Monday, September 29, 2025

व्हिन्सेंट व्हान गॉग -अभिवाचन प्रयोग

 व्हिन्सेंट व्हॅन गॉग (१८५३-१८९०

 उर्सूलाच्या(युजेनी) प्रेमात पडलेल्या व्हॅन गॉग सुरुवातीच्या काळात अनेक शेतातील चित्रे रेखाटली .अगदी तिला लग्नाची मागणी  घातली, पण त्याच्या भ्रमाचा भोपळा फुटला. तीने तिचे लग्न आधीच ठरल्याचे सांगितले. विन्सेंट च्या आयुष्यात प्रेमाची कमतरता कधीच भरून आली नाही.



विन्सेंट व्हॅन गॉग, एक डच चित्रकार, ज्याच्या जीवनाची कथा उत्कटतेने आणि दुखद घटनांनी भरलेली आहे. आयुष्यात जिवंतपणी त्याचे केवळ एकच चित्र विकले गेले. तरीही चित्रांची साथ त्याने शेवटपर्यंत सोडली नाही



सूर्यफूल "आणि "तारांगित रात्र" ह्या चित्रांनी त्याच्या मृत्यूनंतर त्याला अमरत्व दिले. - अशा रंगांच्या जा‌दूगाराची एकाकी कहाणी लेखक-आर्यविंग स्टोन यांनी लिहिली. ज्याचा अनुवाद माधुरी पुरंदरे यांनी केले. हीच गोष्ट व्हान गाँगच्या चित्रांसह अभिवाचन‌ कलाकृतीद्‌वारे सादर करण्याचा यशस्वी प्रयोग  शेखर नाईक यांनी साकार केला. धनेश, धीरेश, श्रद्धा, अश्विनी यांनी आवाजाच्या अप्रतिम सादरीकरणातून या चित्रकाराची कथा उलगडून सांगितली.



खरे पाहता त्याच्या घरातच कलाक्षेत्रातील कलाकृतींचे विक्रीचे धागेदोरे  होते. पण प्रेमाच्या शोधात विन्सेंट नंतर अजूनच एकाकी झाली पुढे त्यांना धार्मिक श्रद्‌धेची गोडी लागली व पाद्री बनण्याचा प्रयत्नही केला. याबाबतचे ऑफिशल पदवी ना तत्सम अभ्यासक्रम ते पूर्ण करू शकले नाही परंतू बेल्जियमधील बोरिनेज येथील कोळसा खाणी भागात त्यांनी मिशनरी म्हणून काम स्वीकारले.



 तिथल्या गरीब लोकांप्रमाणे राहण्याचे ठरवून त्याने मोठे घर सोडून लहान झोपडीत राहायला सुरु केले. काळाचा घाला पडला एका दुर्घटनेत अनेक खाण कामगारांचा मृत्यू झाला .या दुःखाच्या काळात तो सामान्यांप्रमाणे त्यांच्यासोबत होता पण चर्चला हे प्रतिष्ठेला धक्का वाटल्याने त्यांनी त्यात्या लोक या पदावरून दूर केले.

तरीही पुढे या काळातील कथा सरकतांना खाणीतील कामगारांचे त्यांच्या कुटुंबाचे अशांततामय

कष्टमय जीवनही व्हिन्सेंटने चित्रात रेखाटले, जी चित्रे मी कधीच पाहिली नव्हती.



अशाच उतरत्या काळातही -कुपोषणाच्या अवस्थेत ते गेले.पण भावाच्या थिओ यांच्या सांगण्यावरून पुन्हा मन लावून चित्रे काढू लागला. भावाने दिलेल्या आर्थिक मदतीने चित्र काढत होता. घरालाही पिव‌ळा रंग दिला, yellow house तो त्याचा स्टुडिओ होता. पुढे एका वेश्येशी त्याची ओळख झाली तेथील वेश्यालयाचेही अनेक चित्र  त्याने रेखाट‌ले. चित्रकार गॉगीनने त्याला आठवणीतून चित्र काढण्याची सूचना केली, त्यानुसार त्याने अनेक गर्द रंगांची चित्रे रेखाटली. पण चित्रकाराला पोटाची भूक अनेकदा मिटवता येत नसे .अशा अनेक ताणतणावात गोगीन- व्हेन गॉगची मैत्री तर तुटली पण कानही तुटला..... अशाच एका भ्रमाच्या वेळी व्हिन्सेंटने स्वतःचा कान कापला होता, तो कान त्याने वेश्यालयातील गॅबीला दिला...?





व्हॅन गॉगला वेडा समजून त्याची रवानगी लोकांच्या तक्रारीमुळे  मनोरुग्ण दवाखान्यात करावी लागली. तिथल्या डॉक्टर रे' यांच्या सहा‌नुभूती वागणूकीने त्याला हायसे वाटले असेल.तिथे क्लिनिक,बागा,प्रिझनर राऊंड, स्टाररी नाईट चक्रव्यूहाचे चित्र अशी अनेक चित्रं रेखाटली.

'स्टारसी नाईट' हे चक्रव्यूहासारखे चित्र याच काळात काढले.



परंतू १९९० नंतर गंभीर आजारात असतानाच गव्हाच्या शेतात स्वता:वर गोळी झाडली. तो आधीच अशक्त झाला होता, त्यात जखमेचा संसर्ग वाढून तीन दिवसातच व्हॅन गॉग मरण पावला. अंतिम काळातही भावाने 'थिओने धाव घेतली पण "दुःख कायमचे राहीले" गॉग मृत्यू पावला.


पोट्रेट, निसर्गचित्र, फुलं, ऑलिव्ह, फळबागा, शेतं, समुद्र होड्या अशी अनेक हिन्सेंट व्हॅन गॉग यांची चित्रे आज सर्वात अधिक मूल्य मिळवणाऱ्या चित्रांपैकी आहेत.पण विन्सेंट व्हॅन गॉग यांचे आयुष्य कायम दुःखमय राहिले.



त्याच्या आयुष्याच्या अनेक घटना अजून आहेत पण  अभिवाचनाच्या  वेळेमर्यादेमुळे थोडक्यात खुप कल्पकपणे व्हेन गॉग #ऊर्जा_रंगभवन येथे सादर झाला.

-भक्ती

Wednesday, September 24, 2025

नवरात्री निमित्ताने

 नवरात्री निमित्ताने 


परवा एक आंतरजालीय व्याख्यान ऐकत होते त्यामध्ये हडप्पा काळापासून ते आताच्या काळापर्यंत 'घट' (मडके) याचे बद‌लले स्वरूप, त्या निगडीत प्रथा सांगितल्या गेल्या. व्याख्यान जरी घाईत ऐकले तरी काही मुद्दे लक्षवेधक, नवीन होते.


'घट' हा मृत्तिकेपासून बनवलेला विविध हेतू‌साठी धार्मिक विधी, साठवणूक, सामाजिक प्रथांसाठी वापरला जात असे.



सिंधू संस्कृतीत व त्या नंतरच्या काळातही द‌फनविधी साठी घटाचा वापर होत असे.जे जन्म ,मृत्यू, पुनर्जन्म  यांचे प्रतिक आहे.घट हा माती, पाणी यांनी तयार होतो. आणि हीच तत्त्वे नव्याने धान्य म्हणजेच सृजनासाठी आवश्यक आहेत. तसेच मानवी जन्म स्त्रीच्या उदरातून होतो तेव्हा स्त्रीचे उदर घटाप्रमाणेच गोलाकार दिसते. 'स्त्री ही सृजनकर्ता, घटरूपी सृजन मानली गेली. मृत्यूनंतर पुन्हा जन्म मिळावा यासाठी मग दफनविधीसाठी घटांचा वापर होत गेला. घटरूपी आकारातून सृजन होते. अशावेळी कुंभाराकडून मृत्य व्यक्तीसाठी शरीर आकारानुसार घटरचना होत. लहान मुलांसाठी मध्यम आकाराचे मडके पुरेसे असत. तर मोठ्या माणसांसाठी मोठ्या आकाराचे चार-पाच मडके एकावर एक अशी आतून पोकळ बनवली जात. त्यात देह ठेवतांनाही त्याचे हात पाय छाती-पोटाजवळ ठेवले जात जे गर्भात असतानाही असेच असतात. अशाप्रकारे दफन केल्यामुळे  ज्यातून सृजन होणार कशा गर्भासारख्या घटातून मृत्यूनंतर जीवनात योग्य जागी मृत व्यक्तीचे सृजन सहज व्हावे

ही श्रद्‌धा! अशाप्रकारचा दफनविधी कमी झाल्यानंतर पुनर्जन्माचे प्रतिक म्हणून केवळ एखादेच मडके शवाजवळ दफन करतांना ठेवले जाऊ लागले.



हळूहळू या 'स्त्री शक्तीची सश्रद्‌ध आराधना घटस्थापना या रीतीरिवाजात झाली. घट ज्या आत पाण्यातून, मृत्तिकेच्या संपर्कातून बीजारोपण होऊन सृजन धान्यरूपातून उगवते. हा सर्व जागरही नऊ रात्री- गर्भारपणाच्या नऊ महिन्यांचे प्रतिक दर्शवितो.

पुढे या घटाभोवती आनंदोत्सव गरबा गोलाकार आकारात खेळला जाऊ लागला. नंतर अनेक विधींमध्ये धातूचा  कलश पाणी नारळ पाने  सृजनाचे प्रतिक /देवीरूप म्हणून मांडले गेले. तत्कालीन जीवनातील जन्म- नश्वरतेचा विचार प्रत्येक कामात होत असे. मग तो सुतार लोहार, कुंभार कोणीही असे. सृजन आणि नाश‌ चक्र प्रत्येक ठिकाणी असतेच.घट घडवणाऱ्या कुंभारांनीही या सृजनाचा जागर समाज घडीत रचला.


तुकारामांनी थेट विठ्‌ठलालाच 'वेडा कुंभार' म्हटले आहे तर माणसाच्या जीवनाला मडक्याची उपमा दिली आहे.


माती पाणी उजेड वारा। तूच मिसळशी सर्व पसारा

आभाळचि मग ये आकारा। तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे

अंत ना पार||


पहिल्या ओळीचा अर्थ सरळ आहे माती , पाणी, उजेड, वारा या चार तत्त्वांचा उल्लेख पंचमहाभूतांशी पृथ्वी, जल, तेज, वायू यांच्याशी जोडता येतो. मानवी शरीरही याच पंचमहाभूतांनी बनले ही धारणा आहे. वि‌ठ्ठल हे सर्व एकत्र करतो अक्षरशः या पसाऱ्याशी खेळतो. माती पाणी सृजनासाठी तर उजेड, वारा जीवनाला गती देतो, हीच गोष्ट कुंभार मडकी-घट बनवताना करतो. आभाळ आकाराला येते- आकाश विश्व जे विशाल आहे ते साकारले सजीवांसह जाते.तुझ्या घटांच्या 'उतरंडी म्हणजे माणसांच्या, सजीवांच्या लहान मोठ्या प्रजाती उद‌याला येतात. कुंभारही लहान ते मोठ्या आकाराची मडक्यांची उतरंडच  बनवत असतो. अशा या मडकं बनवण्याच्या, सृष्टीच्या जीवांच्या जन्म मृत्यूच्या चक्राला, सीमेला कोणतीच सीमा नाही.


घटाघटाचे रूप आगळे । प्रत्येकाचे देव वेगळे । तुझ्याविना ते कोणा न कळे। मुखी कुणाच्या पडले लोणी कुणामुखी अंगार||


आता घट म्हणजे मानव ठरले! 

या घटामध्ये  मानवामध्ये किती ते दिसण्यात,व्यक्तिमत्वात,विचारात वैविध्य आहे. तर प्रत्येक 'घट'  इतरांपासून निराळा आहे. प्रत्येकाचे व्यक्तीमत्त्व निराळे आहे.अशा प्रत्येक मनुष्याचे कर्म व दैव यांचा समतोल कसा  साधता येतो की नाही हे ईश्वरालाच ठाऊक असते.त्यामुळे समतोल साधला  असेल तर लोणी(आनंद) नाहीतर जीवनभर अंगार (दु:ख)!

-भक्ती

Wednesday, September 10, 2025

Kpopdemonhunter

 


खर म्हणजे तिच्या बरोबर कूंफू पांडा बघायला खूप धमाल येते.तिचं ते सात मजली , खळखळून हसणं मी सुखाने पाहत राहते.लेट ईट गो असं लहानपणी ती मनापासून गाताना आनंदून जायचे.उशीच्या खोळीपासून शाळेच्या कंपास, पर्यंत सगळीकडे फ्रोजनचे एल्सा,ॲना,ओलेफ दिसू लागले.डिस्नेच्या प्रिन्सेस तिच्या बोलण्यातून तीच्या मैत्रीणी भासतात.

के फॉर काईट शिकवण्याच्या पुढे जाऊन जनरेशन अल्फा असलेल्या माझ्या लेकीने मला के फॉर के-पॉप डेमॉन हंटर(K-POP demon hunter )शिकवलं.

के पॉप म्हणजे कोरियन पॉप.आचच्या पिढीला BTS,Blackpink,Blackswan  यांच्या संगीताने,चमकदार व्हिडिओने भुरळ घातली आहे.

खरंच #kpopdemonhunters  हा ॲनिमेशन सिनेमा खूप सुंदर आहे.

रूमी, मुख्य पात्र, K-pop आयडॉल आणि राक्षस शिकारी अशा दुहेरी भूमिकांमधून स्वतःची खरी ओळख शोधते. हे अस्तित्ववादाशी निगडित आहे, जिथे व्यक्ती स्वतःच्या उद्देशाला अर्थ देते. रूमीचा अंतर्मनातील संघर्ष आणि "What It Sounds Like" गाण्यातील भावनिक प्रवास आत्म-प्रतिबिंब आणि स्वीकार हे दिसते.

या सिनेमातलं गोल्डन,सोडा पॉप,टेक अवे ही गाणी भन्नाट आहेत.लहान मुलांना ज्या वयात अनेक न्यूनगंड जडतात .तिथे हा सिनेमा केवळ मनोरंजनच नाही तर स्वतः वर प्रेम करायला खूप मदत करतो.

Wednesday, September 3, 2025

कल्पद्रुमाचिये_तळी-पुस्तक परिचय

 #कल्पद्रुमाचिये_तळी

#रा_चि_ढेरे

#ज्ञानदेव 



कल्मद्रुमातळी ब्रम्ह पुंजाळले कैसे

दिसते सुनीळ तेज गे 

मज पाहता वेणु वेदध्वनि नाद । 

उमटताली सहज गे बाईजे ।।


ज्येष्ठ लेखक संशोधक रा.चि.ढेरे यांच्या अभ्यासपूर्ण लिखाण कधीच अनेकांच्या लिखाणाप्रमाणे बोजड वाटत नाही. आपल्या संस्कृतीच्या अनेक रुढी परंपरांचे सौंदर्यपूर्ण सादरीकरण त्यांच्या लिखाणाच्या यशाचे गमक वाटते.


'कल्पद्रुमाचिये तळी' या पुस्तकात १९६० नंतरच्या काळात ढेरे यांनी ज्ञानदेव ज्ञानेश्वरी संदर्भात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष लिहिलेले अनेक लेख संग्रहित केले आहेत.चार भागात- श्रीज्ञानदेन, श्रीज्ञानदेवी, परीक्षण निरीक्षण,सौंदर्यवेध यात हे  लेख विभागले आहेत.


पहिल्या भागातील लेखात ज्ञानदेवांची बोधभूमी म्हणजेच नाथ संप्रदाय व तत्कालिन इतर संप्रदायाचा ज्ञानदेवांशी असलेला संबंध अभ्यासला गेला आहे.ज्ञानदेवांची कुलस्वामिनी सप्तश्रृंगी असावी की 'म्हाळसा  असावी याचा उहापोह आहे. तसेच या भागात त्र्यंबकेश्वर या स्थलाचे पुरातन महत्व शैव,शाक्त,नाथ परंपरेशी जोडले गेले आहे हे वाचून आश्चर्यचकित झाले.


दुसऱ्या ज्ञानदेवी' भागात ज्ञानेश्वरीत आलेल्या अनेक शब्दांग सुरसपणे धांडोळा वाचायला मिळतो. कीर्ती प्रासाद, कीर्तन या सर्वांचा उल्लेख 'मंदिर' म्हणूनच आहे. मग धर्मकीर्तन म्हणजे 'धर्मार्थ बांधलेले मंदिर या अर्थाने ही संज्ञा हे उमगली.


ज्ञानदेवांचा "गीतारलप्रासाद हे रूपक साक्षात कैलास लेणं या प्रासादावर आधारित आहे .


तंव विनवी ज्ञानदेवो । म्हणे हो कां जी पसावो ।

तरी अवधान देतु देवो । ग्रंथा आतां ॥ २९ ॥

जी गीतारत्नप्रासादाचा । कळसु अर्थचिंतामणीचा ।

सर्व गीतादर्शनाचा । पाढाऊं जो ॥ ३० ॥

लोकीं तरी आथी ऐसें । जे दुरूनि कळसु दिसे ।

आणी भेटीचि हातवसे । देवतेची तिये ॥ ३१ ॥

तैसेंचि एथही आहे । जे एकेचि येणें अध्यायें ।

आघवाचि दृष्ट होये । गीतागमु हा ॥ ३२ ॥

मी कळसु याचि कारणें । अठरावा अध्यायो म्हणें ।

उवाइला बादरायणें । गीताप्रासादा ॥ ३३ ॥

नोहे कळसापरतें कांहीं । प्रासादीं काम नाहीं ।

तें सांगतसे गीता ही । संपलेपणें ॥ ३४ ॥

व्यासु सहजें सूत्री बळी । तेणें निगमरत्नाचळीं ।

उपनिषदार्थाची माळी\- । माजीं खांडिली ॥ ३५ ॥

तेथ त्रिवर्गाचा अणुआरु । आडऊ निघाला जो अपारु ।

तो महाभारतप्राकारु । भोंवता केला ॥ ३६ ॥

माजीं आत्मज्ञानाचें एकवट । दळवाडें झाडूनि चोखट ।

घडिलें पार्थवैकुंठ\- । संवाद कुसरी ॥ ३७ ॥


 भूतपिशाच गटातले गोंदली कसे 'गोंधळी' होत अनेक देवगण परंपरेत समाविष्ट झाले.


का साधुने गोंदळी। संचरोनि सूये मेळि । 

नाना सुदिनांचा आभाळि। दुर्दिनु कीजे ॥


 लीळा ग्रंथातील कटक शब्द देवगिरी किल्ल्यासाठी आहे यासाठी"अनेक संशोधकांनी असंख्य ग्रंथ चाळले आहेत.ज्ञानेश्वरीतही देवगिरीसाठी हाच कटक शब्द योजिला आहे.


महानुभाव व लिंगायत या समाजाचाही ज्ञानेश्वरीवर बराचसा प्रभाव अनेक ओव्यांत आहे . ज्ञानेश्वरीतील षट्स्थल,षट्चक्रे याच प्रमाणे लिंगांगसामरस्य या संज्ञेसाठी उल्लेख केला आहे.


तिसऱ्या भागात ज्ञानेश्वरांचे चरित्र कोणी कोणी, कोणत्या वेगवेगळ्या काळात लिहिण्याचा प्रयत्न केले हे सांगितले आहे.नामदेव व इतरांचे संशोधन आहे.


 यातील पसायदानाची संहिता या छोट्याशा लेखात  पसायदानात अनेक शब्दांची शुद्वता मांडली आहे.


एणे वाग्यज्ञे तोषखवे । तौखौनि माज द्यावे" एकाच ओवीत दोन भिन्न रूपे का?


भजिजो आदिपुरुषी ऐवजी आदिपुरूखी हेच असावे. 'तापहीन हा शब्द 'तप' तपश्चर्येशी निगडीनत असताना  ताप -उष्णता अर्थाने 'तप' आला नाही.


ग्रंथोपजीविय हे अनेक वचन हवे, ग्रंथोपजीव नाही.


शेवटच्या सौंदर्यवेध हा भाग खरोखर बौद शब्द‌सौंदर्याची रत्नखाणच आहे.ज्ञानेश्वरांच्या अनेक विरहणींचा रसास्वाद आहे. तसेच सगुण ज्ञानदेवांचा सहवास अमृतासम कसा असेल यावर अलौकिक शब्द‌माला गुंफल्या आहेत.


लेखकाप्र‌माणे मलाही वाटले माऊली आताच्या लेकरांनाही तुझे सबाह्य नाही तर तुझी असण्याची प्रचिती अंतरात्म्याला लाभू दे!!"आमच्यासाठीही...


'ताटी उघडा ज्ञानेश्वरा'

-भक्ती