Tuesday, July 29, 2025

नागपंचमी निमित्ताने


नाग,साप हे सरपटणाऱ्या प्राण्यांप्रमाणे Reptilia क्लासमध्ये जरी येत असले तरी पाण्यात पोहण्याची,श्वास घेण्याची,पाण्यातही अंडे देण्याची क्षमता amphibians प्रमाणे आहे.


उत्क्रांतीमध्ये survival of the fittest असं डार्विनने सांगितले आहेच.पण याबाबत जनुकीय माहिती मिळवणं खुपच रोमांचित असते.

या सापाने जगण्याच्या लढाईत काय केले मग? सर्वांनाच ठाऊक आहे "विष" या हत्याराचा साप मोठा स्वामी आहे, ज्यामुळेच आपण याला खुप घाबरतो.

या विष ग्रंथी सापाला जनुकीय बदलांमुळे मिळाल्या.मानवाच्या तोंडांत लाळ अन्न पचवण्यासाठी लाळ स्त्रवते, पण सापाच्या तोंडांत विष स्त्रवणारी ग्रंथी जनुकीय उत्क्रांतीची,Gene duplication ची भेट ठरवली.





जर आपल्याकडे एकाच युनिफॉर्मचे दोन जोड असेल तर आपण बिनधास्त राहतो.तसेच सापाकडे एकाच जनुकाचे चक्क दोन जोड(set) जीन‌ डुप्लीकेशनने तयार होतात.आता या जास्तीच्या जीन सेटपासून मग अमृत बनवावे ना,तर नाही साप भावाने विष बनवलं 😀 जितकं जहाल विष तो या उत्क्रांतीच्या काळात बनवत गेला तितकं जास्त त्याचा वंश या survival of the fittest या घमासानात पुढे जायची शक्यता वाढली.

तर होत काय ..

जिथे सुरुवातीला इतर शारीरिक कार्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रथिनांना विषाच्या घटकांमध्ये रूपांतरित केले गेले. यामध्ये लाळ, स्वादुपिंड आणि अगदी रोगप्रतिकारक प्रथिने यासारख्या विविध स्त्रोतांमधून जनुकांची भरती समाविष्ट होती. या भरती केलेल्या जनुकांमध्ये नंतर उत्परिवर्तन झाले आणि ते विष ग्रंथींमध्ये व्यक्त झाले, शिकारवर विशिष्ट परिणाम करणारे विविध विषांमध्ये विकसित झाले.

बरंय माणसात Gene duplication नाही,नाहीतर सगळीकडे विषकन्या,विषकुमार दिसले असते😀तर मग उंदिर,ससा तर मोठा प्राणी खात साप मस्त जगत होता.

मग माणसाची उत्क्रांतीही होत होती ना..

माणसाला या सर्पदंशाचे परिणाम समजले. शक्तीशाली जीवाला पूजण्याचे,श्रद्धास्थान करण्याचे मानवाची विचारशक्ती पोहचली होती.अनेक जुन्या संस्कृतीपासून सिंधू संस्कृती पर्यंत सर्प चिन्ह सापडल्याची नोंद आहे.मिनोअन संस्कृती ईसापूर्वची दोन्ही हातात साप पकडलेली मूर्ती सापडली आहे.



या हजारोंवर्षांपुर्वीच्या संस्कृतीत प्रजनन हे मुख्य सूत्र मानले जाई.त्यानुसार श्रद्धा विकसित होत.

सापाच्या शरीररचनेमुळे तो पुरुष प्रजनानचे रूप मानले गेले.भूमीवरील सापाचे वारूळ हे योनीरूप मानले गेले.वारूळ-स्थ नाग हा पुरुषत्तत्त्वाचा म्हणजे क्षेत्रपाळाचा प्रतिनिधी मानला गेला वारूळ हे भूमीच्या योनीचे प्रतीक आहे,हे संशोधन रा.चिं.ढेरे यांनी नोंदविले आहे.



पुढे अमूर्त श्रद्धांनी मूर्त घेतल्यावर याची मूर्ती रूपात पुजा होत गेली.लज्जा गौरी हे अनावृत्त शिल्प स्त्री प्रजनन शक्ती रूप दाखविताना तिच्या हातात पुरुषतत्व सर्प अंकन दिसते.


वैदिक काळात नागाचे स्तुती श्लोक आहेत.

पुराणात तर समुद्रमंथन,शेषनाग असा बलाढ्य नाग दाखवला गेला.

पुढे शेती संस्कृती बहरत गेली.उंदिरांना खाणाऱ्या सापाचा माणूस कृतज्ञ तर होताच पण शेतात काम करताना दंश नको म्हणून सापाला,वारूळाला पूजा होत राहिली.

पण त्यात लाह्या दुधाची अंधश्रद्धा कधी आली कोणास ठाऊक?

बरं मग आज पंचमीला ते पुरणाचे उकडलेले दिंड करायचं असतात हे माझ्या सारख्या सुगरणींना काम असतें.



-भक्ती

Monday, July 21, 2025

हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ -पुस्तक परिचय

गेला महिनाभर खंडेरावाच्या घराचे आम्ही सदस्य होतो.खाणदेशातले मोरगाव आमचच गाव होत.

हिंदू जगणयाची समृद्ध अडगळ ही भालचंद्र नेमाडे यांची ज्ञानपीठ मिळवलेली प्रसिद्ध कादंबरी पूर्ण (३६ तास ) ऐकली . तर ६०३ पानांची छापील कादंबरी आहे . 



मागे केलेल्या चर्चनुसार अनेकांना हि कादंबरी १००-२०० पानानानंतरच रटाळ वा वाचावी अशी वाटली नाही. मी छापील पुस्तक वाचायला घेतले असता माझीही तीच अवस्था झाली असती कारण कादंबरीच्या शीर्षकामुळे माझ्यासारखे अनेक वाचक याकडे आकृष्ट झाले आहेत यात मुळीच   दुमत नाही. परंतु शीर्षकानुसार हि कादंबरी पहिल्या भागात  अजिबात  मनाला भिडत नाही. मग शीर्षकाचे ओझे व आपल्या अपेक्षा बाजूला सारत ,खंडेराव याची कहाणी म्हणून वाचताना कादंबरीची मुळे समजायला लागतात . 

कादंबरीच्या सुरुवातीला भारत -पाकिस्तान सिंधू संस्कृती यांच्या पासून सुरुवात होते.स्वातंत्र्याचा लढा त्याचा अर्थ यांची संक्षिप्त विविध कथांद्वारे उहापोह दिसते. नंतर खंडेरावच्या आयुष्यात आई वडील,भाऊ,बहिणी ,आत्या ,काकू .काका यांच्या प्रत्येकाच्या आयुष्याचा तुकडा कादंबरीत त्याच्या लाहानपणासून ते शिक्षणाच्या विविध टप्प्यांपर्यंत जोडला जातो. तसेच ग्रामीण जीवनातील आजूबाजूचे विविध जातीपातीतील लोकांचे जीवन त्यातील दु:ख आनंदाचे प्रसंगही  त्याचा आयुष्याशी जोडून एक रंगेबेरंगी उबदार गोधडीच तयार होते.पण असे हे ग्रामीण जीवन ,रोजच्या जीवनातील प्रसंग कधीच उजेडात आले नाही .केवळ अभिजात संशोधन कथाच  प्रकाशित होतात .आणि मग अशा अनेक ग्रामीण कथा एक अडगळ होतात पण त्याही समृद्ध आहेतच ना म्हणून या हिंदू भूमीवरच्या ही जगण्याची समृद्ध अडगळ आहे असे वाटून गेले 

असा खंडेराव ग्रामीण भागातून शिक्षणासाठी ,संशोधनासाठी शहरात गेल्यावर ग्रामीण मुळांपासून दूर होत जात असतानाच वडिलांच्या अखेरच्या काळात त्याला एकाच मुलगा या नात्याने पुन्हा मागे फिरावे लागतेच ,तेव्हा पुन्हा  एकदा जगण्याच्या बदलेल्या व्याख्या अनेक छोट्या छोट्या संभाषणातून रेखाटल्या आहेत. 

या कादंबरीची अस्सल ग्रामीण कथा साहित्याच्या दृष्टीने नक्कीच वाहवा करायला पाहिजे.अशा खिळवून ठेवणाऱ्या खुसखुशीत पद्धतीने कथा समोर रेखाटल्या आहेत. कादंबरीच्या शेवटी घरात  खंडेराव एकटाच पुरुष ,तेव्हाही आणि संपूर्ण कादंबरीतही बाईचे सोशिक जीवन ,गौण स्थान याविषयी अनेकदा स्पष्टपणे नावड दाखवलीच आहे ,हि अजून एक जमेची बाजू वाटते. 

कांदबरीत शिव्यांची लाखोटी भरभरून आहे.आपण तरीही कादंबरीचा गाभा दूषित न करता वेगच वाढवतात . 

खूप दिवसांनी ग्रामीण जीवनावरची काठावरची कादंबरी न वाटता खोल डोहात नेणारी कादंबरी वाचाल्याची करमणूक नक्कीच झाली." वंशवृक्षाच्या पारंब्या " हा कादंबरीचा पुढचा भाग असणार आहे व तसेच हि कादंबरी एकूण चार भागांची असणार आहे असे वाचनात आले आहे. 

-भक्ती

Wednesday, July 16, 2025

निसर्गायण-पुस्तक परिचय

 निसर्गायण

#लेखक #दिलीपकुलकर्णी.



जडवादी, भोगवादी वृत्ती आधुनिक तंत्रज्ञानात अधिक इच्छांनी वखवखलेल्या माणसाला विनाशाकडे घेऊन चालली आहे.

हे सर्व घडतांना बाह्य निसर्गाची तो अपरिमित हानी करत आहेच. परंतू स्वतःच्या अंतर्बाह्य निसर्गचक्राचीही तो हानी करत आहे. निसर्ग हा संतुलनासाठी सतत चक्रात काम करतो. आधुनिक माणसाला तंत्रज्ञानाचा जिनी प्राप्त झाला, आणि तो हे चक्र सोडून एकरेषीय असंतुलित, विषमतापूर्ण प्रगतीला भुलला आहे. या सगळ्यांवर मात करत संतुलन प्राप्त करण्यासाठी  स्वतःच्या मनोवृत्तीवर काम करायला पाहिजे.

पुस्तकाच्या पहिल्या भागात मनोवृत्ती  स्थिर करणाऱ्या विविध पाश्चात्य आणि भारतीय वैचारिक पद्‌धतींचा उहापोह केला आहे. निसर्गाला जाणून तद् रुप त्यासह एकात्म स्थापन करायला हवे. वस्तुनिष्ठता ते व्यक्तीसापेक्षता याचा विचार केला आहे. निसर्गाशी आनंदाचे नवं नात कसं स्थापन करायचे हे सांगितले आहे. दुसऱ्या भागात अन्न, आरोग्य ऊर्जा या प्राथमिक गरजा  पूर्ण  करताना शस्त्रस्पर्धा,व्यसने,शोषण इत्यादी विकृतीकडे न झुकता सुसंस्कृत होण्याची मानवी  नैसर्गिक उर्मी कशी असते ,जपावी कशी हे  सांगितले आहे.


***

हे पुस्तक वाचताना असेच एक चिंतन सुचले..


वस्तुनिष्ठ विचारांपासून, चालीरीती, परंपरा, उपाय योजना, उपचार यापासून आज व्यक्तीनिष्ठ व्यक्ती सापेक्ष पद्‌धतीचा सर्वत्र वापर होत आहे. अगदी  न्यूटनचा नियमांनाही वस्तुनिष्ठ आईनस्टाईनच्या सापेक्षवादी नियम/थेअरीने मोडीत काढले. उपचार पद्‌धतीत तर आमुलाग्र बदल होत आहे.आता customized diagnosis report आधी अभ्यासले जातात. अगदी थेट DNA based profile वापरून nutriogenomic DNA based customized diet ही दिले जाते. माणसाच्या मनातल्या विचारांची सुसुत्र‌ता आधी केवळ छापील मोजक्यांचीच होती. आता म्हणजे गेल्या १५ वर्षापासून ती स्वतंत्रपणे प्रत्येकाने मांडायची सोय सोशल मिडियाने केली .आता AI तर वैयक्तिक सल्लागाराप्रमाणे सतत व्यक्तीबरोबर आहे.तेही चकटफू!! वर्गात शिकवलेले समजत नाही तर पसर्नल क्लासेसही आहेतच. customized कपडे,दागिने, घर सजावट सारे काही आहेच. यातून फक्त काही ठिकाणी गोंधळ कमी होण्याऐवजी तो वाढल्याचे दिसते.जसे सोशल ‌मिडियावर या व्यक्ती निष्ठतेने बिभत्सरूप अतातायी विचार, व्हिडिओ, भाषण, हिंसक प्रचार रूपात दिसतो. customized वस्तूंच्या नावाखाली प्रचंड लूट व्यक्तींची होत आहेच.


खरं पाहता व्यक्तीनिष्ठता ही देगणी गोंधळ (Universal randomness) न वाढवता काही एकात्मिक पुन्हा  घडवण्यासाठी हवा. जसा योग्य custemized diet, उपचारांनी व्यक्ती मग समाज आरोग्यदायी होईल. customized वस्तू बनवण्यासाठी स्वतःच्या सृजनाचा वापर करून मार्केटचा बळी न होता, योग्य माफक दृष्टिकोन हवा.

-शिक्षण‌क्षेत्रात प्रत्येक मुलाला मदत करण्याची वृत्ती' भविष्य या लहान मुलांचे आयुष्य आणि आपले भविष्य सुंदर करेल.एकमेका साहाय्य करु असे धोरण घेत नैतिकता पाळून प्रत्येक गोष्टीचा वापर हवा. AIचा वापर वैश्विक ज्ञानाच्या साहाय्यानेज्ञानी होण्यास व्हायला हवा.


या सगळ्या वस्तुनिष्ठ कडून व्यक्तीनिष्ठते कडून -- एकात्मिता धोरण --वैश्विक  सुजाणता येण्यासाठी भोगवादी, ओरबडण्याची (ग्राहक-मालक दोन्ही दृष्टीने) संपुष्टात यायला हवी.

-भक्ती

Wednesday, July 2, 2025

स्वार्थी फुलांचा परमार्थ

 हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ" कादंबरी ऐकतेय, स्वार्थ हाच एक परामार्थ आहे,हे त्यातलेच वाक्य आहे.यात पुढे  निसर्गातील इतर सजीवांचा स्वार्थीपणा सांगताना  म्हटलंय...म्हणजे आशय असा होता की,

ही फुलं इतक्या मोहक रंगात उमलतात,सुगंधात दरवळतात ती काय माणसाला आनंद व्हावा म्हणून नव्हे.तर त्यांचं प्रजननाचे चक्र अविरत चालू रहावे म्हणूनच!

पण लक्षात आलं.या सुंदर फुलांनी नकळत एक समाधानाचे चक्र माणसासाठी आपसूकच सुरु केलंय.सकाळच्या शांत पाखरांच्या गुंजारवात,कधी दवांनी भिजलेली,पावसाच्या थेंबात न्हालेली गुलाबी पाकळ्यांची अदा,जांभळ्या गोकर्णाचा मऊसर रंग‌ हाती का उमटत नाही?असा बाळबोध मनाला  प्रश्न पडलेला.पारिजात फुलांच्या टप टप वर्षावात भिजलेल्या‌ पहाटेची मौज कधी संपूच नये वाटतं.बकुळीच्या फुलांनी गंधाळलेली ओंजळ कधी रीती व्हावी असं वाटतच नाही.मोगऱ्याचं फुलणं क्षणाक्षणाने इवल्या पाकळ्यांचे वाढणारं टपोरं सौंदर्य केसांत दिवसभर रेंगाळून माळून घ्यावंच वाटतं.कन्हेरीचा पिवळा साज डोळे दिपून टाकणारा ,सर्वत्र संचार करतो.

अशा वेचलेल्या फुलांना सूत्रात बांधयची ,हार ,गजरे करायची कल्पना सृष्टीच्या आदिमापासून माणसाची सौंदर्य कल्पना जागृत झाल्याची पहिलीच खुण असणार!तुझ्या गळा माझ्या गळा म्हणत एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घालत पुरातन ते आजतायगत बेधुंद प्रेमवीरांचे प्रेम बंधन साकार होत आले.

माणसानेच घडवलेल्या मूर्तीला मग श्रद्धेचे प्रतिक म्हणून याचे हार श्रद्धाभावानेच एक एक फूल ईश्वर नावाने ओवले जाऊ लागले.त्या सूत्राला केशरी,हिरवट,जांभळट,लाल असा देठांचा फुलांचा रंग चढतोच पण बोटांची टोकही या रंगात बुडतात .

तयार झालेल्या मालेचा गंध त्या मूर्तीच्या सर्वांगाला भिणला की अरुपाचे स्वरुप भक्तांच्या दिठी उजळून निघत राहिले..राहत आहे.

-भक्ती



(ता.क.- आधी हिंदू कादंबरी ऐकताना जड जात होती.पण आता अतुल पेठे यांचे अभिवाचन, कांदबरीत असे कुठून कुठून अचानक येणारे संदर्भ एका कथेचा कोलाजच होते.हे लिहितांना त्याचा प्रभाव घडून हे लिहिलेय हे जरा जाणवतंय )