Thursday, June 29, 2023

पंढरीची वारी

 



महाराष्ट्राचे रहिवासी म्हणून पांडुरंगाची सेवा सहज,बालपणापासून करता येते हे एक भाग्याचीच गोष्ट आहे. एकादशीची लगबग ,पहाटे उठून सगळ्यांनी दूरदर्शनवर विठ्ठल महापूजा भक्तीभावाने पाहणे.अशा अनेक आठवणी मांडता येतील.जाणतेपणा आल्यावर आषाढी वारी कुतुहलाने,अभ्यासाने,शिस्तबद्धता जाणण्यासाठी अनुभवण्याची आस लागतेच.संत साहित्याचा अभ्यास करणारे डॉ.सदानंद मोरे यांनी या विषयी अनेक प्रकारे जागरुकता सामान्यापुढे सोप्या भाषेत मांडला आहे आणि ते कायम यावर काम करत आहेत.अनेक प्रश्नांची उत्तरे सापडतात.

रुक्मिणीच्या शोधात आलेले श्रीकृष्ण पंढरपुरात पुंडलिकाच्या आईवडिलांच्या सेवेतील तल्लीनता पाहून तिथेच थबकले.पुंडलीकाने थोडा काळ ह्या विटेवर उभा राहा असे सांगितले.तो आजपर्यंत श्रीकृष्णाचा स्वयंभू अवतार पांडुरंग पंढरपुरी या विटेवर अजूनही उभा आहे.शंकराचार्यांच्या लिखाणातही आठव्या शतकात पांडूरंगाष्टम रचलेले आहे.पुढे शैव वैष्णव या पंथात वैष्णव पंथाचे दास पंढरपूरी नित्यनेमाने उपासना करण्यास वारीने जात.ही एक सामुहिक उपासना आहे.ज्ञानेश्वर महाराज ,नामदेव यांनीही ही परंपरा सुरु ठेवली.

माझे जिवींची आवडी ।
पंढरपुरा नेईन गुढी ॥१॥
पांडुरंगी मन रंगले ।
गोविंदाचे गुणीं वेधलें ॥२॥
जागृति स्वप्न सुषुप्ति नाठवे ।
पाहतां रुप आनंदी आनंद साठवे ॥३॥
बापरखुमादेविवर सगुण निर्गुण ।
रुप विटेवरी दाविली खुण ॥४॥
ज्ञानेश्वर महाराज

ज्ञानेश्वरांनी वारी उपासनेला १३ व्या शतकात ज्ञानेश्वरी हा प्रमाण ग्रंथ दिला.पुढे अनेक परकीय आक्रमणानंतरही १६ व्या शतकापर्यंतही यात खंड पडला नाही ही मोठी जमेची बाजू आहे.याची प्रेरणा केवळ एकाच तो सावळा पांडुरंग!
पुढे १६व्या शतकात तुकाराम महाराज देहूहून १४०० वारकऱ्यांसह पंढपुरी वारीस जात.तुकाराम महाराजानंतर त्यांचे धाकटे बंधू कान्होबा वारी काढत होते.नंतर तुकारामांचे वंशज नारायण महाराज यांनी ‘पालखी’ प्रथा साधारण १६८० मध्ये सुरु केली.आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका देहूत आणल्या जात.तिथून तुकारामांच्या पादुका अशा दोन्ही पालख्या एकत्र निघत असत. नारायण महाराजांच्या अनेक मराठा सरदारांशी हितगुज असत .त्यामुळे घोडे अनेक तामजाम येथे वाढला गेला.भजना गायनाची एक शिस्त लावली गेली.नारायण महाराजांचे योगदान वारीमध्ये खूप मोठे आहे.

सकळा वैष्णव वाटे जीव, प्राण
तो हा नारायण देहूकर
-संत निळोबा

त्यानंतर पेशवाईत हैबतबाबा आरफळकर जे स्वत: शूर सरदार होते.माऊलीचे निस्सीम भक्त होते.याच काळात ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पालख्या एकत्रित न निघता वेगवेगळ्या निघू लागल्या.
त्यांनी सैन्याचे घोडदळ यात जोडले.ज्यामुळे वारीत एक प्रचंड शिस्त आली.गोल रिंगण ही प्रथा सैन्यांच्या घोडदळाने काही घोड्स्वारीचे खेळ सादर करण्यासाठी सुरु केले.हळू हळू सैन्य यातून बाहेर पडले परंतु गोल रिंगन आणि अश्व फेरी सुरु राहिली.सैन्यामुळेच तळ ठोकून व्यवस्थित छावणी ,नियोजन ,कूच ,कर्णा,चोपदार ह्या पद्धती सुरु झाल्या.
वारीमध्ये सर्वसमावेशकता सुरुवातीपासून अबाधित आहे.एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ही रचनाच वारीची आहे.

यारे यारे लहान थोर।याती भलते नारी नर।
करावा विचार।न लगे चिंता कोणासी।
सकळासी अधिकार||
-संत तुकाराम

मी उणीपुरी चार किलोमीटरच वारीसोबत चालले .पण अनुभव मात्र अनमोलच मिळाला.रविवारी ४० किलोमीटर श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज ,त्र्यंबकेश्वर- पंढरपूर सर्वात लांबचा टप्पा पूर्ण करण्यासाठी पालखी २ जूनलाच निघाली होती.रविवारी २० जूनला ती मांदळी,नगर येथे दुपारी विसावणार होती.रविवारी तिथे पोहचलो.विसाव्याची सर्व व्यवस्था पाहायला मिळाली.काही वारकर्यांशी गप्प्पा मारता आल्या.जवळपास ४३ छोट्या दिंड्या या वारीत /फडात समाविष्ट होत्या.या दिंड्यांना क्रमांक होते.त्यानुसारच त्या चालायच्या.छोट्या छोट्या दिंडी मिळून तयार होतो वारीचा मोठा फड.दिंडीचा अर्थ वीणा आहे.वीणाधारक वारीचा प्रमुख असतो.
वारीच्या पुढे झेंडेकरी,टाळकरी असतात.,पालखीसोबत चांदीचा दंड घेतलेले चोपदार असतात.त्या पाठोपाठ तुळशी वृंदावन घेतलेल्या स्त्रिया असतात.त्यानंतर पखवाजधारक ,मृदंगधारक होते.पालखीसाठी खास खिलारी बैल जोडलेले असतात.
याशिवाय पैठण,देहू,आळंदी,मुक्ताईनगर ,शेगाव,पिंपळनेर,श्रीगोंदा येथून निघणाऱ्या पालख्या मोठ्या फडाच्या आहेत.
वारकर्यांसोबत शिधाची ट्रक असते.विसाव्याच्या ठिकाणी ते आपले अन्न स्वत: बनवतात.रोज साधारण १५- २० किलोमीटर चालतात.आता विसाव्यापासून वारी पुढे मार्गस्थ झाली.मी पालखी मागेच होती.अहाहा काय ती रसाळ कधीही न ऐकलेली भजन,अभंग भारुड व्मृदंग गात होते.पावले सहज पुढे पुढे चालत होते.खरोखरच तोच श्रीहरी चालविता आहे.अशी मी तल्लीन झाले होते .आमचे हे म्हणाले “अग आता पंढरपूरला जाते का आता?बस झालं” बरोबरीच्या माऊली म्हणाल्या “नेतो की हिला,चल ग” जीवावर आल होत थांबायचं,पण काय थांबले.त्या वारकरी म्हणाल्याच म्हणाल्या होत्या की पालखी बरोबर चालणे सोप्प आहे.परतीला एकट्याने जाणं खूप कठीणच आहे.तसच येतांना तेच अंतर पण काळ मोठा झाला होता.


Tuesday, June 27, 2023

तुका आकाशाएवढा (गोनीदा लिखित पुस्तक रसग्रहण)

 मेघदूत पुस्तक जवळच्या पुस्तकांच्या दुकानात मिळते का?हे पाहायला गेले.मेघदूत उपलब्ध नव्हते.पण पुस्तकांची मांदियाळी पाहून भारावून गेले,नजर गेली गोनीदांच्या पुस्तकांकडे ...त्यात दिसले ‘तुका आकाशाएवढा’ हे पुस्तक.वारीही जवळ येत होती,या पुस्तकानिमित्त विठ्ठल नामही स्मरणात राहील,तेव्हा पुस्तक घेतले.तारीख होती एक जून ..गोनीदांचा स्मृतीदिन !दुग्धशर्करा योग जुळून आला.तुका आकाशाएवढा याचे पहिली आवृत्ती १९८१ साली प्रसिद्ध झाली होती.



तुकोबांचे बालपणीचे मित्र संतू तेली जनागडे यांनी मित्रा बरोबरीचे बहुमुल्य क्षण आठवणीच्या रुपात सांगितले आहे असे लेखण यात आहे. लहानपणापासूनच अलौकिक जाणीव असलेले तुकाराम आंबील्ये ..ते ब्रम्हज्ञान मिळालेले.. तुकाराम महाराज असा मोठा प्रवास हळू हळू उलगडत जातो.
तुकोबांचे वडील विठ्ठलाचे भक्त ,वैष्णवपन्थीय,दरवर्षी वारी करणारे,प्रपंच घडी नेटकी ठेवणारे समाजातील सज्जन व्यक्ती होते.अशा वातावरणात तुकाराम यांनाही विठ्ठलाचा लळा लागलाच,भाळी तेच लिहिले असणार.
मोठा भाऊ सावजी लवकर विरक्तीस लागला.आता आई वडिलांची आशा तुकारामच होते .त्यांचाही सावकारकी करावी ,व्यापार वाढवावा असा रोखठोक व्यवहार होता.पहिल्या पत्नीच्या आजारपणामुळे आईने 'आवली' ही दुसरी बायको तुकोबांसाठी आणली.परि हा प्रपंचात असतानाही मनात विठोबाचे स्मरण असतच. संध्याकाळी दीप लावणे ,मंदिरात पंचपदी ,इतर वेळी नामदेव –एकनाथ –ज्ञानेश्वर यांचे अभंग,ओव्या वाचन ,लेखन सुरु होते.केवळ ज्ञानतेज उजळायचे बाकी होते.
सतत ओव्या लिखाण वाचन यामुळे तुकोबांचे ते लीलया पाठ झाले होते.वारीत त्यांच्या मुखामुखावाटे नेहमी रसाळ अभंग ऐकायला मिळत आणि ते त्यांचे निरुपणही सुरेख करत .पुढे मग आमच्याकडे कीर्तन कराल का?अशी प्रेमळ मागणी लोकजन करू लागले.
हरिसेवा,कीर्तन निरुपण ,प्रपंच सर्व निईतसे सुरु होते.काळाने रूप बदलले आधी पित्याचे मग मायेचेही छत्र हरपले,तुकोबा घरातले मोठे कर्ते पुरुष झाले.हा सगळा भार लीलया करत होते.त्यासाठी देशाटन करीत ते कोकणात मीठ खरेदीसाठी गेले.पहिल्यांदा समुद्र पाहिला.त्याचे अपूर्व वर्णन गोनीदांनी तुकोबांच्या नजरेसाठी केले आहे.

“काय त्या उसळणाऱ्या लाटा !असे गमते की जणू डोंगरच धावत येत आहे.किनाऱ्यावरील हे सर्वच स्थूळसूक्ष्म आता गिळून टाकणार ही लाट !पण नाही,ज्ञानोबांचे खरे .किनारा सोडून पाणी अलीकडे काही येत नाही एवढे त्याचे कल्लोळणे सुरु असते,आणि तीरावरची बायाबापादिखुस्हाल आपापले वेव्हार उर्कीस असतात .त्यांस समुद्र केवळ घर आंगण झाला आहे”
सत्य ज्ञानानांतगगनाचे प्रावरणा नाही रूप वर्ण गुण जेथे!

हे एवढे अमर्याद आकाश ,त्याचे त्याने या धरती सागरावर पांघरूण घातले आहे.
आणि कोकणातून देहूला परत येतांना घाट डोंगर पाहून ते म्हणतात ,
“ज्यांना विश्वाच्या जानित्याच्या करनीच चमत्कार पाहायचा असेल ,तर आपले गावढे सोडून या पर्वतांवर गेले पाहिजे”

“जेथ आमृताचेनी पाडे|मुळेहीसकट गोडे|
जोडती दाटे झाडे| सदाफळती
पाउला पाउला उदके|परीवर्षाकाळाही चोखे
निर्झर का विशेखे |सुलभे तेथ
-ज्ञानेश्वर महाराज

पण त्यावर्षी ज्येष्ठ सरला तरीही पावसाच्या मेघांचा थांग नव्हता.धरती चीराळली होती.गायी गुरे तरवडही खाऊन दिवस काढीत होती.शेती भकास झाली होती.पाऊस रुसला होता .दुष्काळ पसरत होता.अशाही परिस्थित तुकाराम वारकऱ्यांसोबत नित्यनेमानुसार पंढरी जाऊन त्या सावळ्यास “पाण्याचे लोट उसळू डे ,रान शेत बहरू दे असे साकडे करून आले”
परंतु मेघराज खुश झालाच नाही ,पावसाने चांगलीच दडी मारली.
लोक अन्नाच्या दाण्याला मुकु लागले.

तुकारांम यान्च्या घरी लोकांच्या रांगा लागल्या “हे दागिने,डाग घ्या ,ऋण द्या धान्य आणायचं आहे ,धान्य द्या ...एव्हढा दुष्काळ आम्हांस जगवा.”
अखेर दुकानातलेही धान्य संपले.लोकांच्या रांगा संपत नव्हत्या .तुकाराम मंदिरात नित्यपूजा करीत असता विठ्ठलाने सदबुद्धी दाखवली ...मार्ग दाखवला.घरातले सर्व दागिने कर्जावर ठेवून तुकोबांनी त्यातून साऱ्या गावासाठी धान्य खरेदी केलं.पण तरीही पुरले नाही.दुष्काळ गुराढोरांचा,माणसांचाही घास घेत होता.सर्वत्र प्राण्याच्या प्रेताची त्यावर घिरट्या घालणाऱ्या गिधाडांची गर्दी दाटली.भकास दुष्काळाचे वर्णन अंगावर काटा आणतो.सावकाराने एक ना ऐकले कर्जफेडीचा तगादा लावत शेवटी घरी धाड घालत”तुकाराम आम्बिल्ये यांचे दीवाळ निघाल ,अशी दवंडी पिटवली.” भरीत भर तुकारामांची पहिली बायको अन्न अन्न करून वारली आणि पाठोपाठ मुलगाही गेला.
अशा दु:खाचे भार माथी घेऊन तुकाराम पुरते खचले....दूर निघून गेले....कोणासही न सांगता...ते कुठे गेले?

तुकारामांना शोधायला माउलींची आळंदी,पुणे,चाकण,जुन्नर ना ना ठिकाणांचा शोध घेतला.अखेर १४ दिवसांनी भामगीरीच्या पर्वतावर एका खोल घळीमध्ये एक तेजस्वी चेहरा ,ब्रम्ह्तेज असलेला दिसला-तुकोबाराय ...शांत प्रसन्न ,ध्यानस्त!त्यांच्या शरीरावर त्यांचे स्वामित्व संपले ,ते आता निळ्याचे झाले होते.या आनंदात ते म्हणतात,

आनंदाचे डोही आनंद तरंग । आनंदची अंग आनंदाचें ॥१॥
काय सांगो जाले काहीचियाबाही । पुढे चाली नाही आवडीने॥ध्रु.॥
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा । तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे ॥२॥
काय सांगो जाले काहीचियाबाही । पुढे चाली नाही आवडीने॥ध्रु.॥
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा । अनुभव सरिसा मुखा आला ॥३॥
काय सांगो जाले काहीचियाबाही । पुढे चाली नाही आवडीने॥ध्रु.॥

त्याना धन्य तृप्त वाटत आहे
पूर्व जन्मी सुकृते थोर केली|
ती मज आजि फळासी आली||
परमानंदु आजि मानसी||
-माउली

पर्जन्यधारा न्हात न्हात घराशी पोहचताना इतक्या दिवसांच्या कल्मेषाचे मूळ त्याना समजले –जनाचे व्याज ,सावकारी.आपले अमंगळ ऋणाची खातेवही ..हा मोह...इंद्रायणीच्या डोहात बुडवण्याचे ते ठरवतात.पत्नी आवली संघर्ष करते पण सारे व्यर्थ ...तुकोबा आता मोह मुक्त होतात.
तुकोबारायांच्या मनीच्या अभंगाच्या धारा धो धो करत वाहत सुटतात.अगणित अभंग उत्स्फूर्त त्यांच्या मुखावाटे प्रगटत असतात.एकांत चिंतनासाठी ते भांडारेश्वर मंदिरात ध्यानाला बसत,ग्रंथ अभ्यासात श्रीहरी हृदयात वास्तव्य करून असे-

सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती ।
रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥
गोड तुझें रूप गोड तुझें नाम ।
देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥
विठो माउलिये हाचि वर देईं ।
संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥
तुका म्हणे कांहीं न मागे आणीक ।
तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥

आणि ही अजरामर रचना..

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेवोनिया
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

तुळसीहार गळा कासे पितांबर
आवडे निरंतर हेची ध्यान
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

मकर कुंडले तळपती श्रवणी
कंठी कौस्तुभ मणी विराजित
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
पाहीन श्रीमुख आवडीने
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

हे सारे घडत होते पण सामर्थ्य कोण देत होते ..प्रत्यक्ष हरीच

आपुलिया बळे नाही मी बोलत । सखा कृपावंत वाचा त्याची ॥१॥
साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी । शिकविता धनी वेगळाची ॥2॥
काय म्यां पामरें बोलावी उत्तरे । परि त्या विश्वंभर बोलविले ॥3॥
तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा । वागवी पांगुळा पायाविण ॥१॥

समाजातील अंधश्रद्धेवर मार्मिक टीका ,प्रपंच मर्म ,देवाचा गोंधळ’,ओव्या अनेक साहित्य प्रकार त्यांच्या प्रतिभेतून स्फुरत राहत होते.
एक गमतीशीर रचना ,प्रपंचातून मन सुटत नाही ..देवाची गोडी काही लागत नाही...

परिसे गे सुनेबाई |
*नको वेचू दूध दही ||१
*आवा चालीली पंढरपुरा |
*वेसींपासुन आली घरा ||२
*ऐके गोष्टी सादर बाळे |
*करि जतन फुटके पाळे ||३
*माझा हातींचा कलवडू |
*मज वाचुनी नको फोडूं ||४
*वळवटक्षिरींचे लिंपन |
*नको फोंडू मजवाचून ||५
*उखळ मुसळ जाते |
*माझे मनं गुंतले तेथे ||६
*भिक्षुंक आल्या घरा |
*सांग गेली पंढरपुरा ||७
*भक्षी परिमित आहारु |
*नको फारसी वरों सारू ||८
*सुन म्हणे बहुत निके |
*तुम्ही यात्रेची जांवे सुखे ||९
*सासुबाई स्वहित जोडा |
*सर्वमागील आशा सोडा ||१०
*सुनमुखीचे वचन कानी |
*ऐकोनी सासु विवंची मनी ||११
*सवतीचे चाळे खोटे |
*म्या जावेसे इला वाटे ||१२
*आता कासया यात्रे जाऊ |
*काय जाऊन तेथें पाहू ||१३
*मुले लेकरे घर दार |
*माझे येथेंचि पंढरपूर ||१४
*तुका म्हणे ऐसे जन |
*गोवियेलें मायेंकरून ||१५

जुन्नर ,कोल्हापूर अनेक ठिकाणी तुकारामाच्या कीर्तनाचे सप्ताह ऐकण्यास झुंबड उडत.त्यांच्यामुळे अनेक जन वारकरी,माळकरी झाले.
पण आवली मात्र काळ्या पांडुरंगाचे गुणगान गात नव्हती..कर्काशाच होती.

देव भक्तालागीं करूं नेदी संसार । अंगें वारावार करोनि ठेवी ॥१॥
भाग्य द्यावें तरी अंगीं भरे ताठा । म्हणोनि करंटा करोनि ठेवी ॥ध्रु.॥
स्त्री द्यावी गुणवंती तिपे गुंते आशा । यालागीं कर्कशा करुनी ठेवी॥२॥
तुका म्हणे साक्ष मज आली देखा । आणीक या लोकां काय सांगों ॥३॥

ते तिला समजावून सांगत मन मोठ कर..तरच तुझा माझा वियोग होणार नाही.

हळू हळू तुकारामांच्या रचना सर्वत्र गाजू लागल्या.एक कुणबी रचना करतो,वेदांवर टीका करतो असे खुसपट रामेश्वर भट यांच्या समोर येते.”तू या पुढे अभंग लिहू नको जे लिहिले ते इंद्रायणीत बुडव”असे फर्मान तुकोबांना सुचवतात.
तुकोबाराय याने उद्विग्न होतात,ही काय ईश्वराची माया ?तोच रचविता होतो आणि तोच परीक्षा घेतो?
नाही या परीक्षेस सामोरे गेले पाहिजे..
जलदिव्य केलेच पाहिजे.तुकाबांचे देवाशीच भांडण लागते.माझा संशय फिटू दे.हे लिखाणाचे बाड देवाचे असेल तर ते तरून वर येईल नाहीतर या पाण्याआड राहिलं!
आठ दहा चौदा दिवस इंद्रायणी काठी ते अन्नपाण्याशिवाय संकेताची वाट पाहत ठाण मांडतात.
आणि संशय फिटतो.ज्या दोर्यांनी बाड दगडाने बांधलेले असतात ते मासे खातात आणि वह्या पाण्यावर तरंगून येतात.

थोर अन्याय केला | तुझा अंत म्यां पाहिला |
जनाचिया बोला | साठीं चित्त क्षोभविलें ||१||
भोगविलासी केला क्षीण | अधम मी यतिहीन |
झांकूनी लोचन | दिवस तेरा राहिलों ||२||
अवघें घालूनियां कोडें | तहानभुकेचें सांकडें |
योगक्षेम पुढें | तुज करणें लागलें ||३||
उदकीं राखिलें कागद | चुकविला जनवाद |
तुका म्हणे ब्रीद | साच केलें आपुलें ||४||

तुकाराम यांचे जीवन आता मोगरीचा मळा झाला ,सर्वत्र सुगंध त्याने चहू दिशांनी भ्रमर त्यांजकडे धाव घेऊन येऊ लागतात.
जनतेचा राजा शिवाजी महाराजही तुकोबांच्या कीर्तनाचा रसस्वाद घेतात..त्या वर वीररस यातील रचना घडतात.

ढालतलवारें गुंतले हे कर ! म्हणे मी जुंझार कैसा झुंजो !!१!!
पेटी पडदळे सिले टोप ओझे ! हे तो जाले दुजे मरणमूळ !!२!!
बैसविले मला येणें अश्वावरी ! धावू पळू तरी कैसा आता ? !!३!!
असोनि उपाय म्हणे हे अपाय ! म्हणे हायहाय काय करू !!४!!
तुका म्हणे हा तो स्वयें परब्रह्म ! मूर्ख नेणे वर्म संतचरण !!५!!

माउलीने १६ व्या वर्षी समाधी घेतली आपण ४२ वर्षे जगलो आता इंद्रियांना हा तेज झोत सहन होईना.पण थांबावयास हवे.येथे रेंगाळून राहायला नको.

फाल्गुन वद्य बीज
आपुल्या माहेरा जाईन मी आता ! निरोप या संता हाती आला !!१!!
सुख दुःख माझे आइकिलें कानी ! कळवळा मनी करुणेचा !!२!!
करुनी सिद्ध मूळ साऊलें भातुके ! येती दिसे एकें न्यावयासी !!३!!
त्याचि पंथे माझे लागलेसें चित्त ! वाट पाहे नित्य माहेराची !!४!!
तुका म्हणे आता येतील न्यावया ! अंगे आपुलिया मायबापा !!५!!

प्रचंड वावटळ आली ,गरगरत... धूळ उठली ..जन डोळे चोळत राहिली ,काही नजरेस पडेना.
तुकोबांभोवती वेगाने वावटळ आली भिरभिरत आकाशापर्यंत गेली ,ब्रम्हांड घुसळून निघत होते...
तुकोबा दिसेनासे झाले
तुकोबाराय आकाशाएवढा झाला होता .

अणुरेणुया थोकडा ।
तुका आकाशा एवढा ||

-भक्ती

Sunday, June 18, 2023

मेघदूत

 

आषाढस्य प्रथमदिवसे-महाकवी कालिदास जन्मदिवस



तर आषाढ जवळ येतोय तेव्हा मेघदूत वाचायचे इच्छा पूर्ण करावी असं ठरवलं.संस्कृत थोड थोड कळते ,तेव्हा मराठीच्या भाषांतर असलेले मेघदूत कोणते घ्यावे याची विचारपूस जाणकारांत केली-कुसुमाग्रज आणि शांता शेळके यांचे मराठीतलं मेघदूत प्रसिद्ध आहे हे कळाले.दोन्ही पुस्तक मागावली.मेघदूताची जवळपास २००पेक्षा जास्त भाषांतर उपलब्ध आहेत त्यात चिपळूणकर गुरुजी,बोरकर,सीडी देश्स्मुख ,बोरवणकर यांचेही मेघदूत टीका प्रसिद्ध आहेत.

कुसुमाग्रज १९५६ साली तर शांता शेळके यांनी १९९४ साली मेघदूत मराठीत अनुवादित केलं आहे.दोन्ही अनुवाद आपआपली विशेषता,भाषा घनता दाखवतात.शांता शेळके यांनी ‘पादाकुलका’ या छंदाच वापर केला तर कुसुमाग्रजांनी छंदोबद्ध भावानुवाद केला आहे.शांता बाईंच्या मेघदुतामध्ये शब्द सामर्थ्य खुलून दिसते ,कुसुमाग्रजांच्या मेघदुतामध्ये एका सरल रसाळता आहे.



माझा अनुभवलेले मेघदूत:

११६ (कुसुमाग्रज अनुवादित) १२०(शांता शेळके अनुवादित)श्लोक असलेले मेघदूत एक खंडकाव्य आहे.जे दोन भागात आहे –पूर्वमेघ आणि उत्तरमेघ !

पूर्वमेघ:

पहिल्याच श्लोकामध्ये सेवेत प्रमाद केल्यामुळे कुबेराकडून शाप मिळालेला यक्ष रामगिरी पर्वतावर मायभूमी अलकनगरीपासून दूर एकटाच कंठत आहे हे सांगितले आहे.

कश्चित् कान्ताविरहगुरुणा कश्चित् कान्ताविरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत्तः शापेनास्तङ्गमितमहिमा वर्षभोग्येण भर्तुः ।

 यक्षश्चक्रे जनकतनयास्नानपुण्योदकेषु स्निग्धच्छायातरुषु वसतिं रामगिर्याश्रमेषु ॥ १

असा दूर शापित यक्ष विरह भावनेने कृश झाला आहे की त्याच्या हातामधून कंगणही गळून पडत आहे...या बारकाव्यातूनच पुढील काव्यात अशा अनेक रुपकाची लयलूट असणार हे लक्षात येते.अलकानगरी पासु आपल्या प्रिय पत्नी पासून दूर असणाऱ्या या यक्षाला आषाढाच्या पहिल्याच दिवशी कृष्ण मेघ हा खेळकर गजाप्रमाणे डोंगराशी खेळणारा भासतो.आणि हाच आपला निरोप –विरह यातना आपल्या पत्नीकडे पोहचवू शकतो आणि ठरवतो या मेघालाच दूत करायचे-मेघदूत !

तस्मिन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्तः स कामी नीत्वा मासान् कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठः मासान् कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठः । आषाढस्य प्रशथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं (प्रशम) वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ॥ २

तिसऱ्या आणि चतुर्थ श्लोकामध्ये या मेघाचे कौतुक करून ,यक्ष त्याचे स्वागत करतो.

तस्य स्थित्वा कथमपि पुरः कौतुकाधानहेतोः अन्तर्बाष्पश्चिरमनुचरो राजराजस्य दध्यौ । 

मेघालोके भवति सुखिनोऽप्यन्यथावृत्ति चेतः कण्ठाश्लेषप्रणयिनि जने किं पुनर्दूरसंस्थे ॥ ३॥


 प्रत्यासन्ने नभसि दयिताजीवितालम्बनार्थी जीमूतेन स्वकुशलमयीं हारयिष्यन् प्रवृत्तिम्हारयिष्यन् प्रवृत्तिम् ।

प्रवृत्तिम् स प्रत्यग्रैः कुटजकुसुमैः कल्पितार्घाय तस्मै प्रीतः प्रीतिप्रमुखवचनं स्वागतं व्याजहार ॥ ४

पण असा मेघ नावाचा भौतिक घटक दूत कसा होणार?याचे उत्तर कवी देतोच ....विरहाने व्याकुळ प्रेमी ज्या प्रमाणे चंद्रमुख पाहून सजनीला आठवून गप्पा मारतो ,प्रेमिका फुलांशी प्रियकराच्या गप्पा मारते ,त्याचप्रमाणे अशा व्याकुळ यक्षाला चेतन अचेतन यांच्या सीमा राहत नाही...उरते केवळ उत्कट भावना!

धूमज्योतिः सलिलमरुतां संनिपातः क्व मेघः संदेशार्थाः क्व पटुकरणैः प्राणिभिः प्रापणीयाः । 

इत्यौत्सुक्यादपरिगणयन् गुह्यकस्तंइत्यौत्सुक्यादपरिगणयन् गुह्यकस्तं ययाचे कामार्ता हि प्रकृतिकृपणाश्चेतनाचेतनेषु ॥ ५

यापुढे आठव्या श्लोकापर्यंत यक्षाने आपल्या विरह यातना मेघाला सांगितल्या आहेत.आता तू रामागीरीहून निघणार आणि अलका नगरीकडे आक्रमण करणार तेव्हा तो मार्ग कसा आहे याचे वर्णन केले आहे.कशा प्रकारचे शेत,विविध पक्षी ,फुलं ,जलाने भरलेले जलाशय ,पर्वतरांगा यांचे रसाळ वर्णन आहेच पण या मेघासह वाचकही या प्रवासाला निघतात.

विंध्य,विदिशा नगर,वेत्रवती सरिता,अवंती नगरी,सिंधू नदी,शिप्रा ,महाकाल नगरी ,देवगिरी,व्योमनदी,गंगा,,चंबल,ब्रम्ह्वार्ता,कुरुक्षेत्र ,सरस्वती नदी,क्रौंचगिरी,कैलास,मानस सरोवर आणि मग अलका नगरी असा मार्ग १५-२० श्लोकामध्येसांगताना कालिदास भूगोलाचाही अभ्यासक होता हे समजते.या श्लोकांमध्ये निसर्ग सौंदर्य  वर्णित केले आहे.मेघदूतमधला प्रमुख रस ‘शृंगार रस’!

नदीलादेखील एक सौदर्यवती ललना भासवली आहे(श्लोक २८)

 चिक्षोभस्तनितविहगश्रेणिकाञ्चीगुणायाः 

संसर्पन्त्याः स्खलितसुभगं दर्शितावर्तनाभेः । 

निर्विन्ध्यायाः पथि भव रसाभ्यन्तरः सन्निपत्य 

स्त्रीणामाद्यं प्रणयवचनं विभ्रमो हि प्रियेषु ॥ 


मेघाला त्या नदीचा प्रियकर सांगितला आहे (श्लोक ३१,४०).

गम्भीरायाः पयसि सरितश्चेतसीव प्रसन्ने छायात्मापि प्रकृतिसुभगो लप्स्यते ते प्रवेशम् ।

प्रवेशम् तस्मात् तस्याः तस्मात् कुमुदविशदान्यर्हसि त्वं न धैर्यान् मोघीकर्तुं चटुलशफरोद्वर्तनप्रेक्षितानि ॥ 


शृंगारिक रतक्रीडेचे श्लोक केवळ शहारे देणारे आहेत (श्लोक ३७,३८,४१)

तस्याः किं चित् करधृतमिव चित् करधृतमिव प्राप्तवानीरशाखं नीत्वा नीलं सलिलवसनं मुक्तरोधोनितम्बम् ।

मुक्तरोधोनितम्बम् प्रस्थानं ते कथमपि सखे लम्बमानस्य भावि ज्ञातास्वादो विवृतजघनां को विहातुं समर्थः ॥ ४1


ह्याच बरोबर भक्ती रसाचे श्लोक आहेत.मेघाला महाकाल शंकाराची पूजा करण्यासाठी तुझ्या मेघ गर्जना डमरूसम त्या मंदिरात घुमू देत(श्लोक ३४,३६)पुढे हिमायात पोहचल्यावर शंभूची अर्चना करावी सांगितले(श्लोक ५६).

अप्यन्यस्मिञ् जलधर अप्यन्यस्मिञ् महाकालमासाद्य काले स्थातव्यं ते नयनविषयं यावदत्येति भानुः । 

कुर्वन् संध्याबलिपटहतांकुर्वन् संध्याबलिपटहतां शूलिनः श्लाघनीयां आमन्द्राणां फलमविकलं लप्स्यसे गर्जितानाम् ॥गर्जितानाम् 

कार्तिकेयाचे सेवा करण्यासाठी मेघ तुझे जल येथे उतरू दे(श्लोक ४३).

उत्तरमेघ –

उत्तरमेघाचा प्रमुख भाव विरह आहे.अलकानगरीत पोहचल्यावर मेघा तुला अवंती नगरी कशी दिसेल याचे सौंदर्यात्मक विवेचन आहे.(श्लोक २ ते १२)आणि तेराव्या श्लोकामध्ये यक्षाचे घर नेमके कसे ओळखायचे याचेवर्णन आहे,दारी इंद्रधनू तोरण...

तत्रागारं धनपतिगृहानुत्तरेणास्मदीयं दूराल्लक्ष्यं सुरपतिधनुश्चारुणा तोरणेन ।

यस्योपान्ते कृतकतनयः कान्तय वर्धितो मे हस्तप्राप्यस्तबकनमितो बालमन्दारवृक्षः ॥ 

तिथे विरहाने तळमळनाऱ्या पत्नीचा दिनक्रम कसा संथ निरस झाला असेल ,ती सतत अश्रू ढाळत असेल (श्लोक ४४ ).मुखावरील तेज ,केसांची रया,रात्रीची तिची घालमेल ,एकांत व्याकुळ रात्री कशा ती जगात असेल हे सांगितल्या आहेत.

अङ्गेनाङ्गं प्रतनु तनुना गाढतप्तेन तप्तं सास्रेणाश्रुद्रुतमविरतोत्कण्ठमुत्कण्ठितेन । 

उष्णोच्छ्वासं समधिकतरोच्छ्वासिना दूरवर्ती सङ्कल्पैस्तैर्विशति विधिना वैरिणा रुद्धमार्गः ॥ 

दोघांच्या प्रणयाच्या रात्री काही श्लोकात शृंगार रसात सांगितल्या आहेत.

अशा माझ्या प्रिय पत्नीला तू मेघा माझे कुशल सांग ,तिच्याविना मीही येथे तळमळतो आहे,आता केवळ चार मास धीर धर!असा निरोप सांग(श्लोक ५३)तिच्या कुशलतेचा निरोप घेऊन तू मेघा त्वरित माझाकडे निघून ये ही याचना यक्ष मेघदूताला करतो(श्लोक ५४)

कच्चित् सोम्यकच्चित् व्यवसितमिदं बन्धुकृत्यं त्वया मे प्रत्यादेशान्न खलु भवतो धीरतां कल्पयामि ।

 निःशब्दोऽपि प्रदिशसि जलं याचितश्चातकेभ्यः प्रत्युक्तं हि प्रणयिषु सतामीप्सितार्थक्रियैव ॥ 

-भक्ती



आषाढस्य प्रथमदिन.

 

 

 

Sunday, June 11, 2023

बेलफळाचे सरबत

 



बेलफळ पहिल्यांदाच पाहिलं.मोठ्या शहरात ते उन्हाळ्यात विकतही सहज मिळते.मला मात्र झाडाचा शोध लागला म्हणून मिळाला.

तर सध्या एकच बरं म्हणून एकच आणलं.टणक बाहेरच्या हिरवट केशरी रंगाच्या आवरणाला जरा चिर होती.जरा सुगंध घ्यावा वाटला.अहा,काय तो परिमळ!घरी पोहचेपर्यंत सगळ्या रस्त्याने तो मधुर गंध मनभर भरून घेत राहिले.तसच ठेवलं.निवांत सरबत ,जेली करेन असं ठरवलं.आज दुपारी त्याची आठवण आली.पुन्हा गंध घेतला,बत्त्याने टणक आवरण दोन भागात फोडले.आत मध्यम पिकलेला पिवळसर गर होता.कौट फळासारखाच बिया,शिराधागे होते.जरा चिकट होता.गर चमच्याने काढला.थोडासाच गर मिक्सरमधून फिरवला.गाळून घेतला,भलताच तुरट लागला.साखर वापरायची नव्हती.तेव्हा यु-ट्युबकडे जावेच लागले.तेव्हा योग्य पाककृती समजली.

कृती-बेलफळाचा गर अर्धे पाण्याने भरलेल्या पातेल्यात चमच्याने कुस्करून घ्यावा.बिया फुटू देऊ नये.तुरटपणाला त्याच जबाबदार असतात म्हणूनच मिक्सरमधून बियासह गर फिरवू नये.तर तो गर पाण्यात अर्धा -एक तास ठेवावा.नंतर गाळून घ्यावा.शक्यतो इथे पण साखर लागतेच.आवडीनुसार साखर ,पूदिना पानं,सैंधव मीठ घालावे.बर्फ आणि आणखीन गार पाणी घालावे.सुंदर रंगाचे बेलफळ सरबत तय्यार!चवही एकदम रिफ्रेशिंग आहे.

बेलफळ सरबत उपयोग -बेलफळात व्हिटामिन C मुबलक आहे.शुगर लेव्हलही याने कमी होते.अनेक पोटाच्या विकारावर औषधाप्रमाणे,अन्टीबक्टेरियल असा गुणधर्म यांचा आहे.

माझ्या मिक्सरमधून वाटून एकत्र केलेल्या गरात पाणी, बर्फ,साखर टाकून निवांत उन्हाळ्यात अखेर अखेरच्या दुपारी याचा आस्वाद घेतला.आणि पुन्हा एक पारंपारिक पाककृती करण्याचे समाधान मिळवलं

-भक्ती

Saturday, June 3, 2023

पौर्णिमा

 पाहूनी शुभ्र चंद्रमुख

कोमल रात सजली

आरास चांदण्यांची

लयलूट प्रकाशाची


लक्ष दीप चमचमती

आकाश मंडप सजले

नित्य फुलले चांदण

केशर गंध वार्यावरती


लेवून सोनप्रभा

हिमकण अन् नदीजळ

कमलदेठ हर्षिले

पौर्णिमा साजरी


-भक्ती