांना पटते.कारण एकंदरीत  मज सारख्या मुळातून मुळाच्या शोधाची आवड असणाऱ्या वाचकाला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. धर्मोइतिहास वाचन अवजड भाषा असल्याने वाचनाची गोडी लागत नाही पण रा.चि.ढेरे यांचे लेखन अत्यंत सुगम आहे.



अनुक्रमणिका पाहता,चार विविध विषय क्षेत्रातील संस्कृती,दैवत , आस्थेची स्थाने,लोकमान्यता असलेले श्रद्धा विषयांचे लेख पुस्तकात समाविष्ट आहेत. पहिल्या भागातील लेखांत महाराष्ट्र आणि जवळील राज्यातील माहित नसलेल्या व माहिती असलेल्या ‘गुरु’  परंपरेविषयी समजते.दुसऱ्या भागात स्त्री देवता माहिती वाचायला मिळते.यातील सीता,उमा राधा यांचे निराळे पैलू समोर येतात.राधा या लेखात राधा नाचवणे या परंपरेपासून तमाशा पर्यंतचा प्रवास वाचण्यासारखा आहे.कालिदासरचित  नायिका शकुंतला,यक्ष प्रिया,अनुसया मृछाकटीकम ची नायिका वसंतसेना ,गीतगोविन्दम रचना जयदेव या अभिजात साहित्याची रसाळ वर्णने लेखांत आहे.

संत चक्रपाणी यांवर रा .ची  यांनी स्वतंत्र पुस्तक लिहिलेच आहे ,पण एका गुजराती मनुष्याचा महाराष्ट्रात संत चक्रपाणि आणि महानुभाव पंथाचा उगम वाढ यात अनेक नवीन माहिती दाखवतो.शैव पंथाविषयी अनेक गोष्टी विविध लेखात विस्तृत मांडली आहे.जय गंगे जय भागीरथी या लेखात एक शिव भक्तीची उगम गंगा आणि एक कृष्णसावळी यमुना यांचा संगम ,कुंभयात्रेसाठीचे महत्व वाचनीय आहे.विंचू चावला लेखात संत एकनाथ यांच्या साहित्याने भारुड ही देणगी जनमानसाला दिली.लंकेची पार्वती हा शब्द अपभ्रंश आहे  ‘लंजा पार्वती’ ‘,लज्जागौरी’ म्हणजेच ‘अनावृत्त जगन्माता’ याचा गंधही सामन्यांना नसेल.निषाद या आदिम जमातींची मनोरंजक तितकीच विश्वसनीय माहिती वाचताना त्यांनी प्रथम नांगर वापरले तसेच अनेक शब्द संस्कृत भाषेला प्रदान केले.वीस अंक निषादसाठी महत्वाचा त्यांनीच अठरा वीसे म्हणजे १८*२०=३६० असे वर्षाचे दिवस मोजले पण अपभ्रंश झाला ‘अठरा विश्वे’ सदाकाळ या अर्थानेच.आदित्य राणूबाई सौराष्ट्र ,काश्मीर,राजस्थान ,नेमाड ,महाराष्ट्र अशा अनेक भागांत सुर्योपासक गटाची माहिती देतेच .तर हिचे मूळ इराणचे राज्ञई (रानी)याच्याशी निगडीत आहे.इराण मधील सुर्योपासक सूर्यच्या राण्या रशन आणि  नर्शेफ नावावरून भारतात झाल्या राज्ञई आणि निक्षुभा.

असे अनेक धर्मोइतिहात्मक संशोधांवर आधारलेले लेख वाचत राहणे या पुस्तका निमित्ताने पर्वणीच आहेत.

रा.चि.ढेरे या उपासकांचे तत्त्वज्ञान ,संस्कृतीचे  महान  कार्य पाहून मी थक्क झाले.

-भक्ती


Thursday, August 17, 2023

जुन्नर भटकंती -२

 


पहिल्या भटकंतीतच मी नाणेघाटला पावसाळ्यात परत येण्याचं ठरवलं होतं.

सकाळच्या शांत गारव्यात जुन्नरकडे निघालो.आता रस्ता ओळखीचा झालायं.जुन्नरच्या जवळ आल्यावर मोठमोठ्या केळीच्या बागा आणि दुरच्या हिरव्या डोंगरांवर पसरलेली धुक्याची साय आनंदाची ग्वाही देत होती.

साधारण आठ वाजता जुन्नरला पोहचलो.पोटात इंधन भरून समोर भव्यतेची साद देणार्या शिवनेरीकडे कूच केले.मोगल,सुलतानी, निजामशाही या संकटांच्या हलकळ्ळोलात रयतेचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान!





यावर जाणार्या दोन वाटांपैकी अर्थातच सात दरवाज्यांची सोपी वाट निवडली.पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा(विकिपीडिया).आमची कोकरं उत्साहात धावत होती.एका कैदेतून सुटून स्वतः फोटोंच्या कैदेत अडकवत निवांत चाललो होतो.एकूण दरवाज्यांपैकी काहीच दरवाजांवर व्याघ्र शिल्प होते.सातवाहन काळात नाणेघाटावर देखरेखीसाठी या गडाची निवड झाली आणि इतर राजवटीत अभेद्य किल्ला अशी वाटचाल आणि बांधणी झाली.इथले महत्त्वाचे ठिकाण 'शिवाईदेवी मंदिर' जिजाऊ मातेने शिवाईहून 'शिवाजी'‌ नाव छत्रपती यांना दिले.देवीचा गाभारा प्रसन्नतेने ओतप्रोत आहे.त्याचे बाह्य बांधकाम आणि शेजारील लेण्या पाहून कार्लाची आठवण झाली.शिवाईदेवी मंदिराच्या बाजूला पुरातन लेण्या खोदलेल्या आहेत.एक स्तुप आणि इतर भिक्खूच्या राहण्याची सोय असलेल्या दगडी खोल्या आहेत.इथे पाण्याच्या खोदलेल्या खुप टाक्या आहेत.लेण्यांचा समूह पाहून.छत्रपती जन्मस्थान पाहायला निघालो.हा गड बहू झाडांनी वेढलेला आहे त्यामुळे चालतांना जीव सुखावतो.कोकरांची एनर्जी जरा कमी झाली होती.जन्मस्थळी पोहचलो.गड राजांच्या घोषणेने दुमदुमत होता.इतर वाडा पडला होता पण एकच ती प्रसिद्ध इमारत उभी आहे.त्या पाळण्यात अंगाई गात जिजाऊ शिवरायांना निजवित असेल,माझ्या मुखातून अंगाई उमटली "गुणी बाळ असा जागसी का तू राजा निज रे निज शिवबाळा"

सध्या वाचत असलेल्या 'दास डोंगरी राहतो ' पुस्तकातल्या दोन पानांचे अभिवाचन केले ज्यात रामदास स्वामी शिवबांना शिकवण देतात

“मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा”

“आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे”

“महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे”

समोर भव्य बदामी आकाराचा तलाव आहे.त्यापुढे कडेलोट स्थान.बाजूलाच 'महादेव कोळी चौथरा' मोगलांच्या क्रूर कृत्याची, महादेव कोळींचे बंड मोडण्यासाठी त्यांचा केलेला शिरच्छेद यांची साक्ष देणारा चौथरा.परतीची वाट जराशी सोपी होती, तपासले असता जवळपास दोन्ही बाजूंनी मिळून ५ किमीची ही भटकंती-चढाई चार तासांची झाली.फुस्स झालेले कोकरू किरकोळ खरदेमुळी परत टणाटण उड्या मारु लागले



 .शिवनेरीवर पावसाने साधारण दर्शन दिल्यामुळे नाणेघाटाकडे पाऊसधारांच्या आशेने निघालो.शंभू डोंगरापासून स्वर्ग अवतरू लागला.



पावसाची माया 

न्हाऊ घाली

डोंगराची काया

सुखावली दिठी

हिरव्या डोंगरा

देता चपळ मिठी...

असेच दृश्य या जुन्नरच्या दुसऱ्या भटकंती पाहिले.



सृष्टीचा मुक्त हस्त वरदान भाताच्या इवल्या रोपांवर,जागोजागच्या छोट्याशा झर्यांतून,डोंगरांवर लहणार्या तलम ढगांच्या पदरांवर दिसत होते.तो खळाळता गोड आवाज..रोज मेडिटेशनला 'प्ले' करते ,आज प्रत्यक्ष तृप्ती कानांना होताना रोमांच उठले.नाणेघाटला पोहचल्यावर तोच खळाळ हजारो वर्षांपासून ऐतिहासिक घाटातून आजही वाहत होता.हा काहीसा कठीण मार्ग प्रत्येक जण मोठ्या धीटाईने करतोच कसा याचे मला आश्चर्य वाटत असते.मी दुसऱ्या वेळी इथे आले हा आनंदही अवर्णनीय होता.पुढल्यावेळी पायथ्यापासून वर चढाई करणार असं ठरवलं.


नानाचा अंगठा अनेक चढत होते पण मला पाहायचा होता नाणेघाटचा प्रसिद्ध उलटा धबधबा(reverse waterfall).पण जायचं कसं?जसा विठोबा भक्ती भावाने आठवला की सामोरी येतोच अगदी तसेच एक काहीसे वृद्ध आजोबा समोर आले "जीवधनच्या पायथ्याशी उलटा धबधबा पाहायचा का?चला अमूक अमूक दक्षिणा द्या नेतो"असे म्हणाले.चला त्याच्यामागून अर्ध्या रस्त्यात वाहनाने गेलो आणि मग पायी निघालो.ओहो...हिरव्या जीवधन किल्ल्याहून धावणारे शुभ्र मऊ ढग.. स्वर्गच!

कोकरू बदकाच्या मागे धावत होतं..प्रचंड गोड व्हिडिओ आलाय.

माझी लेक 'आबा आबा'  नाना प्रश्न निरसण करत त्या वृद्ध आजोबांचे बोट पकडून पुढे गेली.ज्या क्षणी उलटा धबधब्यापाशी  पोहचलो ते आश्चर्यकारक दृश्य पाहिले.खालच्या दरीतील वार्याच्या प्रचंड दाबामुळे कड्यांवरून खाली पडणारे पाणी मोठ्या फोर्सने वर फेकले जाते.त्यात जो तो मनसोक्त भिजत होता.भारतात चारही उलटे धबधबे केवळ याच नाणेघाट डोंगर रांगांत आहेत की त्यातील एक मी पाहत होते.परतीच्या वाटेतही आबाचे 'विठोबा'चे बोट तिने सोडले नव्हते.

नाणेघाट 


उलटा धबधबा 





नाणेघाट नेहमीप्रमाणे मन जड झाल होत.