#पक्षी_रूपके
पक्षिणी प्रभाती चारियासी जाये ।
पिलुवाट पाहे उपवासी ॥
तैसे माझे मन धरी वो तुझी आस ।
चरण रात्रंदिवस चिंतीतसे ॥२॥
तान्हे वत्स घरी बांधलेसे देवा ।
तया हृदयी धावा माउलीचा ॥३॥
नामा म्हणे केशवा तु माझा सोईरा ।
इवलाश्या पक्ष्यांचे दाणे टिपयाची सकाळची लगबग रोज पाहते हे दाणे टिपून त्यांना पिल्लाना भरवायचे असते.संतांनी यात रूपक शोधलं .मराठी संतांची निसर्गातील घटना रूपक म्हणून वापरायची प्रतिभा अभंग ओव्या वाचताना एका प्रतिसृष्टीत डोकवायचा आनंद देतात.या अभंगात ईश्वराच्या मातृत्वपूर्ण कृपेचे प्रतीक आहे. जसे आई पक्षी आपल्या पिल्लांसाठी दाणे आणते आणि ते उपाशी राहून वाट पाहतात तरी आई येऊन पोसते, तसे भक्त विरहात असला तरी विठ्ठल त्याच्याकडे धावतो.
आणि हे दाणे संचय करणे हे पक्षांत नाही ते रोजच्या रोज येणार दाणे टिपणारी ...हवे तेव्हडेच मग अजून रूपक यावर आहे ,
पक्षी अजगर न करी संचित ।
तयासी अनंत प्रतिपाळी ॥२॥
तुका म्हणे तया भार घातलिया ।
उपेक्षीना दयासिंधु माझा ॥३॥
निसर्गातील प्राणी -पक्षी, अजगर, बेडूक हे उदाहरण देत तुकोबा सांगतात की, जो संचित करत नाही, त्यालाही ईश्वर पोसतो. भक्तानेही प्रपंच करावा, पण त्यात गुंतून जाऊ नये..सर्व ईश्वरावर सोपवावे.
पक्ष्यांचे हि वागणूक इसापनीतीतही रूपकाने कथांमध्ये गुंफली गेली.चतुर कावळा कथा तर प्रसिद्धच आहे .
असाच एक चतुर कावळा मला रविवारी भेटला.एक कावळा इतका काव काव करत होता. तब्बल १५ मिनिटे न थांबता तो काव काव करत होता ..काय आज पाहुणे येणार का ? वगैरे विचार झाले .पण हा आपला काव काव करीत होता .मग लक्षात आलं कठड्यावर उरलेली खिचडी ठेवली होती. याला ती पाहिजे तो मला काव काव संदेश देऊन तिथून उठायला सांगतोय .मी हळूच उठून दूर गेले .तर पटदिशी आला आणि खिचडी खात बसला.एक मोठा घास घेऊन उडून गेला .खरंच कावळा किती हुशार त्या दिवशी पटले.
त्याच्या काव काव ने मला ज्ञानेश्वर माउलींचा अभंग/विरहिणी आठवली .भक्ताची विठ्ठलभेटीची तळमळ इतकी तीव्र आहे की साधा कावळा ओरडला तरी तो शुभशकुन वाटतो. कावळ्याला प्रेमाने, सन्मानाने बोलावले जाते ,जसे आई मुलाला बोलावते
पैल तो गे काऊ कोकताहे ।
शकुन गे माये सांगताहे ॥१॥
उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ ।
पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥
दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी ।
जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ॥३॥
दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी ।
सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥
आंबया डहाळी फळें चुंबी रसाळीं ।
आजिचे रे काळीं शकुन सांगे ॥५॥
ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणें ।
भेटती पंढरीराये शकुन सांगे ॥६॥
-ज्ञानेश्वर महाराज

No comments:
Post a Comment