Saturday, February 19, 2022

हेमंत ऋतू!

 

हेमंत ऋतू!

हिवाळा,लहानपणी हाच ऋतू मला जास्त आवडायचा कारण शाळा अजिबात बुडत नसे.पावसाळ्यात पावसाने धांदल उडायची आणि उन्हाळ्यात शाळेला सुट्टी असायची.थंडीत कस निवांत निवांत शांत वाटायचं.

थंडी ही हेमंत आणि शिशिर या ऋतूत विभागली आहे. या दोन ऋतुंमध्ये फारसा फरक करायचा तर तापमानावरून करता येईल. तरीही काही ठिकाणी याचा उल्लेख प्री-विंटर असा आहे. तापमान १० डिग्री ते २५ डिग्री असते.

ऋतूसंहार मध्ये कालिदासाने हेमंतचे वर्णन असे केले आहे

नवप्रवालोद्रमसस्यरम्यः प्रफुल्लोध्रः परिपक्वशालिः।
विलीनपद्म प्रपतत्तुषारोः हेमंतकालः समुपागता-यम्‌॥ 

बीज अंकुरित झाले आहेत .फुले लगडली आहेत.धान्य आता कापणीस योग्य आहे.परंतु कमळ कोठेही दिसत नाही त्यामुळे स्त्रिया अन्य फुलांचा वापर श्रुंगारासाठी करत आहेत.दवबिंदू पडायला लागले आहेत,पूर्व थंडीचा हा असा काळ आहे.स्त्रिया सुगंधी चंदनाचा वापर उटणे म्हणून करत आहेत.शेत आणि सरोवर पाहून मन हर्षित होत आहेत.

चरक संहिता मध्ये देखील हेमंत ऋतूला स्वास्थ्य प्रदान करणारा सांगितलं आहे.

"शीते शीतानिलस्पर्शसंरुद्घो बलिनां बलीः।
पक्ता भवति..."

गजपतिद्वयसीरपि हैमन्तस्तुहिनयत्सरितः पृषतां पतिः।

सलिलसंततिमध्वगयोषितामतनुतातनुतापकृतं दृशाम्॥

 

हिवाळ्यातील  थंड वारे,दवबिंदू ,खोलवर गोठलेलली नदी अगदी बलाढ्य हत्तीएवढी,त्यात उष्ण काही उष्ण वारे अशा वेळी जिचा पती दूरदेशी आहे तिच्या डोळ्यांतून दुख:दायी अश्रू वाहत आहेत.

कवी माघ

अवश्यायतमोनद्धा नीहारतमसा ऽवृता।

प्रुप्ता इव लक्ष्यन्ते विपुष्पा वनराजयः॥

 

हेमंत काळातील पुष्पहीन वातावरण असूनही दूरवर पसरलेले हे रान पंखांप्रमाणे भासणाऱ्या बर्फाच्या चादरीच्या अंधारात निजलेले आहे.

वाल्मिकी रामायण

हा गुलाबी थंडीचा काळ प्रेमी युगालासाठी अतीव आनंद देणारा.एकमेकांच्या मिठीत शेकोटीजवळ रात्रभर ऊब अनुभवण्याचा.यावर  ओडिसातील पट्टचित्र सुंदर हेमंत ऋतू दाखवतांना.



तसेच भारतीय टपाल खात्याने प्रसिध्द केलेले हेमंत ऋतुवरील तिकीट एक ऊबदार म्हणाव लागेल.



पण याच ऋतूमध्ये प्रवाशांची थंडीत गारठून ततपप होत असते.

सायबेरियन व इतर पक्षी हजारो किलोमीटर प्रवास करून महाराष्ट्र भिगवण ,गुजरात या ठिकाणी या काळात  स्थलांतर करतात.

गुलाब ,प्राजक्त याच काळात दवाने भिजलेली सुंदर दिसतात. 

गोल्डन शॉवर



डिसेंबर मधली स्लाईम वीड




मराठी महिन्यांनुसार मार्गशीर्ष आणि पौष महिन्यातील दत्त जयंती,श्रीकृष्णाने जेव्हा गीता सांगायला सुरुवात केली ती गीता जयंती येते.

सूर्याची उपासना आणि शेतात गव्हाच्या ओंब्या डुलू लागतात.कोवळी पिके पाहून सृजनाची भावना होते.बर्याचशा झाडांना आता फळ,शेंगा लगडलेल्या दिसून येतात.लवकरच ही चांगली पक्व होणार असतात.

संक्रांत ,बैसाखी,ओणम अश्या वेगवेगळ्या नावाने पिक अन्न धान्याबद्दल कृतज्ञता दाखवली जाते.तीळ-गुळाचा गोडवा आणि स्निग्धता नात्यांत उतरावा अशी कामना करून यथेच्छ सेवन केले जाते.

तीळगुळ वड्या


सुवासिनी सुगट

हेमंत ,शिशिर ऋतू साऱ्या थकलेल्या पानांना,सृष्टीला बर्फाच्या चादरीमध्ये निवांत निजायला सांगत आहे कारण त्यांना लवकरच वसंताचे स्वागत करायचे आहे.

---भक्ती


Saturday, January 22, 2022

झटपट जळगावी भरीत

 

झटपट जळगावी भरीत

पार जळगावहून वांगी आले होते.ही वांगी आकाराने ओव्हल मोठी ,फिक्कट हिरवी असतात.यात बिया कमीअ असतात.२०१६ साली जळगावी वांग्यांना GI tag ही मिळाला आहे.

शेवटी हे एकच राहिले  होते.तेव्हा जळगावी भरीतची पाकृ लिहिण्याची आणि चित्रित करायचे ठरवले.हा पदार्थ हल्लीच शिकल्यामुळे  करून खायला घालायला उत्साह वाटतो आणि झटपटीत होतो.

साहित्य :

१.पावशेर जळगावी वांगे

२.एक वाटी कांद्याची पात (चिरलेली)

३.एक वाटी कच्चे शेंगादाणे

४.अर्धी वाटी भाजलेले शेंगादाणे

५.एक वाटी चिरलेला ओला कांदा

६.५-६ हिरव्या मिरच्या

७.७-८ लसून पाकळ्या

८..कोथिंबीर चिरलेली

९.फोडणीचे साहित्य

कृती:

१.वांग्याला तेल लावावे.सुरीने चुहू बाजूंनी टोचे मारून घ्यावेत.त्यात चार लवंगा खोचून घ्याव्यात .

२.वांगी आचेवर भाजून घ्यावेत.जळगावात धान्य काढल्यानंतरच्या उरलेल्या काड्यांवर शेतात भाजतात.

३.वांगे भाजताना बरोबर हिरव्या मिरच्याही भाजून घ्याव्यात.

४.भाजलेल्या वांग्याचे वरचे टरफल काढून टाकावे.भाजलेले वांगे वाटून/ठेचून घ्यायचे .यासाठी लाकडी खलबत्त्ता(बडगी) वापरला जातो .वा पाटा वरवंटा .यात कोणतेही धागे न राहता एकजीव  व मऊ होणे महत्वाचे.

५.हिरव्या मिरच्या व लसून एकत्र  वाटून घ्यावेत.

६.फोडणीसाठी कढईत दोन मोठे चमचे तेल गरम करावे .जिरे ,मोहरी.मिरची लसून वाटण टाकावे.

७.भाजलेले आणि कच्चे शेंगादाणे परतून घ्यावेत.

८.यात चिरलेला ओला कांदा परतून घ्यावा.नन्तर चिरलेली कांद्याची पात टाकून परतून घ्यावी.

९. आवडीनुसार हळद ,मीठ ,कोथिंबीर टाकावी.तिखट जास्त हवे असेलं तर तिखटही वापरू शकता.

 

१०.आता वाटलेला वांग्याचा गर यात टाकून परतून घ्यावा .१० मिनिटे वाफ येऊ द्यावी.

११.गरमा गरम जळगावी भरीत भाकरी बरोबर खायला तयार.

-भक्ती





Monday, January 10, 2022

ऐसी अक्षरे....मेळवीन-- एक होता कार्व्हर


 

एक होता कार्व्हर

लेखिका :वीणा गवाणकर

साधी राहणी उच्च विचारसरणी या उक्तीनुसार जगणारे,वागणारे  मानव जातीला वरदान असतात. डॉक्टर जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर अमेरिकन शास्त्रज्ञ  ,कृषी क्षेत्रात अमुल्य कार्य करणारे सतत कार्यमग्न असणारे.पण इथपर्यंत पोहचण्यासाठी वर्णद्वेष हा सर्वात मोठा अडथळा त्या काळात भोगुनही एक तारा शेती क्षेत्रात कायमचा उमटला.

अमेरिकन गुलामगिरीच्या काळात १८६० च्या दरम्यान झाला ,आपल्या जन्माची तारीख कार्व्हरयानाही माहित नव्हती.आईवडील दोघेही गुलाम होते,मोजेस कार्व्हर यांनी त्यांना विकत घेतले होते.एका नाट्यमय अपहरणात मेरी- जॉर्ज कार्व्हरची आई कायमची नाहीशी होती. केवळ जॉर्ज वाचतो ज्याला मोजेसबाबा एका घोड्याच्या मोबदल्यात पुन्हा विकत घेतात.जॉर्ज कार्व्हर  मोजेस आणि त्यांची पत्नी सुझेन यांच्या घरातलाच छोटासा भाग होतो.काहीही न बोलणारा हा कृष्ण मुलगा मुका असेच सगळ्यांना वाटत.परंतु फुलांविषयी,पक्षांविषयी निसर्गाविषयी त्याचे ममत्व सगळ्यांना आश्चर्यचकित करते.एका जादुगाराप्रमाणे हिरमुसलेली झाडं,रोपं तो खुलवीत असे.कार्व्हर कृष्णवर्णियांना डायमंड ग्रोव्हला शिक्षणासाठी परवानगी नसते.मोजेसबाबाचे घर सोडून निओशोला पोहचतो.रात्रभर थंडीत कुडकुडत काढणाऱ्या जीवाला मारिया नावची चांगली स्त्री आसरा देते आणि त्यांचे नाव कार्व्हर बाबांचा जॉर्ज ‘जार्ज कार्व्हर’ होते.शिक्षणासाठी कार्व्हरची धडपड ,कष्ट करून पैसे कमवायचे ,प्रवेश घ्यायचा ,शिकायचे आणि पैसे संपले की पुन्हा शाळा सोडायची.नंतर तेच कष्ट,पैसे कमवा,शिका हे चक्र त्याचे चालूच राहत असे.पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी हायलंड विद्यापीठाने देऊ केलेला प्रवेश प्रत्यक्षात ते कृष्णवर्णीय आहे समजताच रद्द केला जातो.कार्व्हारंची शिक्षणासाठीची तगमग सिम्पसन कॉलेजमुळे पूर्ण होते परंतु आपल्या कृष्णवर्णीय बांधवांच्या उद्धारासाठी कला आणि संगीतातली आवड आणि संधी सोडून कार्व्हर शेतकीमहाविद्यालयात प्रवेश घेतात.तिथेच पुढे ते प्राध्यापक महानुन्ही रुजू होतात.मायकोलॉजी आणि  वनस्पती पथोलोजीमध्ये नवनवीन संशोधन करू लागतात.अनेक दुर्मिळ वनस्पती,कीड ,बुरशी यांवर काम करत असतात.

शेकडो वर्ष गुलामगिरीतच जगलेल्या असंख्य कृष्णवर्णियांना गुलामगिरीतून स्वातंत्र्य तर मिळते पण त्याचा उपयोग त्यांना मुळी येत नव्हता.अशांसाठी वाशिंग्तोन यांनी  दक्षिण अमेरिका मध्ये टस्कीगी संस्थेची स्थापना केली.भांबावलेल्या कृष्णवर्णियांना स्वत:च्या पायावर उभे करायचे हा त्यांचा निर्धार होता.त्यानुसार अनेक लघुउद्योग ते शिकवतात.लक्षात येते की गुलामगिरीत शेतीत गुरांप्रमाणे राबणाऱ्या या बांधवांना शेतीचे खरे ज्ञान मिळाले पाहिजे हे वाशिंग्तोन ओळखतात.यासाठी एकच नाव त्यांच्या समोर येते जॉर्ज कार्व्हर.ते कार्व्हर्नाना निवडीचे पत्र धाडून टास्कीगीत येण्याचे आमंत्रण देतात.आणि कार्व्हरही “येत आहे “या वाक्याने काही दिवसात जुन्या प्रयोगशाळेत सर्व नीट व्यवस्था करून  तिथे पोहचतात.तिथे आपल्या बांधवांची डळमळीत अवस्था पाहून कार्व्हर  बदलाचे एक मोठे शिवधनुष्य उचलतात.

टस्कीगीतच पुढचे सारे आयुष्य ते व्यतित करतात.सकाळी चारला फिरून आल्यावर ते प्रयोगशाळेत पूर्ण व्यग्र होऊन जात.रोटेशन क्रॉप,कापसाऐवजी सोयाबीन ,भुईमुग असे जमिनीचे पोत वाढविणारे पिकांचा पर्याय ते देतात.भुईमुगाचा एक हंगाम अतिपिकामुळे आणि मागणी कमी असल्याने वाया जाणार तेव्हा कार्व्हर स्वत:ला प्रयोगशाळेत कोंडून घेतात आणि जवळपास शेकडो बाय प्रोडक्ट तयार करूनच श्वास घेतात.तीच गोष्ट रताळी पिकाची,सोयाबीन ,कापसाची!कृत्रिम  रंग महाग म्हणून मातीपासून रंग बनविणे,शाकाहारी मांसाहार असे एज्का अनेक प्रयोग वाचतांना कमालीची मौज वाटते.

त्यांच्या अफाट संशोधनाने हळूहळू जगालाही भुरळ पडणार नाही तर नवलच.पण तरीही फंडची गरज म्हणून कार्व्हर पियानोचे प्रयोग करून तो मिळवतात.अनेक त्यांना मोठमोठ्या संशोधन केंद्राचे त्यांना नोकरीसाठी निमंत्रण येते पण ते सर्व नाकारतात.अगदी तुटपुंज्या पगारात  काम करतात,तोही ते शेवटी फंड म्हणूनच देतात. आयुष्यभर मित्रांनी दिलेला एकच कोट वापरला.कधीही सुट्टी घेतली नाही.

एव्हढे असूनही या सेवाव्रतीची कृष्णवर्णीय म्हणून हेटाळणी थांबत नाही.अनेक अपमान पचवून आपल्या कार्यापासून ते तसूभरही मागे हटले नाही.तुम्ही याचा प्रतिकार का करत नाही यावर ते उत्तर देत संघर्ष करण्याऐवजी  तो वेळ मी संशोधनासाठी देईल’ हवी तुमचा वर्ण ,धर्म ,जात ई. गोष्टी नाही हे पुन्हा महान लोकांचे लक्षण  अधोरेखित होते.

आयुष्यभर अविवाहित राहिलेल्या हा  सेवाव्रती आपला कधी हयातीत इतर शास्त्रज्ञाशी मिसळला नाही एकलकोंडा राहिला,पण कार्याच्या बाबतीत एकाग्र राहिला.जास्त सहवास लाभालाही नाही तरीही  आईला  ते कधीच विसरले नाही ,मातृभक्त राहिले.आपल्या कार्याचे बीज योग्य हाती देऊन कार्व्हर १९४३ ला कर्मभूमीतच अनंतात विलीन झाला.

वीणा गवाणकर लिखित हे पुस्तक मराठीतले एक अमुल्य साहित्य आहे.पुस्तक लिहितांना सरळ सोपी तरीही तरल भाषा हे या पुस्तकाच्या यशाचे गमक आहे.पुस्तकातली चित्रे,पुस्तकातील उत्कृष्ट दर्जाची पाने हे  पुस्तकाची जमेची बाजू आहे

प्रेरणा देणाऱ्या पुस्तकांमध्ये या पुस्तकाचे स्थान खूप मोठे आहे.

-भक्ती


या पुस्तकाच्या परीक्षणाचा एक सुंदर व्हिडीओ 

 https://youtu.be/kRERzKw2Jlo

कार्व्हर यांच्या फोटोंसाठी 

https://en.wikipedia.org/wiki/George_Washington_Carver


Saturday, December 25, 2021

शरदोत्सव

 परतीचा पाऊस आपली पावले जोरदार आपटत निघाला असतो.बरेचदा समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्याने वादळ धडकून नासधूस होत राहते. पावसाने पूर्ण रजा घेतल्यावर आल्हाददायी थंड हवा वाहू लागते.चिखल नाहीसा होऊन जमिनी पायी फिरण्यासाठी योग्य आहेत.नितळ शांतता रमू लागते.शेवंती,झेंडूच्या फुलांनी मोहक चादर सृष्टीला नेसविली असते.नवरात्रीच्या उत्सवात या फुलांनी आणि इतर फुलांनी एक उर्जेची उपासना अधोरेखित होत राहते.

त्यांनतर कोवळ्या थंडीने सजलेल्या दीपावलीच्या सुवासिक पहाट! वर्षातील सर्वात निवांत दिवसांची ,माणिकताईंची गाणी,दिवाळी पहाट संगीत कार्यक्रमाचे सुख सारी सारी रेलचेल शरदातीलच . काही फुलं प्रकर्षाने मोहित करत राहतात.कांचन –आपट्याची सुंदर गुलाबी फुलं! तलावातील कमळांची मुक्त बहरण.पितृपाठात अनेक भाज्यांची आवाक अधिक दिसते.

ऑक्टोबर उष्णतेचे दहा –वीस दिवस संपले की पानगळीचा हंगाम लाल पिकलेल्या पानांच्या उन्मळून जमिनीवर पडलेला खच नजरेस दिसतो.माझ्या परदेशातील मैत्रिणीने ऑटम AUTUMN च कौतुक करत मस्त फोटो टाकले होते,तिला गमतीने म्हटलं इकडे ये आणि उंबराची गळलेली पान एक तास झाडून घे मग कळेल खरा ऑटम  असा हा इकडे थकलेला ऋतू भासतो.झाडांच्या काड्या न काड्या पसरून ओक बोक रूप त्यांना शोभत नाही.विरक्त झाडाने पायथ्याशीच आपलं जून रूप त्यागलेले !!

पहाटे धुक्याची चादर अलवार पांघरून सृष्टी गुलाबी झालेली आणि थोड्याच वेळात तिची दवांची मोती माळ पानांवर अलगद उतरते.निळे आकाश आणि पिंजलेले पांढरसे नभ पाहतच राहाव वाटत. ज्वारीची पिक पूर्ण तयार होत ताठ डोलत गोजिरवाणी दिसतात.कुरणांवर चरणाऱ्या गाई तृप्त दिसत आहेत. दिवस मावळतीचे रंग जरा लवकरच ओढून शरद रात्रीना मुक्त उधळण बहाल करतो.ढगांना अजिबात या पटलावर फिरण्यास परवानगी नसते. काळ्या रंगांच्या वस्त्रांवर शुभ्र चांदण खडी ,सौंदर्यात रात राणी मुक्त हसत हसते .कोजागिरीला तिच्या भाळीची गोल चंद्र बिंदी आणि त्याची प्रभावळ सोबत केशर दुधाचे पेले ,गप्पा गाण्यांची मैफिल अजून काय पाहिजे.शांता शेळके यांच “शारद सुंदर”हे गीत ही सगळी हुरहूर ,गुलाबी हवा मादक वातावरण निर्मिती करते.

काही शरद ऋतु वर्णन:

अपाम् उद्वृत्तानां निजम् उपदिशन्त्या स्थितिपदं
दधत्या शालीनाम् अवनतिम् उदारे सति फले।
मयूरानाम् उग्रं विषम् इव हरन्त्या मदम् अहो
कृतः कृत्स्नस्यायं विनय इव लोकस्य शरदा ||

(३.८ मुद्राराक्षस ,विशाखदत्ता)
पाण्याच्या फुगलेल्या प्रवाहाला पुन्हा कक्षेत बांधणारा,भाताच्या पिकांना सहज वाकवणारा,मोराची असीम इच्छा नष्ट करणारा पहा हा शरद ऋतू अजस्त्र गोष्टी शांत करतोय .
या वर्णनातच शरदाला शांत असा शारदेचा वरदहस्त असणारा दाखविला आहे.

अभिव्ऱ्ष्टा महामेघैर्निर्मलाश्चित्रसानवः।
अनुलिप्ता इव आभान्ति गिरयश्चन्द्ररश्मिभिः॥

(वाल्मिकी रामायण)
शरद ऋतूमध्ये पर्वतांची शिखरे मेघांनी मुक्त होत ,चंद्राच्या प्रखर किरणांनी न्हाहून गेली आहेत .
या वर्णनात शारदीय चंद्र रात्रीचे सौंदर्य अधोरेखित होते.
तसेच शरदातील अनेक नद्यांना नव वधुंचे रूपक दिले गेले आहे ,ज्या लाजत मुरडत शांत वाहत आहेत.

़काही पुष्पवैभव-
१.आपटा(कान्चन )





Sunday, November 14, 2021

पारगाव भातोडी -१

 


गुगल करता करता , मराठा युद्ध जेथे झाले त्याची रोचक माहिती वाचली.प्रवास मोठा नव्हता ,तेव्हा जवळच्याच पण ऐतिहासिक पानाला  कधी भेट देईन याचा मागोवा घेत होते.घरीच बनवलेल्या मिसळ पावचा भरपेट न्याहरी करून निघाले.

रस्त्याने नव्याने चाललेल्या उड्डाणपुलाच्या कामाची प्रचंड लगबग होती.हळूहळू ती लगबग मागे टाकत टाकत मिलिटरी एरिया त्याच्या ऐसपैस भव्य इमारती आणि काही रणगाडे नजरेस पडत होत्या.पुढे तो भाग संपताच दुतर्फा हिरवीगार कांद्याची शेत नांदताना दिसली.आणि मोकळी हवा केसांशी खेळू लागली.मास्क अलगदच पर्समधे शिरला.आता रस्तावरची वर्दळही नाहीशी झाली.लवकरच पारगाव भातोडी वेस आली.टिपिकल गावची घर पण कमी लोकसंख्या वाटत होती.तेव्हा डाव्या  बाजूस नृसिंह मंदिर आणि उजव्या  बाजूस शरीफ राजे समाधी स्थान होते.मंदिर जुने आहे असे समजले ,तेव्हा नक्कीच पाहायचे म्हणत डाव्या बाजूला वळालो.

दुरूनच तीन उंच कळस,सुंदर दगडी पायऱ्या ,घाट पाहून अचंबित आणि उत्साहित झाले.मंदिर खाली उतरून जायचे होते.जीव हळू हळू थंड होऊ लागला.अत्यंत भव्य आणि विशिष्ट रचना असलेले हे सुंदर मंदिर आहे ,जे १४४० ला पेशवा कान्होजी नरसोजी यांनी बांधले आहे. आत गाभारा वेगळाच आहे.दक्षिणमुखी प्रवेशद्वार आहे पण  मूर्तीचे मुख समोर नसून पूर्वेला एका खिडकीच्या समोर आहे  जिथून ध्रुव तार्याचे दर्शन होते असा उल्लेख आहे.स्वयंभू मूर्तीची रचनाही अनोखी आहे.

सुंदर प्रवेशद्वार



मंदिर मात्र ११११ सालचे आहे.एका ठिकाणची खिडकी इतकी अप्रूप आहे,नजरेला सुखावणारी जळकीर्ती ...काळ्या पाषाणात कोरलेली महिरप..सहज ठाण मांडता अशी जागा..:)

प्रदिक्षणा घालण्यासाठी वरती बांधलेल्या देखण्या दोन बुरुजावर आपण जाऊन शांत ,निरामय वाहत्या नदीचे दर्शन घेऊ शकतो.दोन्ही बाजूंनी नदीच्या प्रवाहात उतरण्यासाठी भव्य पायऱ्याची रचना आहे.मंदिरालगतच घाट पाहून वाईच्या मंदिराची आठवण झाली .तलावात पाय सोडून निवांतपणा घेतांना निसर्गसखे खेकडा,मासोळ्या आपपल्या विश्वात रमताना पाहून मजा येत होती.

 या घाटाची देखभाल केली तर एका  पुरातन काळाचा गंध मन भरून अनुभवता येईल असे वाटून गेले.

मनोहरी जळ...



घाटाचा हाही उपयोग ..



 

 

      उन्ह चढू लागली तेव्हा लवकरच ऐतिहासिक स्थळ पाहण्यसाठी उजव्या बाजूस वळालो.समाधीस्थानाकडे जाण्यासाठी कोणतीच पाटी नसल्याने जरा गैरसोय झाली.पण चिंचवडच्या गडकिल्ले सेवा समिती, गडवाट या संस्थने २०१५ ला याचा जीर्णोदधार करून इतिहास संवर्धनाचा  एक उत्तम पायंडा दिला आहे.

शरीफराजे समाधीस्थळ



 १६२४ ला भातवशेची लढाई झाली. अहमदनगर शहरापासून दहा मैल अंतरावर भातवडी तलावाजवळ शहाजी शरीफजी राजांनी घडवलेला जगप्रसिद्ध रणसंग्राम होता. निजामशाहाकडून लढताना, सलाबतखान (निजामशहाचा इंजिनीयर) ने बांधलेला तलाव फोडून आदिलशाही आणि मोगलांचे सैन्य,शहाजी शरीफजी राजांनी गनिमी काव्याचा वापर करून परास्त केले होते, मराठ्यांनी जिंकलेले हे पहिले युद्ध
होय. शरीफजी राजांना वीर मरण आले आणि शहाजीराजांनी त्यांच्या तेराव्याला भातवडीचे जेवण ठेवले तेव्हा या गावाचे भातोडी असे नाव पडले.

इतरत्र फिरताना “हे चिंचेचे झाड “गान आठवत राहिले कारण असंख्य चिंचेची झाडे आजूबाजूला होती.पटापट चिंचा तोडल्या तर चक्क गाभुळलेल्या लाल चिंचा होत्या “आंधळा मागतो एक डोळा,देव देतो दोन”


पुढे वाघेश्वरी देवीचे दर्शन घेतले.

पाथर्डी रस्त्यानेच वीरभाद्राचे जुने मंदिर आहे.वीरभद्र शंकराचा मुलगा आहे आणि जो लिंगायत समाजाचा कुलदैवत आहे असे समजले.मूर्ती अत्यंत विलोभनीय आहे.

वीरभद्र