Tuesday, June 25, 2024

कृष्णाच्या गोष्टी -४

 #कृष्णाच्यागोष्टी४

*रासलीला 



कृष्ण जीवनातील गोपीकृष्ण हा जसा टीकेचा विषय असतो तसा तो मधुराभक्तीचा प्राण आहे. महाभारतात या लीलांचा उल्लेख नाही.गोपीकृष्ण बद्दल अनेक प्रकारचे विचार आपल्याला वाचायला मिळतात. महाभारतात जेव्हा द्रौपदीला वेणी खेचून सभागृहात दु:शासन आणत होता.तिचा भरसभेत अपमान करत होता. तेव्हा लाचार झालेल्या आपल्या पतींना पाहून त्या पतीव्रतेने मदतीकरता हाक मारली ती कृष्णाला!

 "गोपीजन प्रिया कृष्णा धाव रे धाव"

 गोपीजन प्रिय हा कृष्ण जीवनावरील कलंक असता तर कठीण प्रसंगी त्याला मदतीला बोलवतांना द्रौपदीला कृष्णाची आठवण झाली नसती. लहान व किशोर वयातील कृष्णावर सर्वच लहान थोर वृद्ध अशा गोपींचे विलक्षण प्रेम होते. तो अतिशय सुंदर व गुटगुटीत मुलगा सर्वांना खूप खूप आवडत असे. महाभारतात वरील द्रौपदीद्वारे केलेला उल्लेख सोडता वज्र गोपीकृष्ण संबंध आढळत नाही. पुढे विष्णुपुराणात गोपी कृष्णाचा प्रेममूल्य प्रतिव्रता दृष्टीने आहे. तर भागवत पुराणात याला शृंगार साज चढतो. ब्रह्मवैवर्तात संपूर्ण विषयिकतेचे स्वरूप प्राप्त होते.


*व्रज गोपी- विष्णुपुराण



पंचम अंशाच्या तेराव्या अध्यायात ५८ श्लोकात असे लिहिले आहे ,

कृष्णं गोपांगना रात्रौ रमयन्ति रतिप्रिया:||

 हा रमयन्ति आणि रतिप्रिय यातील 'रम्' धातूचा खरा अर्थ क्रीडा करणे असा आहे .खरे तर रास ही एक प्रकारची क्रीडा आहे,ज्यामध्ये स्त्री पुरुष एकमेकांचे हात धरून गाणी गातात ,गोलाकार नाचत असतात. प्राचीन काळात स्त्रियांच्या वेद अध्ययनावर बंदी तर कर्ममार्ग कष्ट साध्य होते आणि योग साधना देखील अवघडत होती. म्हणून ज्यातून चित्तरंजनही होईल आणि परमेश्वर चरणी मन ,बुद्धि गुंतुन पडेल असा भक्ती मार्ग रास क्रीडेच्याद्वारे कृष्णाने स्त्री वर्गाला दाखवला असे काही विद्वानांचे मत आहे. पाश्चात्य बोलडान्स मात्र आपण मोठ्या उत्सुकतेने पाहतो कारण पाश्चात्य समाजात याला कलंक मानत नाही किंवा नींद्य ही मानत नाही. खरे तर कृष्णाच्या काळात हे यमुना तीरावरच्या गोप गोपिकांचे असे नाच सामाजिक दृष्टीने निंद्य मानले जात नसत. पावसाळा संपल्यानंतर सुगीच्या दिवसात यमुनेच्या तीरी चांदण्यात असे नाच होत असे. याला सुगीचा आनंदोत्सव साजरा करण्याची पद्धत असे म्हटले जाते .


*व्रज गोपी- हरिवंश

यमुना तीरावरच्या चालणाऱ्या या नृत्यांना हरिवंशात रास ही संज्ञा नाही त्यांना इथे नाव आहे 'हल्लीस' आणि विष्णू पर्वाच्या त्या ७० व्या अध्यायाचे नाव आहे हल्लीसक्रीडा.हल्लीस म्हणजेच स्त्री-पुरुषांनी हातात हात घालून गोलाकार नाचत गाणी म्हणण्याचा प्रकार ,मंडल करून नृत्य करणे.

विष्णुपुराणातील गोपींचा कृष्णभक्ती योग हरीवंशकर्त्याला समजलाच नाही. हरिवंशात अनेक ठिकाणी विलासप्रियतेचे चित्रण आले आहे. 

*व्रज गोपी भागवत

 हरिवंशापेक्षा गोपींचा अधिक विलासी भाव येथे वर्णिला आहे .पण त्या साऱ्याला भागवतकारांनी एक आध्यात्मिक डूब दिली आहे. 


*गोपीवस्त्रहरण





भागवतातील रास नृत्याचा विचार करण्याआधी दशांस्कंदाच्या बाराव्या अध्यायातील गोपी वस्त्रहरण प्रसंगाचे विवेचन करणे योग्य ठरेल. ही कथा महाभारत विष्णुपुराण किंवा हरिवंशात नाही. गोपींच्या कृष्णावरील अतिप्रेमामुळे त्यांना कृष्णाला पती रूपात प्राप्त व्हावे असे वाटले आणि त्यासाठी त्यांनी 'कात्यायनी' नावाचे व्रत एका महिन्यात केले. नदीत स्नान करायचे .तीरावर वस्त्र उतरून ठेवायचे आणि डुबकी घ्यायची. याप्रकारे महिन्याच्या शेवटच्या दिवशी ज्या दिवशी व्रत पूर्ण होणार होते त्या दिवशी त्या यमुनेत स्नान करत होत्या. तेव्हा कृष्ण तेथे आला त्यांनी सर्व गोपींची वस्त्रे उचलली आणि जवळच्या कदंब वृक्षावर जाऊन तो चढून बसला. त्या त्याला वस्त्रे परत देण्याची याचना करू लागल्या.भागवतकरांच्या म्हणण्याप्रमाणे गोपींना त्यांचे कर्मफल देण्याकरता तेथे आलेल्या कृष्णाने त्यांची वस्त्रे परत करण्याचे नाकारले.म्हणाला, बाहेर या आणि तुमचे हात जोडून मला विनंती करा मग मी वस्त्रे परत देईन. ईश्वराला कोणीही भक्तीने सर्वस्व अर्पण केल्यापासून त्याची प्राप्ती होत नाही.गोपींनीही कृष्णाला प्राप्त करण्यासाठी त्याला सर्वस्व अर्पण केले. स्त्रीला धन कर्म धर्म भाग्य या सगळ्यांपेक्षा लज्जेचा त्याग करता येत नाही. कृष्णाने गोपींना तो लज्जात्याग करायला लावला .गोपींचे सर्व समर्पण कामवासनाजन्य नसून ते भक्तीजन्य होते, हा भागवतकरांचा दावा आहे.

परंतु वस्त्रहरणाच्या प्रसंगात कृष्णावर परस्त्री गमनाचा कलंक येतो आणि तो कुठलाही आध्यात्मिक रूपकाने पुसता येत नाही याचा भागवतकरांना विसर पडलेला दिसतो. पण कृष्णाला जितेंद्रिय म्हणून दोष देता येत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. हे सर्व प्रकरण बघता कृष्णचरित्रावर हा डाग मानला जाऊ नये असे दिसते. कारण वृंदावन सोडून मथुरेत आल्यानंतर कृष्ण कधीही परत गोकुळात आला नाही. गोपींच्या प्रेमात तो तसा अडकलेला असता.तर हे घडले नसते. कृष्णाचे दैविकरण झाल्यानंतर कृष्ण जीवनात हे प्रसंग प्रक्षिप्त झाले असावेत. कारण देवाच्या बाबतीत काही होत नाही ,पाप पुण्याच्या संकल्पना आपल्या सामान्यांसाठी!

*व्रजगोपी ब्रह्मवैवर्त पुराण -"राधा"



ब्रह्मवैवर्त पुराण आणि कवी जयदेवाचे प्रख्यात  दीर्घ काव्य 'गीतगोविंद' याशिवाय दुसऱ्या कुठल्याही प्राचीन ग्रंथात राधेचा उल्लेख सापडत नाही. रासपंचाध्यायातच काय संपूर्ण भागवतात ही राधा नाही, विष्णुपुराणात ,हरीवंशात किंवा महाभारतात ही कुठे राधा नाही. पण नव्या ब्रह्मवैवर्त पुराणात कृष्णाची एक नवी प्रतिमा उभी केली गेली आहे. या पुराणात कृष्ण हा विष्णूचा अवतार नाही. तर कृष्ण हेच मुलतत्व आहे. विष्णू वैकुंठात राहत असला पण कृष्ण गोलोक त्यापेक्षा कितीतरी उंचावर आहे आणि त्याच्या रास मंडळामध्ये कृष्ण राहतो असे सांगितले आहे.या गोलकाची अधिष्ठाती देवता कृष्ण विलासधरिणी आहे .रास मंडळाला धारण करणारी ती राधा आहे. वृंदावनातील बाळकृष्ण आणि राधा एक विवाहित तरुणी आहे. परंतु पौराणिक कथेनुसार राधा कोणा एका श्रीदामाच्या शापामुळे पृथ्वीवर मानवी रूपात राहिली.गोपी पत्नी आणि तरीही कृष्णप्रिया म्हणून कलंकिनी ठरली.तसा तिला शापच होता राधे मागून कृष्ण पृथ्वीवर जन्मला म्हणून वृंदावनात तो बाल रुपात होता तरीही राधेचा प्रियकर होता कारण तो देव होता. ब्रह्मवैवर्त पुराणातील राधाकृष्ण संबंधावर नवा वैष्णव धर्म आधारलेला आहे. विष्णुपुराण, भागवत पुराण कुठल्याही इतर पुराणात या वैष्णव  धर्माचे नाव सुद्धा सापडत नाही. वैष्णवधर्माचे राधा हे केंद्र आहे आणि त्याच्या आधारे जय देवाने आपल्या गीत गोविंद नामक दीर्घ काव्याची रचना केली आहे. आणि त्याचाच आधार घेत अनेक ठिकाणी कृष्ण संगीताची इमारत उभी झाली आहे.

* प्राथमिक  वैष्णव धर्माचा आधार वेदांतील ईश्वरवाद आहे. वेदांता द्वैतवाद आणि अद्वैतवाद यांची चर्चा आहे. प्राचीन काळी अद्वैतवादात अशी भिन्नता नव्हती. ईश्वर जगातील संपूर्ण चेतन आणि अचेतन सृष्टीत भरला आहे पण तो सर्वात भरूनही उरला आहे ही वैष्णवी धर्माची धारणा आहे. तांत्रिक धर्मातील वैशिष्ट्ये वैष्णव धर्मात संलग्न करून वैष्णव धर्माचे नव्याने रचना करण्याचे कार्य ब्रह्मवैवर्तकाराने केले आहे. यातील राधा ही सांख्यांची मूळ प्रकृती आहे आणि कृष्ण म्हणजे वेदांत त्यांचा परमात्मा! ब्रह्मवैवर्तातील श्रीकृष्ण जन्मखंडात कृष्ण पुन्हा पुन्हा राधेला तू मूल प्रकृती आहेस असे सांगतो. परंतु या अभिनव वैष्णव सांप्रदायातील मूल प्रकृती राधा सांख्यातील जशीच्या तशी प्रकृती नाही. सांख्यांची प्रकृती तांत्रिक शक्ती असते.प्रकृती वाद व शक्तिवाद यामध्ये अंतर आहे. प्रकृती पुरुषापासून संपूर्ण तया भिन्न असते. परंतु परमात्मा शक्तीचा आधार आहे .त्यामुळे आत्मा आणि शक्ती भिन्न असू शकत नाही. हा शक्तीवाद फक्त तंत्रापुरता मर्यादित राहिला नाही वैष्णवांनी सांख्यांच्या प्रकृतीला वैष्णव शक्तीचे रूप दिले आहे.ते लिहितात कृष्ण राधेला म्हणतो "राधे तुझ्याशिवाय मी फक्त कृष्ण आहे पण तुझ्याबरोबर राहिल्याने मी' श्री 'कृष्ण झालेला आहे." विष्णुपुराणाच्या प्रथम अध्यायाच्या आठव्या अंशमत 'श्री' चा महिमा वर्णिला आहे. आणि तिच्याविषयी जे जे सांगितले आहे ते ते ब्रह्मवैवर्तकरांनी राधेच्या बाबतीत सांगून राधा हीच 'श्री' आहे आणि ईश्वराची शक्ती आहे दोघांचा विधी पूर्वक परिणय म्हणजेच शक्तिमानाच्या शक्तीचा स्फुरण आहे शक्तीचा विकास म्हणजे दोघांचा विहार आहे असे सांगितले आहे. पण भागवताच्या दशांश भागतील तिसऱ्या अध्यायातील २८ व्या श्लोकात 'अनयाराधीतो नूनम' असा संदर्भ आला आहे म्हणजे यात अनयचा आणि राधेचा उल्लेख केला आहे .पण यात राधा धातू चा अर्थ आहे आराधना किंवा पूजा करणारी कृष्णाची आराधिका राधा .तर अमरकोश मध्ये कृतिका नक्षत्रापासून राधा विशाखा नक्षत्र १४ वे .पूर्वी गणना कृतिका नक्षत्रापासून होत असे कृतिका नक्षत्रापासून राशी गणना सुरू केली तर विशाखा नक्षत्र वर्षा मध्यावर येते म्हणून राधा रास मंडळात मध्यवर्ती असो नसो राशी मंडळात ती मध्यवर्तीच होती. गोपीकृष्ण राधाकृष्ण संबंध हरिवंशकारांनी आणि भागवत ब्रह्मवैवर्ततादी पुराणांनी किती विलासी पद्धतीने रंगवले असले ,सकृत दर्शनी वैश्विक दाखवले असले तरी कृष्ण एक महापुरुष या दृष्टीने त्याच्या या किशोरावस्थातील चरित्राकडे चारित्र्य राखण्याच्या दृष्टीने या प्रसंगाकडे बोट दाखवणे मुळीच रास्त नाही.


धर्म संरक्षणार्थ अवतरण झालेल्या कृष्णाच्या जीवनातील रास क्रीडेला चंद्रावरच्या काळाप्रमाणे कलंक असे कसे म्हणता येईल ?

गुरु सांदिपनींने व्यभिचारिक कृष्णाला आपला शिष्य म्हणून मान्यता दिली असती का ? कंसवधानंतर वृंदावनात जाऊन परतलेल्या बलरामाजवळ कृष्ण वृंदावनातील एखाद्या गोपी मध्ये अडकलेला असता तर तिची खास चौकशी त्याने केली नसती का? कृष्णाच्या पराक्रमावर भाळून रुक्मिणीने कृष्णावर प्रेम केले होते कृष्णाच्या वृंदावनातील अवैध्य प्रेमाच्या भानगडी तिच्या कानावर गेल्याशिवाय राहिल्या असत्या का? गेली हजारो वर्ष भारतवर्ष या महापुरुषावर विलक्षण प्रेम करत आला आहे का बरे ?या साऱ्यांच्या प्रश्नांची नकारार्थात उत्तरच सारे गवसते असे म्हणायला हवी.


संदर्भ -शोध कृष्णाचा -प्रवसी पूर्णत्वाचा 

लेखक- प्रा.डॉ.राम बिवलकर

Monday, June 24, 2024

कृष्णाच्या गोष्टी-३

 

यमलार्जुन भंग



एक दिवस अवखळ कृष्णाला यशोदेने एका उखळीला बांधले. ती कामासाठी इतरत्र निघून गेली. छोटासा कृष्ण उखळीसह अंगणात आला. अंगणातच यमलार्जुन नावाचे दोन वृक्ष होते. कृष्ण उखळीसह त्यामधून पुढे निघाला, आकाराने छोटी उखळ झाडाच्या खोडांनाच अडकली. तरीदेखील कृष्ण ती ओढतच राहिला.तेव्हा दोन्ही वृक्ष त्या जोरदार धक्क्याने आवाज करत जमिनीवर उन्मळून पडले. ही कथा विष्णुपुराण आणि महाभारताच्या सभापर्वात आहे. धष्टपुष्ट कृष्णाने उखळी ओढून नेण्याचा प्रयत्न केला तर ते जरासे नाजूक वृक्ष मोडणे साहाजिक आहे.भागवत पुराणांमध्ये यामागे कुबेराच्या दोन मुलांना शापामुळे वृक्षरूप घ्यावे लागले होते.कृष्णाने ते वृक्ष मोडून पाडल्याने त्यांना शाप मुक्त केले अशी कथा आहे.या कथेमुळेच कृष्णाचे नाव दामोदर असे पडले.शंकराचार्यांच्या म्हणण्यानुसार दामोदर म्हणजेच इंद्रिय निग्रह करून ज्याने उच्च स्थान प्राप्त केले आहे असा .दम म्हणजे इंद्रिय निग्रह आणि उदर म्हणजे उत्कृष्ट किंवा वर जाण्याची गती! महाभारतातदेखील दामोदर शब्दाचा उल्लेख आहे. तर भागवत मध्ये दामन या शब्दाचा गाई गुरे बांधतात ते दावे असा अर्थ आहे. ज्याच्या पोटाला दावे बांधले आहेत तो दामोदर.


गोकुळ व्रजा मधून वाढत्या लांडग्यांच्या त्रासामुळे गोकुळ वृंदावनात हलवण्यात आले होते. वृंदावनात गोप सवंगड्यांबरोबर कृष्ण मोठा होत होता.त्यांच्याबरोबर तोही गाई गुरे चरायला नेत असे. तो बासरी वाजवायला शिकला होता आणि थुंब्याचा म्हणजेच ढोलकी सारख्या एका वाद्याचा तो सुंदर ताल ही धरत असे.पर्ण वाद्याचा झंकारही करे .यमुनेच्या काठावर खेळ मांडत, कुस्तीचे फड उभे करत असे. दही दूध लोणी भाकर यांचे मिश्रण करून सगळे पदार्थ एकत्र करून काला करत सर्वजण एकत्र भोजन करीत. आणि यातूनच काल्याची प्रथा पडली असावी. असा हा कृष्ण सर्वांचा लाडका नेताच झाला .


वत्सासुर वध 

वत्सासूर जंगली गायीच्या गोर्हाच्या रूपात गाई गुरात हुंदडयला लागला. छोट्या गोपालांना शिंगाने मारू लागला .तेव्हा कृष्ण आणि इतर सवंगड्यांनी गोफण गुंड्याने आणि नंतर काट्यांनी या जंगली गोर्हाल्या ठार केले.


बकासुर वध



जंगलातल्या एका तळ्याकाठी गाई गुरांना पाणी पिण्यासाठी नेले असता.तिथे मोठ्या आकाराच्या बगळ्यांच्या एका थव्याने कालवडी, गुरे ,गोपाल यांच्यावर हल्ला केला. तेव्हा रामकृष्ण यांनी त्या बगळ्यांवर गोफणीतून दगडांचा वर्षाव केला. अनेकांना लोळवले. त्यातला एक तर महाकाय असा भयंकर बगळा होता. त्याने कृष्णावरच हल्ला केला तेव्हा कृष्णाने आपल्या हातातील काठीचा त्याच्या चोचीवरचा जबरदस्त प्रहार केला.त्यामुळे तो बगळा खाली पडला आणि अशा पद्धतीने त्याला तिथेच ठार केले.


अघासूर वध



घनदाट जंगलात एका भागात अजगर -अघासूर आल्याचे रामकृष्णांच्या कानी आले. एक दिवस ते सर्व आपल्या सवंगड्यांसह गाईंना घेऊन त्या जंगलात गेले. पुष्ट गाई पाहून अघासूर पुढे आला व एका गायीला गिळू लागला. तेवढ्यात कृष्ण व इतर सवंगडी यांनी अजासुरावर हल्ला केला. त्याला मारण्यासाठी धनुष्यबाण, भाले काठ्या, गोफणी ,कुऱ्हाडी ,कोळती अशी आपली वेगवेगळी सगळी हत्यारे त्यांनी वापरली. अघासूराने  गाईला तर सोडलेच परंतु सर्व सवंगड्यांनी कुऱ्हाडीने व कोयत्याने चिरून चिरून अघासूराचे तुकडे केले अशा तऱ्हेने अघासुराचा वध झाला.

या तीनही कथा केवळ भागवतात आहेत. विष्णुपुराण ,हरिवंश अथवा महाभारतात सापडत नाहीत.


धेनकासूर वध



वृंदावनात एका भागात ताल वृक्षांचे घनदाट जंगल होते. या भागात गाढवासारखे तोंड असलेल्या वनवृषभांचा मोठा सुळसुळाट होता. या वनवृषभांना धेनकासुर असे म्हटले जाई. धेनकासूर असलेल्या जंगलाच्या भागात मात्र अतिमधुर फळे खायला मिळत असत आणि तेथे गाईंसाठी भरपूर गवतही होते. त्यामुळे रामकृष्णाने धाडसाने व पराक्रमाने गोपाळांसह धेनकासुर म्हणजेच वनवृषभ यांना ठार करण्याचे अथवा जंगलातून दूर करण्याचे ठरवले. सर्व सवंगडी हे तीर कमटे काठ्या भाले गोफणी अशी हत्यारे घेऊन तालवनात पोहोचले .वनात पोहोचल्यावर गोपाळ मोठमोठ्याने हाकारे -कुकारे द्यायला लागले, ओरडायला सुरुवात केली. तर काहींनी बरोबर आणलेले शंख वाजवायला सुरुवात केली. कित्येकांनी बरोबर आणलेले शिंगेदेखील वाजवायला सुरुवात केली.सगळीकडे जंगलामध्ये गोपाळांनी केलेला हाहाकार ऐकू येऊ लागला. त्यामुळे वनवृषभ भयंकर डरकाळी फोडीत व पाय आपटत तेथे हजर झाले. अशावेळी वृषभांवर सगळ्यांनी दगड मारले. विलक्षण त्वेषाने हल्ले चढवले. त्यामध्ये बरेच वनवृषभ मारले गेले आणि तालवन सर्वांसाठी खुले झाले.


कालिया मर्दन



कालिया मर्दन ही कथा सर्वच पुराणांमध्ये आढळते. कालिया नागाचा फणा पकडून कृष्णाने त्याच्याबरोबर केलेल्या घनघोर युद्धाची सर्वांनाच माहिती आहे‌ लेखकाच्या मते ही अलौकिक कथा नसून वृंदावनाच्या परिसरात येऊन कालियाप्रमुख नाग  जमातीच्या लोकांनी तो प्रदेश विषमय करण्याच्यादृष्टीने त्या परिसरात राहणाऱ्या यादवात अंधाधुंद निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला होता. त्याला पायबंद घालून नागांना त्या भागातून घालवून लावण्याचा कृष्णाचा तो प्रयत्न असला पाहिजे.


प्रलंब वध 




कंसाने गोकूळातील कोण दोन बलवंत -दोन गोपी आहेत हे खात्री करण्याकरता प्रलंबनामक आपल्या एका विश्वासातील बलदंड माणसाला वृंदावनात पाठवले. सर्व सवंगडी एकदा हरिण- क्रीडा नामक खेळ खेळत होते. यामध्ये ज्याला हरिणासारखी उडी पाठीवरून मारता येणार नाही त्याला शिक्षा होत असे. त्याला आपल्या सोबतीला पाठीवर बसून विशिष्ट अंतर धावावे लागेल. प्रलंब या खेळात हरला आणि तो बलरामाला पाठीवर घेऊन जंगलाच्या वाटेने डोंगराच्या चढणीकडे धावू लागला .तो वेगळ्याच दिशेने धावत असल्यामुळे पाठीवरच्या बलरामाने त्याला थांबायला सांगितले व आरडाओरडा करायला सुरुवात केली. पण प्रलंब तेथे थांबला नाही. तेव्हा त्याचा इरादा समजल्यावर बलरामाने त्याच्या डोक्यावर इतक्या जोराने मुष्टी प्रहार केला की तो तोतया गोपाळ मरून खाली पडला. आणि हीच कथा प्रलंबसुर वध झाली.


गोवर्धन 



गोपालांनी देखील आपल्या दुग्ध व्यवसायाला स्मरण करून गायींची पूजा करावी. पावसामुळे गाईंना आवश्यक असलेला गवत -चारा निर्माण होतो. त्यामुळे आवश्यक तो पाऊस हा ढग डोंगरांनी अडवल्यामुळे पडतो. म्हणून गोवर्धन डोंगराची पूजा करावी असे कृष्णाला वाटत होते. तेव्हा इंद्रयागा ऐवजी गोवर्धन याग करावा आणि पूजनासाठी गोधनाची पूजा करावी असे त्याने सर्वांना सुचवले. कृष्णाच्या या कल्पनेला सर्वांनी पाठिंबा दिला.त्यावर्षी गोकुळवासीयांनी इंद्रयागा ऐवजी मोठ्या समारंभ पूर्वक गोवर्धन याग पार पाडला. नाचत गात वेदमंत्र घोषाने त्यांनी हा उत्सव साजरा केला. पण नंतरच शरद ऋतूमध्ये एक धुवांधार पाऊस गोकुळात बरसला. विजांचा लखलखाट ,ढगांचा गडगडाट झाला. नदी नाले भरले, यमुनेला पूर आला. सर्वांनी कृष्णाला साकडे घातले, संकटातून वाचवण्याची याचना केली. कृष्ण म्हणाला आपण इंद्रायागाऐवजी गोवर्धनाची पूजा बांधली,पूर आला. तर आपण आता गोवर्धनालाच शरण जायचे. गुरेढोरे सोडा आणि घरातील अन्नधान्य चीज वस्त्र जे लादता येईल ते गुरांवर लादा.गोवर्धनाकडे चला .गोप गोपी आणि गाईगुरे संरक्षणासाठी कृष्णाने करंगळीवर पाऊस थांबेपर्यंत पर्वत धरला हे दैविकरण हरिवंश सारख्या ऐतिहासिक ग्रंथात शोभत नाही असे लेखकाचे मत आहे. त्यांच्यानुसार या कथेचा लौकिक अर्थ एवढाच म्हणता येईल की यमुनेला पूर आला तिचे पाणी गोपांच्या गाई गुरांच्या गोठ्यात आणि घरात शिरू लागले. तेव्हा सखलभागातून गोपांना त्यांच्या गाईगुरांना संरक्षणसाठी कृष्णाने गोवर्धन पर्वताच्या उतारावरील उंच प्रदेशात नेले आणि त्यांचे पुरापासून संरक्षण केले.


संदर्भ - शोध कृष्णाचा-प्रवासी पूर्णत्वाचा 

लेखक -प्रा. डॉ.राम बिवलकर

Saturday, June 22, 2024

कृष्णाच्या गोष्टी-२



वसुदेव आणि देवकी विवाह

वसुदेवाचे शौर्य विद्वत्ता शहाणपण पाहून देवकीचे त्याच्यावर प्रेम जडले सर्वांनी त्यांच्या विवाहाला मान्यता दिली. खरे पाहता उग्रसेन आणि कंस या विवाहामुळे अस्वस्थ झाले होते. परंतु वधू-वरांना विभोत्तर समारंभ पूर्वक देवदर्शनाला नेऊन व तिथून वधूला वरगृही सोडण्याच्या वरातीत मिरवणुकीत वधू-वरांच्या खास रथाचे सारथ्य स्वतः कंसांनी केले होते. त्याला दाखवायचे होते की आपल्या आपल्या बहिणीवर किती प्रेम आहे. कंसाला काही दिवसांनी खटवांग वनात नारद भेटला आणि त्याने देवकीचे आठवे मूल तुला ठार करणार आहे असे भविष्य सांगितले. या भविष्यवाणीमुळे तो अधिकच त्यांना आपला शत्रू मानू लागला व त्यांचा विविध प्रकारे त्याने छळ सुरू केला. 


त्यावेळी उग्र सेन याने त्याला सांगितले होते की अंधक राजकुमाराला हे शोभा देत नाही. परंतु बापाचे बोलणे दुर्लक्षित केले. त्याचवेळी नारदाने त्याला सांगितले होते की "तू खरा यादव नसून कालनेमी नावाचा दानव आहेस आणि तो यादवांचा शत्रू आहे "या अशा काही गोष्टींमुळे त्याच्या मनात उग्रसेना विषयी राग वाढतच चालला होता. आपण उग्रसेनापेक्षा अधिक तेजस्वी, बलवान आहोत असे त्याला सतत वाटत राहिले व अहंकारामुळे तो बापाचाही छळ करू लागला.त्याने वडिलांना कैद केले.आपणच मथुरेचा राजा आहोत हे सर्वत्र जाहीर केले. यादवांची आणि वृष्णी ची महाभयंकर हालउपेक्षा सुरू झाली. ठरल्याप्रमाणे कंसाने देवकीच्या पहिल्या सहा अर्भकांचा शिळेवर आपटून संहार केला.देवकीचा सातवा गर्भ हा  कंसाच्या भयाने आतल्या जिरला. 


इकडे कंस भयामुळे देवकी नवव्या महिन्याऐवजी आठव्या महिन्यातच प्रसूती झाली यादवांचा उद्धारक श्रीकृष्ण बुधवार श्रावण वैद्य अष्टमीच्या जयंती नामक रात्री विजय नामक मुहूर्तावर अभिजीत नक्षत्रावर शालिवाहन शक पूर्व 3263 या दिवशी म्हणजे इसवीसन पूर्वी ३१८७ जन्मला.

 काही करून या मुलाला तरी वाचवा असे देवकीने वसुदेवाला सांगितले. तेव्हा वसुदेवाने ज्याप्रमाणे आपल्या पत्नीला रोहिणीला व पुत्राला नंद गोपालाकडे सुरक्षितपणे ठेवले होते. त्याचप्रमाणे त्यांनी याही मुलाला नंदगोपालाकडे नेण्याचे ठरवले. नंद गोपालाची पत्नी यशोदा ही त्याच दिवशी प्रसूत झाली होती. श्रमामुळे ती झोपली गेली होती. वाड्यात कोणीही नव्हते.अशा वेळेस वसुदेवाने तिच्या कुशीतील मुलगी उचलून त्या ठिकाणी आपला मुलगा तिथे ठेवला व त्यांची अदलाबदल केली. इकडे कंसाला देवकी प्रसूत झालेली समजली.जेव्हा त्या आठव्या पुत्राला मारायला आला व बालकाला त्यांनी तिथून उचलले. "तेव्हा ही मुलगी आहे हिला मारू नको" असे देवकीने त्याला सांगितले. आणि खरोखरच त्याला जेव्हा लक्षात आले की आपल्या ला मारणारा आधीच कुठेतरी जन्मला आहे व सुरक्षित आहे .तेव्हा तो अधिक चिडला परंतु त्यांनी देवकी आणि  वसुदेवाचे बंधन शिथिल केले. वसुदेवाने ही नंदला आपला गौळवाडा मथुरेपासून जितक्या दूर नेता येईल तितक्या दूर लवकरात लवकर हलवण्याचे सूचना केली. त्यानुसार नंद आपल्या कुटुंबासह मथुरा सोडून यमुना काठाने प्रवास करीत करीत यमुना पार करत व्रजामध्ये पोहोचला. गोकुळातल्या गोप गोपिकांनी तेथे त्याचे आनंदाने स्वागत केले .


मूळ ऐतिहासिक घटनेत नायकाच्या विभूतीमत्वामुळे त्याचे पुढील काळात हळूहळू दैवीकरण होत जाणे आणि मूळ ऐतिहासिक कथेत अनैसर्गिक आधिक चमत्कारिक गोष्टी विविध कारणांसाठी प्रक्षिप्त होणे हे साहजिक असते. त्यामुळे मुख्य माध्यमातून जितकी वर्षे मौखिक झालेल्या प्रसार अधिक तितकीच तिच्यामध्ये अनैसर्गिक प्रक्षेपते अधिक असते अभ्यासकांना दिसून आले. त्यानुसार कृष्णाच्या बालपणाशी निगडित अनेक कथा या चमत्कारिक वाटतात पण त्यातील काही गोष्टी चमत्काराला विलग करून पाहिल्या तर पटतात देखील!



पुतनावध

पूतना राक्षसी होती ही कथा भागवत पुराणात आहे. परंतु सुश्रताने पूतना शब्दाचा एक रोग विशेष असा दिलेला अर्थ लेखकाला योग्य वाटतो.पुतना म्हणजे दूध पित्या बालकांना होणारा एक रोग आईने काही स्वच्छतेचे नियम पाळले काही औषधी व झाडपाल्यांचा वापर केला की पुतनाचा अंत करता येतो असे त्यांनी म्हटले आहे. अनेक विद्वानांनी विश्वकोशातील कृष्णा वरील आपल्या लेखात पूतनावधाची ही उपपत्ती मान्य केली आहे.



शकटासुराचा वध 

हा देखील राक्षस न मानता शकट म्हणजे दह्या दुधाची मडकी ठेवलेला गाडा येथे अपेक्षित आहे. कृष्ण जेव्हा पहिल्यांदा उपडा पडला तेव्हा प्रथेप्रमाणे सर्वांनी बाळकृष्णाला  हळदीच्या दुधाने स्नान घालून एका गाड्यामध्ये दह्या दुधाची व लोण्याची मडकी रचून ठेवली व त्या गाड्या खाली झोळी बांधून कृष्णाला ठेवले. पण हा गाडा म्हणजे शकट हा अचानक मोडून पडला व त्याचे चाके दुतर्फा झाला आतली मडकी फुटली. दही दूध लोणी विखरून दही दुधाचा रहाडा सर्वत्र  झाला. गाड्या -शकटाखाली बांधलेल्या झोळीतील बालक कृष्ण आता गाड्याखाली चिरडला असे सगळ्यांना वाटले. परंतु तो तेथे सुरक्षित राहिला.हे घडलेले अकल्पित काहीतरी राक्षसी असावे असे भोळ्या गोप गोपिकांना वाटले.त्याचाच पुढे जाऊन  कृष्णाने शकटासुराचा वध केला अशी अंधश्रद्धा पसरली. 


तृणावर्ताचा नाश 



यात देखील पावसाच्या सुरुवातीला मोठमोठे वादळे गोकुळात येत असे. तेव्हा सारे गोप गोपी मंडळी जंगलातून वाळलेले गवत आणून त्याचे मचाण करून त्या वाळलेल्या गवताच्या पेंढ्या रचून ठेवण्यात गर्क होत. कारण एकदा पाऊस सुरू झाले की गाईगुरांना दूरवर नेऊन चारणे अशक्य होईल .अशा वेळेस त्यांनीही केलेली सोय असे. परंतु एकदा अगदी जोर जोरात असे गर्जते वादळ आले व गवत व पालापाचोळा आकाशात भिरभिरला उडला. या भयानक चक्रीवादळामुळे  हाहाकार उठला.सर्वजण आपापली मुलं घेऊन नंदाच्या घरी आली तेथे त्यांनी आसरा घेतला. अशावेळी सर्वांच्या लक्षात आले की कृष्ण वादळात अडकला.वादळ इतके भयंकर होते की कृष्ण जिवंत हाती लागेल की नाही अशी सगळ्यांना शंका होती पण त्याच वेळी वादळ थांबल्यावर त्यांना कृष्ण सापडला .चक्रीवादळाला पुराणात असुर बनवले गेले आहे कृष्णाला संहारक बनवले गेले आहेत आणि गोष्टीचे नाव तृणावर्ताचा वध असे केले आहे.


संदर्भग्रंथ-शोध कृष्णाचा- प्रवासी पूर्णत्वाचा (लेखक-प्रा. डॉ.राम बिवलकर)

Friday, June 21, 2024

गोष्टीकृष्णाच्या १

 #गोष्टीकृष्णाच्या१

मला आवडतात गोष्टी वाचायला.आणि त्याजर मुळापर्यंत नेणाऱ्या असतील तर मनोरंजक वाटतात😄

फोटो -कृष्णा @मथुरा😊



कृष्ण जन्माच्या आधी एक साम्राज्यवादी नेता होता त्याचे नाव जरासंध व मगधचा राजा. तो पराक्रमी , ईश्वर पूजक होता. त्याने ८६ राजांना आपल्या पराक्रमाने जिंकून त्यांची राज्य आपल्या राज्याला जोडून आणि त्यांना कैद केले होते. आता ८६ मध्ये आणखीन १४ राज्यांना जिंकून त्याची संख्या १०० झाल्यावर तो 'शतराज शीर्षमेध' असा एक नरसंहार बेत शंकराला संतुष्ट करण्यासाठी करणार होता.विशेष म्हणजे यातील बरीच मंडळी जरासंध एवढीच दुष्ट होती. त्यामुळे दुष्ट राजांचा एक मोठा संघच देशात निर्माण झाला होता. ८६ मध्ये हस्तीनापुरातील राजा धृतराष्ट्र चे राज्य जरासंधाने जिंकलेले नव्हते अथवा त्यांचे मांडलिकत्व नव्हते. याचे कारण अर्थातच त्यांचा रक्षक म्हणजे भीष्म! भगवान परशुरामाशी युद्ध करणाऱ्या अशा भीष्माचा प्रताप सर्वत्र जाहीर होता. त्यामुळे जरासंधला हस्तिनापूरकडे पाहण्याचे धैर्य झाले नाही.


 कृष्णाचे कूळ

आर्यावर्तात म्हणजेच आजच्या उत्तर भारतात शूरसेन राज्य होते. या देशाचे राजधानीचे नाव होते मथुरा ती मूळची मधुपुरी म्हणून ओळखली जायची. ती आधी सूर्यवंशीय राजांची राजधानी होती परंतु कालंतराने ती चंद्रवंशीय यादवांची विविध कुलाची झाली. यादवांची विविध कुलांची छोटी छोटी गणराज्य या भागात प्रस्थापित होती. आपापल्या विविध सात गणराज्यात यांचे भाग होते. पण ते सर्व मथुरेचे मांडलिक होते. बहूम,कुकुर ,अंधक,दाशार्ह ,यादव,वृष्णी आणि भोज ही या संघांची नावे .


कृष्ण हा यादवांच्या कुळातील यदूपासून ४२ वा पुरुष होता. यदू हा ययाती आणि देवयानी यांचा पुत्र होता. कृष्णाच्या  आधी अंधकापैकी उग्रसेन हा मथुरेचा गणाध्यक्ष होता ,आपला मोठा भाऊ देवक याच्याशी कपटाने ते बळकावले होते. देवकाचे वृष्णी आणि शूरसेन हे दोन मित्र होते. मथुरेमध्ये अंधक आणि भोज यांची असलेली मोठेपणा शूरसेनाला मान्य नव्हता. त्याच दरम्यान उग्रसेनेने  वृष्णी प्रमुख अक्रुराचा विवाह त्याच्या आत्याची आहूकीशी लावला.


 देवक मथुरा सोडून शूरसेनकडे काही कामानिमित्त गेला होता. तेव्हा त्याला हद्दपार केल्याची अफवा पसरवण्यात आली. त्याच दरम्यान आहुक मरण पावला आणि त्यामुळे भोज आणि अंधक, आक्रुर सारख्या दृष्टीकुळातील प्रतिष्ठांच्या मदतीने उग्रसेनला मथुरेचा नवा राजा बनवलं आणि त्याचा बलदंड पुत्र कंस याला राजकुमार बनवलं.


देवकाला चार मुली आणि सात मुले होते. सर्वात  लहान देवकी. देवकाचा मित्र शूरसेनला वसुदेवासह दहा पुत्र होते आणि पाच मुली होत्या. त्यामुळे वसुदेव जावयाला आणखीन दोन मुली देवकाने दिल्या. 


मथुरेसाठी यादवांच्या या दोन कुलांमध्ये रस्सीखेच चालू होते. यात वसुदेवाचे पारडे जड होते त्याच्या पाच बहिणी परिसरातील पाच राज्यांना दिलेल्या होत्या यातील मोठी प्रथा म्हणजेच कुंती हस्तीनापुरच्या राजाला पांडूला, दुसरी सुतदेवा ही करुश याला, तिसरी श्रुतकीर्ती ही कैकेय राज्याला,चौथी श्रुतश्रवा ही चेदी राजाला आणि पाचवी राजाधिदेवी ही अवंती राजाला दिली होती.


 अशा परिस्थितीत देवक शूरसेन , वसुदेव मथुरा येथील भोजांचे व अंधकांचे वर्चस्व नष्ट करणार आहेत असे उग्रसेनाला वाटले आणि त्यामुळेच मगधराज जरासंधाने सुद्धा मथुरेत फुट पाडण्यासाठी अस्ति आणि प्राप्ती या आपल्या दोन मुली कंसाला दिल्या.


संदर्भ -शोध कृष्णाचा,पूर्णत्वाचा प्रवासी 


Wednesday, June 19, 2024

तीळाचे लाडू

लाडू करायचे म्हटलं की साजूक तूप पाहिजेच हा समज खजूर वापराने दूर झालाय.खजूर वापरल्यामुळे लाडूंची चवही सुंदर होते आणि वळायलाही झटपट होतात.



तीळाचे लाडू 

१५० ग्रैम अर्धवट भाजलेले तीळ

अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे 

अर्धी वाटी सुके खोबरे

अर्धी वाटी गुळ

आठ- दहा खजूर 

दहा बारा बदाम

इलायची

सर्व जिन्नस मिक्सरमधून फिरवून घ्यायचे.यात खोबरं,तीळ असल्यामुळे याला सहज तेलही सुटते वळायला सोपे जातात.अगदी स्निग्ध पूर्ण लाडू होतात.

हे लाडू मऊ असल्याने खायलाही कष्ट ह़ोत नाही,पाक वगैरे करावा लागत नसल्याने चिकटही होत नाही.