Sunday, December 7, 2025

पुस्तक -#स्वतःला_जगवत_ठेवण्याचे_प्रयोग



पुस्तक -#स्वतःला_जगवत_ठेवण्याचे_प्रयोग

लेखिका -#ऐश्वर्या_रेवडकर


स्वतःचे अवकाश शोधणाऱ्या स्वच्छंदी मुली लग्न संस्थेतील कच्चे दुवे ,पुरुषत्वाचा दुराभिमान, पितृसत्ताक वर्चस्व, स्त्री-आदरातील सामाजिक दांभिकता या मुद्द्यांपर्यंत तटस्थपणे नक्कीच पोहोचतात.तेव्हा त्या विचारांना फेमिनिझम म्हणत आपण हेटाळतो .पण फेमिनाईन/ faminine energy सारखी सुंदर गोष्ट ज्यासाठी स्त्री-लैंगिकता व स्वातंत्र्य याबाबत बोलणंही, समजून घेणेही गरजेचे असते,हे भारतीय समाजात कोणाच्याही गावी नसते.याविषयी मतं मांडण हे अनेक सामाजिक संकेत मोडण्यातहजमा आहे. तिथे ही कादंबरी एक अबोल विषयातील  एक सूर्यफुल आहे, स्वच्छ ब्राईट!

कादंबरीची नायिका मुक्ताचे अनेक प्रकारच्या पोरकपण तिला ज्या ज्या वेळी हक्काचं घर, स्पर्श, शांती मिळाल्याचं सुखाने न्हाऊ पाहत,त्यात्यावेळी पुरुषाची फुकाची मर्दानी/पुरूषत्व त्या साऱ्याचा चुराडा करते. कादंबरीत मुक्ताची फरफट वाचत असतांनाच तिचं आपल्या अवघड अशा ‘सर्जरी’ कार्यातील  डॉक्टर म्हणून एकाग्रता थक्क करते. बाई स्वतःच्या पायावर उभी असणं, तिच्या कामाची ती स्वाभिमानी असणं हा तिच्या अवकाशाचा पाया आहे, हे पुन्हा पटतं.

अशा काळ्यागहिऱ्या  आयुष्याच्या लाटांवर शरीराच्या नावेला अनेकदा आत्महत्येचा भोवरा गिळंकृत करू पाहतो. पण दरवेळी उठून उभी राहणारी मुक्ता अजब रसायन आहे.

खूप दिवसांनी आयुष्याचे जसं आहे तसं उघडं-नागडं सत्य सांगणारी, स्वीकारायला लावणारी कादंबरी वाचली. कुठेही जडजड वाक्यांचा मुलामा देत कादंबरी वाढवून मांडलेली नाही.

सारे समाज नियम माणसानेच बनवले आहेत.त्यात अडकून न राहणाऱ्या स्वतः स्वतःच्या नियमांनी जगणाऱ्या मुक्ता  आजूबाजूला नक्कीच आहेत.

-भक्ती

Saturday, November 22, 2025

मातृदेवता

 #आदिमाया 

#लेखक -#अशोक_राणा

#मातृदेवता

आजही जिथे स्त्रीयांववर अमानुषता करणारा समाज अस्तित्वात आहे.तो मातृसत्ताक संस्कृतीची मूळे पूर्ण विसरला आहे. तो समाज सिंधू संस्कृतीतील मातृदेवतांचे उगम  वाचायला,जाणून घ्यायला उत्सुक कसा असणार?

पण ही सरसकटीकरण करणारी वाक्यं न मानता ज्यांना संस्कृती, संस्कृतीची रूपांतरणे जाणून घ्यायची इच्छा आहे त्यांनी हे पुस्तक एकदा तरी नक्की वाचावे.

पुस्तकात आर्येतर पूर्व काळातील मातृगणांची ओळख करून देली आहे. आर्यनंतरच्या काळात सिंधू व इतर मातृगण सत्तेतील देवतांचे रूपांतर कसे झाले?हे यात अनेक ठिकाणी सांगितले आहे.


काही मातृदेवतांना हीन दर्जा देण्यात आला,उदाहरण पूतना, होलिका, दिती, निऋती, अमावस्या, दनू,माया,कद्रू इ. तर काही ज्या समाजमनात खोल छाप सोडून  होत्या, त्यांच्या मनातून दूर होत नव्हत्या अशा मातृदेवतांचे मुळ रूप बदलून त्यांना वैदिक, बौद्ध देवतांत समाविष्ट केले जसे लक्ष्मी, सरस्वती,साती आसरा, सटवी, जीवती-हारिती, आदिती!


या पुस्तकात असंख्य गोष्टी/कथा या मातृदेवतांविषयी सांगितल्या आहेत.

ज्या समजून घ्यायला खूप काळ लागू शकतो. 

तरीही पुस्तक वाचताना अनेक नवीन शिल्पे, मूर्ती यांची रोचक माहिती मिळाली. अशा शिल्पांचा केवळ उल्लेख इथे दिला आहे. 

ज्या मूळच्या सिंधू संस्कृतीतील ,बौद्ध,यक्ष संस्कृतीतील आहेत,हे मत पुस्तकात आहे.


1. शाल भंजिका - बुद्धमाता मायादेवी  



शालभंजिका शिल्पांमध्ये एक स्त्री वृक्षाची फांदी पकडलेली दाखवली जाते, जी बौद्ध कलेत मायादेवीला बुद्धाच्या जन्माच्या वेळी साल वृक्षाची फांदी पकडलेली दर्शवते; ही शिल्पे प्रजननशीलता आणि निसर्गाचे प्रतीक आहेत, ज्यात त्रिभंग मुद्रेत फळांनी भरलेल्या वृक्षासह स्त्री दाखवली जाते. भारतीय कलेत ही थीम प्राचीन काळापासून आढळते, जसे सांची आणि भरहूत येथील स्तूपांवर. गंधार आणि मथुरा शैलीतील शिल्पांमध्ये मायादेवीच्या जन्मदृश्याची निगडित असते, ज्यात ती उभी राहून साल वृक्षांची फांदी पकडलेली दिसते


2. सिंधूसंस्कृतीतील सापडलेल्या मातृदेवता शाकंभरी?



ही हरप्पा (Harappa) येथे सापडलेली एक अत्यंत महत्त्वाची सिंधू-सभ्यतेची मुद्रा (Seal) आहे, जी मातृदेवतेचे सर्वात प्राचीन पुरावे मानली जाते.

ही मुद्रा इसवी सनपूर्व २६००–१९०० च्या काळातील असून, तिच्यावर उलट्या (उलट्या पायांनी) बसलेली एक स्त्री-आकृती आहे, जिच्या योनीतून एक रोपटे (वनस्पती) उगवताना दिसते – ही पृथ्वीमाता किंवा प्रजनन-देवतेचे स्पष्ट प्रतीक आहे.

शाकंभरी ही नंतरची देवता असली तरी तिचे मूळ सिंधूतील मातृदेवतांशी जोडले जाते, ज्यात लज्जा गौरी सारख्या नग्न बसलेल्या मूर्त्या शाकंभरीच्या रूपाशी संबंधित आहेत. वडनगर येथील प्राचीन शिल्पे लज्जा गौरी/शाकंभरी दाखवतात, ज्यात मानवी रूपात फुलांच्या डोक्याची देवी दिसते


3. यक्षी  

यक्षी शिल्पे भारतीय कलेत निसर्ग आत्म्याचे रूप दाखवतात, ज्यात पूर्ण विकसित स्त्री आकृती असते, जसे दीदारगंज यक्षी ही मौर्य काळातील चमकदार दगडी मूर्ती. अमरावती स्तूपातील यक्षी शिल्पे दुसऱ्या शतकातील असून, त्या वृक्षाशी जोडलेल्या दाखवल्या जातात. मथुरा आणि गांधार कलेत यक्षी सहायक आकृत्या म्हणून आढळतात, ज्यात अलंकृत वस्त्रे आणि दागिने असतात. केरळातील यक्षी मूर्त्या लोककलेत भयानक किंवा मोहक रूपात दिसतात, जसे पद्मनाभस्वामी मंदिरातील


4. गजलक्ष्मी - / मायादेवी  



गजलक्ष्मी शिल्पांमध्ये लक्ष्मीला कमळावर बसलेली आणि दोन हत्तींनी अभिषेक करताना दाखवले जाते, जी संपत्ती आणि प्रजननशीलतेचे प्रतीक आहे; ही थीम प्राचीन भारतीय मंदिरे आणि गुहांमध्ये आढळते, जसे वाराह गुहा किंवा कश्मीरमधील ६व्या शतकातील मूर्त्या. बौद्ध कलेत ही मायादेवीशी जोडली जाते, ज्यात जन्मदृश्यात कमळ आणि हत्तींचा समावेश असतो. सातवाहन आणि शुंग काळातील शिल्पे २रे शतक बीसीई ते १ले शतक सीई पर्यंतच्या आहेत. कांस्य आणि दगडी मूर्त्या हिंदू आणि बौद्ध दोन्ही परंपरांमध्ये लोकप्रिय आहेत


5. तेरमधील - २५०० वर्ष २५०० वर्षांपू्वीची पौंपई मूर्ती 



पॉम्पेई लक्ष्मी ही इसवी सन ७९ मधील व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेकात पुरलेल्या इटलीतील पॉम्पेई शहरात सापडलेली हत्तीदान्ताची (ivory) सुंदर भारतीय शैलीची मूर्ती आहे.

ही मूर्ती इसवी सनाच्या पहिल्या शतकात भारतातून (बहुधा मथुरा किंवा दक्षिण भारत) रोमन साम्राज्यात व्यापारी मार्गाने गेली होती, जे भारत-रोम व्यापाराचे ठोस पुरावे आहे.


6. सिंधूसंस्कृतीतील साती आसरा  



 मोहनजो-दारो येथे सापडलेली सिंधू संस्कृतीची प्रसिद्ध मुद्रा आहे. तिच्यावर दाखवलेल्या सात मानवी आकृत्या (खालच्या बाजूला) काही विद्वानांच्या मते सप्तमातृका किंवा साती आसरा (सात जलदेवता किंवा मातृदेवता) यांचे प्राचीन रूप असू शकते, ज्यांचे मूळ सिंधू संस्कृतीत असल्याचे मानले जाते.

7. निऋती  



निरृति देवीची शिल्पे दक्षिण-पश्चिम दिशेची रक्षक म्हणून दाखवली जातात, ज्यात भयानक रूप, चार हात, खड्ग आणि साप असतात; राजस्थान किंवा उत्तर प्रदेशातील ९००-१००० सीई च्या वाळू दगडी मूर्त्या प्रसिद्ध आहेत. ती मृत्यू आणि क्षयाची देवी असून, उंच केस आणि सापांनी गुंफलेली दिसते. मंदिरांच्या आयकॉनोग्राफीत लोकपाल म्हणून समाविष्ट, ज्यात काळे रूप आणि सोनेरी केस असतात. दक्षिण भारतीय मंदिरांत निरृतिची शिल्पे राजरानी मंदिरासारख्या ठिकाणी आढळतात


9. भूमाता की शाकंभरी सिंधू संस्कृतीतील - भूमाता एकच ? जरीमरी  

भूमाता किंवा शाकंभरीची सिंधू संस्कृतीतील शिल्पे मातृदेवतांच्या टेराकोटा मूर्त्यांशी जोडली जातात, ज्यात लज्जा गौरी सारख्या नग्न बसलेल्या आकृत्या प्रजनन आणि पृथ्वी देवी दाखवतात; भूमाता आणि शाकंभरी एकच असू शकतात, ज्यात भाज्या आणि फळांची देवी रूप. जरीमारी ही लोकदेवता रोगनिवारक असून, तिची शिल्पे महाराष्ट्रातील लोककलेत साधी दगडी किंवा टेराकोटा असतात. वडनगर येथील प्राचीन शिल्पे शाकंभरीला मानवी रूपात दाखवतात, सिंधूतील मेहरगढ मूर्त्यांशी समान


10. सटवाई / जिविती । हारिती  

सटवाई किंवा जिविती ही लोकदेवता असून, तिची शिल्पे महाराष्ट्रातील ग्रामीण भागात साधी दगडी किंवा टेराकोटा असतात, जी मुलांच्या रक्षणकर्ती दाखवतात. हारिती ही बौद्ध देवता असून, तिची शिल्पे गांधार कलेत धूसर शिस्ट दगडात असतात, ज्यात ती मुलांसह बसलेली किंवा पांचिकासह दिसते; २रे-३रे शतकातील मूर्त्या संपत्ती आणि प्रजनन दाखवतात. हारितीची रूपांतरण कथा शिल्पांत दानवी ते देवी रूपात दिसते, जसे लॉस एंजेलिस म्युझियममधील. भारतीय आणि पाकिस्तानी गांधार शिल्पांत हारिती मुलांसह उभी असते


11. गार्डन्स ऑफ अॅडोनीस- नवरात्री  

गार्डन्स ऑफ अॅडोनीस हे प्राचीन ग्रीक विधी असून, त्यातील कलश आणि बीज रोपणाशी संबंधित कलाकृती टेराकोटा भांडी आणि मूर्त्या आहेत, ज्या प्रजनन रीतिशी जोडल्या जातात. नवरात्रीशी समानता असून, घाटस्थापना कलशातील बीज रोपणाशी, परंतु शिल्पे दुर्गा किंवा देवी मूर्त्यांमध्ये दिसतात, जसे १० डोके आणि १० हात असलेली दुर्गा शिल्पे. प्राचीन भारतीय कलाकृतींमध्ये फलदायी देवी मूर्त्या नवरात्रीशी जोडल्या जातात. ग्रीक कलाकृतींमध्ये अॅडोनीसच्या मूर्त्या आणि बागा दाखवल्या जातात, ज्या मृत्यू आणि पुनरुत्थानाचे प्रतीक.


12.काली आणि छिन्नमाता -छिन्नमस्ता देवीच्या शिल्पांमध्ये ती स्वतःचे शीर कापलेली, रक्ताच्या तीन धारा वाहत असलेली आणि काम-रती जोडप्यावर उभी असलेली दाखवली जाते; ही शिल्पे मुख्यतः तांत्रिक कलेत आढळतात, जसे १९व्या शतकातील राजस्थानी शैलीत किंवा मंदिरांच्या मूर्त्यांमध्येदिसते.

Sunday, November 16, 2025

'लोकधन' (ऐसी अक्षरे -) ते..... 'The folk आख्यान'

 'लोकधन' (ऐसी अक्षरे -) ते..... 'The folk आख्यान'




इथे पुस्तक परिचयासोबतच लोककला हा सामान दुवा असणाऱ्या आणखीन एका कार्यक्रामाचाही थोडक्यात आढावा दिला आहे.  

मला मानवाच्या इतिहासाबद्‌दल अनेक गोष्टी जाणून घ्यायला आवडतात.त्या इतिहासाची केवळ पानेच /लिखित साहित्य  वाचून सध्यातरी  समाधान करून घेतले जाते. तसेच विविध उत्खनन, स्थापत्य, वस्तू, भौगोलिक खुणा त्या इतिहासाजवळ घेऊन जातात . पण अनेक मौखिक परंपरा -लोककला हा वारसा जपत आलया  आहेत. लोकपरंपरा काळानुरूप बदलाचे वादळ पांघरूण वेळोवेळी रुप बद‌लून समाजा समोर येतात. परंतू काळ आता इतका वेगवान होत क्षणोक्षणी बदलत आहे की है 'लोकधन' संपुष्टात येण्याची  भीती आहे.


डॉ. संजय बोरुडे लिखित 'लोकधन' हे पुस्तक मौखिक लोकपरंपरा आणि इतिहास यांचा अनमोल वारसा जपणारे आहे.


मौखिक लोकपरंपरा:यात ओवी, आख्यान, लोककथा, उखाणे, आन्हे (कोडं), कूट, आणि फूट यांसारख्या मौखिक लोककलांचे सोप्या व संक्षिप्त रूपात वर्णन पुस्तकात आहे.


ओवी: हा छंद ६व्या शतकातील ग्रंथांमध्येही आढळतो. 'विवेकसिंधू' (११८८) हा ग्रंथ याच छंदात रचलेला आहे. यात जात्यावरची ओवी, सावित्रीबाई फुलेंच्या ओव्या, वैधव्य ओव्या, धनगरी ओव्या, डाकची/मतिकाची ओवी (उत्तरक्रियेत गायली जाणारी),मोहिनीराजाच्या ओव्या  अशा अनेक रंजक प्रकारांच्या ओव्यांचा समावेश  आहे.


स्त्री गीते: गौरी-गणपती सणातील गौरी गीते, काथवट कणा, आणि मंगळागौरीची गीते यांचाही समावेश आहे.


उखाणे ,आन्हे(कोड ) सवाल-जवाब, कलगी-तुरा सारख्या सवाल-जवाब प्रकारांची गमतीशीर उदाहरणे आहेत.


सण आणि लोकपरंपरा:


कोजागिरी, दिवाळी, नवरात्र यांसारख्या सणांच्या लोकपरंपरांचा आढावा घेतला आहे.ज्यात अनेक लोककथा या सणाभोवती कशा आल्या हे सांगितले 


दिवाळी: वसुबारस (गाय-गौ-धेनू), धनत्रयोदशी (धन्वंतरी), लक्ष्मीपूजन (अलक्ष्मी-करमूणी) यांमधील देवतांची समुद्रमंथनातून आलेली रत्ने या क्रमाने माहिती दिली आहे,समुद्रमंथन रत्ने दिवाळी सण असा विचार माझ्यासाठी नवाचं होता. 


बलिप्रतिपदा: दसऱ्याला  पाताळात धाडलेल्या बळीराजा बलिप्रतिपदेला पुन्हा प्रगटणार अशी वदंता होती.तेव्हा हा सण बळी राजाच्या स्वागतासाठी साजरा करण्याची पद्धत सुरू झाली, तसेच हा कृषीपरंपरेतील दुःखाचा सण असल्याचेही मत काही प्रवाहात नमूद केले आहे.


इतिहास आणि शेतीचा शोध:शेतीचा शोध आदिमानवाच्या काळात स्त्रीने कसा लावला, याचा एक रंजक संदर्भ आहे. पुरुष शिकारीला बाहेर असताना गुहेत असलेल्या स्त्रियांनी(काहि ,बाळंत ,लेकुरवाळ्या असत) फेकलेल्या फळांच्या बियांपासून झाड तयार होते, हे निरीक्षणाने जाणले आणि शेतीकडे वाटचाल सुरू झाली.


इतर लेख:हलगी, वाघबारस, चिन्हसंकेत, मापनाची साधने, कुलचिन्हे  यांसारख्या विविध विषयांवरील लेखांचा समावेश आहे.


लोकपरंपरेतील शब्दांचे अर्थ:


गजी = गजनृत्य


आन्हा = कोडं/आयना


सुंबरान = स्मरण


आख्यान  = ओवीतला गद्य भाग


खेडणे = शेती करणे


जित्राब = जनावरे

हलकारे=सांगावा पुढे जाणे 

हलगीच्या चाली =कावडीची चाल,कुस्तीसाठी मर्दानी चाल,हलगी आंदोलन 

हलगी=कडे,कडेकरी 


 'The Folk आख्यान' 

"लोकधन पुस्तक वाचून लोककला, लोकपरंपरा याविषयी भारावलीच होते.तोच दुपारी ह्यांचा फोन आला, "तिकीटे काढली आहेत, आपल्याला 'The folk -आख्यान' कार्यक्रम पाहायला जायचे आहे. या कार्यक्रमाविषयी मी ऐकलं होत, रील्स पाहिल्या होत्या. म्हटलं चला अजून जाणून घेऊ‌या. तर यूट्युब यातील प्रमुख सूत्रधारांच्या-कलाकारांच्या  मुलाखती ऐकल्या.


ऐकूनच थक्क झाले. कारण पुस्तकात वाचलेल्या जवळपास सर्व लोककला, लोकवाद्य  वापरुन हा भन्नाट कार्यक्रम या २५ वी तल्या कलाकारांनी भव्य-दिव्य असा  तयार केला आहे. विशेष करुन ईश्वर अंधारे' ज्यांनी सर्व कार्यक्रमाचे लेखन केले आहे, त्यांचेही  (MSC. Electronic) मी शिकले त्याच New Arts, commerce & science महाविद्यालयात शिक्षण झाले आहे. याच महाविदयालयाच्या आणखीन एका  विद्यार्थ्याने  आधीच महाराष्ट्र- मराठी  सिनेमाला एक नवी दृष्टी-वाट दिली - ते नागराज मंजुळे.आणि या कार्यक्रमाची  संगीतकार जोडी हर्ष-विजय यातील  हर्ष हे  सासरच्या मूळगावाच्या शेजारच्याच गावचे म्हणजे 'उम्मापूस्चे' (बीड) आहेत. त्यामुळे अजून जवळीक वाटली :) 



तर या कार्यक्रमाची खासियत म्हणजे यात लोकपरंपरेतील प्रसि‌द्ध, लोकप्रिय गीते वापरुन कार्यक्रम केला जात नाहीतर ईश्वर अंधारे यांनी स्वतः  नव्याने  रचलेले आणि लोककलेचे विविध प्रकार असलेले गीतप्रकार सादर केले आहेत.. 


सादर केलेले गीतप्रकार:


आवतन, पालखी पलंग, आराधना गीत, अभंग, ओवी, सुंबरान, गवळण, घाटोळी,पोवाडा, कोड-कूट, भारुड, वाघ्या मुरळी गीत, नमन गण,गोंधळ यांसारखे विविध गीतप्रकार सादर केले आहेत.


लोकवाद्यांची जुगलबंदी (तालकचेरी):यात महाराष्ट्रातील लोकपरंपरेतील अनेक  लोकवाद्यायची जुगलबंदी -तालकचेरी ऐकतांना अंगावर रोमांच उभा राहिल्याशिवाय शहत नाही, संबळ, पखवाज, ढोलकी, हलगी, तुणतुणे, घुंगूर, टाळ-चिपळ्या, पायपेटी ,बासरी, झांज, मृदंग, डफली, मादळ, तारपा, ताशा, मंजीरा यांसारख्या अनेक लोकवाद्यांची तालकचेरी (जुगलबंदी) रोमांचक अनुभव देते.


ओवी सादर करताना गायिकांचा आवाज 'काळजाला हात घालतो.'


सद्यस्थितीवरील भाष्य:

कार्यक्रम कीर्तनकार , शाहीर, पोतराज, वासुदेव, बहुरुपी, गोंधळी, लावणी कलाकार यांसारख्या लोककलावंतांच्या सद्यस्थितीवर भाष्य करतो.

महाराष्ट्राची अस्सल 'लोक' कला संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे, याबद्दल प्रेक्षकांच्या डोळ्यात अंजन घालतो, ज्यामुळे कार्यक्रम भावूक आणि विचार करायला लावणारा ठरतो.


एकूणच, 'लोकधन' पुस्तक आणि 'The Folk आख्यान' कार्यक्रम, दोन्ही महाराष्ट्राच्या मौखिक आणि सांस्कृतिक वारशाचे महत्त्व अधोरेखित करतात

-भक्ती

आता पुस्तकातील  काही आन्हे विचारते ,काही शब्द अपशब्द वाटतात पण ती बोलीभाषा आहे ,पण उत्तर अश्लाघ्य नाही. 

१. आटक्यात लोटके लोटक्यात दही बारा कोस जाई पण सांडत नाही. 


२. माड्यावर माड्या छत्तीस माड्या, हात नाही परत तर बोंबल भाड्या.. 


३. कोकणातून आला भट, धर शेंडी, आपट 


४. नेसली सतारा लुगडी, तरी **** उघडी 


५. केशेरावाचा घोडा बोटेरावने नेला, तळी मुक्काम केला, नखरड्याने जीव घेतला. 


६. अंधाऱ्या खोलीत म्हातारी मेली, पाच जण भाऊ पण दोघांनीच उचलली. 


७. तीन पायांची त्रिंबकराणी खाते लाकूड, पिते पाणी 


८. चुलीत गेली अन् गर्भार झाली..


९. एवढीशी सकू, तिला काजळ कुंकू 


१०, एवढी एवढी ननूबाई, साऱ्या वाटंनं गाणं गाई 


११. एवढीशी ननूबाई, पदर केवढा घेई 


१२. सुपात लाह्या त्यात रुपाया 


१३. तीन लाकडं आणि अकरा माकडं

Monday, October 27, 2025

द हिडन फिगर!



 महिला दिनानिमित्त मला एक मस्तच चित्रपट सापडला.द हिडन फिगर!

हा सिनेमा सत्य व्यक्तीरेखांवर आधारित आहे.प्रगत मानल्या जाणाऱ्या अमेरिकेत १९६१ ला वर्णद्वेष होता.गडद रंगांच्या लोकांना खूप हीन मानले जायचे.अशा वेळी देखील चक्क नासामध्येही हा भेदभाव होता.पण कॅथरीन जॉन्सन, डोरोथी वॉन आणि मेरी जॅक्सन,  या तीन हुशार गडद रंगांच्या संशोधक बायकांनी इतिहास घडवला . गणितज्ञ ,मून मिशन भाग घेणारी कॅथरीन,आयबीएम कम्प्युटर हेड होणारी डोरोथी आणि मेरी नासातली पहिली कृष्ण वर्णीय  इंजिनिअर होती.

त्यांचा लढा खरच खुप प्रेरणादायी सिनेमा आहे.

Sunday, October 26, 2025

तुरीच्या दाण्यांची कचोरी

 "#तुरीच्या_दाण्यांची_कचोरी" ही विदर्भातील पारंपरिक आणि चविष्ट नाश्त्याची रेसिपी आहे. हिवाळ्यात तुरीच्या शेंगांपासून काढलेले हिरवे दाणे वापरून बनवली जाणारी ही कचोरी कुरकुरीत आणि मसालेदार असते. ती चहा किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासोबत उत्तम लागते

दारात ८ फूट तुरीचे एक झाड आलंय,ते तुरींच्या शेंगांनी‌ खुप लगडलेले आणि वाकलेलं आहे.एक तोडी केली तेव्हा आज कचोरी केली.पुढच्या तोडीला आमटी करणार आहे.




आवश्यक साहित्य (भरणासाठी):

तुरीचे हिरवे दाणे (सोललेले): १ वाटी +१/२ वाटी मटार

ओले खोबर्‍याचे तुकडे: २ वाट्या (कुटलेले)

हिरव्या मिरच्या,आलं: २-३ (बारीक चिरलेल्या)

धनेपूड-३ टीस्पून

जिरे+बडीशेप पूड : १ टीस्पून

हळद: १/२ टीस्पून

लाल तिखट: १ टीस्पून (चवीनुसार)

मीठ: चवीनुसार

कोथिंबीर+कसूरी मेथी : ३ टीस्पून (बारीक चिरलेली)

तेल: १ टेबलस्पून (भरण परतण्यासाठी)

आवश्यक साहित्य (डोघासाठी):

मैदा: २ वाट्या

तूप किंवा तेल: ४ टेबलस्पून (मळण्यासाठी)

मीठ: १ चिमूट

गरम पाणी: आवश्यकतेनुसार (मळण्यासाठी)


कृती-

: तुरीचे दाणे +मटार दाणे स्वच्छ धुवून घ्या.कुकरमध्ये २ शिट्टींत वाफवून घ्या.वाफवून झाल्यावर मिक्सरमधून मध्यम आकारासाठी फिरवून घ्यायचे. 


एका कढईत १ टेबलस्पून तेल गरम करा. त्यात जिरे आणि हिरव्या मिरच्या घालून परतवा. नंतर कुटलेले खोबर्‍याचे तुकडे, धने पावडर, हळद, लाल तिखट ,जिरे+बडीशेप पूड आणि मीठ घालून २-३ मिनिटे परतवा. उकडलेले तुरीचे दाणे+मटार दाणे घालून ५-७ मिनिटे मंद आचेवर शिजवावे, जेणेकरून दाणे मऊ होतात पण फुटत नाहीत. शेवटी चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण थंड होऊ द्या. हे सारण तयार आहे.


पारीचे कणीक :

 एका भांड्यात मैदा, मीठ आणि तूप घालून चांगले मळा. हळूहळू गरम पाणी घालत मऊ आणि लवचिक डोघ तयार करा (खस्ता डोघासाठी तूप चांगले मिसळा). डोघाला १० मिनिटे झाकण लावून बाजूला ठेवा.



कचोरी भरून आकार द्या: डोघाची लहान-लहान गोळ्या करा . प्रत्येक गोळी चपट्या करून भरणाचा थोडा भाग भरून बंद करा. हाताने हलकेच चपटे करा किंवा लाटा जेणेकरून भरण बाहेर येऊ नये. मध्यभागी थोडे जाड ठेवा.


या कचोऱ्यांना वरतून तेल लावून #airfryer मध्ये १८०°वर १० मिनिटे ठेवा.नंतर उलटून परत १८०°वर ५ मिनिटे ठेवा.

किंवा

तळा:  कचोर्‍या मंद आचेवर सोनेरी व्हायपर्यंत तळा. 



ही कचोरी चटणीसोबत (लिंबू-मिरची चटणी किंवा कोथिंबीर चटणी) सर्व्ह करा.

ती २-३ दिवस टिकते, म्हणून स्टोअर करून ठेवता येते.


पौष्टिकता: तुरीचे दाणे प्रोटीन आणि फायबरने युक्त असल्याने ही कचोरी आरोग्यदायी आहे.

Monday, September 29, 2025

व्हिन्सेंट व्हान गॉग -अभिवाचन प्रयोग

 व्हिन्सेंट व्हॅन गॉग (१८५३-१८९०

 उर्सूलाच्या(युजेनी) प्रेमात पडलेल्या व्हॅन गॉग सुरुवातीच्या काळात अनेक शेतातील चित्रे रेखाटली .अगदी तिला लग्नाची मागणी  घातली, पण त्याच्या भ्रमाचा भोपळा फुटला. तीने तिचे लग्न आधीच ठरल्याचे सांगितले. विन्सेंट च्या आयुष्यात प्रेमाची कमतरता कधीच भरून आली नाही.



विन्सेंट व्हॅन गॉग, एक डच चित्रकार, ज्याच्या जीवनाची कथा उत्कटतेने आणि दुखद घटनांनी भरलेली आहे. आयुष्यात जिवंतपणी त्याचे केवळ एकच चित्र विकले गेले. तरीही चित्रांची साथ त्याने शेवटपर्यंत सोडली नाही



सूर्यफूल "आणि "तारांगित रात्र" ह्या चित्रांनी त्याच्या मृत्यूनंतर त्याला अमरत्व दिले. - अशा रंगांच्या जा‌दूगाराची एकाकी कहाणी लेखक-आर्यविंग स्टोन यांनी लिहिली. ज्याचा अनुवाद माधुरी पुरंदरे यांनी केले. हीच गोष्ट व्हान गाँगच्या चित्रांसह अभिवाचन‌ कलाकृतीद्‌वारे सादर करण्याचा यशस्वी प्रयोग  शेखर नाईक यांनी साकार केला. धनेश, धीरेश, श्रद्धा, अश्विनी यांनी आवाजाच्या अप्रतिम सादरीकरणातून या चित्रकाराची कथा उलगडून सांगितली.



खरे पाहता त्याच्या घरातच कलाक्षेत्रातील कलाकृतींचे विक्रीचे धागेदोरे  होते. पण प्रेमाच्या शोधात विन्सेंट नंतर अजूनच एकाकी झाली पुढे त्यांना धार्मिक श्रद्‌धेची गोडी लागली व पाद्री बनण्याचा प्रयत्नही केला. याबाबतचे ऑफिशल पदवी ना तत्सम अभ्यासक्रम ते पूर्ण करू शकले नाही परंतू बेल्जियमधील बोरिनेज येथील कोळसा खाणी भागात त्यांनी मिशनरी म्हणून काम स्वीकारले.



 तिथल्या गरीब लोकांप्रमाणे राहण्याचे ठरवून त्याने मोठे घर सोडून लहान झोपडीत राहायला सुरु केले. काळाचा घाला पडला एका दुर्घटनेत अनेक खाण कामगारांचा मृत्यू झाला .या दुःखाच्या काळात तो सामान्यांप्रमाणे त्यांच्यासोबत होता पण चर्चला हे प्रतिष्ठेला धक्का वाटल्याने त्यांनी त्यात्या लोक या पदावरून दूर केले.

तरीही पुढे या काळातील कथा सरकतांना खाणीतील कामगारांचे त्यांच्या कुटुंबाचे अशांततामय

कष्टमय जीवनही व्हिन्सेंटने चित्रात रेखाटले, जी चित्रे मी कधीच पाहिली नव्हती.



अशाच उतरत्या काळातही -कुपोषणाच्या अवस्थेत ते गेले.पण भावाच्या थिओ यांच्या सांगण्यावरून पुन्हा मन लावून चित्रे काढू लागला. भावाने दिलेल्या आर्थिक मदतीने चित्र काढत होता. घरालाही पिव‌ळा रंग दिला, yellow house तो त्याचा स्टुडिओ होता. पुढे एका वेश्येशी त्याची ओळख झाली तेथील वेश्यालयाचेही अनेक चित्र  त्याने रेखाट‌ले. चित्रकार गॉगीनने त्याला आठवणीतून चित्र काढण्याची सूचना केली, त्यानुसार त्याने अनेक गर्द रंगांची चित्रे रेखाटली. पण चित्रकाराला पोटाची भूक अनेकदा मिटवता येत नसे .अशा अनेक ताणतणावात गोगीन- व्हेन गॉगची मैत्री तर तुटली पण कानही तुटला..... अशाच एका भ्रमाच्या वेळी व्हिन्सेंटने स्वतःचा कान कापला होता, तो कान त्याने वेश्यालयातील गॅबीला दिला...?





व्हॅन गॉगला वेडा समजून त्याची रवानगी लोकांच्या तक्रारीमुळे  मनोरुग्ण दवाखान्यात करावी लागली. तिथल्या डॉक्टर रे' यांच्या सहा‌नुभूती वागणूकीने त्याला हायसे वाटले असेल.तिथे क्लिनिक,बागा,प्रिझनर राऊंड, स्टाररी नाईट चक्रव्यूहाचे चित्र अशी अनेक चित्रं रेखाटली.

'स्टारसी नाईट' हे चक्रव्यूहासारखे चित्र याच काळात काढले.



परंतू १९९० नंतर गंभीर आजारात असतानाच गव्हाच्या शेतात स्वता:वर गोळी झाडली. तो आधीच अशक्त झाला होता, त्यात जखमेचा संसर्ग वाढून तीन दिवसातच व्हॅन गॉग मरण पावला. अंतिम काळातही भावाने 'थिओने धाव घेतली पण "दुःख कायमचे राहीले" गॉग मृत्यू पावला.


पोट्रेट, निसर्गचित्र, फुलं, ऑलिव्ह, फळबागा, शेतं, समुद्र होड्या अशी अनेक हिन्सेंट व्हॅन गॉग यांची चित्रे आज सर्वात अधिक मूल्य मिळवणाऱ्या चित्रांपैकी आहेत.पण विन्सेंट व्हॅन गॉग यांचे आयुष्य कायम दुःखमय राहिले.



त्याच्या आयुष्याच्या अनेक घटना अजून आहेत पण  अभिवाचनाच्या  वेळेमर्यादेमुळे थोडक्यात खुप कल्पकपणे व्हेन गॉग #ऊर्जा_रंगभवन येथे सादर झाला.

-भक्ती

Wednesday, September 24, 2025

नवरात्री निमित्ताने

 नवरात्री निमित्ताने 


परवा एक आंतरजालीय व्याख्यान ऐकत होते त्यामध्ये हडप्पा काळापासून ते आताच्या काळापर्यंत 'घट' (मडके) याचे बद‌लले स्वरूप, त्या निगडीत प्रथा सांगितल्या गेल्या. व्याख्यान जरी घाईत ऐकले तरी काही मुद्दे लक्षवेधक, नवीन होते.


'घट' हा मृत्तिकेपासून बनवलेला विविध हेतू‌साठी धार्मिक विधी, साठवणूक, सामाजिक प्रथांसाठी वापरला जात असे.



सिंधू संस्कृतीत व त्या नंतरच्या काळातही द‌फनविधी साठी घटाचा वापर होत असे.जे जन्म ,मृत्यू, पुनर्जन्म  यांचे प्रतिक आहे.घट हा माती, पाणी यांनी तयार होतो. आणि हीच तत्त्वे नव्याने धान्य म्हणजेच सृजनासाठी आवश्यक आहेत. तसेच मानवी जन्म स्त्रीच्या उदरातून होतो तेव्हा स्त्रीचे उदर घटाप्रमाणेच गोलाकार दिसते. 'स्त्री ही सृजनकर्ता, घटरूपी सृजन मानली गेली. मृत्यूनंतर पुन्हा जन्म मिळावा यासाठी मग दफनविधीसाठी घटांचा वापर होत गेला. घटरूपी आकारातून सृजन होते. अशावेळी कुंभाराकडून मृत्य व्यक्तीसाठी शरीर आकारानुसार घटरचना होत. लहान मुलांसाठी मध्यम आकाराचे मडके पुरेसे असत. तर मोठ्या माणसांसाठी मोठ्या आकाराचे चार-पाच मडके एकावर एक अशी आतून पोकळ बनवली जात. त्यात देह ठेवतांनाही त्याचे हात पाय छाती-पोटाजवळ ठेवले जात जे गर्भात असतानाही असेच असतात. अशाप्रकारे दफन केल्यामुळे  ज्यातून सृजन होणार कशा गर्भासारख्या घटातून मृत्यूनंतर जीवनात योग्य जागी मृत व्यक्तीचे सृजन सहज व्हावे

ही श्रद्‌धा! अशाप्रकारचा दफनविधी कमी झाल्यानंतर पुनर्जन्माचे प्रतिक म्हणून केवळ एखादेच मडके शवाजवळ दफन करतांना ठेवले जाऊ लागले.



हळूहळू या 'स्त्री शक्तीची सश्रद्‌ध आराधना घटस्थापना या रीतीरिवाजात झाली. घट ज्या आत पाण्यातून, मृत्तिकेच्या संपर्कातून बीजारोपण होऊन सृजन धान्यरूपातून उगवते. हा सर्व जागरही नऊ रात्री- गर्भारपणाच्या नऊ महिन्यांचे प्रतिक दर्शवितो.

पुढे या घटाभोवती आनंदोत्सव गरबा गोलाकार आकारात खेळला जाऊ लागला. नंतर अनेक विधींमध्ये धातूचा  कलश पाणी नारळ पाने  सृजनाचे प्रतिक /देवीरूप म्हणून मांडले गेले. तत्कालीन जीवनातील जन्म- नश्वरतेचा विचार प्रत्येक कामात होत असे. मग तो सुतार लोहार, कुंभार कोणीही असे. सृजन आणि नाश‌ चक्र प्रत्येक ठिकाणी असतेच.घट घडवणाऱ्या कुंभारांनीही या सृजनाचा जागर समाज घडीत रचला.


तुकारामांनी थेट विठ्‌ठलालाच 'वेडा कुंभार' म्हटले आहे तर माणसाच्या जीवनाला मडक्याची उपमा दिली आहे.


माती पाणी उजेड वारा। तूच मिसळशी सर्व पसारा

आभाळचि मग ये आकारा। तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे

अंत ना पार||


पहिल्या ओळीचा अर्थ सरळ आहे माती , पाणी, उजेड, वारा या चार तत्त्वांचा उल्लेख पंचमहाभूतांशी पृथ्वी, जल, तेज, वायू यांच्याशी जोडता येतो. मानवी शरीरही याच पंचमहाभूतांनी बनले ही धारणा आहे. वि‌ठ्ठल हे सर्व एकत्र करतो अक्षरशः या पसाऱ्याशी खेळतो. माती पाणी सृजनासाठी तर उजेड, वारा जीवनाला गती देतो, हीच गोष्ट कुंभार मडकी-घट बनवताना करतो. आभाळ आकाराला येते- आकाश विश्व जे विशाल आहे ते साकारले सजीवांसह जाते.तुझ्या घटांच्या 'उतरंडी म्हणजे माणसांच्या, सजीवांच्या लहान मोठ्या प्रजाती उद‌याला येतात. कुंभारही लहान ते मोठ्या आकाराची मडक्यांची उतरंडच  बनवत असतो. अशा या मडकं बनवण्याच्या, सृष्टीच्या जीवांच्या जन्म मृत्यूच्या चक्राला, सीमेला कोणतीच सीमा नाही.


घटाघटाचे रूप आगळे । प्रत्येकाचे देव वेगळे । तुझ्याविना ते कोणा न कळे। मुखी कुणाच्या पडले लोणी कुणामुखी अंगार||


आता घट म्हणजे मानव ठरले! 

या घटामध्ये  मानवामध्ये किती ते दिसण्यात,व्यक्तिमत्वात,विचारात वैविध्य आहे. तर प्रत्येक 'घट'  इतरांपासून निराळा आहे. प्रत्येकाचे व्यक्तीमत्त्व निराळे आहे.अशा प्रत्येक मनुष्याचे कर्म व दैव यांचा समतोल कसा  साधता येतो की नाही हे ईश्वरालाच ठाऊक असते.त्यामुळे समतोल साधला  असेल तर लोणी(आनंद) नाहीतर जीवनभर अंगार (दु:ख)!

-भक्ती

Wednesday, September 10, 2025

Kpopdemonhunter

 


खर म्हणजे तिच्या बरोबर कूंफू पांडा बघायला खूप धमाल येते.तिचं ते सात मजली , खळखळून हसणं मी सुखाने पाहत राहते.लेट ईट गो असं लहानपणी ती मनापासून गाताना आनंदून जायचे.उशीच्या खोळीपासून शाळेच्या कंपास, पर्यंत सगळीकडे फ्रोजनचे एल्सा,ॲना,ओलेफ दिसू लागले.डिस्नेच्या प्रिन्सेस तिच्या बोलण्यातून तीच्या मैत्रीणी भासतात.

के फॉर काईट शिकवण्याच्या पुढे जाऊन जनरेशन अल्फा असलेल्या माझ्या लेकीने मला के फॉर के-पॉप डेमॉन हंटर(K-POP demon hunter )शिकवलं.

के पॉप म्हणजे कोरियन पॉप.आचच्या पिढीला BTS,Blackpink,Blackswan  यांच्या संगीताने,चमकदार व्हिडिओने भुरळ घातली आहे.

खरंच #kpopdemonhunters  हा ॲनिमेशन सिनेमा खूप सुंदर आहे.

रूमी, मुख्य पात्र, K-pop आयडॉल आणि राक्षस शिकारी अशा दुहेरी भूमिकांमधून स्वतःची खरी ओळख शोधते. हे अस्तित्ववादाशी निगडित आहे, जिथे व्यक्ती स्वतःच्या उद्देशाला अर्थ देते. रूमीचा अंतर्मनातील संघर्ष आणि "What It Sounds Like" गाण्यातील भावनिक प्रवास आत्म-प्रतिबिंब आणि स्वीकार हे दिसते.

या सिनेमातलं गोल्डन,सोडा पॉप,टेक अवे ही गाणी भन्नाट आहेत.लहान मुलांना ज्या वयात अनेक न्यूनगंड जडतात .तिथे हा सिनेमा केवळ मनोरंजनच नाही तर स्वतः वर प्रेम करायला खूप मदत करतो.

Wednesday, September 3, 2025

कल्पद्रुमाचिये_तळी-पुस्तक परिचय

 #कल्पद्रुमाचिये_तळी

#रा_चि_ढेरे

#ज्ञानदेव 



कल्मद्रुमातळी ब्रम्ह पुंजाळले कैसे

दिसते सुनीळ तेज गे 

मज पाहता वेणु वेदध्वनि नाद । 

उमटताली सहज गे बाईजे ।।


ज्येष्ठ लेखक संशोधक रा.चि.ढेरे यांच्या अभ्यासपूर्ण लिखाण कधीच अनेकांच्या लिखाणाप्रमाणे बोजड वाटत नाही. आपल्या संस्कृतीच्या अनेक रुढी परंपरांचे सौंदर्यपूर्ण सादरीकरण त्यांच्या लिखाणाच्या यशाचे गमक वाटते.


'कल्पद्रुमाचिये तळी' या पुस्तकात १९६० नंतरच्या काळात ढेरे यांनी ज्ञानदेव ज्ञानेश्वरी संदर्भात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष लिहिलेले अनेक लेख संग्रहित केले आहेत.चार भागात- श्रीज्ञानदेन, श्रीज्ञानदेवी, परीक्षण निरीक्षण,सौंदर्यवेध यात हे  लेख विभागले आहेत.


पहिल्या भागातील लेखात ज्ञानदेवांची बोधभूमी म्हणजेच नाथ संप्रदाय व तत्कालिन इतर संप्रदायाचा ज्ञानदेवांशी असलेला संबंध अभ्यासला गेला आहे.ज्ञानदेवांची कुलस्वामिनी सप्तश्रृंगी असावी की 'म्हाळसा  असावी याचा उहापोह आहे. तसेच या भागात त्र्यंबकेश्वर या स्थलाचे पुरातन महत्व शैव,शाक्त,नाथ परंपरेशी जोडले गेले आहे हे वाचून आश्चर्यचकित झाले.


दुसऱ्या ज्ञानदेवी' भागात ज्ञानेश्वरीत आलेल्या अनेक शब्दांग सुरसपणे धांडोळा वाचायला मिळतो. कीर्ती प्रासाद, कीर्तन या सर्वांचा उल्लेख 'मंदिर' म्हणूनच आहे. मग धर्मकीर्तन म्हणजे 'धर्मार्थ बांधलेले मंदिर या अर्थाने ही संज्ञा हे उमगली.


ज्ञानदेवांचा "गीतारलप्रासाद हे रूपक साक्षात कैलास लेणं या प्रासादावर आधारित आहे .


तंव विनवी ज्ञानदेवो । म्हणे हो कां जी पसावो ।

तरी अवधान देतु देवो । ग्रंथा आतां ॥ २९ ॥

जी गीतारत्नप्रासादाचा । कळसु अर्थचिंतामणीचा ।

सर्व गीतादर्शनाचा । पाढाऊं जो ॥ ३० ॥

लोकीं तरी आथी ऐसें । जे दुरूनि कळसु दिसे ।

आणी भेटीचि हातवसे । देवतेची तिये ॥ ३१ ॥

तैसेंचि एथही आहे । जे एकेचि येणें अध्यायें ।

आघवाचि दृष्ट होये । गीतागमु हा ॥ ३२ ॥

मी कळसु याचि कारणें । अठरावा अध्यायो म्हणें ।

उवाइला बादरायणें । गीताप्रासादा ॥ ३३ ॥

नोहे कळसापरतें कांहीं । प्रासादीं काम नाहीं ।

तें सांगतसे गीता ही । संपलेपणें ॥ ३४ ॥

व्यासु सहजें सूत्री बळी । तेणें निगमरत्नाचळीं ।

उपनिषदार्थाची माळी\- । माजीं खांडिली ॥ ३५ ॥

तेथ त्रिवर्गाचा अणुआरु । आडऊ निघाला जो अपारु ।

तो महाभारतप्राकारु । भोंवता केला ॥ ३६ ॥

माजीं आत्मज्ञानाचें एकवट । दळवाडें झाडूनि चोखट ।

घडिलें पार्थवैकुंठ\- । संवाद कुसरी ॥ ३७ ॥


 भूतपिशाच गटातले गोंदली कसे 'गोंधळी' होत अनेक देवगण परंपरेत समाविष्ट झाले.


का साधुने गोंदळी। संचरोनि सूये मेळि । 

नाना सुदिनांचा आभाळि। दुर्दिनु कीजे ॥


 लीळा ग्रंथातील कटक शब्द देवगिरी किल्ल्यासाठी आहे यासाठी"अनेक संशोधकांनी असंख्य ग्रंथ चाळले आहेत.ज्ञानेश्वरीतही देवगिरीसाठी हाच कटक शब्द योजिला आहे.


महानुभाव व लिंगायत या समाजाचाही ज्ञानेश्वरीवर बराचसा प्रभाव अनेक ओव्यांत आहे . ज्ञानेश्वरीतील षट्स्थल,षट्चक्रे याच प्रमाणे लिंगांगसामरस्य या संज्ञेसाठी उल्लेख केला आहे.


तिसऱ्या भागात ज्ञानेश्वरांचे चरित्र कोणी कोणी, कोणत्या वेगवेगळ्या काळात लिहिण्याचा प्रयत्न केले हे सांगितले आहे.नामदेव व इतरांचे संशोधन आहे.


 यातील पसायदानाची संहिता या छोट्याशा लेखात  पसायदानात अनेक शब्दांची शुद्वता मांडली आहे.


एणे वाग्यज्ञे तोषखवे । तौखौनि माज द्यावे" एकाच ओवीत दोन भिन्न रूपे का?


भजिजो आदिपुरुषी ऐवजी आदिपुरूखी हेच असावे. 'तापहीन हा शब्द 'तप' तपश्चर्येशी निगडीनत असताना  ताप -उष्णता अर्थाने 'तप' आला नाही.


ग्रंथोपजीविय हे अनेक वचन हवे, ग्रंथोपजीव नाही.


शेवटच्या सौंदर्यवेध हा भाग खरोखर बौद शब्द‌सौंदर्याची रत्नखाणच आहे.ज्ञानेश्वरांच्या अनेक विरहणींचा रसास्वाद आहे. तसेच सगुण ज्ञानदेवांचा सहवास अमृतासम कसा असेल यावर अलौकिक शब्द‌माला गुंफल्या आहेत.


लेखकाप्र‌माणे मलाही वाटले माऊली आताच्या लेकरांनाही तुझे सबाह्य नाही तर तुझी असण्याची प्रचिती अंतरात्म्याला लाभू दे!!"आमच्यासाठीही...


'ताटी उघडा ज्ञानेश्वरा'

-भक्ती

Friday, August 29, 2025

नभीची चंद्रकोर उतरली



 आठवणींची गर्दी दाटली

मेंदीच्या रेषेत तुझी चाहूल 


नभीची चंद्रकोर उतरली

कमळ सौंदर्याची पडली भूल


नाजूक स्वप्नांची नक्षी रंगली

सख्याची साथ निरंतर अनमोल


नयनी तुझ्या चंद्रकोर न्हाली

काळोखातही स्वप्नांना आधारवेल


शीतल राती कळी उमलली

स्मित तुझे ,उमलले कमलदल


प्रेमाची सावली मिठीत गंधाळली 

बहरले ते नाजूक रानफूल


-भक्ती




Saturday, August 23, 2025

बेसरबिंदी - 'ग्रेस' एक स्मरण

 बेसरबिंदी - ग्रेस एक स्मरण






कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ग्रेस यांच्या ध्वनिमुद्रीत आवाज त्यांच्या अनवट वाटेच्या कवितांच्या सौंदर्याचे तत्त्व  उमलून सांगतात. आणि ग्रेस यांच्याच सुरेल गीताचे स्वर कानी पडतात...


प्रकाश गळतो हळूहळू 

चंद्र जसा उगवे 

पाण्यावरती उमटत जाती 

अंधूक अंधूक दिवे ...


दूर सनातन वृक्षांनाही

हिरवट गंध मूका

दुःख सुरांचा क्षितिजापाशी

मेघ दिसे परका...


बस... एका अनवट प्रकाशातून ग्रेसांचे स्मरण सुरु होते. बेसरबिंदीतील सादर झालेल्या कवितांचे,ललितबंधांचे,गीतांचे विषेशत्व  जाणवले की, ग्रेस यांच्या नेहमीच्याच  प्रसिद्‌ध कवितांपेक्षा वेगळ्या कवितांचा,लेखांचा यात मागोवा आहे.


कार्यक्रमाच्या संहितेमध्ये ग्रेस यांच्या कवितेच्या सृजनाचे अनेक पैलू स्पर्शित केले गेले. ग्रेसांना प्रिय असलेली भगवी संध्या, आईची गुढ माया, पावसाची  निरव रिमझिम, दुःखाची कातरवेळ आणि अजून बरेच काही..


ग्रेसांनी लिहिलेले अनेक ललितलेखन कार्यक्र‌मात सुंदररीत्या गुंफले आहेत. सुरुवातीलाच 'तोडाचा डोह'' काळजाला पिळवटून टाकतो. सादरकर्त्याच्या आव‌ा‌जाची धीर-गंभीरता त्या डोहाच्या वातावरणाचा आभास तंतोतंत उभा करतो.


तांदूळ मोजणाऱ्या मुलींची कथा व्यथा खोल शिरते. एलिझाबेथच्या शेवंतीच्या रोपांनी कशी मानवातील अहंकाराच्या मूळापाशी कधी नेले कळलेच नाही... प्रश्न शेवतींचा नाही एलिझाचा आहे.


नको मोजू माझ्या 

मुक्तीच्या अंतरे 

ब्रम्हांडाची दारे 

बंद झाली ..


माझ्या आसवांना 

फूटे हिमगंध 

मागे-पुढे बंध 

पापण्यांचे..


ग्रेसांची  दग्ध मुलींचे संध्यागीत यात संध्याकाळचे हिरवट दुःखाचे तरंग उमटत राहतात.


पक्षी पक्षी व्याकूळ व्याकूळ रुतवून काटा उर अभंग दग्धमुलींचे विरक्त हसणे संध्येपाशी एक तरंग

..

...

....

मी स्मरणाने गंध अचंबित संध्यामायेचा कल्लोळ|


ग्रेस यांच्या लिखाणाला दुर्बोधताचा शाप नाही तर  ते वरदान आहे कारण Making Sense From Non Sense हे परीसस्परीस शक्तीचे द्योतक आहे.


मी महाकवी दुःखाचा 

प्राचीन नदीपरी खोल 

दगडाचे माझ्या हाती 

वेगाने होते फूल - 

ग्रेस


अशा या प्रिय ग्रेस यांच्या स्मरणाची संध्या मी अनुभवली ABAA(आबा) 'अहमदनगर बॅकस्टेज आर्टिस्ट असोशिअसन यांच्या अभूतपूर्व सुंदर बेसरबिंदी यां कार्यक्र‌मामधून!


विविध क्षेत्रात स्थिरावलेल्या पण २०-२२ वर्ष कलेच्या अनेक रंगी तंतूने जोडलेल्या या गुणी प्रतिभावंत कलाकारांनी या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. बेसरबिंदीचा  पहिला कार्यक्रम एफ.टी.आय(FTII) ओल्ड मेन थिअटर ,पुणे येथे सादर झाला. यातील सादरीकरण केवळ गीत, लेख यानेच  सजलेले नाही तर  प्रकाश योजना, नेप्यथ्य याच्या परीपूर्ण साथीने चमकले आहे.


प्राचीताईच्या आंतरजालावरच्या मैत्रीने मी या कार्यक्रमाच्या संगतीत आले. काल प्राचीताई आणि सर्व कलाकारांच्या या 'बेसरबिंदीने' ग्रेस यांच्या स्मरणाचे चांदणं मनभरून स्पर्शून आले.


हा कार्यक्रम अजिबात चुकवू नका.नक्की पहा!



-भक्ती



Friday, August 22, 2025

बैलपोळ्या निमित्ताने

 #बैलपोळा

#मातृदिन

#६४_योगिनी


आंतरजालावर bull  आणि bull with hump शोधा.दोन्ही चित्रे मिळतील .मग समजते कि बैलांच्या उत्क्रांतीमध्ये वातावरणाचा खूप मोठा भाग आहे. 





आज आपण पाहतो ते बैल, म्हणजे पाळीव गुरांची एक प्रजाती, ऑरॉक्स (Aurochs) नावाच्या एका जंगली प्राण्यापासून विकसित झाले आहेत. हा प्राणी आता नामशेष झाला आहे.झेबू हा भारतीय भागात आढणारा बैलाची विशिष्ट प्रजाती आहे.सुमारे 10,000 वर्षांपूर्वी, मध्य पूर्व (आताचे तुर्की) आणि भारतीय उपखंडात ऑरॉक्स (Bos primigenius) या मोठ्या, जंगली गुरांना पाळीव बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली.बर्फ़ाळ भागात याक या    

या प्रजातीने  प्राणवायू कमी असलेल्या भागात स्वतः:च्या   लाल  रक्तपेशी वाढवून मानवाला साथ दिली तर पाठीवर नांगर घेऊन झेबूच्या वंशांच्या भारतीय  शेतीला  साथ दिली. 


दोन मुख्य प्रजाती: या पाळीव बनवण्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे आजच्या आधुनिक गुरांच्या दोन प्रमुख प्रजाती उदयास आल्या:


#टॉरिन गुरांचे वंशज (Bos taurus): हे मध्य पूर्व आणि युरोपमध्ये विकसित झाले. या प्राण्यांना खांद्यावर कूबड (hump) नसते आणि त्यांचे कान सरळ असतात.

होल्स्टीन, जर्सी, अँगस, हेरफोर्ड इ. यांचा उगम युरोप, अमेरिका किंवा ऑस्ट्रेलियासारख्या थंड हवामानाच्या प्रदेशात झाला आहे.


#इंडिकाइन गुरांचे वंशज (Bos indicus): हे भारतीय उपखंडात (सिंधू खोऱ्याच्या आसपास) विकसित झाले. या प्राण्यांच्या खांद्यावर एक विशिष्ट कूबड असते आणि त्यांचे कान लोंबकळलेले असतात.  हे कूबड उष्णता सहन करण्यास आणि शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करते. याशिवाय, त्यांची सैलसर त्वचा आणि मोठे लोंबकळणारे कान उष्ण हवामानाशी जुळवून घेण्यासाठी उपयुक्त ठरतात.

भारतात आढळणारे बहुतेक बैल याच वंशाचे आहेत, ज्यांना आपण झेबू (Zebu) नावानेही ओळखतो.


#भारतीय_बैलांची_उत्क्रांती ही साधारणपणे ८,००० वर्षांपूर्वी सिंधू संस्कृतीच्या काळात सुरू झाली. हे बैल ऑरॉक्स (Bos primigenius) या जंगली गुरांच्या एका भारतीय उप-प्रजातीपासून विकसित झाले आहेत, ज्यांना भारतीय ऑरॉक्स (Bos primigenius namadicus) म्हणून ओळखले जाते.


बैलांच्या उत्क्रांतीचे प्रमुख टप्पे:

पाळीवकरण (Domestication): उत्खननात सापडलेल्या पुराव्यांनुसार, मेहरगढ (आताचे पाकिस्तान) आणि सिंधू खोऱ्याच्या आसपासच्या प्रदेशात मानवाने जंगली बैलांना पाळीव बनवण्यास सुरुवात केली. यामुळेच, भारतीय बैल हे त्यांच्या युरोपियन आणि आफ्रिकन नातेवाईकांपेक्षा वेगळे आहेत.


जनुकीय वेगळेपण: भारतीय बैल, ज्यांना झेबू (Bos indicus) म्हणून ओळखले जाते, त्यांच्यामध्ये त्यांच्या युरोपियन नातेवाईकांपेक्षा काही खास जनुकीय आणि शारीरिक वैशिष्ट्ये आहेत. यातील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या खांद्यावर असलेले कूबड (hump).


कृत्रिम निवड (Artificial Selection): मानवाने शेतीची कामे (नांगरणी, वाहतूक) आणि दुधासाठी उपयुक्त असलेल्या बैलांची निवड केली आणि त्यांची पैदास केली. यामुळे अनेक स्थानिक जाती (breeds) उदयास आल्या.


मानवी हस्तक्षेपामुळे झालेले बदल

मानवाने शेती आणि इतर कामांसाठी बैलांचा वापर सुरू केल्यावर, त्यांच्यामध्ये अनेक बदल घडवून आणले. याला कृत्रिम निवड (Artificial Selection) म्हणतात. माणसाने त्यांच्या गरजेनुसार शांत स्वभावाचे, मजबूत आणि अधिक काम करणाऱ्या बैलांची निवड केली आणि त्यांची पैदास केली. यामुळे जंगली ऑरॉक्सच्या तुलनेत आजच्या बैलांचे काही महत्त्वाचे बदल झाले:


आकार: पाळीव बैल त्यांच्या जंगली पूर्वजांपेक्षा लहान झाले.


स्वभाव: ते अधिक शांत आणि माणसाळलेले झाले, ज्यामुळे त्यांचा शेतीत वापर करणे सोपे झाले.


शारीरिक रचना: वेगवेगळ्या कामांसाठी (उदा. नांगरणी, वाहतूक) त्यांची शिंगे, कूबड आणि शरीर अधिक योग्य बनले.

#भारतीय_बैलांच्या_काही_प्रमुख_जाती:

खिलार: हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि मजबूत बैल आहेत, जे त्यांच्या वेग आणि सहनशीलतेसाठी ओळखले जातात.


कांकरेज: गुजरात आणि राजस्थानमध्ये आढळणारी ही जात दुहेरी कामासाठी (दूध आणि शेती) वापरली जाते.


गिर: गुजरातमध्ये आढळणारे हे बैल मुख्यतः दूध देणाऱ्या गावांसाठी प्रसिद्ध असले, तरी त्यांचे बैलही खूप शक्तिशाली असतात.


थारपारकर: राजस्थानमध्ये आढळणारी ही जात दुष्काळग्रस्त आणि उष्ण हवामानाला तोंड देण्यासाठी ओळखली जाते.



पिकासोचे evolution of bull हे चित्र


उत्क्रांतीचे पुरावे

बैलांची उत्क्रांती सिद्ध करण्यासाठी अनेक वैज्ञानिक पुरावे उपलब्ध आहेत.


पुराजीव विषयक पुरावे (Palaeontological evidences): लाखो वर्षांपूर्वीच्या ऑरॉक्स प्राण्यांचे सांगाडे आणि जीवाश्म सापडले आहेत, ज्यांचा अभ्यास करून त्यांचे आधुनिक बैलांशी असलेले साम्य सिद्ध होते.


बाह्यरूपीय पुरावे (Morphological evidences): आजच्या बैलांच्या हाडांची रचना (उदा. पायांची हाडे) आणि त्यांच्या जंगली पूर्वजांच्या हाडांची रचना यात खूप साम्य आढळते.


जनुकीय पुरावे (Genetic evidences): आधुनिक बैलांच्या डीएनएचा अभ्यास केल्यावर हे सिद्ध झाले आहे की त्यांचे जनुकीय स्वरूप ऑरॉक्सशी मिळतेजुळते आहे, ज्यामुळे ते एकाच पूर्वजाचे वंशज असल्याचे स्पष्ट होते.


थोडक्यात, बैलांची उत्क्रांती ही निसर्गाने घडवलेल्या नैसर्गिक निवडीचा आणि मानवाने केलेल्या कृत्रिम निवडीचा एक सुंदर संगम आहे, ज्यामुळे एक जंगली प्राणी माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला.


हा बैल पोळ्याचा एक महत्वाचा भाग परंतु आजच्या काळात अनेक वर्षांपासून हि पिठोरी अमावस्या #मातृदिन'  ओळखली जाते. स्त्रियांच्या रुपाला संतती देणारी म्हणून अधिक शक्तीरूपात पाहण्याच्या सिंधू संस्कृती नंतर खूप काळानंतर तंत्र सिद्धी या रूपात योग्य जाणणारी "योगिनी" स्त्री होत.



मीनानाथ यांच्याद्वारे या योगिनी कौलाची हि साधना प्रस्थापित करण्यात आली.माता ,बहीण ,पत्नी अशा उपासना विविध गुप्त पद्धतीच्या असत. आदिशक्तीपासून उत्पन्न ८ शक्तीच्या प्रत्येकी आठ रूपांची शक्ती मिळून ६४ योगिनी असाव्यात असे मानले जाते. शरीरातील ३२ धमन्यांमध्ये प्रत्येकी दोन योगिनीहि मानल्या जातात . 

ओरिसा ,भेडाघाट,मवाली,हिरापूर,राणीपुर,खजुराहो येथे हि मंदिर पाहता येतील. गोलाकार रचना असलेल्या मंदिरापासून भारताच्या गोलाकार संसदेची इमारत बनवली गेली. 



 ते सर्व ठीक आहे पण आधी पोटोबासाठी आज विशेष करून तांदळाची खीर,रव्याच्या साटोऱ्या केल्या ... तुमच्याकडे काय आहे मेन्यू ??



-भक्ती

लेखातील काही मजकूर AI माहितीस्रोतातील आहे.

Wednesday, August 13, 2025

#गीतारहस्य -प्रकरण८ विश्वाची उभारणी व संहारणी

 #गीतारहस्य 

#प्रकरण८ वे

( पान क्र. १०२-११८)

#विश्वाची_उभारणी_व_संहारणी


**विश्वाची उभारणी व संहारणी

सांख्याप्रमाणे प्रकृति व पुरुष या स्वतंत्र मूलतत्वांचे स्वरूप म्हणजे प्रकृति पुरुषासमोर आपल्या गुणाचा जो बाजार मांडते त्यास मराठी कवींनी 'संसृतीचा पिंगा' तर ज्ञानेश्वर महाराज यांनी 'प्रकृतीची टांकसाळ 'असे म्हटले आहे.


प्रकृतीच्या या व्यापारास समर्थांनी 'विश्वाची उभारणी व संहारणी' हे शब्द घेतले आहेत. भगवद्‌गीतेप्रमाणे प्रकृति आपला संसार चालविण्यास स्वतंत्र नसून ती हे काम परमेश्वराच्या इच्छेने चालवीत असते ,असे म्हटले आहे .( गी. ९.१०) परंतू कपिलांनी प्रकृति स्वतंत्र मानिली आहे. पुरुषाचा व तिचा संयोग झाला म्हणजे तिची टांकसाळे सुरू होते आणि प्रकृतीची मूळची साम्यावस्था मोडून तिच्या गुणांचा विस्तार होऊ लागतो असे सांख्यांचे म्हणणे आहे. उलटप‌क्षी वेदसंहितेत, उपनिषदांत स्मृती ग्रंथांत व प्रकृति मूळ न मानिता परब्रम्ह मूळ मानून त्यापासून 'हिरण्यगर्भ समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेकः आसीत् 'प्रथम हिरण्यगमे (ऋ१०.१२१.१) आणि या हिरण्यगर्भापासून किंवा सत्यापासून सर्व सृष्टि झाली (ऋ. १०.७२, १०.१९०) किंवा प्रथम पाणी उत्पन्न होऊन  ऋ. १०.८२.६ ( त्यापासून सृष्टि त्यांत ब्रम्हदेव, ब्रम्ह‌देवापासून सर्व जग किंवा तोच ब्रम्हदेव अर्ध्या भागाने स्त्री झाला होता. अगर पाणी उत्पन्न होण्यापूर्वी पुरुष होता (कठ ४.६.) अगर ब्रम्हा-पासून प्रथम तेज, पाणी, व पृथ्वी (अन्न) ही तीनच तत्वे होऊन टंग मिश्रणाने पदार्थ झाले.


तथापि आत्मरूपी मूळ ब्रम्हापासूनच आकाशादिक्रमाने पंचमहाभूते निघाली (तै.उ. २.१.) हे अबेर वेदांतसूत्रात ठरविले.

वेदान्ती प्रकृति स्वतंत्र मानीत नसले तरी एकदा शु‌द्ध ब्रम्हातच मायात्मक प्रकृति, हा विकार दिसू लागल्यावर पुढील सृष्ट्युत्पत्तिक्रमासंबंधाने त्यांची आणि सांख्यांची अखेर एकवाक्यता झालेली होती, हे यावरून दिसून येते.


#सृष्ट्युत्पत्तिक्रमाची जुळणी


१.प्रकृतीची कळी उमलण्याच्या क्रमाबद्‌दल #गुणोत्कर्ष किंवा 'गुणपरिणामवाद' असे म्हणतात.


२.अव्यक्त प्रकृतीदेखील स्वतःची साम्यावस्था मोडून पुढे व्यक्त सृष्टि निर्माण करणाऱ्याचा निश्चय करीत असते, निश्चय म्हणजेच व्यवसाय, व तो करणे हे बुद्‌धीचे लक्षण आहे. म्हणून प्रकृतीत #व्यवसायत्मिक बु‌द्धी हा गुण प्रथम उत्पन्न होतो, असे सांख्यांनी ठरविले आहे.


३.मनुष्याला एखादे कृत्य करण्याची बु‌द्धी प्रथम होते, त्याचप्रमाणे प्रकृतिलाही आपला पसारा करण्याची बु‌द्धी प्रथम व्हावी लागते. या गुणास पाहिजे तर अचेतन / अस्वयंवेद्य म्हणजे स्वतः स न कळणारी बुद्‌धी म्हणा. (आधिभौतिक उदा. गुरुत्वाकर्षण / लोहचुंबकाचे आकर्षण).


४ प्रकृतित उत्पन्न होणारा बुद्‌धी हा गुण, सत्व, रज आणि तम या मिश्रणाचा असला तरी, त्यातील प्रत्येकाचे प्रमाण अनंत रीतींनीं भिन्न होत असल्यामुळे, या तिघांच्या प्रत्येकी अनंत भिन्न प्रमाणांनी झालेले बु‌द्धीचे प्रकारहि त्रिघात अनंत होऊ शकतात. हे सर्व इंद्रियगोचर असल्यान व्यक्त तत्त्व मानले जातात.


५.पण प्रकृति अजूनही एकजिनसी असते, तो मोडून बहूजिनसीपणा उत्पन्न होतो, यासच 'पृथकत्व म्हणतात

६.बुद्धीपासून पुढे उत्पन्न होणाऱ्या अन् पृथकपणाच्या या गुणासच #अहंकार' म्हणतात. कारण, पृथक् पणा 'मी-तूं' या शब्दांनीच प्रथम व्यक्त करण्यांत येत होता. म्हणजेच अहं-कार-अहं- अहं [मी-मी] करणे होय.

मूळ प्रकृतीत अहंकाराने भिन्न भिन्न पदार्थ बनण्याची शक्ति याप्रमाणे आल्यावर पुढील वाढीच्या दोन शाखा होतात.


१ झाडे, मनुष्य वगैरे #सेंद्रिय प्राण्यांची सृष्टि

२.#निरिंद्रिय पदार्थांची सृष्टि


** इंद्रिय याचा अर्थ इंद्रियवान प्राण्यांच्या इंद्रियांच्या शक्ती

 #सेंद्रिय प्राण्यांचा जड देह होतो. म्हणून फक्त इंद्रियांचा देहाचा समावेश जड म्हणजे निरिंद्रय सृष्टींत सांख्यांत सेंद्रिय सृष्टी म्हणजे देह विचार केला आहे. व आत्मा सोडून फक्त इंद्रियांचा विचार केला आहे.


अहंकार (एकूण १६ गुणोत्कर्ष)


#सत्त्वगुणोत्कर्ष

पाच इंद्रिये

पाच कर्मेंद्रिये व मन

(एकूण अकरा इंद्रिये)

#तमोगुणोत्कर्ष

निरिंद्रिय सृष्टी

पाच तन्मात्रद्रव्ये


९ तन्मात्रे - शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यांची जिस तन्मात्रे, मिसळ न होता प्रत्येक गुणाची निरनिराळी अतिसूक्ष्म मूलस्वरुपे ही निरिंद्रिय सृष्टीची मूलतत्वे आहेत.

१०.या पंचतन्मात्रद्रव्यांपासून क्रमाक्रमाने स्थूल पंचमहाभूतें (यांस 'विशेष' असेहि नांव आहे) व स्थूल निरिंद्रिय पदार्थ होऊ लागतात, या पदार्थांचा यथासंभव अकरा सूक्ष्म इंद्रियांशी संयोग होऊन सेंद्रिय सृष्टि बनले, असे सांख्यांनी ठरविले आहे.


#स्थूलपंचमहाभूते व #पुरुष धरून याप्रमाणे एकंदर २५ तत्त्वे होतात. हे मूल प्रकृतिचेच विकार होत

त्यांतही विकार सूक्ष्मतन्मात्र व पाच स्थूल महाभूते हे द्रव्यात्मक असून बुद्धि, अहंकार गुण आहेत, ही असा भेद आहे. तेवीस व इंद्रिये या केवळ शक्ति किंवा तत्त्वे व्यक्त तर मूळ प्रकृति अव्यक्त


#ब्रम्हवृक्ष किंवा ब्रम्हवन [ ममा. अश्व ३५. २०-२३ व ४७.१२-१५] पान. नं १०८-१०९.

माह (मा, अश्व. २५. २०-२३ व ४७. १२-१५), 

अव्यक्तबीजप्रभवो बुद्धिस्कन्धमयो महान् ।

महाहंकारविटपः इन्द्रियान्तरकोटरः ।।

महाभूतविशाखश्च विशेषप्रतिशाखवान् ।


सदापर्णः सदापुष्पः शुभाशुभफलोदयः ।।


आजीव्यः सर्वभूतानां ब्रह्मवृक्षः सनातनः ।


एनं छित्वा च भित्त्वा च तत्त्वज्ञानासिना बुधः ।।


हित्त्वा सङ्गमयान् पाशान् मृत्युजन्मजरोदयान् ।


निर्ममो निरहंकारो मुच्यते नात्र संशयः ।।



"अव्यक्त (प्रकृति) हें ज्याचें बीं, बुद्धि (महान्) हें ज्याचें खोड, अहंकार हा ज्याचा मुख्य पल्लव, मन व दहा इंद्रियें हीं ज्याच्या आंतल्या ढोल्या, (सूक्ष्म) महाभूतें (पंचतन्मात्रे) या ज्याच्या मोठ्या शाखा, आणि विशेष म्हणजे स्थूल महाभूतें या ज्याच्या आडशाखा किंवा डहाळ्या, असा हा नेहमीं पानें, फुलें व शुभाशुभ फळें धारण करणारा, सर्व प्राणिमात्रांना

आधारभूत, पुरातन मोठा ब्रह्मवृक्ष आहे. याला तत्त्वज्ञानरूप तरवारीनें छेदून व त्याचे तुकडे तुकडे करून ज्ञानी पुरुषानें जन्म, जरा व मृत्यु उत्पन्न करणारे संगमय पाश तोडावे, आणि ममत्वबुद्धि व अहंकार यांचा त्याग करावा, म्हणजे तो निःसंशय मुक्त होतो." सारांश, हा ब्रह्मवृक्ष म्हणजेच 'संसृतीचा पिंगा' किंवा प्रकृतीचा अगर मायेचा 'पसारा' होय. याला 'वृक्ष' म्हणण्याची वहिवाट फार प्राचीन म्हणजे ऋग्वेदापर्यंत पोंचलेली असून, उपनिषदांतून यासच 'सनातन अश्वत्थवृक्ष असें म्हटलें आहे (कठ. ६. १). परंतु तेथे म्हणजे वेदांत या वृक्षाचे मूळ (परब्रह्म) वर आणि शाखा (दृश्यसृष्टीचा पसारा) खालीं एवढेच वर्णन केलेलें असतें. हैं वैदिक वर्णन आणि सांख्यांचीं तत्त्वें यांची जोड घालून गीतेंतील अश्वत्थवृक्षाचे वर्णन बनविलें आहे. हैं गीता १५.१ व २ या श्लोकांवरील आमच्या टीकेंत स्पष्ट करून दाखविलें आहे.


वर वृक्षरूपानें दिलेल्या पंचवीस तत्त्वांचेंच सांख्य आणि वेदान्ती निरनिराळ्या प्रकारें वर्गीकरण करीत असल्यामुळे, या वर्गीकरणाबद्दलचीहि थोडी माहिती येथें सांगितली पाहिजे. सांख्य असें म्हणतात कीं, या पंचवीस तत्त्वांचे मूलप्रकृति, प्रकृतिविकृति, विकृति आणि न-प्रकृति-न-विकृति, असे चार वर्ग होतात. (१) प्रकृतितत्त्व दुसऱ्या कोणापासून झालेलें नाहीं म्हणून त्यास मूलप्रकृति हैं नांव प्राप्त होतें. (२) ही मूलप्रकृति सोडून दुसऱ्या पायरीवर आलें म्हणजे महान् हें तत्त्व लागतें. महान् प्रकृतीपासून निघाला म्हणून तो 'प्रकृतीची विकृति किंवा विकार' आहे; व पुढें अहंकार या महान् तत्त्वापासून निघाला म्हणून महान् या अहंकाराचें प्रकृति किंवा मूळ आहे. एतावता महान् किंवा बुद्धि हा गुण एका बाजूनें अहंकाराची प्रकृति किंवा मूळ होतो; आणि दुसऱ्या बाजूनें मूळ प्रकृतीची विकृति म्हणजे विकार होतो. म्हणून सांख्यांनीं त्यास 'प्रकृति-विकृति' या वर्गात घातले आहे; व याच न्यायानें अहंकार व पंचतन्मात्रे यांचा समावेशहि 'प्रकृति-विकृति' या वर्गांतच करण्यांत येतो. जें तत्त्व अगर गुण स्वतः दुसऱ्यापासून निघालेलें (विकृति) असून पुढे आपणच दुसऱ्या तत्त्वांचें मूलभूत (प्रकृति) होतें त्यास 'प्रकृति-विकृति' असें म्हणतात. महान्, अहंकार व पंचतन्मात्रे हीं सात तत्त्वें अशा प्रकारचीं आहेत. (३) पण पांच ज्ञानेंद्रियें, पांच कर्मेंद्रियें, मन आणि स्थूल पंचमहाभूतें या सोळा तत्त्वांपासून पुढे दुसरी कोणतींहि तत्त्वें निघालेलीं नाहींत. उलट तींच दुसऱ्यापासून निघालीं आहेत. म्हणून या सोळा तत्त्वांस 'प्रकृति-विकृति' असें न म्हणतां नुसतें 'विकृति' किंवा 'विकार' असें म्हणतात. (४) पुरुष प्रकृति नाहीं व विकृतीहि नाहीं, तो स्वतंत्र व उदासीन द्रष्टा आहे.


११.मूलप्रकृतिरविकृतिः महादादयाः प्रकृतिविकृतयः सप्त । षोडषकस्तु विकारो न प्रकृतिर्न विकृतिः पुरुषः ।।

" मूळ प्रकृति ही अविकृति म्हणजे कशाचाच विकार नाही. महदादि साल, महत्, अहंकार व पंचतन्मात्र या प्रकृति विकृति होत. आणि मनासकट अकरा इंद्रिये व स्थूल पंचमहाभूतें मिळून सोळा तत्त्वांस नुसत्या विकृति किंवा विकार असे म्हणतात. पुरुष प्रकृति नाही आणि विकृति नाही. (सां.का.३)


१२.पण वेदांतशास्त्रात प्रकृति स्वतंत्र न मानता परमेश्वरापासून पुरुष व प्रकृति निर्माण होतात हा सि‌द्धांत आहे. त्यामुळे प्रकृति- विकृती या सांख्यभेद शिल्लक राहत नाही. ती परमेश्वरापासून उत्पन्न झाली असून ती प्रकृति-विकृतिच्या वर्गात येते.

वर्गात येते


१३.एका बाजूस जीव व दुसऱ्या बाजूस ८ प्रकारची प्रकृति निर्माण झाली. म्हणजे वेदान्त्यांनुसार पंचवीस तत्त्वापैकी सोळा तत्त्वे सोडून देऊन बाकी राहिलेल्या नऊ तत्त्वांचे जीव' व "अष्धा प्रकृति' हे दोनच प्रकार आहेत.


१४.गीतेत पुरुष' याला जीव म्हटले आहे, जी ईश्वराची 'परा प्रकृति - श्रेष्ठ रुप' आहे तर मूळप्रकृति गीतेत 'अपर' म्हणजे कनिष्ठ स्वरूप मानली जाते. (गी. ७.४५.)


# पंचीकरण - पाच महाभूतांपैकी प्रत्येकाचा कमीजास्त भाग घेऊन त्या सर्वांच्या मिश्रणाने नवा पदार्थ तयार होणे.


# पंचमहाभूते यांच्या उत्पत्तीचा क्रम तैतिरीयोपनिषदांत असा दिला आहे.


"आत्मनः आकाशः संमूतः । आकाशाद्वायुः । वायोरग्नि। अग्नेरापः ।


अद्‌भ्यः पृखिवी । पृथिव्या ओषधयः । इ"


आणि पंचमहाभूत निर्माण झाल्यानंतर.


'पृथिव्या ओषधयः । ओषधीभ्योऽन्नम् । अन्नात्पुरुषः"


१५.परंतू श्वेताश्वतरोपनिषद, छांदोग्योपनिषादांत पंचतत्त्वां ऐवजी तेज, आप व अन्न (पृथ्वी) ही तीनच मूलतत्वे त्रिवृत्कारणाने सृष्टी निर्माण झाली असे कोन आहे.


परंतू तैत्तरीय (२.१), प्रश्न (४.८), बृहदारण्यक ८४.४.५ वगैरे दुसया उपनिषदांतून, श्वेताश्वेतर (२०१२) वेदांत सूत्रर (२.३१-४) व शेवटी गीता (७.४, १३.५) यातही तिहींत ऐवजी पाच महाभूते सांगितली आहेत. गर्भोपिनिषदांत 'पंचात्मक' आहे असे आरंभीच म्हटले आहे.


#सचेतन तत्व-#पुरुष'


१..मूळ प्रकृतीपासून निघालेल्या पृथिव्यादि स्थूल पंचमहाभूतांम सूक्ष्म इंद्रियांशी संयोग झाला म्हणजे शरीर तयार होते पण ते सेंद्रिय तरीही जडच असते. या इंद्रियांना प्रेरणा करणारे तत्त्व जड प्रकृतिहून निराळे असून त्यास पुरुष म्हणतात.


२.हा पुरुष अकर्ता असून त्याचा प्रकृतीशी संयोग झाला म्हणजे सजीव सृष्टीस सुरुवात होते, व 'मी निराळा व प्रकृति निराळी हे ज्ञान झाल्यावर पुरुषाचा प्रकृतिशी झालेला संयोग लुटून तो मुक्त होतो.


#ज्ञानाखेरीज जो मनुष्य मरतो त्याच्या आत्मा प्रकृतीच्या चक्रांतून अजीबात सुटत नाही हे उघड आहे."


म्हणजेच ज्ञान नसतो प्राणी मेला तर मरतेवेळी त्याच्या आत्म्याबरोबर प्रकृतीच्या १८ तत्त्वांचे हे लिंगशरीर पंचमहाभूततत्त्वे) देहातून बाहेर पडते आणि ज्ञानप्राप्ती होईपर्यंत त्या पुरुषास नवे नवे जन्म घेण्यास लावीत असते.

(पान ११४)

३.पंचमहाभूते संपल्यावर इतर १३ तत्त्वे पंचतन्मात्रांसह राहते. पुढे वेदांतात कर्माकर्मानुसार तर सांख्यात सत्त्व, रज, तम गुणानुसार या लिंगशरीराला निवृत्ती अथवा देवयोनी (सत्व अधि मनुष्ययोनी (रज अधिक) तिर्थक्‌योनी (तमगुण अधिक] येथे जन्म प्राप्त होतो.


#संहार 

सांख्यशास्त्रानुसार मूळ अव्यक्त प्रकृतीपासून किंवा वेदांतानुसार मूळ सद्रूपी परब्रम्हापासून सृष्टीतील सर्व सजीव व निर्जीव व्यक्त पदार्थ क्रमाक्रमाने निर्माण झाल्यावर सृष्टीच्या संहाराची वेळ आली म्हणजे उभारणीचा वर जी गुणपरिणामक्रम सांगितला त्याच्या उलट क्रमाने सर्व व्यक्त पदार्थ अव्यक्त प्रकृतीत किंवा मून ब्रम्हांत लय पावतात असा सांख्य व वेदांत या दोन्हीं शास्त्रांचा सिद्‌धांत आहे.


पुढे श्रुतिस्मृतिपुराणांत ब्रम्हदेवांपासून / हिरण्य गर्भापासून / शैव / वैष्णव निमित्तकारणापासून सृष्टी कशी निर्माण झाली हे वर्णिले आहे.


भगवद्‌गीतेंतहि "मम योनिमहत ब्रम्ह" (गी. १४.३)असे त्रिगुणात्मक प्रकृतीलाच ब्रम्ह नाव देऊन या बीजापासून प्रकृतीच्या त्रिगुणाने अनेक मूर्ति झाल्या हे सांगितले.


तर (गी.१.६) मध्ये ब्रम्हदेवापासून सात मानसपुत्रांची उत्पत्ती व पुढे चराचर सृष्टी निर्मिती झाली आहे.


परंतू भागवतातील  संकर्षण, प्रद्युमन्न, अनिरुद्‌ध यांचा सृष्टीरचनेचा उल्लेख गीतेत कोठेही नाही. हा भागवत आणि गीता भेद पुन्हा दर्शित करतो.

-लोकमान्य टिळक 

Tuesday, July 29, 2025

नागपंचमी निमित्ताने


नाग,साप हे सरपटणाऱ्या प्राण्यांप्रमाणे Reptilia क्लासमध्ये जरी येत असले तरी पाण्यात पोहण्याची,श्वास घेण्याची,पाण्यातही अंडे देण्याची क्षमता amphibians प्रमाणे आहे.


उत्क्रांतीमध्ये survival of the fittest असं डार्विनने सांगितले आहेच.पण याबाबत जनुकीय माहिती मिळवणं खुपच रोमांचित असते.

या सापाने जगण्याच्या लढाईत काय केले मग? सर्वांनाच ठाऊक आहे "विष" या हत्याराचा साप मोठा स्वामी आहे, ज्यामुळेच आपण याला खुप घाबरतो.

या विष ग्रंथी सापाला जनुकीय बदलांमुळे मिळाल्या.मानवाच्या तोंडांत लाळ अन्न पचवण्यासाठी लाळ स्त्रवते, पण सापाच्या तोंडांत विष स्त्रवणारी ग्रंथी जनुकीय उत्क्रांतीची,Gene duplication ची भेट ठरवली.





जर आपल्याकडे एकाच युनिफॉर्मचे दोन जोड असेल तर आपण बिनधास्त राहतो.तसेच सापाकडे एकाच जनुकाचे चक्क दोन जोड(set) जीन‌ डुप्लीकेशनने तयार होतात.आता या जास्तीच्या जीन सेटपासून मग अमृत बनवावे ना,तर नाही साप भावाने विष बनवलं 😀 जितकं जहाल विष तो या उत्क्रांतीच्या काळात बनवत गेला तितकं जास्त त्याचा वंश या survival of the fittest या घमासानात पुढे जायची शक्यता वाढली.

तर होत काय ..

जिथे सुरुवातीला इतर शारीरिक कार्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रथिनांना विषाच्या घटकांमध्ये रूपांतरित केले गेले. यामध्ये लाळ, स्वादुपिंड आणि अगदी रोगप्रतिकारक प्रथिने यासारख्या विविध स्त्रोतांमधून जनुकांची भरती समाविष्ट होती. या भरती केलेल्या जनुकांमध्ये नंतर उत्परिवर्तन झाले आणि ते विष ग्रंथींमध्ये व्यक्त झाले, शिकारवर विशिष्ट परिणाम करणारे विविध विषांमध्ये विकसित झाले.

बरंय माणसात Gene duplication नाही,नाहीतर सगळीकडे विषकन्या,विषकुमार दिसले असते😀तर मग उंदिर,ससा तर मोठा प्राणी खात साप मस्त जगत होता.

मग माणसाची उत्क्रांतीही होत होती ना..

माणसाला या सर्पदंशाचे परिणाम समजले. शक्तीशाली जीवाला पूजण्याचे,श्रद्धास्थान करण्याचे मानवाची विचारशक्ती पोहचली होती.अनेक जुन्या संस्कृतीपासून सिंधू संस्कृती पर्यंत सर्प चिन्ह सापडल्याची नोंद आहे.मिनोअन संस्कृती ईसापूर्वची दोन्ही हातात साप पकडलेली मूर्ती सापडली आहे.



या हजारोंवर्षांपुर्वीच्या संस्कृतीत प्रजनन हे मुख्य सूत्र मानले जाई.त्यानुसार श्रद्धा विकसित होत.

सापाच्या शरीररचनेमुळे तो पुरुष प्रजनानचे रूप मानले गेले.भूमीवरील सापाचे वारूळ हे योनीरूप मानले गेले.वारूळ-स्थ नाग हा पुरुषत्तत्त्वाचा म्हणजे क्षेत्रपाळाचा प्रतिनिधी मानला गेला वारूळ हे भूमीच्या योनीचे प्रतीक आहे,हे संशोधन रा.चिं.ढेरे यांनी नोंदविले आहे.



पुढे अमूर्त श्रद्धांनी मूर्त घेतल्यावर याची मूर्ती रूपात पुजा होत गेली.लज्जा गौरी हे अनावृत्त शिल्प स्त्री प्रजनन शक्ती रूप दाखविताना तिच्या हातात पुरुषतत्व सर्प अंकन दिसते.


वैदिक काळात नागाचे स्तुती श्लोक आहेत.

पुराणात तर समुद्रमंथन,शेषनाग असा बलाढ्य नाग दाखवला गेला.

पुढे शेती संस्कृती बहरत गेली.उंदिरांना खाणाऱ्या सापाचा माणूस कृतज्ञ तर होताच पण शेतात काम करताना दंश नको म्हणून सापाला,वारूळाला पूजा होत राहिली.

पण त्यात लाह्या दुधाची अंधश्रद्धा कधी आली कोणास ठाऊक?

बरं मग आज पंचमीला ते पुरणाचे उकडलेले दिंड करायचं असतात हे माझ्या सारख्या सुगरणींना काम असतें.



-भक्ती

Monday, July 21, 2025

हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ -पुस्तक परिचय

गेला महिनाभर खंडेरावाच्या घराचे आम्ही सदस्य होतो.खाणदेशातले मोरगाव आमचच गाव होत.

हिंदू जगणयाची समृद्ध अडगळ ही भालचंद्र नेमाडे यांची ज्ञानपीठ मिळवलेली प्रसिद्ध कादंबरी पूर्ण (३६ तास ) ऐकली . तर ६०३ पानांची छापील कादंबरी आहे . 



मागे केलेल्या चर्चनुसार अनेकांना हि कादंबरी १००-२०० पानानानंतरच रटाळ वा वाचावी अशी वाटली नाही. मी छापील पुस्तक वाचायला घेतले असता माझीही तीच अवस्था झाली असती कारण कादंबरीच्या शीर्षकामुळे माझ्यासारखे अनेक वाचक याकडे आकृष्ट झाले आहेत यात मुळीच   दुमत नाही. परंतु शीर्षकानुसार हि कादंबरी पहिल्या भागात  अजिबात  मनाला भिडत नाही. मग शीर्षकाचे ओझे व आपल्या अपेक्षा बाजूला सारत ,खंडेराव याची कहाणी म्हणून वाचताना कादंबरीची मुळे समजायला लागतात . 

कादंबरीच्या सुरुवातीला भारत -पाकिस्तान सिंधू संस्कृती यांच्या पासून सुरुवात होते.स्वातंत्र्याचा लढा त्याचा अर्थ यांची संक्षिप्त विविध कथांद्वारे उहापोह दिसते. नंतर खंडेरावच्या आयुष्यात आई वडील,भाऊ,बहिणी ,आत्या ,काकू .काका यांच्या प्रत्येकाच्या आयुष्याचा तुकडा कादंबरीत त्याच्या लाहानपणासून ते शिक्षणाच्या विविध टप्प्यांपर्यंत जोडला जातो. तसेच ग्रामीण जीवनातील आजूबाजूचे विविध जातीपातीतील लोकांचे जीवन त्यातील दु:ख आनंदाचे प्रसंगही  त्याचा आयुष्याशी जोडून एक रंगेबेरंगी उबदार गोधडीच तयार होते.पण असे हे ग्रामीण जीवन ,रोजच्या जीवनातील प्रसंग कधीच उजेडात आले नाही .केवळ अभिजात संशोधन कथाच  प्रकाशित होतात .आणि मग अशा अनेक ग्रामीण कथा एक अडगळ होतात पण त्याही समृद्ध आहेतच ना म्हणून या हिंदू भूमीवरच्या ही जगण्याची समृद्ध अडगळ आहे असे वाटून गेले 

असा खंडेराव ग्रामीण भागातून शिक्षणासाठी ,संशोधनासाठी शहरात गेल्यावर ग्रामीण मुळांपासून दूर होत जात असतानाच वडिलांच्या अखेरच्या काळात त्याला एकाच मुलगा या नात्याने पुन्हा मागे फिरावे लागतेच ,तेव्हा पुन्हा  एकदा जगण्याच्या बदलेल्या व्याख्या अनेक छोट्या छोट्या संभाषणातून रेखाटल्या आहेत. 

या कादंबरीची अस्सल ग्रामीण कथा साहित्याच्या दृष्टीने नक्कीच वाहवा करायला पाहिजे.अशा खिळवून ठेवणाऱ्या खुसखुशीत पद्धतीने कथा समोर रेखाटल्या आहेत. कादंबरीच्या शेवटी घरात  खंडेराव एकटाच पुरुष ,तेव्हाही आणि संपूर्ण कादंबरीतही बाईचे सोशिक जीवन ,गौण स्थान याविषयी अनेकदा स्पष्टपणे नावड दाखवलीच आहे ,हि अजून एक जमेची बाजू वाटते. 

कांदबरीत शिव्यांची लाखोटी भरभरून आहे.आपण तरीही कादंबरीचा गाभा दूषित न करता वेगच वाढवतात . 

खूप दिवसांनी ग्रामीण जीवनावरची काठावरची कादंबरी न वाटता खोल डोहात नेणारी कादंबरी वाचाल्याची करमणूक नक्कीच झाली." वंशवृक्षाच्या पारंब्या " हा कादंबरीचा पुढचा भाग असणार आहे व तसेच हि कादंबरी एकूण चार भागांची असणार आहे असे वाचनात आले आहे. 

-भक्ती

Wednesday, July 16, 2025

निसर्गायण-पुस्तक परिचय

 निसर्गायण

#लेखक #दिलीपकुलकर्णी.



जडवादी, भोगवादी वृत्ती आधुनिक तंत्रज्ञानात अधिक इच्छांनी वखवखलेल्या माणसाला विनाशाकडे घेऊन चालली आहे.

हे सर्व घडतांना बाह्य निसर्गाची तो अपरिमित हानी करत आहेच. परंतू स्वतःच्या अंतर्बाह्य निसर्गचक्राचीही तो हानी करत आहे. निसर्ग हा संतुलनासाठी सतत चक्रात काम करतो. आधुनिक माणसाला तंत्रज्ञानाचा जिनी प्राप्त झाला, आणि तो हे चक्र सोडून एकरेषीय असंतुलित, विषमतापूर्ण प्रगतीला भुलला आहे. या सगळ्यांवर मात करत संतुलन प्राप्त करण्यासाठी  स्वतःच्या मनोवृत्तीवर काम करायला पाहिजे.

पुस्तकाच्या पहिल्या भागात मनोवृत्ती  स्थिर करणाऱ्या विविध पाश्चात्य आणि भारतीय वैचारिक पद्‌धतींचा उहापोह केला आहे. निसर्गाला जाणून तद् रुप त्यासह एकात्म स्थापन करायला हवे. वस्तुनिष्ठता ते व्यक्तीसापेक्षता याचा विचार केला आहे. निसर्गाशी आनंदाचे नवं नात कसं स्थापन करायचे हे सांगितले आहे. दुसऱ्या भागात अन्न, आरोग्य ऊर्जा या प्राथमिक गरजा  पूर्ण  करताना शस्त्रस्पर्धा,व्यसने,शोषण इत्यादी विकृतीकडे न झुकता सुसंस्कृत होण्याची मानवी  नैसर्गिक उर्मी कशी असते ,जपावी कशी हे  सांगितले आहे.


***

हे पुस्तक वाचताना असेच एक चिंतन सुचले..


वस्तुनिष्ठ विचारांपासून, चालीरीती, परंपरा, उपाय योजना, उपचार यापासून आज व्यक्तीनिष्ठ व्यक्ती सापेक्ष पद्‌धतीचा सर्वत्र वापर होत आहे. अगदी  न्यूटनचा नियमांनाही वस्तुनिष्ठ आईनस्टाईनच्या सापेक्षवादी नियम/थेअरीने मोडीत काढले. उपचार पद्‌धतीत तर आमुलाग्र बदल होत आहे.आता customized diagnosis report आधी अभ्यासले जातात. अगदी थेट DNA based profile वापरून nutriogenomic DNA based customized diet ही दिले जाते. माणसाच्या मनातल्या विचारांची सुसुत्र‌ता आधी केवळ छापील मोजक्यांचीच होती. आता म्हणजे गेल्या १५ वर्षापासून ती स्वतंत्रपणे प्रत्येकाने मांडायची सोय सोशल मिडियाने केली .आता AI तर वैयक्तिक सल्लागाराप्रमाणे सतत व्यक्तीबरोबर आहे.तेही चकटफू!! वर्गात शिकवलेले समजत नाही तर पसर्नल क्लासेसही आहेतच. customized कपडे,दागिने, घर सजावट सारे काही आहेच. यातून फक्त काही ठिकाणी गोंधळ कमी होण्याऐवजी तो वाढल्याचे दिसते.जसे सोशल ‌मिडियावर या व्यक्ती निष्ठतेने बिभत्सरूप अतातायी विचार, व्हिडिओ, भाषण, हिंसक प्रचार रूपात दिसतो. customized वस्तूंच्या नावाखाली प्रचंड लूट व्यक्तींची होत आहेच.


खरं पाहता व्यक्तीनिष्ठता ही देगणी गोंधळ (Universal randomness) न वाढवता काही एकात्मिक पुन्हा  घडवण्यासाठी हवा. जसा योग्य custemized diet, उपचारांनी व्यक्ती मग समाज आरोग्यदायी होईल. customized वस्तू बनवण्यासाठी स्वतःच्या सृजनाचा वापर करून मार्केटचा बळी न होता, योग्य माफक दृष्टिकोन हवा.

-शिक्षण‌क्षेत्रात प्रत्येक मुलाला मदत करण्याची वृत्ती' भविष्य या लहान मुलांचे आयुष्य आणि आपले भविष्य सुंदर करेल.एकमेका साहाय्य करु असे धोरण घेत नैतिकता पाळून प्रत्येक गोष्टीचा वापर हवा. AIचा वापर वैश्विक ज्ञानाच्या साहाय्यानेज्ञानी होण्यास व्हायला हवा.


या सगळ्या वस्तुनिष्ठ कडून व्यक्तीनिष्ठते कडून -- एकात्मिता धोरण --वैश्विक  सुजाणता येण्यासाठी भोगवादी, ओरबडण्याची (ग्राहक-मालक दोन्ही दृष्टीने) संपुष्टात यायला हवी.

-भक्ती