Sunday, February 22, 2026

वाचाल_तर_समृद्ध_व्हाल

 #वाचाल_तर_समृद्ध_व्हाल 

#कवीला_ऐकाल_तर_जाणीवा_विस्ताराल



वाचन का करायचे? ,वाचनालय वाचणाऱ्यासाठी का सुरु ठेवायचे? तर या पुस्तकांमधले विचार मनात झिरपत राहतात ,नकळत शबदांचा ओलावा आयुष्य सुखकारक,ताकदीचे करते.

सकाळ पुस्तक महोत्सवात अहिल्यानगर येथे दुसऱ्यांदा रंगला. पुस्तकांची मांदियाळी पुस्तक वाचन,वाचनालय या विविध मार्गांनी फुलवणाऱ्या वाचनवेड्याना मान्यवराकडून गौरवपत्रक दिले गेले.

यानिमित्ताने कविसंमेलन आयोजित होते.खूप दिवसांनी कवी संमेलन अक्षरशः अनुभवले.काव्य ही भावभावनांचा ,विचारांचा अनोखा मेळ सर्वांना लाभत नाही.म्हणूनच जाणलं पाहिजे "जे न देखे रवी ते ते देखे कवी "


माजी आमदार लहू कानडे, ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, तुकाराम धांडे, भरत दौंडकर, संदीप जगताप, अमोल बागूल यांच्या काळजाला हात घालणाऱ्या कविता अनुभवता आल्या.


ज्येष्ठ कवी **अरुण म्हात्रे यांनी अनेक मराठी कवींच्या कविता नारायण सुर्वे ,पाडगावकर कार्यक्रमात वेळोवेळी सादर केल्या .त्यात अत्रे व इतर साहित्यिकांच्या खुमदसार किस्से पेरून वातावरण अलगद हास्यमयही केले.त्यांचा उत्साह वय विसरायला लावणारा होता . म्हात्रे यांनी वेळ निराळी आहे' ही कविता आणि अखेर उंच माझा झोका हे गीत सुरांच्या साथीने सादर केले.


**तुकाराम धांडे यांनी 'आई होती तेव्हा' ही कविता सादर केली."आई होती तेव्हा,जातं जतंगाण गाण गायचं उखळामध्ये नाचताना, मुसळ छतापर्यंत उड्या मारायचं" अहाहा डोळ्यासमोर नाचत आकाशाकडे झेपावणारे मुसळ उभं राहील.थेट ग्रामीण रंगढंगातला हा कवी नक्की ऐका https://www.facebook.com/share/v/1BjrThSPEv/

तुकाराम आणि आजोबा या कवितेत दोघांमधलं साम्य काय तर "डोंगर"तुकारामांचा भंडाऱ्याचा तर आजोबांचा गावातला खूप वेगळी निसरग-माणूस यांच्या नात्याची कविता आहे ."भूगोल "कविता तर जंगल.गाव गिळणाऱ्या ससत्तांधला चपराक आहे .


नाशिकचे कवी व शिक्षक **संदीप जगताप हे त्यांच्या शेतकऱ्यांच्या समस्या, आई आणि सामाजिक विषयांवरील भावूक व प्रेरणादायी कवितांसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. 'शेतकरी मुलाशीच लग्न करा' अशी साद घालणाऱ्या त्यांच्या कविता तरुण वर्गात खूप व्हायरल झाल्या आहेत.https://www.facebook.com/share/v/1CNhjdyTYP/ लहानपणीची "इन्स्पेक्शन "कविता आई-तिचे कष्ट अधोरेखित करतात .


 ''बैलावानी राबणारा बाप गाईवानी होता.. हात त्याचा खरबुडा पण आईवानी होता..'' कवी **भरत दौंडकर यांची ही कविता आणि "मुलगा काय करत होता पुस्तक वाचत होता ",गुंठा गुंठा जमीन विकून आज गोफ आली गळ्यात , पण एक प्लेट मातीचा वास हुंगायला उद्या रक्त येईल डोळ्यात, -गोफ या कवीची या कविता आजचे वास्तव दाखवतात https://youtu.be/uzeNUZ0dfCI?si=_oj5_z4tfBv3BtE_ 


स्वतःचा वेगळा असा ठसा उमटविणारी कविता म्हणून 'क्रांतीपर्व', 'टाचाटिभा', 'तळ ढवळताना' या कवितासंग्रहांचे निर्माते माजी आमदार **लहू कानडे यांनी "लोकशाही "कवितेत सत्य स्वीकारायचे धैर्य देते हे दिसले .


नगरचे प्रसिद्ध ,हरहुन्नरी कलावंत कवी **अमोल बागुल यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ठ सूत्रसंचालन तर केलेच पण त्यांच्या "सुलभ आत्महत्या सेतू केंद्र" या कवितेने आत्महत्या आणि मनाची अवस्था याचा निराळा आयाम सादर केला .


अशा काव्याने भरलेल्या संध्याकाळी मन हरखून गेले आणि मोबाइल हातात घेण्याची इच्छाच राहिली नाही. हा एक उत्तम उपाय आहे मोबाइल व्यसन कमी करण्याचा मनाला उभारी देणारा, आनंद देणारा. आता असे कविसंमेलन नियमित हजेरी लावण्याचा निश्चय केला :)

-भक्ती

Saturday, February 21, 2026

‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी

 ‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी



युवाल नोव्हा हरारी हा असा इतिहासकार आहे की, जो केवळ इतिहासात रमायला शिकवत नाही, तर इतिहासाने माणसाचे जीवन कसे बदलत गेले हे पाहायला शिकवतो. म्हणूनच तो आता केवळ इतिहासतज्ज्ञ नाही, तर एक ‘विचारवंत’ म्हणूनही ओळखला जात आहे.


नेक्सस या पुस्तकाची हेडलाईन आहे .“अश्मयुगापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत-माहितीच्या जाळ्यांचा संक्षिप्त इतिहास.”पुस्तकाची सुरुवात करण्यापूर्वी मुखपृष्ठावरील ‘कबूतर’ लक्ष वेधून घेते. या कबूतराची गोष्ट पुढे पुस्तकात आहेच.

शेर आमी (प्रिय मित्र) हा अमेरिकन आर्मी सिग्नल कोरचा एक होमिंग पिजन होता.सैनिकांनी त्याला संदेश पायाला बांधून  हवेत सोडले. जर्मनांनी त्याच्यावर जोरदार गोळीबार केला .एक शेल त्याच्या खाली फुटला, त्याच्या छातीला गोळी लागली, डावा डोळा आंधळा झाला, उजवा पाय पूर्णपणे कापला गेला.तरीही शेर आमी उडत राहिला! तो ४० किलोमीटर उडून ४५ मिनिटांत डिव्हिजन मुख्यालयापर्यंत पोहोचला. तिथे त्याने संदेश पोहोचवला, ज्यामुळे अमेरिकन तोफखान्याने हल्ला थांबवला आणि जवळपास २०० सैनिकांचे प्राण वाचले.हरारी ही गोष्ट पुस्तकात माहितीच्या शक्ती दाखवण्यासाठी सांग

माहिती केवळ मानवी बनवलेली नसते तर कबूतरासारखा प्राणीही माहिती वाहून नेऊ शकतो.एक छोटी माहिती किती मोठे जीवन वाचवू शकते.


पुस्तक तीन भागांत विभागले आहे.


भाग १ -मानवी नेटवर्क्स 


‘सत्य’ शोधण्याच्या प्रयत्नात लोकांनी जे काही वापरले असेल, ते म्हणजे माहिती. वास्तव समजून घेण्यासाठी आपण माहितीचा वापर करतो. जेव्हा माहिती वास्तवाचे अचूक प्रतिनिधित्व करते, तेव्हा ती ‘सत्य’ ठरते. माहितीचे काम केवळ जोडणी करणे हे असते. परंतु मानवी समाजातील बहुतांश माहिती आणि खरंतर इतर जैविक व भौतिक व्यवस्थांतील बहुतांश माहिती कशाचाही अचूक प्रतिनिधित्व करत नाही. हा व्यामिश्र मुद्दाच पुस्तकाचा पाया आहे.


मौखिक परंपरा, कथा, मिथके, चित्रलिपी, दस्तऐवज, कागदी लिखाण, छापखाना अशा विविध टप्प्यांतून माहितीची रूपे बदलत गेली आणि ‘माहितीची जाळी’ समाजासाठी निर्माण झाली.


सेपियन्स पुस्तकाप्रमाणेच येथेही हरारी ‘कथांची शक्ती’ अधोरेखित करतो. कथा सामूहिक श्रद्धा निर्माण करतात, लोकांना एकत्र आणतात. पुस्तके या कल्पनांचा आणि कथांचा प्रसार करतात. पण जेव्हा यामुळे लोकसमूह नियंत्रित करता येतो हे लक्षात आले, तेव्हा माहिती सत्ताव्यवस्थेचा भाग बनली.मग चुकीची माहिती दोष निर्माण करू लागली.छापील चुकीच्या माहितीच्या प्रसाराचे उदाहरण म्हणून ‘विच हंटिंग’ -जादूटोणा शोध मोहिमा दिले आहे. भीती पसरवून, छळाला कारणीभूत ठरवता येते. स्टॅलिन आणि हिटलर यांची माहितीचे नियंत्रण करून सत्ता टिकवणे व विरोधकांचा बिमोड करणे कसे शक्य झाले, याची अनेक उदाहरणे येथे दिली आहेत.


भाग २ आणि ३-संगणकाचे राजकारण,डेटा वसाहत ,ए आय 


पुढील भागांत संगणक, इंटरनेट आणि अल्गोरिदम यांमुळे ‘सत्य’ आणि ‘शास्त्र’ यातील समतोल कसा ढळत आहे, हे स्पष्ट केले आहे. माहितीला आकार देऊन आणि निर्णयप्रक्रियेत सहभागी होऊन मानवी राजकारण ‘मानव व यंत्र संवाद’ या मिश्र स्वरूपात रूपांतरित होत आहे. संगणक आता ‘AI’च्या रूपात स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात आणि कल्पना निर्माण करू शकतात.


‘सिलिकॉन पडदा’ ही संकल्पना मांडताना हरारी सांगतो की, संगणक-सत्ता केंद्रीकरण होऊ शकते. नव्या साम्राज्यवादात मानवजात फुटून प्रतिस्पर्धी डिजिटल साम्राज्ये निर्माण होऊ शकतात. प्रत्येक राजवट स्वतंत्र एआय प्रणाली तयार करेल. परिणामी परस्परसंवाद कठीण होईल.


एआयची स्फोटक शक्ती नियंत्रणात ठेवणे कठीण होऊ शकते. औद्योगिक क्रांतीत मागे राहिलेल्या राष्ट्रांवर प्रगत राष्ट्रांनी वर्चस्व प्रस्थापित केले. एआयच्या बाबतीतही असेच काही घडेल का, हा प्रश्न हरारी उपस्थित करतो.आजच्या काळात युद्धासाठी बंदुका आवश्यक नाहीत. केवळ डेटा गोळा करून, कॉर्पोरेशन किंवा सरकार ‘डेटा-वसाहती’ निर्माण करून माहितीच्या आधारे नियंत्रण मिळवू शकतात. त्यामुळेच अनेक देशांत विविध अॅप्सवर बंदी घातली जाते.

पूर्वी साम्राज्यवादासाठी जमीन, नंतर औद्योगिक युगात यंत्रे व इंधन महत्त्वाचे होते.आता डिजिटल डेटा आणि अल्गोरिदम जगावर नियंत्रण मिळवू शकतात. एआय व स्वयंचलनामुळे विकसनशील देशांसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते. नफा वाढवण्यासाठी स्वयंचलन वाढेल आणि अकुशल कामगारांची गरज कमी होईल.


हार्डवेअर प्रत्येक देशात वेगळे असल्याने स्थानिक उपकरणांची सक्ती करण्याचे महत्त्व वाढू शकते. सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर जगभरात देशांनुसार वेगळे होत राहिल्यास जग ‘माहितीच्या कोशां’मध्ये विभागले जाऊ शकते.


एआय, ओळख आणि भविष्य


एआयमुळे केवळ नोकऱ्या आणि राजकीय बदल होणार नाहीत, तर सांस्कृतिक बदलांनाही सामोरे जावे लागेल. ‘शरीर’ आणि ‘ऑनलाइन ओळख’ यातील नाते काय? विविध सभ्यतांनी मन व शरीर प्रश्नाला वेगवेगळी उत्तरे दिली आहेत.


जोपर्यंत भौतिक शरीर हीच ओळख मानली जाते, तोपर्यंत एआयला व्यक्ती म्हणून स्वीकारले जाणार नाही. परंतु समाजाने शरीराचे महत्त्व कमी केले, तर एआयला व्यक्ती म्हणून अधिकार देण्याचा प्रश्न उद्भवू शकतो.जर जग परस्परविरोधी डिजिटल कोशांत विभागले गेले, तर एका कोशातील अस्तित्वे दुसऱ्या कोशातील लोकांना दुर्बोध व अनाकलनीय वाटू शकतात.


स्वतःला अतिहुशार समजणाऱ्या माणसाने निर्माण केलेल्या एआय आणि अल्गोरिदमवर तो नियंत्रण ठेवू शकेल का? याचे ठोस उत्तर नसतानाही माणूस एआय विकसित करत आहे. माहितीच्या जाळ्याचा हा दोष आहे .सत्यासाठी नव्हे, तर व्यवस्थेसाठी ही निर्मिती होत चालली आहे.


नेक्सस -अश्मयुगापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत माहितीच्या जाळ्यांचा संक्षिप्त इतिहास.

अनुवादक- प्रणव सखदेव

प्रकाशक-मधुश्री पब्लिकेशन

ISBN-978-81-980859-5-5.

पृष्ठसंख्या-४६४ पाने 

मूळ किंमत-₹५००.

Monday, February 9, 2026

माचीवरला बुधा