Monday, December 29, 2025

पर्व--लेखक डॉ. एस. एल. भैरप्पा

 पर्व



मूळ कन्नडमध्ये १९७९ साली प्रकाशित झालेली दिग्गज लेखक डॉ. एस. एल. भैरप्पा यांची महाकादंबरी 'पर्व' एक मैलाचा दगड आहे.उमा कुलकर्णी यांनी ती मराठीत भाषांतरीत केली आहे. 

व्यासरचित महाभारत वाचायची इच्छा असणाऱ्यांना, परंतु इतका मोठा ग्रंथ आतापर्यंत शक्य नसल्याची जाणीव असते. अशा वेळी 'पर्व' वाचून त्याची छोटी, प्रभावी आणि वास्तववादी वाचण्याची तहान काहीशी शमली जाते. 

आताच्या पिढीतील वाचकांसाठी खास सुंदरता म्हणजे अमानवी संकल्पना ,चमत्कार दूर करून महाभारतातील पात्रांच्या मनोव्यापाराचे वास्तववादी चित्रण करणारी ही कादंबरी आहे.भैरप्पा यांनी कादंबरी लिहिताना अनेक वर्षे संशोधन केले. त्यांनी महाभारतात वर्णन केलेल्या स्थळांना – द्वारका, राजगृह, लोथल, कुरुक्षेत्र इ. ठिकाणांना भेट दिली होती. असं वाचनात आलं की हिमालयातील गढवाल प्रदेशात बहुपतित्व प्रथा आजही आहे, ती द्रौपदीच्या काळापासून चालू असल्याचे संशोधन त्यांना प्रेरणा देऊन गेले. कादंबरीत सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी अतिशय विश्वसनीय वास्तववादी वाटते.


सुरुवात मद्रदेशातील राजघराण्यांतीळ पात्रांच्या युद्धासंबंधी संवादातून होते.हळूहळू कथा पांडवांच्या जन्माकडे कथा सरकते. इथला भाग पर्यंतचा 'देवसाहाय्याने पांडव जन्म' हे मिथक याचा उलगडा ,त्यांच्या नियोग जन्मरहस्याने होतो. उत्तरेकडील भारतात राहणाऱ्या हिमालयातील तत्कालीन लोकांना 'देव' संबोधले गेले आहे .तसेच राक्षस, नागयांनादेखील कादंबरीत लोकगण म्हणून वर्णन केले आहे. आपल्याला टीव्हीवरच्या महाभारताने खूप काळ भ्रमात ठेवले असं समजते :)

आतापर्यंत द्रौपदी, कर्ण, अर्जुन हे विविध लेखकांनी स्वतंत्रपणे मांडले आहेत. पण 'पर्व' कादंबरीत अनेक नावीन्यपूर्व तत्वचिंतनाने पात्रांची ओळख होते. भीम बलवान नायक तर दिसलाच, पण तो एक संवेदनशील, द्रौपदीसाठी जीव ओवाळणारा, प्रेम आणि कर्तव्य यात अडकलेला, हिडिंबा व घटोत्कचाबद्दल अपराधी भावनेने ग्रासलेला 'माणूस' म्हणून दिसला.

"मी हिडिंबेला वनात सोडून आलो, तिच्या मुलाला युद्धात बलिदान दिले. मी पांडवांचा भाऊ म्हणून जगलो, पण पती आणि वडील म्हणून अपयशी ठरलो."



'पर्व' मधील सर्वात व्यावहारिक आणि राजकीय-बुद्धिमान पात्र मला 'कुंती' वाटली. पण ती दृष्ट्या गांधारीपेक्षा वेगळी. आधी आपल्याला मूल हवं, ज्येष्ठत्व हवं यासाठी ती पांडूच्या नियोगाचा वापर करायचे ठरवते. याआधीच तिने कर्णाचा जन्म, त्याग गुप्त ठेवीत सामाजिक स्थितीचे रक्षण केले असते.

नंतरही पांडवांना नेहमी वास्तवाची जाणीव करून देते आणि त्यांना नैतिक अधःपतनापासून वाचवते. ती पांडवांना कधीही दासींबरोबर संबंधांना नकार द्यायला सांगते. भीम हिडिंबा व मुलात अडकलेला दिसताच ती लवकरच भीमासह ते स्थान सोडते. तिचा द्रौपदीला बहुपतित्व मानायला भाग पाडून भावांभाषांचे एकत्रित करणे? कर्णाकडे आपल्या पाच मुलांना जीवनदान मागते. इतकेच नाही तर शेवटी युद्धात कुरुवंशाचा महाविनाशानंतरही ती पुन्हा वंशासाठी गर्भधारणेचा द्रौपदीला सल्ला देते.

यामधील कायम भव्यदिव्य दिसणाऱ्या राजमहालांचे वातावरण युद्धकाळात चणचण भासणाऱ्या काळ्या सावटाखाली  होते, हे वाचणे अगदी वेगळा अनुभव देते. जसे –

दिवा लावायला तेल नाही म्हणून धृतराष्ट्र दासीला ऋण घेऊन तेल आणण्यास सांगतो.द्रोण दुधावर वा पाण्यात सातूवर भूक भागवतात. 

युद्धात सर्व मनुष्य, प्राणी शक्ती पूर्णपणे वापरली जाते. युद्धाच्या पार्श्वभूमीवर सैनिकांचे, सेनापतींचे दैनंदिन जीवन, खाण्यापिण्याची व्यवस्था आणि युद्धपटांचे  वर्णन इतके तपशीलवार आहे की वाचताना पोटात खळबळ वाटते.

--युद्धात इतकी जीवितहानी होते की सर्वत्र मांस, रक्त यांचा खच पडतो, प क्षी प्राणी प्रेतांवर झुंबड उडवतात. 

--माणसांच्या मलाचा सर्वत्र दुर्गंध पसरतो.

या अशा कारणांमुळे युद्धभूमी-युद्धाचे ठिकाण बदलून ठराविक काळाने वा दररोज पुढे पुढे स्थान सरकवले जात असे.

--युद्धात मेलेल्या घोड्याच्या मांसाचे भक्षण अन्नटंचाईमुळे करावे लागते.

--संजयाला कुरुक्षेत्राकडे मोठमोठाले यानंतर कापत जाई आणि तितक्याच वेगाला पुन्हा परत महाली येऊन सर्व युध्द खबरबात धृतराष्ट्राला सान्गत असे ,दूरदृष्टीचा प्रश्नच मिटला. 

--शेवटी कृष्ण गांधारीला आपल्या डोळ्यावरची पट्टी काढायला सांगतो ,असा अकल्पनीय शेवट मी पाहिल्याचं वाचला . 

महाभारत ---

"कुरुक्षेत्र हे युद्धाचे मैदान नव्हे, ते एक प्रचंड कत्तलखाना होते. मनुष्य, प्राणी, रक्त, मांस आणि हाडांचा ढिगारा. जे जिंकले त्यांनाही काही मिळत नाही.फक्त रिकामे हात आणि रक्ताने माखलेले मन."

--भक्ती 

Friday, December 26, 2025

संस्कृती - इरावती कर्वे(पुस्तक परिचय)

 संस्कृती 

लेखिका- इरावती कर्वे

संस्कृती म्हणजे संचय... वर्तमानकाळात श्रीमंत भूतकाळची कर्तबगारी मागच्या पिढीकडून जे जे मिळाले ते . ५०-७० वर्षापूर्वीचे हे संस्कृती पुस्तकातील समाजमनाचे विश्लेषण करणारे लेख आजही काळातीत आहे.इरावतीबाईंची 'आमची संस्कृती' ,'मराठी लोकांची संस्कृती' ही पुस्तकेदेखील मानववंशशास्त्र हा त्यांचा विषय या दृष्टिकोणातून लिहिला आहे. 'मराठी लोकांची संस्कृती' या पुस्तकाची पीडीएफ आंतरजालावर सहज मिळेल,नक्की वाचा. 



'संस्कृती' पुस्तकातील पहिलया  सात लेख  रामायण महाभारतातील गोष्टी संशोधक वृत्तीने अभ्यासल्या आहेत.  

महाभारत आणि रामायण-१,महाभारत आणि रामायण - २

या दोन्ही लेखांत रामायण व महाभारत या दोघांमधील विस्तृत साम्य व फरक मांडले आहेत. रामायण-काव्य तर महाभारत-इतिहास. महाभारतातील विविध 'पर्व' तर रामायणातील विविध 'कांड' यातील पुरुषांचा संघर्ष सांगताना , एक महाभारतातील संघर्षाची बीजे सुरुवातीलाच रोवली असल्याने कथा  एकसंध वाटते. तर रामायणात संघर्षभावना विविध वेळी येते व नाहीशी होते असल्याने कथा विस्कळीत वाटते. दोघांमधील अहिंसेबद्दलचे उल्लेख निराळे आहेत. दोन्हींमध्ये पितृप्रधान, बहुपत्नीक कुटुंब पद्धतीत जे संघर्ष व द्वेष आहेत त्यानुसार कथा दिसतात.परंतु महाभारतात भावाभावांचा संघर्ष माणसांचा अंत करतो, तर रामायणात गळे कापण्याऐवजी भावाभावांना एकमेकांच्या गळ्यात पडता येते हे सिद्ध होते.

यानंतर 'अयोध्याकांड (राम वनाला जातो)' यामधील दशरथ राजाच्या कृतीचे अनेक पद्धतीने, विविध कथा-अभ्यास करून खोल विवेचन आहे. 'भरत आजोळी असतानाच, दशरथाने राज्याभिषेकाची घाई का करावी?, कौसल्या व कैकयीचे नाते खरेच कसे होते? असे अनेक कधीही विचार न केलेले मुद्दे पाहायला मिळतात.

'अयोध्याकांड - २ (भरत भाव)' यात भरताने आपले राज्य नाकारत भावाकडे वनी धाव घेतली तेव्हा त्याचा प्रवास ,पितृशोक समाचार रामाला सांगणे ,मातासमवेत पुन्हा अयोध्या गमन हे सांगताना ,रामाने १४ वर्ष प्रतिज्ञा पाळण्याचे का ठरवले? हा प्रश्न मनात हा लेख पेरूण  जातो .


'अरण्यकांडात' रामाचा प्रवास नक्की रामायणातील ठिकाणे कोणती हे विविध संदर्भाने अभ्यासले आहे. रामाने आयुष्यात चारदा गंगा ओलांडली.

१. विश्वामित्रांसह यज्ञ रक्षणाला जाताना

२. जनक यज्ञाला उत्तरेकडे गेले तेव्हा

३. वनवासाला जाताना

४. लंकेतून सीतेला घेऊन येताना

हंपी, गोदावरी, सध्याची लंका ह्या मागाहून रामकथेच जोडल्या गेल्या असतील का? कालीदासाच्या वेळेपर्यंतचे बदल झाले.

पुढे 'सीता' व 'सासवा सुना' हे लेख सीतेला सीतेच्या आणि महाभारतातील 'सत्यवती, अंबिका, अंबालिका या स्त्रियांच्या आयुष्यातील घटनाक्रम व त्याचे काम महाभारताच्या कथांवरचे परिणाम मांडले आहेत.

सासवा सुनांमध्ये पराधीन दुर्दैवी या तीन बायकांमुळे/नारीमुळे महाभारत कथेला जन्म मिळाला.

त्यांना व्यंग असणारी मुले व्यासाला त्यांनी दर्शविलेल्या अबोल विरोधामुळे निपजली व महाभारत युद्ध सुरू झाले असेही म्हणता येईल.

पुढचे अध्याय 'धर्म' हा एक अत्यंत समतोल भाषेतला लेख आहे. यामध्ये अगदी आदिमानवापासून आतापर्यंतच्या समाज जीवनात 'धर्म' म्हणजेच आचारसाधनेचा उगम व प्रवास थक्क करणाऱ्या तथ्यांसह वाचायला मिळतो. यामध्ये स्त्रियांचे, पुरुषांचे तंत्र व वागणुकीचे स्वतंत्रपणे विवेचन मिळते. त्यानंतर सामाजिक मूल्यांचे सांप्रदायिक, कायदेविषयक (दोन्ही आचारमय) आणि  नीतीतत्त्वांच्या दृष्टीने (मन: प्रवृत्ती) तत्त्वे कशी काम करतात हे विविध उदाहरणांनी मांडले आहे.समाज रचना  काळ सतत बदलत असतो. ती बदलती सत्ये आकलन करून त्यानुसार वागण्याची ताकद, सत्यशोधन सतत चालू ठेवल्याने मिळू शकते.

शेवटी नरहर कुरुंदकर यांनी एका दीर्घ वैचारिक लेखातून इरावतीबाईच्या थोर चिंतनाचा आढावा 'श्रद्धांजली' यात घेतला आहे. एकाच ठिकाणी गृहिणी,गार्गी आणि मराठी कवयित्री यांचा संगम अनोख्या पद्धतीने 'इरावती कर्वे' या महान व्यक्तिमत्त्वात झाला आहे. -

 भक्ती - २६/१२/२०२५.

Monday, December 22, 2025

Pune Book Festival 2025

 











मागच्या वर्षी पुणे बुक फेस्टिवल खूप भव्य दिव्य आवडले होतं .माझी वाचनाची आवड पाहता सगळ्या मैत्रिणी आश्चर्याने "तू अजून पुणे बुक फेस्टिवलला गेली नाहीस का?"विचारत होत्या.अखेर शेवटच्या दिवशी फर्ग्युसनला पोहचलेच. सगळ्या स्टॉलची लिस्ट आदल्या दिवशी प्रिंट करून आणली होती पण मी ती घरीच विसरले त्यामुळे परत नव्याने प्रदर्शन आणि पुस्तक पाहायला सुरु केले.व्यंकटेश  माडगूळकरांचे पुस्तक हाती घेतलं की ते आपण टाळूच शकत नाही-जंगलांतील दिवस . 

निरंजन घाटे यांचेही एक पुस्तक मी दरवेळी मी घेतेच,मला अनेकदा तथ्यापर्यंत पोहचण्याला त्यांचे पुस्तक मदत करतात -खेळ आणि विघ्यान 

साधनांच्या स्टॉलवर मला खूप गर्दी तीही दर्दी वाचकांची वाटली ,त्यांनी पुढच्यावेळी मोठा स्टॊल घ्यायला हवा. -मन्वंतर,पुढे जाण्यासाठी,बिजापूरची डायरी 

भैरप्पांची पुस्तक आतापर्यंत स्टोरीटेलवर ऐकली पण हार्ड कॉपी पहिल्यांदा घेतली -सार्थ 

विवेकानंदांची खूप दिवसांपासूनची राजयोग,कर्मयोग,प्रेमयोग,घ्यांयोग ,भक्तियोग हि घ्यायची होती तिची घेतली. 

सिग्मोईडची पूस्तक वाचायला सुरुवात करणार आहे.-Psychopathology of Everyday Life

आता माझ्या व इतर अनेकांच्या  पुस्तकपरिचयाच्या लेखनाला कायम कौतुकरूपी प्रोत्साहन देणारे वाचनवेडा या फेसबुक आणि कायप्पाचे आधारस्तंभ विनम्र भाबळ प्रत्यक्षात मला ओळख देत समोर आले "कशा आहात?"नावाप्रमाणेच त्यांचे  बोलणं खूप विनम्र आहे. 

खूप दिवसांपासूनचे पाहिजे होते ते  'महामाया निळावंती ' प्रत्यक्ष लेखकाकडून 'सुमेध' यांच्यकडून स्वाक्षरीसह स्वीकारले.तसेच कॅन्सर फायटर 'ब्युटी ऑफ लाइफ' च्या लेखिका आशा नेगी मॅडम बरोबर पाच सहा मिनिटेच चर्चा करून प्रेरणादायी वाटले. 

अजून खरी पुस्तकाची लयलूट ,आनंद लेकीनेही घेतला-सुधामूर्ति यांचे गोपीचे पुस्तक .कुल्फी ,चिकू पिकू च्या स्टॊलवर ती मनमुराद रमली . ikakey (एक कि)हा  नवीनच उपक्रम म्हणजेच ऑडिओ बुकाचा मुलींसाठी शालेय ऑडिओ बुकाचा या ठिकाणी समजल्याने व तिला आवडल्याने सबस्क्रिब केला. सह्याद्री ट्रेकर्स सामाजिक संस्थेचे अनेक पुरात्तव वर्ग मो ऑनलाइन केले,त्याचे हरहुन्नरी आयोजक पैजा आणि सुदर्शन भेटल्याने पून्हा झालेल्या शैव,वैष्णव,लेणी वर्गांची उजळणी झाली . तरी महाराष्ट्र संशोधन संस्था,गीता वर्ग हे पाहायचे राहिले. चकटफू  सुंदर बुकमार्कस  आणि आंनदमठ मिळाल्याने मजा वाटली . 


मनातील भावनांच्या लाटा उसळतात आणि शांत होतात पण जे पुस्तक तुम्ही वाचता त्याने तुमच्या मेंदूचे जाळे (synapse)निरोगी होतं राहत 

हे कागदांचे पंख मनाला स्वच्छंदी तर करतातच...

***

आपल्या मेंदूंमध्ये, काही तासांमध्ये नवे सायनॅप्सेस तयार होतात. उदाहरणार्थ, हा एक परिच्छेद वाचल्यामुळेदेखील तुमच्या मेंदूच्या रचनेमध्ये थोडेफार बदल होतात, न्यूरॉन्सना नव्या जोडण्या करण्यासाठी किंवा जुन्या कड्या टाकून देण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. जेव्हा तुम्ही वाचायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही आधीपेक्षा किंचित वेगळे असता. जनुकीय पातळीवरही गोष्टी आश्चर्यकारकरीत्या लवचीक असतात. व्यक्तीचा डीएनए जरी आयुष्यभर सारखाच राहत असला, तरी तीच जनुकं जशी अभिव्यक्त झाली असती, त्यामध्ये एपिजेनेटिक आणि पर्यावरणीय घटकांमुळे भरपूर बदल होऊ शकतो

-नेक्सस(युवाल हरारी)

माझ्या खरेदी केलेल्या पुस्तकांची ओळख 

https://youtube.com/shorts/39pRvSY6fEg?si=A3cG-5EM4m4V_Ykj

मिपा कट्टा २०२५

 रविवारच्या मिपा कट्ट्याची वेळ ४ ते ६ होती पण पुस्तक प्रदर्शनात ३ वाजताच आबा भेटला. आमचा कट्टा एक तासच अगोदर सुरु झाला . मी आबाला कौतुकाने खरेदी केलेल्या पुस्तकांची भरलेली पिशवी दाखवली . तर आमचे हे आणि आबा रखरखीत खान्देश आणि मराठवाड्याचे पाणी ,उद्योगांवर चर्चा करत होते ;)

आबा म्हणाला मी रामचंद्र काकांना शोधून आणतो आणि तो अर्ध्या तासाने परत आला. रामचंद्रकाका आल्यावर आम्ही फर्ग्युसन महाविद्यालय ते वाडेश्वरला गाडीतून वाट काढत निघालो.रस्त्यात ब्रिटिश लायब्ररी (जुनी),टाइम्सचे कार्यालय,रानडे इन्स्टिट्यूट याची इमारत कामकाज सांगितलं ... एक हेरिटेज वॉकच यानिम्मिताने झाला. वाडेश्वरला पोहचल्यावर स्वधर्म मिसळपाव.कॉम चा फलक घेऊन उत्साहाने उभे होते हे छान वाटले. टर्मिनेटर सोडता बाकी सर्व मिपाकर कट्ट्यासाठी हाजीर होते.स्वधर्म,कुमार १ यांचे छायाचित्र आधी पाहिल्याने ते ठाऊक होते पण यापैकी अभ्या आणि चामुंडराय याना प्रथम पाहिले . आता आम्ही टर्मिनेटर यांची वाट पाहत होतो. 

काही मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर एक टेबल मिळाल्यावर मिसळपाव कट्टा रंगायला सुरु झाला. आणि मग थोड्याच वेळात टर्मिनेटर यांचे आगमन झाले...आता जे येणार त्यापैकी सर्वजण आले पण 'येऊ शकतो' यातले 'किल्लेदार' मिपाकर राहिले हे समजले.

सर्वांच्या ओळखी सुरु झाल्या . मला तेव्हा समजले आजचे सर्वच मिपाकर आपल्या व्यावसायिक क्षेत्रातही धुरंधर आहेत. विशेष म्हणजे प्रत्येकाचे क्षेत्रातले अनुभव ऐकण्यासारखे होते. मधेच वेटर मिसळपाव. कॉम फलक पाहून मिसळपावचे ऑर्डर देणार का हे गंमातीने म्हणाला आणि एकाच हशा पिकला ... हायला पुण्याचे वेटरही हजरजबाबी आहेत कि अस मला वाटलं :)

पलिकडच्या टेबलाच मला खास ऐकू नव्हतं पण कुमार १ ,चामुंडराय ,स्वधर्म यांच्याशी मी त्यांच्या -माझ्या लेखनाविषयी ,मतांविषयी अल्प बातचीत केली. मग आंतरजालावरच्या इतर चांगल्या गोष्टींची चर्चा झाली ,सर्वात सुंदर ,वापरायला सुंदर संस्थळ मिपाच आहे याबाबत सर्वांना मिपाकर असल्याचा आनंद समाधान आहे हे जाणवलं पण सर्व्हर ,इथली कमी लोकसंख्या अनेकदा रसोभंग करतो याबाबत थोडी नाराजी वाटते हेही एकमत झाले. 

सॅन्डविचवर माझ्या लेकीने चांगला ताव मारला ,स्वधर्म यांचेही सँडविच तिने फस्त केले. चामुंडराय यांनी आणलेलया 'तीर्थ' मिश्रित चॉकलेट बाटल्या भारीच दिसत होत्या. पाच वर्षांपूर्वी माझ्या एका विद्यार्थ्याचा सुरु वाईनचा प्रोजेक्ट होता तेव्हा मी आणि मैत्रिणी सॅम्पल टेस्टिंग नावाखाली चढेपर्यंत वाईन प्यायलो होतो.पण आज अहोंसमोरच हे तीर्थ पिताना आता घरी निदान वाईनची बाटली आणायला हरकत नाही असे वाटतंय :)

मी आणलेली पालक शंकरपाळी,तिळगुळ वड्या व माझ्या इतरहि अनेक पाककृतींचे सर्वानी कौतुक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.. 

इकडे आमच्या यांना आधीच तंबी दिल्याने त्यांनी श्रोता होण्याचे स्वीकारले :) गिरीजाला मात्र हे काका मला कसे ओळखतात याचे आश्चर्य वाटत राहिले. 

अखेर कट्टा समारोपाकडे वळाला तेव्हा कुमार १ यांनी तेंडुलकरांचे स्त्रीचे आयुष्यातले मोलाचे स्थान अशा आशयाचे खूप सुंदर शब्दांचे सादरीकरण केले ... 

हळू हळू आम्ही डेक्कनच्या गर्दीत कट्ट्याच्या आठवणी घेत विरून गेलो... जय मिपा :)






Tuesday, December 16, 2025

मुळ्याचा चटका

 मुळ्याचा चटका

लिंबू, दही असे घालून चटकदार, हिरव्या मिरच्या घालून झणझणीत, वरून भुरभुरलेली कोथिंबीर, खोबरे आणि मुख्य म्हणजे कच्च्या (रॉ) चवीच्या भाज्या, फळे यांच्या कोशिंबिरी, वाटलेली डाळ, कोसांबरी पहिल्यापासून फार आवडतात.

या सर्व वर्णनात तंतोतंत बसणारी कैरीची डाळ तर जीव की प्राण आहे.इतर हळदी-कुंकू मागे पडले. पण कैरीची डाळ, पन्हे, पानाफुलांनी गंधित चैत्र... यासाठीच चैत्रगौर मी खूप उत्साहाने करते.

आता ऐन थंडीत कोण बरे अशा पाककृतीत परफेक्ट बसणार? गाजर? नाही, तो गोडगोड हलव्यातच बरा... तर तो मुळा! वेगवेगळ्या पदार्थांची नावे घेतली की पंचेंद्रिये सळसळायला हवीत! हलव्याचा गाजरी रंग डोळ्यांना- दोन्ही आरोग्याने आणि दृश्याने सुखावतो. हुरड्याचा गंध अस्सल आहाराचा नाकात भरतो. यात जर मुळा म्हटले की त्याचा उग्र वास, कडवट चव नाकाला नकोशी होते.

मुळ्याचा चटका या पाककृतीत मात्र ती चव बन्यापैकी बॅलन्स होते. कैरीच्या डाळीप्रमाणे यातही भिजवलेली हरभरा डाळ, मिरच्या मुख्य घटक आहेत. पण अजून पौष्टिकता वाढावी व हरभरा डाळ आवडत नसल्यास भिजवलेले हिरवे मूगही वापरले आहेत. वरून चुरचुरीत तेलाची फोडणी म्हणजेच चटका दिला की झाला मुळ्याचा चटका... लय भारी!



साहित्य

१ मोठी वाटी किसलेला मुळा (साधारण २ मुळे)

१/२ वाटी भिजवलेली हरभरा डाळ

१/४ वाटी भिजवलेले हिरवे मूग

४ हिरव्या मिरच्या

१/४ वाटी किसलेले खोबरे (ओले किंवा सुके)

१/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर

एका लिंबाचा पूर्ण रस

चवीपुरते साखर व मीठ

फोडणीसाठी: जिरे, मोहरी, लाल सुकी मिरची, हळद, हिंग

कृती

१. भिजवलेली हरभरा डाळ, मूग, मिरच्या, दोन चमचे कोथिंबीर मिक्सरमध्ये वाटून घ्या.

२. वाटलेल्या डाळीला किसलेल्या मुळ्याबरोबर एकत्र करा.

३. या मिश्रणात खोबरे, कोथिंबीर एकत्र करा.

४. लिंबाचा रस घालून नीट मिक्स करा.चवीनुसार मीठ व साखर घाला.

५. तेलात जिरे, मोहरी, लाल सुकी मिरच्या, हळद, हिंग यांची फोडणी करून मुळ्याच्या डाळीला चटका द्या.

६. लहान मुले तरीही खात नसल्यास डोश्याच्या पीठात किंवा धिरड्याच्या पीठात हे मिश्रण टाकून डोसे किंवा धिरडे बनवा.

७. कच्च्या मुळ्याची जी चव आहे, ती अनुभवण्यासाठी याला अजिबात वाफवू नका.

ही रेसिपी हिवाळ्यातील पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे, ज्यात मुळ्याची कडवट-उग्र चव डाळ,लिंबू आणि फोडणीतून परफेक्ट बॅलन्स होते. तोंडी लावण्यासाठी किंवा सलाडसारखी भाकरी-भाजीबरोबर उत्तम!

Sunday, December 7, 2025

पुस्तक -#स्वतःला_जगवत_ठेवण्याचे_प्रयोग



पुस्तक -#स्वतःला_जगवत_ठेवण्याचे_प्रयोग

लेखिका -#ऐश्वर्या_रेवडकर


स्वतःचे अवकाश शोधणाऱ्या स्वच्छंदी मुली लग्न संस्थेतील कच्चे दुवे ,पुरुषत्वाचा दुराभिमान, पितृसत्ताक वर्चस्व, स्त्री-आदरातील सामाजिक दांभिकता या मुद्द्यांपर्यंत तटस्थपणे नक्कीच पोहोचतात.तेव्हा त्या विचारांना फेमिनिझम म्हणत आपण हेटाळतो .पण फेमिनाईन/ faminine energy सारखी सुंदर गोष्ट ज्यासाठी स्त्री-लैंगिकता व स्वातंत्र्य याबाबत बोलणंही, समजून घेणेही गरजेचे असते,हे भारतीय समाजात कोणाच्याही गावी नसते.याविषयी मतं मांडण हे अनेक सामाजिक संकेत मोडण्यातहजमा आहे. तिथे ही कादंबरी एक अबोल विषयातील  एक सूर्यफुल आहे, स्वच्छ ब्राईट!

कादंबरीची नायिका मुक्ताचे अनेक प्रकारच्या पोरकपण तिला ज्या ज्या वेळी हक्काचं घर, स्पर्श, शांती मिळाल्याचं सुखाने न्हाऊ पाहत,त्यात्यावेळी पुरुषाची फुकाची मर्दानी/पुरूषत्व त्या साऱ्याचा चुराडा करते. कादंबरीत मुक्ताची फरफट वाचत असतांनाच तिचं आपल्या अवघड अशा ‘सर्जरी’ कार्यातील  डॉक्टर म्हणून एकाग्रता थक्क करते. बाई स्वतःच्या पायावर उभी असणं, तिच्या कामाची ती स्वाभिमानी असणं हा तिच्या अवकाशाचा पाया आहे, हे पुन्हा पटतं.

अशा काळ्यागहिऱ्या  आयुष्याच्या लाटांवर शरीराच्या नावेला अनेकदा आत्महत्येचा भोवरा गिळंकृत करू पाहतो. पण दरवेळी उठून उभी राहणारी मुक्ता अजब रसायन आहे.

खूप दिवसांनी आयुष्याचे जसं आहे तसं उघडं-नागडं सत्य सांगणारी, स्वीकारायला लावणारी कादंबरी वाचली. कुठेही जडजड वाक्यांचा मुलामा देत कादंबरी वाढवून मांडलेली नाही.

सारे समाज नियम माणसानेच बनवले आहेत.त्यात अडकून न राहणाऱ्या स्वतः स्वतःच्या नियमांनी जगणाऱ्या मुक्ता  आजूबाजूला नक्कीच आहेत.

-भक्ती